Tuesday, July 18, 2017

 

Aishwarya Yoga, the Yoga of Majestic Affluence

Yoga Of Majestic Affluence
(“Aishwarya Yoga Of The Lord”)  “ऐश्वर्य योग”

Bhagavan Sri Krishna while expounding the Geeta, speaks of Aishwarya Yoga – Yoga of Majestic Affluence (Ch. 9 – 5). Sri Dnyaneshwar Maharaj elucidates it while furnishing simple and convincing metaphors.
To begin with he reiterates importance of Jnyana, which is Atma-Jnyana, Brahma-jnyana or Knowledge of The Self (Swaroopa-Jnyana). It bestows ever-lasting, eternal bliss.
Aishwarya Yoga explains exact format of the non-dual Divine Principle as well as  true nature of Nature, exact status of ‘beings’ in Nature and relationship of ‘beings’ with the ‘Creator’.
Lastly, it emphasises unsullied unique Devotion.

It would be interesting to note at this juncture that Chapters 2, 3, 5, 7 and 8  are solely devoted to rational knowledge acceptable to Buddhi or intellect. Likewise, the ninth chapter is an invitation for the Knowledge Savvy aspirants.

While the Lord explains uniqueness of this Yoga to Arjuna, the latter has a natural but intelligent query to make. He asks as to why the common folk never sought it in spite of that being so simple, easily available and best !  Is it not strange, this indifference to such supreme knowledge ? The Lord agreed and said, it is because beings engrossed themselves in external joys and pleasures due to subservience to senses.  In fact, entire visible world is an extension, expansion of One Single Whole ! (‘Ekoham bahoosyam’) . All beings are in Me, but I Am not in them. (This statement of the Lord can be understood through a simple metaphor as explained by Sri Dnyanadev. Froth is present in water but there is no water in froth.)
Then, how to understand it ? The Lord says it can be understood by transcending Maya, looking beyond without recourse to imagination.
It is said that one sees whatever is imagined ; ‘the eyes do not see what the mind does not know’!  Likewise, the world becomes visible when one thinks about the world. In fact there is neither ‘existence’ nor ‘actuality’ of the universe; it ‘appears’ to ‘exist’ or ‘real’ by virtue of imagination.
The Lord emphasises that He dons vesture of the Universe being Universe Himself. Sri Dnyanadev puts forth another simile- Mirage appears because of Sun-rays, which becomes non-existent without those. It means Sun is the basis for mirage. Likewise, ‘beings’ appear by virtue of the Lord as the basis. In fact, there is no distinction between ‘beings’ and the Lord ; both are  One , just as Sun and its splendour are one and the same being inseparable.
The Lord says that entire genesis or dissolution of beings is a manifestation of ‘imagination’, not Him ! He further exhorts to abandon this element  of imagination through self-experience and become part of Him, mingle in Him so as to experience entire Nature as himself all the way. Therefore it becomes necessary to get over slumber of imagination and ever remain aware of one’s own Real Self !

 Prakruti , Maya or Nature takes on the role of genesis, sustenance or dissolution of the world at My behests ; I need not ‘do’ anything, the Lord says. However, I Am always required just as the King is necessary to build an empire without his physical activity or toiling involved therein.  Or else, entire activities take place in the light of lamp in some household, the lamp remaining indifferent and just a witness ! Similar is the case with Me; even while entire worldly activities take place at My behests, I Am aloof of those and therefore those actions do not bind Me !
Nevertheless , without  understanding this tenet beings look at Me through gross vision and consider Me as having a human body. Those fools give Me a name and  accuse Me of ‘doing’ activity; they even incriminate birth or death unto Me! All this is indeed contrary knowledge (विपरीत ज्ञान)
Life of such foolish people is indeed wasted; what is more, their entire learning and even ordained duties are in vain ; nothing remains after their death. However, there are a few that worship Me with pure conscience ; they lovingly venerate Me considering  entire universe as My Form and Serve Me dispassionately by virtue of Knowledge about Me.
They pursue devotion unto Me through Keertan, Namamaran ; they attain salvation even without undertaking arduous path of Hatha-Yoga or Ashtanga yoga.
There are some that worship Me through Jnyana-Yajnya and they recognise My non-dual form by virtue of their knowledge borne out of duality ! They now know that even while things and beings are many , there is only One, which is Me !
Thus, I Am behind everything and the eight-fold Prakruti  gives birth to universes under My aegis. I Am verily the primal sound Aum as well as entire Vedas. I Am the place where primal seed of the universe that lies dormant in Unmanifest form .

However, how unfortunate are those who do not recognise My all-pervasiveness, My omnipotence, omnipresence and omniscience ! Blind faith and devotion is of no avail to understand My true nature ; it is only exact knowledge (यथार्थ ज्ञान) that can unravel My mystery. After all, what is the use of strong wings if the eagle happens to be blind ?

Thus, the Lord explained His Aishwarya Yoga to all of us Arjunas !!

