Thursday, July 28, 2022
स्वाभिमान !
स्वाभिमान !
अहंकार आणि अभिमान हे वरकरणी समानार्थी शब्द वाटत असले तरी त्यांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे हे मज सामान्य माणसालाही सहज कळते. वास्तविक अहंकार हा कधीच एकट्याने प्रगट होत नसतो. त्याचे बरोबर ईर्षा, दंभ, दर्प, क्रोध, ‘मी नि माझे’, विषयांधता आणि भ्रांतिरूप प्रत्यक्ष आंधळेपण आपोआप व्यक्त होत राहतात. अहंकारावर खूप खूप सांगण्या-ऐकण्यासारखे असले तरी त्याचेच धाकटे भावंड अभिमान किंवा अस्मिता केव्हाही उजव्या ठरतात हे निर्विवाद !
‘धाकट्या भावंडावरून’ एक विचार सहज मनांत आला की रावण, त्याचे अनुयायी, मांडलिक नि कुंभकर्ण-शूर्पणखेसारखे निकटवर्तीय रावणासारखेच अति अहंकारी आणि क्रूर म्हणून ओळखले गेले, तर विभीषणासारखा सात्विक प्रवृत्तीचा धाकटा भाऊ किती निरहंकारी निफजला पहा !
वास्तविक खरा ज्ञानी पुरूषच अनहंकारी असू शकतो जरी तो ‘अहं ब्रह्मास्मि’ या बोधांत रमलेला असतो, जे केवळ दृढ आत्मविश्वासाचे प्रतीक म्हटले पाहिजे.
दुसरे, ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ या उद्घोषांत केवळ अस्मिताच दृग्गोचर होते ना ? आपल्या कुलशीलाचा सार्थ अभिमान बाळगण्यांत मला तरी अहंकाराचा लवलेश दिसत नाही. आपले वाडवडील, पूर्वज, ऋषिमुनी - ज्यांचे गोत्र आपण श्रध्दा पूर्वक मिरवतो किंवा धारण करतो यांत कुठे दिसतो अहंकार ? किंवा मी भारतभूमीचा सुपुत्र आहे हा भाव केवळ अस्मिता म्हणूनच मानायला हवी की नाही ?
आपल्याला उत्तम शिक्षक लाभले, उत्कृष्ट शाळा किंवा महाविद्यालयांत शिकतां आले, सन्मानाने नोकरी-व्यवसाय करता आला वगैरे सर्व बाबतींत आपण कसे भाग्यशाली ठरलो हे सांगण्यात किंवा खरंतर अनुभवण्यांत जाणवणारा स्वाभिमान कौतुकास्पद नसावा काय ?
माफ करा, अहंकार नि स्वाभिमान यांतील ठळक फरक दाखवण्यासाठी एवढी मल्लीनाथी झाली !
तथापि या सगळ्याची परिणती अहंकारांत होवू नये हीच ईश्वरचरणीं मनोभावें प्रार्थना आहे. मात्र केवळ प्रार्थना तोकडी पडू नये यासाठी विलक्षण शालीनता, ऋजुता, क्षमावृत्ती आणि दैवी संपदा गाठीशी असणे अत्यावश्यक नाही काय ?
रहाळकर
२८ जुलाय २०२२
Wednesday, July 27, 2022
तत् त्वमसि !
तत् त्वमसि !
मित्रहो !
“असतोs मा सद् गमय, तमसोsमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मांs अमृतं गमय” ही आर्त हांक हजारों वर्षांपूर्वी ‘बृहदारण्येव उपनिषदांत’ गायिली गेली आणि तिने देशोदेशींचे लाखो करोडो लोकांची हृदयें हेलावून सोडली. शेकडो वर्षांपासून काही संधिसाधू आणि धूर्त लोकांनी माणसाला फसवून त्यांच्या अगतिकतेचा फायदा उठवीत स्वत:चा स्वार्थ साधला आणि त्याला अज्ञानरूपी घोर अंध:काराच्या गर्तेंत गटांगळ्या खायला लावल्या ; मानवी जीवन वेळोवेळी निराश, अश्रध्द आणि दु:खाच्या खाईंत गुदमरत राहिले.
मात्र त्या वेळी देखील वेगवेगळ्या ठिकाणी संत महात्मे, सत्पुरूष, ऋषी, कवी यांनी वेळोवेळी अवतार घेतले आणि समस्त मानव जातीला ‘सत् चित् आनंद’ या त्रयीची ओळख करून दिली. ‘सत्त्याची’ वाट दाखवणारे हे वाटाडे दीपस्तंभाप्रमाणे यात्रेकरूंना वाट दाखवीत राहिले ; ज्ञानप्रकाशाने अमृतत्वाची जाणीव करून देत आले. अशा सत्यबोधकांनी स्वत:पासून दूर जात असलेल्या मानवजातीला त्याच्या ‘उगमाकडे’ पुन्हा परत येण्यासाठी मार्ग दाखविला.