Jai Sairam
18 July 2017
Pune





Sunday, July 16, 2017

 

Mangaon to Garudeshwar (9)

माणगाव ते गरूडेश्वर (९)
पुळ्यापासून संगमेश्वर कडे परस्पर जाण्यासाठी एक आडवळणी रस्ता नुकताच चोखाळला होता ( तसेही आडवळणी रस्ते शोधण्यात आमच्याइतका कोणी माहिर नसेल !) या रस्ताने जाताना कोंकण रेल्वेला आपण खूप वेळा छेद देत जातो (क्रास करतो !) त्याहीपेक्षा, विनाकारण उलटे हातखंबावरून न गेल्यामुळे आपला वेळ नि इंधनाचीही बचत होते. संगमेश्वरच्या बरेच अलीकडे आपण पुन्हा गोवा-मुंबई महामार्गाला लागतो. खरंतर याला ‘महामार्ग’ म्हणणे धाडसाचे ठरेल ! आत्तां कुठे हा रस्ता चौपदरी होऊं घातलाय ! (थॅंकयू नितिनजी !!)
तथापि, या रस्त्यावर ड्राईव्ह करण्यात एक वेगळीच थ्रिल आहे खरी. अर्थात पुढे एखादे संथगतीने जाणारे अवजड वाहन किंवा वाटच न देणारा टेम्पो नसेल तर ! खूप म्हणजे खूप चढ-उतार, वेडीवाकडी वळणें नि अचानक रस्त्यावर उतरलेली गुरं आपल्याला होश्शियार ठेवतात.
चिपलूनच्या (चिपळूण) जस्ट अलीकडे जरा वाट वाकडी करून वीसबावीस किलोमीटर डावीकडे देवी सरस्वतीचे मंदिर पाहता येईल. याचे वैशिष्टय असे की सरस्वती शारदेचे मंदिर अतिशय दुर्मिळ असते. महालक्ष्मी किंवा महाकालीची मंदिरें अनेक आहेत पण शारदेचे मंदिर क्वचितच आढळेल.  निदान आपण सरस्वतीपुत्रांनी तरी आवर्जून पहायला हवे !

चिपलूनच्या (चिपळूण) पंचक्रोशीत अनेकानेक प्रेक्षणीय तसेच श्रध्दास्थाने आहेत. मात्र समुद्रकिनारी वसलेले नि एकेकाळी पालशेत बंदर म्हणून प्रसिध्द असलेले ‘गुहागर’ पाहण्यासारखे आहे. कोणत्याही प्रकारचा ‘संसर्ग’ न झालेला इथला सागरकिनारा खराखुरा ‘व्हर्जिन’ आहे – अछूता ! व्याडेश्वर हे आमच्याप्रमाणेच अनेकांचे कुलदैवत आहे , त्यामुळे आमचेबरोबर तुम्ही दर्शनाला आलांत तर आमचेबरोबरच देवालाही बरें वाटेल . लगोलग दुर्गादेवी मंदिरातही ओटी भरून येऊं ! येथील अंजनवेल  दीपगृह तसेच वेतकामाच्या विविध वस्तू आणि मोठ्ठ्या आकाराच्या सुपाऱ्यांसाठीही गुहागर प्रसिध्द आहे. हाप्पुसची देणगी तर आख्ख्या कोंकणाला बहाल केलीय निसर्गाने ! असो.
आज आपण खेडमार्गें दाभोळ, दापोली, हर्णै, केळशी कडे आपला काफिला वळवूं. चिपळूणपासून या मार्गावर बरेच अंतर कोयनामाई आपल्यासंगट असणार आहे. तिचे मोहून टाकणारे नि क्षणोक्षणी बदलत जाणारे रूप पाहून आपण स्वत:तच गुंतून जातो नि अचानक आठवतात ज्ञानेक्श्वरीतील ओळी – “ या गीतार्थाची थोरी / स्वयें शंभू विवरी / जेथ भवानी प्रष्नु करी / चमत्कारौनि // तेथ हरू म्हणें नेणिजे/ देवी जैसें कां स्वरूप तुझें / तैसें हें नित्य नूतन देखिजे / गीतात्त्व // १/७१

खरोखर, आपल्या अवतीभवती इतके विलक्षण बदल प्रत्यहीं घडत असतात, मात्र त्यांची दखल आपण किती कॅज्युअली घेतो. अनेक स्थूल किंवा ढोबळ फरक नजरेस पडतातही, पण सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म बाबी हमखास निसटून जातात ; काय गवसले, काय हरवले याची मोजदाद क्वचित् केली जाते. खरे तर दोन्हीही कधीच गळून गेल्या असतात काही थोडक्या पाऊलखुणा मागे ठेवून ! त्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्यात मजा असते.
फारच ॲबस्ट्रॅक्ट व्हायला लागलंय का ? तर मग ते असो . आपण कोयनामाईला नजरेआड होऊ न देतां मार्गक्रमणा करीत राहूं . डोंगराच्या घाटमाथ्यावरून दूरवर दाभोळ वसलेले दिसेल . होय, ते अजून तिथेच आहे. राजकारण्यांच्या ‘अरबी समुद्रात दाभोळ प्रकल्प बुडवून टाकू’ अशा बेछूट वल्गनांके बावजूद !
दापोलीत जयराम फाटकांच्या “रिसोर्ट”वर उतरूंया का ? या सधन शेतकरी/बागायतदाराने आपल्या भल्यामोठ्या घराशेजारी चारपाच टुमदार बंगलीवजा माडर्न घरकुलं उभारलीं आहेत. अशा सधन शेतकऱ्याचे वर्णन  लक्ष्मण देशपांडे (वऱ्हाड निघालय् लंडनला फेम) यांनी आपल्या सदाबहार एकपात्री प्रयोगांतून मराठवाड्यातील बाप्पांना जगभरात नेऊन ठेवले होते. गर्भश्रीमंतीचे ते अप्रतिम सादरीकरण ठरले. दापोलीतले फाटक कदाचित अतिश्रीमंत नसतील, पण स्व-कष्टाने त्यांनी आपला वारसा वृध्दिंगत केला हे नि:संशय. एकत्र कुटुंबांत गुण्यागोविंदाने राहात प्रत्येकजण हसतमुख नि सतत कार्यमग्न ! खूप छान वाटतं अशी कुटुंब नि त्यांचे अगत्य पाहून. स्वत: जयराम वयाची सत्तरी झालेली असूनही पहांटे सहा ते रात्री अकरापर्यंत कुठल्या ना कुठल्या कामांत मग्न (त्यांना पाहून आमच्या नाना सोमण-कर्नल प्र.का.सोमण- यांची प्रकर्षांने आठवण झाली ) ; साहजिकच त्यांना बोलते करणे सोपे नाही, मात्र (आपुन फारसे बोलत नसूनही) त्यांना बोलते करणे अस्मादिकांना लीलया जमले नि आख्ख्या कोंकणचा इतिहास त्यांनी आपल्या खास शैलींत आमच्या मागील भेटीत कथन केला होता. मात्र त्याविषयीं पुन्हा कधीतरी !
त्यांच्या घरी चापलेले भरपूर कांदा-नारळयुक्त दडपे पोहे, गरमागरम आंबोळ्या नि मलईदार श्रीखंडाची चव अजून जिभेवर रेंगाळत आहे !!

दापोलीपासून पाच किमी. भर घाटांत व्याघ्रेश्वराचे मंदीर आहे (अनेक वर्षें याच ठिकाणाला आमचे कुलदैवत समजून होतो, पण आवडी बदलतात तशा कावडी बदलत गेल्या नि एकाहून अधिक कुलदैवतें कळलीं !!) (खरंतर जेव्हा तो जगन्नियंता सर्व विश्वें व्यापूनही शेष उरतो, तिथे त्याला एका किंवा अनेक ठिकाणीच काय म्हणून पाहावें ?)
विषयांतर फारच वाढतंय्, तेव्हा तूर्तास छोटीशी विश्रांती !!
(क्रमश: .........




Wednesday, July 12, 2017

 

Ganapati Pule and Malgund

माणगाव ते गरूडेश्वर (८)
श्रीदेव गणपती पुळे ! लाखो भाविकांचे श्रध्दास्थान नि असंख्य पर्यटकांचे पसंतीचे स्थळ असलेले हे रम्य क्षेत्र अगदीं अलीकडच्या काळात प्रसिध्दीस आले. मला निश्चितपणे आठवते की साधारण पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत गणपती पुळ्यास जाणारे मोजके लोक असत. मुंबईहून जाण्यासाठी मुंबई-गोवा बोटीने जावे लागे नि ती बोटही जयगड, हर्णे,  वगैरे बंदरें घेत रत्नागिरीनजीक खोल समुद्रांत थांबून तेथून छोट्या होड्यांतून रत्नागिरीत प्रवाशांना उतरवीत असे. तेथून दिवसात एकदा धावणाऱी टूरिस्ट बस पुळ्यास येई ! माझे आईवडील नि धाकटी भावंडं जवळ जवळ चारपाच पिढ्यांनंतर प्रथमच १९५८ सालीं पुळ्यास अशा सायासाने पोहोचली होती !  मात्र गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून तेथील चित्र पालटत गेले नि आता तें अग्रगण्य पर्यटनस्थळांत गणले जाते. संपूर्ण मंदिर आणि परिसराचा उत्तम प्रकारे विकास झाल्यामुळे येथे कायम गजबज असते. मंदिरासमोरचा समुद्र जवळ या म्हणून खुणावत असतो पण बिवेअर ! अत्यंत धोकादायक आहे हा किनारा. काठालगत एक महाभयंकर ‘ट्रफ’ (खोलवटा) असल्यामुळे पट्टीचे पोहोणारेही येथे हतबल होऊन प्राण गमावून बसतात. किमान इथे तरी सागरराजाला दुरून नमस्कार करणे श्रेयस्कर !
स्वयंभू गजानन मूर्ती खरोखर खूप लोभस आहे हे नि:संशय. शांतपणे दर्शन घेऊन तिला अंत:करणांत साठवून घ्यावी नि मग निवांतपणे समोरच्या सभागृहात ठाण मांडून आपली वैयक्तिक सेवा-साधना श्रीचरणीं रूजूं करावी. श्रींना प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगर चढून उतरावा लागतो, मात्र ते अजिबात कठीण नाही. प्रदक्षिणामार्ग छान टाईल्सनी आच्छादित केवळ एक कि.मी. इतकाच लांबीचा आहे नि अथर्वशीर्ष म्हणता म्हणतां  चुटकीसरसा पूर्ण होतो. असो.
हल्लीं सर्वच देवस्थानांवर भोजन-प्रसादाची चांगली सोय असते. मात्र रूचिपालटासाठी आपण अन्यत्र जायचे ठरविले तर डाळिम्बी उसळ, उकडीचे मोदक, आळूचे फदफदे वगैरे खास कोकणी पदार्थ (आगाऊ आर्डर देऊनच !) उपलब्ध होवू शकतात. तथापि, मोदकांचा निश्चित आकडा सांगणे महत्त्वाचे आहे ; संख्येपेक्षा उणे-अधिक मागणी अपमान करू शकते !!
श्रीदेव गणपती पुळ्यापासून केवळ दोन किलोमीटरवर कविश्रेष्ठ केशवसुतांचे जन्मस्थान ‘मालगुंड’ वसलेले आहे. तिथे त्यांचे भव्य स्मारक नि संग्रहालय पाहण्यासारखे आहे.
बाय द वे, केशवसुत आणि माझे आजोबा नरहर शंकर रहाळकर हे दोघे जीवश्च-कंठश्च मित्र ! दोघांचेही प्राथमिक शिक्षण खानदेशातील जळगांव जिल्ह्यातल्या गिरणा नदीकाठच्या भडगांवला झाले. माझे आजोबा एक किस्सा रंगवून सांगत असत. तेव्हांसुध्दा गिरणा नदी वर्षातले अकरा महिने उताणी असे ; जेमतेम पाऊल बुडेल इतक्या पाण्यातून ही शाळकरी मुले नदीपलीकडच्या शाळेत जात. एकदा मात्र गिरणेला पूर आला म्हणून मोठाल्या वेताच्या टोपल्या (डोंगा) होडीप्रमाणे पाण्यात टाकून या मुलांनी नदी पार करण्याचा प्रयत्न केला. डोंगा अर्ध्यापर्यंत पोचता पोचतां तो अचानक बुडाला नि ही मुलें पाण्यांत चक्क उभी राहिली ती कमरेभर पाण्यांत ! (इतका तो “पूर” मोठ्ठा होता गिरणेचा !!) असो . आजोबांनी केशवसुतांच्या कवितांचे एक समीक्षक म्हणून उत्कृष्ट परिशीलन करून ‘केशवसुत आणि त्यांची कविता’ हा शोधप्रबंध लिहिला नि तो पुढे पुणे-मुंबई विद्यापीठांत एम्. ए. च्या विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तक म्हणून नावारूपाला आला.
तर अशा माझ्या दृष्टीने पवित्र स्थळाला भेट देऊन आपण पुळे-मालगुंडचा निरोप घेऊं आणि संगमेश्वर मार्गें आपल्या पुढच्या प्रवासासाठी प्रयाण करू.
(क्रमश:......)