लई भारी होतंय् का हे निरूपण ? पण अचानक आईन्स्टाईनची एक उक्ती आठवली, ‘A thought sometimes makes me hazy, Am I or the other is crazy’ ! (एक विचार मला कधीकधी अस्वस्थ करतो - मीच एकटा वेडसर आहे की इतर सुध्दा ! ) By the way, क्रेझी म्हणजे सेन्सलेस, इम्प्रॅक्टिकल, इनसेन वगैरे ! ! असो.
मला वाटतं की आईन्स्टाईन प्रमाणेच इतर अनेकांना निरनिराळ्या संदर्भात काही ‘हट् के’ किंवा ॲबसर्ड वाटावे असे प्रश्न पडत असतील. (मला नेहमीच पडतात - चंद्रकांत काकोडकरांच्या रहस्यकथांतला तिरळ्या डोळ्यांचा प्रभाकर नाही का मी ! )
‘तत् त्वमसि’ या महावाक्या बरोबर इतरही तत्सम वचनें सहज आठवली (इतका मी ‘निर्ढावलोंय’ संस्कृत भाषेचा वापर करताना ! ) पण आज तो विषय मांडण्याचा फोल उपद्व्याप करायचा नाही असे वारंवार बजावतोय मी स्वत:ला.
खरं तर मी कोण, काय, कसा आहे हे माझ्यापेक्षा इतर जास्त जाणतात आणि ते एकापरीस बरेच आहे, कारण स्व-स्वरूपाचा उहापोह करताना स्वानुभवा ऐवजी ऐकीव वा वाचीव सिध्दान्त विनाकारण ‘फेकले’ जातील.
तथापि, दिसतं तसं नसतं ही उक्ती अतिशय सार्थ आहे हे निश्चित. ‘मी’ जो, जसा, कसा आहे हे इतरांपेक्षा मीच जाणतो हे सत्य वरील विधानाच्या अगदी विपरीत ठरतेय की ! मग खरा तो (तत्) कोण, कुठे, कसा ?
बुचकळ्यात पडलांत ना, अखेर याला म्हणायचंय तरी काय ! मीही ! !
रहाळकर
२७ जुलाय २०२२
Sunday, July 24, 2022
पन्नास वर्षां पासूनचे पुणें !
पन्नास वर्षां पासूनचे पुणें !
आम्ही पुण्यांत वास्तव्यास येऊन आतां बावन वरूषें लोटलींत. त्या आधी बावन्न सालीं चक्क महिनाभर पुण्यांत राहून गेलो होतो मावशीकडे. त्या वेळी सायकल चालवणे (फिरवणे) हा छंद तर होताच पण सोमवार पेठेतल्या ‘कर्पे टॅन्क’ आणि डेक्कन जिमखान्यात विराजमान ‘टिळक टॅन्क’ वर पोहोणे शिकण्याचा जीवघेणा प्रयोग करून झाला होता. जीवघेणा एवढ्यासाठी कीं पाठीवर बांधलेला डालडा चा डबा अचानक निसटला नि मी खूप गटांगळ्या खाल्ल्या होत्या. पाण्याची तेव्हा बसलेली भीती इतकी जबरदस्त होती की भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जाणाऱ्या लॉन्च मधे मी अक्षरश: डोळे घट्ट मिटून आईच्या मांडीवर दीड तास झोपून होतो. (अर्थात ‘मेडिकल’ ला आल्यावर इन्दौरच्या पहिल्या वहिल्या अतिशय मॉडर्न आणि सुंदर ‘स्वीमिंग पूलवर’ -तेही म्युनिसिपालिटीने उभारलेल्या - पोहायला किंवा खरंतर ‘तरंगायला’ जे शिकलो ते तरंगणे आजतगायत चालू आहे. ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, ‘सूर मारणे’ वगैरे लीला मी केवळ खूप दूर ग्यालरींत बसून एन्जॉय करतो ! असो.
त्या बावन सालींच चाखलेले कावऱ्यांचे मॅन्गो आईस्क्रीम अजूनही जिभेवर रेंगाळत आहे तसेच एरंडवणें पार्क मधली भेळ, पुन्हा कधीच तेवढे समाधान देऊ शकली नाही. तेही असो.