Saturday, July 08, 2017

 

माणगाव ते गरूडेश्वर (७)

माणगाव ते गरूडेश्वर (७)
 पावस मधून पाऊल निघत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र पुढच्या प्रवासासाठी दुसरा पर्यायही नाही म्हणा ! सबब एकवेळ पुन्हा समाधीमंदिरात जाऊन धावते दर्शन घेऊं नि मार्गस्थ होऊं. तथापि मंदिरासमोरील देसाईबंधूंच्या रिनोव्हेटेड विकानाला भेट दिल्याशिवाय वारी पूर्ण होणार कशी? ( विकान हा शब्द माझे एक आवडते लेखक पुरूषोत्तम भास्कर ऊर्फ पु.भा.भावे यांनी प्रचारात आणला. मराठी भाषेचे शुध्दीकरण करीत त्यांनी असे अनेक नवनवीन शब्द प्रचलित केले. स्वातंत्रवीर विनायक दामोदरांनीही अशीच भाषाशुध्दी केलेली स्मरते. माझ्या शुध्द मराठीसाठी त्यांनाही रिस्पान्सिबल् सॉरी जबाबदार धरण्यास हरकत नाही !) असो !!
तर, देसाईबंधूंचे आमरस डबे, फणसपोळी-आंबापोळीची भरपूर पाकिटं नि कोकम सरबतांच्या कॅन्स (बरण्या) आणि खूपशी मिरगुंडं, मिरच्या, सांडगे (अन् दिसेल ते) तसंच काजूपाकिटं गाडीच्या डिक्कीत भरता भरतां जीव मेटाकुटीस येतो. (तरी सांगत होतो काजू घ्यावे तर मालवणचेच. पण डायरेक्ट कारखान्यातून घेऊ म्हणतां म्हणतां अखेर  देसाईबंधूंचेच देणे द्यावे लागले ना ? असो !)

आज आपण रत्नागिरीमार्गे गणपती पुळ्याकडे प्रस्थान करूं. रत्नागिरी शहराच्या अलीकडे समुद्रसपाटीपासून जरा उंचीवर एक भव्य रिसोर्ट कोहिनूरवाल्या मनोहरपंतांनी उभारला आहे. अम्मळ महाग आहे म्हणतात पण आपण कुठे तिथे राहणार आहोंत ? जस्ट माहिती दिली एव्हडेच. तिथलं रेस्टारेंट मात्र मोठ्ठ्या बोटीच्या आकाराचे असल्याचे बाहेरूनही कळते.
पुळ्याला जाणेसाठी दोन मार्ग प्रचलित आहेत. एक हातखंबा-जाकादेवी-चाफे वरून जाणारा लांबचा नि दुसरा रत्नांग्रीच्या पोटातून मिऱ्याबंदर पार करीत समुद्राच्या काठाकाठाने जाणारा. कोकणातून जाणारे कोकणस्थ लांबचा खर्चिक मार्ग कसा निवडतील ? बिसाईड्स, समुद्रशोभा आयतीच बघायला मिळणार नाही का !
 रत्नांग्रीचा माझा डायरेक्ट संबंध खरं तर मराठी वांड्मयातूनच अधिक आला. पु.लंचा अंतू बरवा किंवा विंदा करंदीकरांच्या धोंडंया न्हाव्याने कोकणाची भुरळ पाडली हे खरे आहे. इथून जवळच असलेल्या साखरप्यानजिकच्या गावात विनोबा भावे जन्मले हेही ऐकून माहीत होते. अखिल महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राला ललामभूत असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक महाराजा रत्नागिरीचेच.
कालेजात असतांना पुलंची एक अफलातून एकांकिका आम्ही गणेशोत्सवात सादर केली होती. त्यात वारंवार तपकिरीचा बार भरून ठ्यां करून मोठ्ट्याने शिंकणाऱ्या बेरकी ‘रे कुडाळकर’ या चाकरमान्या कारकूनाची भूमिका मला मिळाली होती. अंगच्या सहज नाटकी स्वभावामुळे नि वारसहक्काने मिळालेल्या भल्या मोठ्या नाकामुळे तपकिरीसोबतच माझी भूमिका ‘वठली’ हे वेगळे सांगणे नलगे ! असो.

मिऱ्याबंदर मागे टाकता टाकतांच डावीकडे अफाट पसरलेला अरबी समुद्रकिनारा आपली पुळ्यापर्यंत साथ सोडीत नाही. ओह! व्हाट ए ब्यूटिफुल साईट एंड मिल्यू ! किती किती सुंदर दृष्य नि वातावरण !! अथांग निळाशार समुद्र पाठीवर उन्हं असतांनाच अधिक रम्य असतो. समोरून येणारी सूर्यकिरणं एकतर दिपवतात तरी नाहीतर भाजून टाकतात आणि चांदीसारखा चकाकणारा समुद्र दुसरे काही दिसूच देत नाही. असो.
तर आपण या वळणावळणाच्या सुंदर सपाट रस्त्यावर लीलया गाडी हाकताना घाटमाथा संपताच आपली जणू वाट पहात उभ्या असलेल्या आपल्या नेहमींच्या शहाळीं वाल्याच्या हातगाडीसमोर आपली मोटारगाडी उभी करूं. अमृतासमान गोड शहाळें नि त्याहून गोड त्याच्याशी साधलेला कोकणी संवाद आपल्याला आज पुळ्यांत कितपत गर्दी असेल याची कल्पना देतो. घाटमाथ्यावरून खाली क्षितिजापर्यंत पसरलेला सागर नि सागरकिनारा ; त्यांवर डौलाने फिरणारी लहानमोठी गलबतं नि होड्या ; समुद्रात दूरवर फेकलेली मच्छीमारांची जाळीं ; लाटांचा मंद खळखळाट नि त्यांवरचा नाजुक फेंस ; सर्वच किती नयनरम्य नि मनोहारी ! केवळ लाजबाब !!
श्रीक्षेत्र देव गणपती पुळेच्या जस्ट अलिकडे आमचे पुख्तैनी गाव ‘नेवरे’ लागते. खरंतर आमचे आडनाव रहाळकर ऐवजी नेवरेकर का पडले नाही ते माहीत नाही. (तसंही रहाळकर हेच आडनाव बरें वाटते.) या नजीकच्या नेवरे गावामुळे आम्ही मूळचे गणपती पुळेयाचे असा लौकिक झाला असावा नि तसेंही रहाळकरांनी पुळे संस्थानला त्यांची वहिवाटीची जमीन भेट म्हणून दिल्याचा शिलालेख मंदिरात शिरताना डाव्या बाजूस आढळतो. असो.
आपण गणपतीपुळ्याच्या पंचक्रोषींत दाखल झालो आहोत. पार्किंगबरोबरच राहण्या-जेवण्याची तजवीज करायला हवी म्हणजे मग श्रीदर्शनाला निवांतपणे जाता येईल.
सबब, छोटीशी विश्रांती !



Wednesday, July 05, 2017

 

माणगाव ते गरूडेश्वर (६)

माणगाव ते गरूडेश्वर (६)
स्वामींचा आत्मबोध –
स्वामी स्वरूपानंदांनी विपुल वाड्मय निर्माण केले. यांत ‘अभंग-ज्ञानेश्वरी’, ‘अभंग-अमृतानुभव., ‘संजीवन गाथा’, ‘अमृतधारा’ वगैरे प्रामुख्याने सांगतां येतील. स्वामींनी ‘आत्मज्ञान’ या शब्दाचा ‘आत्मबोध’ या अर्थाने उल्लेख केलेला आढळेल. दोन्हीत म्हटले तर अतिसूक्ष्म अथवा वाटल्यास ढोबळ फरक आहे. जमल्यास त्याची मीमांसा नंतर करूं.

स्वामी स्वरूपानंद ‘नाथपंथी’ होते आणि त्याबद्दलची ग्वाही ते पुढील रचनेतून सहजपणे देतात. –
     “अवघें हरिमय योगबळें”
           हरि: ओम्
कृपावंत थोर सद्गुरू उदार / तेणें योगसार दिलें मज //
मन-पवनाची दाखवोनि वाट / गगनासी गांठ बांधियेली //
शून्य-नि:शून्याचें बीज महाशून्य / भेटविलें धन्य हरिरूप //
स्वामी म्हणें माझा नाथ-संप्रदाय / अवघें हरिमय योगबळें //

संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांप्रमाणेच ते सद्गुरूंना वारंवार नमन करताना एक सुंदर नवरत्नहार त्यांचे चरणीं अर्पण करतात –

जय जय जी जगदात्मया / सच्चिदानंदसूर्या /
स्वामी समर्था सद्गुरूराया / गणेशरूपा //
करोनि आत्मत्वें वंदन / घातले चरणीं लोटांगण /
सहजें आलें लीनपण / कृपाबळें //
जी प्रभु आपुला म्हणितला / तेणे संसार मोक्षमय जाला /
देखें उन्मेष उदैजला / नित्य नवा //
तुटला विषयांचा लाग / निमाला जन्ममरणाचा भाग /
फिटला जीवदशा-पांग / सामरस्यें //
देहीं अहंता मुरली / वृत्ति स्व-रूपीं विराली /
व्दैताव्दैत गिळोनि ठेली / अखंडत्वें //
सरली कर्माकर्म-विवंचना / कीं आपैसी साध्य-साधना /
उरलें करोनि अकर्तेपणा / ठायींचा चि //
बोलीं अबोलता जाहलों / सहजसुखें सुखावलों /
धन्य धन्य देवा पावलों / परमसिध्दि //
स्व-रूपीं विश्व-रूप देखिलें / विश्वरूपीं स्वरूप सामावलें /
स्वरूपा-विश्वरूपाआगळें / नित्य त्तत्व //
स्वामीचा सेवकु जाहलों / तैं येतुले भाग्य लाधलों /
अक्षय-पदीं लाचावलों / ह्या चि लागीं //

     नव ओंविया नवरत्नहार / स्वामींस समर्पिला सादर /
     तेणे संतोषौनि अभय-कर / ठेविला माथां //
                              (स्वामी स्वरूपानंद )

इतका सुंदर नवरत्नहार अर्पण केल्यावर सद्गुरूंपाशी काय मागायचे त्याचा उत्तम गृहपाठ ते आपल्या सर्वांसाठी सांगतात –