गेल्या पन्नास वर्षांत खूप खूप बदल पाहिलेत मी पुण्यांत. (अस्सल पुणेकराच्या अनेक ‘ट्रेट्स्’ (Traits) मात्र माझ्यापासून अद्याप कोसों दूर आहेत, कारण मी अजूनही स्वत:ला ओरिजिनल इन्दौरी मानतो ! )
वास्तविक पुण्यातली दीर्घकाळ केलेली नोकरी मुन्शिपाल्टीतलीच. पहिले सहा महिने मला फिरत्या दवाखान्यात काम करावे लागल्याने शहराचे सहाही बाह्य भागांतल्या ‘वस्त्या’ मी पादाक्रान्त करू शकलो आणि नंतर मेडिकल युनिट्स चा प्रमुख म्हणून शहरातले गल्लीबोळ सुद्धा माझ्या नित्य परिचयाचे झाले. जवळजवळ बावीस वर्षें सर्व प्रकारच्या आणि पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांशी संपर्क झाला तसेच ट्रेड यूनियन्सच्या नेत्यांशी देखील बऱ्यापैकी घसट राहिली. आणि म्हणूनच पुण्यांतल्या स्थित्यंतरांविषयी मी जरासा अधिकार वाणीने बोलू शकतो !
खरंच खूप बदललंय पुणे ! गेली काही वर्षें ‘पेठांचे’ बाहेर राहिल्याने पेठांची अशी सद्यस्थिती फारशी अवगत नसली तरी आधीचे कित्येक जुने वाडे कधीच जमीनदोस्त झालेत नि त्यांची जागा निव्वळ खुराड्यांनी घेतल्याचे ठळकपणे जाणवते आहे. एकेकाळी फटकळ तुसडेपणा आणि पुण्याचा ‘जाज्वल्य अभिमान’ फक्त स्वप्निल जोशींच्या टीव्ही वरच्या वटवटी पुरता मर्यादित झाला असावा. खरंतर ‘फ्लॅट संस्कृती’ खोलवर मुळें धरते आहे अशी दाट कुशंका अस्वस्थ करतेयं आतांशा. या ‘संस्कृतींत’ हमे किसीसे क्या लेनादेना ही भावना बेचैन करणारी आहे.
तेही असो मित्रांनो. इतर सर्वच शहरांबरोबर पुणे खूप झपाट्याने बदलत चाललंय हे निर्निवाद . शहरात उंच उंच इमारती म्हणजे फारतर चारपाच मजली, पण जरासे बाहेर पडतांच वीस पंचवीस मजल्यांचे काँक्रीट जंगल अक्षरश: चक्रावून टाकते. त्यांत आता सगळीकडेच मेट्रोची कामे झपाट्याने सुरू आहेत, भल्यामोठ्या उड्डाणपुलांनी अख्खे शहर होत्याचे नव्हते झालंय् जणू ! आता जुन्या खुणा नि लॅंडमार्क्स तर गायब झाल्यात नि ‘कहां आ गये हम’ अशी गोंधळात टाकणारी दृष्यें दिसली की आपल्या समोर, आपल्या हयातींत हे सर्व घडत असणे सुखावह वाटते हे नक्कीच.
काही वर्षांपूर्वी कॅप्टन मुश्ताक अली, भारतीय क्रिकेटचे आक्रमक फलंदाज, यांची एक मुलाखत पाहिली होती जेव्हा ते बरोब्बर पन्नास वर्षांनी लॉर्ड्स वरील एका समारंभासाठी इंग्लंडला गेले होते. त्यांना जेव्हा विचारले की तेव्हा आणि आत्तां लंडनमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला, तर त्यांचे उत्तर होते की अजूनही इथे तितकीच कडाक्याची थंडी आहे, बाकी काहीच पूर्वीचे राहिलेले नाही. आतां कदाचित पुण्याचे तसे म्हणता येणार नाही कारण आता इथले हवामान सुद्धा आमुलाग्र बदललेले जाणवेल माझ्या वयाचे मंडळींना. तेव्हा ते अतिशय प्रसन्न, स्वच्छ आणि मोकळे असे, कोणालाही हवेहवेसे. तेव्हाचे मराठी चित्रपट बहुधा पुण्यातील वातावरणाचे, अत्यंत चोखंदळ अशा रसिकांचे असे. खरंतर पुणेरी दाद मिळाल्या शिवाय कलावंतांचे समाधान नसे.
लेकिन अब जमाना बदल गया है, लोग ज्यादा ‘प्रॅक्टिकल’ हैं, उन्हे रिझाना अब आसान नही रहा. नव्हे, हा सूर निराशेचा नाही कारण एका प्रसिध्द लेखकाने लिहून ठेवलंय की इस बदलाव मे नई आशा है, नई जान ऊर्जा शक्ती ! म्हणूनच पुण्यातल्या या झपाट्याने होणाऱ्या बदलाचे स्वागत आहे !
रहाळकर
२४ जुलाय २०२२