उदारा जगदाधारा देई मज असा वर /
स्व-स्वरूपानुसंधानीं रमो चित्त निरंतर //
काम-क्रोधादिकां थारा मिळो नच मदंतरीं /
अखंडित वसो मूर्ति तुझी श्रीहरि साजिरी //
शरीरीं हि घरीदारीं स्त्रीपुत्रादि परिग्रहीं /
अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रहीं //
नको धन नको मान नको लौकिक आगळा /
सोडवीं हा परी माझा मोहपाशांतून गळा //
नको भोग नको त्याग नको विद्या नको कला /
अवीट पदपद्माची अमला भक्ति दे मला //
नर नारी हरीरूप दिसो बाहेर-अंतरीं /
‘राम कृष्ण हरि’ मंत्र उच्चारो मम वैखरी //
मी-माझें मावळो सर्व, तूं-तुझे उगवो अतां /
मी तूंपण जगन्नाथा,  होवो एकचि तत्त्वतां //
देव-भक्त असें व्दैत, अव्दयत्व न खंडितां /
दाखवीं देव-देवेशा , प्रार्थना ही तुला अतां //

            ।।  ओम राम कृष्ण हरि ।।

सरतेशेवटीं , त्यांची श्रीज्ञानदेव वंदना आपल्याही नित्यपाठात असायला हवी . ती अशी –
“नमितों योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत ।
तो सत् कविवर परात्पर गुरू ज्ञानदेव भगवंत । ।
स्मरण तयाचे होतां साचें चित्तीं हर्ष न मावे ।
म्हणुनि वाटतें पुन: पुन्हा ते पावन चरण नमावे ।।
अनन्यभावें शरण रिघावें अहंकार सांडून ।
झणिं टाकावी  तयावरूनियां काया कुरवंडून ।।
आणि पहावें नितांत-सुंदर तेजोमय तें रूप ।
सहज साधनीं नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ।।

ज्ञानेशाला नमितां झाला सद्गुरूला तोष ।
वरदहस्त मस्तकीं ठेवुनी देई मज आदेश ।।

हा आदेश होता सातशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा सोप्या सरळ मराठी अभंग स्वरूपात गौरव करण्याचा आणि तें महत्कार्य स्वामींनी पूर्ण करून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळांने अभंग ज्ञानेश्वरी हा पावन ग्रंथ छापून प्रसिध्द केला. कोणालाही सहज परवडेल अशा केवळ चाळीस रूपयांत हा ग्रंथ उपलब्ध आहे. केवळ विकत न घेतां तो नित्य वाचनात ठेवावा अशी नम्र आणि कळकळीची विनंती तुम्हा सर्व सुहृदांना करीत आजचे हे लांबलेले वर्णन थांबवितो !!!

जय साईराम !





Monday, July 03, 2017

 

माणगाव ते गरूडेश्वर (५)

माणगाव ते गरूडेश्वर (५)
आज भल्या पहांटे जाग आली ती कोकीळ, भारद्वाज नि इतर अनेक पक्षांच्या किलबिलाटानेच. झोप इतकी झकास झाली की विलक्षण ताजेतवाने नि उल्हसित वाटतेंय. चला, झटपट तयार होऊन स्वामी-दर्शनाला जाऊं. बाहेर इतकं प्रसन्न, ताजंतवानं नि मोकळं वातावरण आहे की इथेच खूप दिवस वास्तव्य करावं !
रस्ताच्या पलीकडे एक ओढा आहे, मात्र त्यावरून पलीकडे जायला एक सुरेख पादचारी पूल आहे. तो उतरून जाताच समाधी मंदीराचा परिसर सुरूं होतो. सगळीकडे कमालीची स्वच्छता लक्षवेधक आहे. समोरच हातपाय धुण्यासाठी अनेक नळ आणि भरपूर नि स्वच्छ पायपुसणींपण ! प्रवेशदाराच्या बाहेर एक छोटेखानी  स्टॉल आहे ; तिथे व्हेंडिंग मशीनवर चहा-कॉफी तसंच थंडगार कोकम सरबत अल्पदरात मिळण्याची सोय आहे. असो !
समाधीमंदिराचा परिसर भव्य, भलामोठा नि सुंदर आहेच पण पांढऱ्याशुभ्र संगमरवरी टाइल्सनी बांधलेलं समाधीमंदीर अप्रतिम आहे. परिसरांत सर्वदूर लावलेल्या शेकडों फुलझाडांमुळे सगळीकडे मंद सुगंध दरवळत आहे (नॅच्च्चरल !)
समाधीमंदिराच्या भव्य सभागृहांत प्रत्येक खांबांवर नि भिंतींवर संतंची भलीमोठी तैलचित्रें लक्षवेधक आहेत. खरंतर आपल्या विशेष आवडीच्या प्रत्येक संताचे चित्र तिथे आहे.
(या निमित्ताने मी नुकत्याच पाहून आलेल्या साताऱ्यातील ‘संत-नगरी’ची आठवण झाली. तेथील भल्यामोठ्या प्रार्थनामंदिरात भारतातील जवळजवळ पन्नास संतांचे फोटो एकसारख्या फ्रेममध्ये ओळीने लावलेले आहेत. प्रत्येक फोटोच्या खाली त्या त्या संताच्या वैशिष्ठ्याबद्दल चार चार ओळींचे सुंदर काव्य आहे. तेथे एकाही पारंपारिक ‘देवाचा’ , म्हणजे राम, कृष्ण , दत्त , गणपती , देवी इत्यादींचे चित्र किंवा मूर्ती नाही ! केवळ संतच !! खरंतर आपल्या या पारंपारिक देवी-देवतांना “प्रत्यक्ष” असं कुणी पाह्यलंय ! मात्र संतांना तर नक्कीच पाहिलं आहे कुणी ना कुणीतरी !! ) असो.
या विशाल सभागृहात दोन्ही बाजूंस बसण्यासाठी मोठाली जाजमे अंथरलेली असतात नि काही थोड्या खुर्च्यापण. थोडं पुढे दोन्ही बाजूला दोन मोठे चौरंग असून त्यांवर स्वामींची काही पुस्तकें वाचनार्थ ठेवलेली असतात. उद्देश असा की दर्शन झाल्यावर काही काळ स्वस्थपणे तीं चाळावीत. (स्वामी हयात असतांना त्यांचे दर्शनार्थ आलेल्या प्रत्येकाला ते एखादे पुस्तक देवून कोणतेही पान उघडून त्यातील मजकूर वाचायला सांगत. आणि अनेकांना अनुभव येई की त्याच्या मनातील प्रश्न किंवा ऐहिक पारमार्थिक पेचांची उत्तरें किंवा मार्गदर्शन त्याला त्या मजकुराद्वारे  हस्तगत होई.) काहीसा तत्सम अनुभव आपल्यालाही यायला हरकत नाही !
समोरच्या चार पायऱ्या चढून गेल्याचर स्वामींची सुंदर सजवलेली समाधी अधिक जवळून स्पष्टपणे पाहता येईल. आपले मस्तक भक्तीभावाने समाधीवर टेकवता येईल नि आतापर्यंतचा सर्व शीण, शारीरिक मानसिक नि आध्यात्मिकही, क्षणांत नाहीसा होईल !!
श्री ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीप्रमाणेच येथेही श्री विठ्ठल-रखुमाईंच्या सुंदर मूर्ती समाधीशिळेमागे वसवण्यात आल्या आहेत. प्रदक्षिणा करून खाली उतरल्यावर तीर्थ घेवून आपणही काही वेळ तरी तिथे ठेवलेल्या पुस्तकांना आपलेसे करूंया .
ज्यांना ‘ध्याना’ ची गोडी आहे त्यांनी समाधीखालच्या ध्यानकक्षांत उतरून शांतपणे ध्यानसाधना करण्याची मुभा आहे.
ठीक बारा वाजता होणाऱ्या आरतीला आपण आवर्जून हजर राहणे उपयुक्त राहील. केवळ तीनच आरत्या, पण इतक्या शिस्तबध्द आणि कर्णमधुर मी अन्यत्र ऐकल्याचे स्मरत नाही. स्त्री-पुरूष वेगवेगळ्या रांगांत एकापाठोपाठ उभे राहून, प्रत्येकाच्या हातात लॅमिनेट केलेल्या आरत्यांची प्रत असते. मंत्रपुष्पांजलीच्यावेळीं प्रत्येकाला एकेक टप्पोरे सुगंधित फूल वाटतात जे आपण समाधीवर प्रत्यक्ष वाहायचे असते. आरती-मंत्रपुष्पांजलीनंतर संस्थानचे मुख्य कार्यवाह “ओम रामकृष्णहरी”चा जप सर्वांकडून म्हणवून घेत असतांना प्रत्येक रांग संथपणे मंदिरात प्रवेश करून समाधीवर स्वहस्तें फूल वाहते आणि प्रदक्षिणा पूर्ण करीत तीर्थप्रसाद घेऊन बाहेर पडते.
अत्यंत शिस्तबध्दपणे नि भक्तिभावाने इथले सर्व कार्यक्रम होतात त्याचा हा उत्तम नमूना !!
संपूर्ण मंदिर परिसर अत्यंत चोखंदळपणे घडविला/सजवलेला आहे. स्वमींचे जन्मस्थान, तसेच त्यांनी वास्तव्य केलेले घर उत्तम प्रकारें जतन करून ठेवलेले आहे. तेथील शेवग्याच्या झाडावर स्वयंभू प्रकट झालेल्या गणेश प्रतिमेभोवती प्रदक्षिणेसाठी सुंदर पार बांधला आहे.
एकूण सर्वच वातावरण प्रसन्न, आल्हाददायक आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत पोषक आहे यांत शंका नाही.
मला इथे किमान पंधरा-वीस वेळा येण्याचे भाग्य लाभले. साहाजिकच गाठीशी अनेकानेक वैयक्तिक अनुभव आहेत. मात्र त्याविषयीं आज तरी चर्चा करणार नाही ; यावेळच्या वारीतच मुक्त विहार करणार आहे, तस्मात्, एक छोटीशी विश्रांती ( कुठेही जाऊं नका, हा आलोच !)


Sunday, July 02, 2017

 

माणगाव ते गरूडेश्वर (भाग ४)

माणगाव ते गरूडेश्वर  (४)
कोंकणातल्या नाभिस्थानी रत्नागिरीच्या अलिकडे बारा किलोमीटरवर वसलेल्या परम पवित्र 'पांवस' मुक्कामी आपण डेरेदाखल झालों आहोत. गणेश-गुळे येथील श्रीगणेशाचे मनोहारी दर्शन नि सागर-दर्शनाचा शान्त शान्त अनुभव यामुळे आपल्याला तशीही पांवसला लवकर पोहोचण्याची उत्कंठा लागली होतीच. त्यामुळे येथे पोंचताच 'माउली माहेर' येथील आपापल्या खोल्यांचा ताबा घेऊन   नि चहा-कॉफीचा मस्तपैकी घोट घेतल्यावर कसे 'फ्रेश' वाटतेय नाहीं ? नव्हे, चहा-कॉफीपेक्षांही इथल्या वातावरणाचा न कळत होणारा हा परिणाम आहे !  इतर लोक फ्रेश होऊन येईस्तवर अंगणात ठेवलेल्या प्रशस्त कोचांवर नि मोठ्ठ्या झोपाळ्यावर अंमळ विसावूंया. स्वामींचे समाधीमंदिर येथून हाकेच्या अंतरावर आहे - जस्ट ॲकरॉस  द रोड.
तशी संध्याकाळ झालेली असल्याने आज तरी आपल्याला केवळ समाधीच्या पायरीवरच डोकें टेकून वन्दन करता येईल ; उदईक मात्र निवान्तपणे दर्शन, आरती, स्वाध्याय आणि प्रसादाचा आनंद लुटतां येईल. म्हणून आज आपण स्वामींचे लांबून दर्शन घेऊन समाधान मानूंया.
तुमच्यापैकी काहीजणांना 'स्वामीं' विषयी फारशी माहिती नसण्याची शक्यता असल्याने त्यांची थोडक्यात जीवनी सांगण्याचा प्रयत्न करतो. स्वामी स्वरूपानन्द म्हणजे पूर्वाश्रमींचे श्री रामचंद्र विष्णुपंत गोडबोले. जन्म १५डिसेंबर १९०३ ; महासमाधी - १५ ऑगस्ट  १९७४ . दोन्ही पांवसलाच. वयाच्या विसाव्या वर्षीं नाथसंप्रदायातील सद्गुरू बाबामहाराज वैद्य यांचा अनुग्रह. ऐन तारूण्यात गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभाग आणि तुरूंगवास. पुन्हा पांवसला आल्यावर स्वावलंबनआश्रमाची मुहूर्तमेढ. मात्र वयाच्या तिसाव्या वर्षीं दुर्धर व्याधीने ग्रासल्याने प्रत्यक्ष मृत्यूशी 'हॅंडशेक' आणि विलक्षण अंतर्मुखता नि आत्मचिंतन. त्यातून आत्मसाक्षात्कार. सद्गुरूंनी नामकरण केलेल्या 'स्वरूपानंद' या नावाला पावसकर आणि इतर सुहृदांनी 'स्वामी'  हे बिरूद लावले ते कायमचे.
गंभीर आजार नि त्यामुळे आलेल्या  विलक्षण अशक्तपणामुळे स्वामी त्यानंतर कधीच पांवसबाहेर, नव्हे, देसाईबंधूंच्या राहत्या घराबाहेर चाळीस वर्षें पडले नाहीत. या दरम्यान भक्तांना मार्गदर्शन करणे आणि अनेक ग्रंथांची निर्मिती नि आत्मानंदांत तल्लीन राहणे हीच त्यांची जीवनशैली झाली. गीता-ज्ञानेश्वरीवरच्या विलक्षण ओढीपोटी "अभंग ज्ञानेश्वरी", "अभंग अमृतानुभव", ""संजीवन गाथा" सारखे अमूल्य वाड्मय त्यांनी निर्माण करून ते अजरामर केले.
जरासे घाईने नि थोडक्यात झालेल्या दर्शनाने आपले कुणाचेच समाधान झालेले नाहीं याची मला जाणीव आहे ; तथापि, ती कसर आपण उद्या भरून काढू ! माउली माहेर मधले गरमागरम जेवण करून आपण आपल्या खोलीत विश्रांतीसाठी जाऊं. सर्व आवश्यक सुविधा असलेल्या प्रत्येक खोलीच्या कपाटांत 'स्वामीं'ची सर्व पुस्तके वाचनार्थ ठेवलेलीं आढळतील. (असाच अनुभव मला इंग्लंडमधल्या सर्व दवाखान्यांत नि कांही होटेल्समधेही पाहायला मिळाला. तिथे 'बायबल' ची प्रत असते )
तर मग, शिरस्त्याप्रमाणे झोपण्यापूर्वी काहीतरी चांगले साहित्य वाचावे म्हणून ज्ञानेश्वरी उघडली नि नेमका अध्याय दृष्टीस पडला तो नववा ! या अध्यायाची सुरुवातच मुळी - "तरि अवधान एकवेळ दीजे / मग सर्व सुखासी पात्र होइजे / हे प्रतिज्ञोत्तर माझे / उघड ऐका //"
मात्र लगेच असेही म्हणतात, "परि प्रौढी न बोलें हो जी / तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं /  देयावें अवधान हे माझी / विनवणी सलगीची //"
याच मूळ ओव्यांना स्वामी अशा स्वरूपात मांडतात - 'आतां अवधान (लक्ष) / एकलेचि द्यावें / मग पात्र व्हावे / सर्वसुखा //' ऐसें असे माझे प्रतिज्ञावचन / ऐका संतजन / उघड हे // तुम्हां सर्वज्ञांच्या सभेमाजीं येथ / नसे हो बोलत / आढ्यतेने (गर्वाने) // द्यावें अवधान / तुम्हीं संतजनीं / माझी विनवणी / सलगीची //'
रहाळकर म्हणतात, " NOW, YOU SHOULD BE FULLY ATTENTIVE SO AS TO BE WORTHY OF TOTAL BLISS. THIS IS MY WORD OF PROMISE TO YOU, O NOBLE BEINGS ! INDEED, I AM NOT SPEAKING TO THIS AUGUST ASSEMBLY WITH A SENSE OF EGO AND PRIDE ON THIS OCCASION. I AM ONLY SUBMITTING TO YOU WITH GREAT AFFECTION.  THEREFORE PLEASE PAY ALL OF YOUR ATTENTION .”
 जरा जास्तच होतंय नाही ? म्हणून तूर्तास थांबतो, कारण तसेहि आपल्याला उद्या लवकर तयार होऊन स्वामी दर्शनाला जायचे आहे. (क्रमश:.....)


This page is powered by Blogger. Isn't yours?