Sunday, August 29, 2021
ग्रंथ नि ग्रंथी !
ग्रंथ नि ग्रंथी ! -एक मुक्त, नव्हे स्वैर चिंतन ! !
ग्रंथ या शब्दाची उपपत्ती अचानक स्वस्थ बसूं देईना. ग्रंथ हे केवळ भली मोठी आणि अवजड पुस्तके नसून खरे तर दोन व्यक्तींमधील संवाद होय, मग तो गुरू-शिष्य स्वरूपात असो किंवा निखळ लेखक-वाचक स्वरूपांत. सहसा अनेक ग्रंथ अतिशय पूजनीय असतात, आपल्या सृजनातून एक वेगळे जग, प्रतिसृष्टी निर्माण करण्याची क्षमता असलेले. कित्येकांना गुरूसदृष योग्यता मिळते आणि त्यांना अक्षरश: डोईवर घेऊन मिरवले जाते. कित्येक ग्रंथ तर चक्क देवघरांत सापडतात.
ग्रंथ निर्माण करणारा ग्रंथकार म्हटला जात असला तरी खरी ग्रंथनिर्मिती केवळ योगायोगाने घडते असे माझे प्रांजळ मत आहे. या जगात प्रत्येकालाच काही ना काही सांगत राहण्याची उपजत ऊर्मी असते, मग ती वकृत्वातून असेल, काव्यस्फूर्तीतून, शिल्प नि चित्रकलेतून किंवा ग्रंथनिर्मितीतून. काहींना ते ऐकण्या-वाचण्याची इच्छा होते तर काही तिकडे चक्क काणाडोळा करतील, कारण एखादा ‘ग्रंथकार’ तेवढ्या तोलामोलाचा किंवा ताकदीचा असेलच असे नाही.
ग्रंथ आणि ग्रंथकारां बरोबरच ‘ग्रंथी’ नावाची एक कुळी असते. या शब्दाचे अनेक अर्थ प्रसंगोपात्त सांगता येतील. ग्रंथी म्हणजे ग्रंथांची पारायणे करणारा ; ग्रंथी म्हणजे ग्रंथाची देखभाल करणारा, संरक्षण करणारा ; ग्रंथी म्हणजे गाठ - गाठ सोडवणारा किंवा उकलणारा ! (म्हणजे ज्ञानदेव ग्रंथकार नि ग्रंथीही ! ! )
गुरूग्रंथ साहेबांच्या सेवेत असलेले ग्रंथी नि पसायदानांत वर्णिलेले ग्रंथोपजीविये म्हणजे ज्यांचा निर्वाह ग्रंथांवर होत असतो ते !
जरा भरकटतेंय गाडी नेहमीसारखी, पण जसजसे शब्द कोलाहल करतात तसतसे ते भरभर उतरून काढले जातात. सबब या उतावीळपणा बद्दल क्षमस्व !
मला म्हणायचंय् ग्रंथ आणि ग्रंथींबद्दल. ग्रंथांची योग्यता काय हे माऊली बहारदारपणे सांगतात. (पहा पहिल्याच अध्यायातील महाभारत ग्रंथाविषयींचे निरूपण ! ) मुळात ग्रंथ कसा असावा ? माझ्या मतें असा की जो एकदा हातांत आला तर सहसा खाली ठेवावासा वाटूं नये असा ; ग्रिप्पिंग, जखडून ठेवणारा, मनमुराद आनंद नि समाधान देणारा. ग्रंथांत विलक्षण शक्ती असते माणसांत आमुलाग्र बदल घडवून आणण्याची, जीवनांत अग्रेसर राहण्यासाठी खूप मोलाचे असतात सदग्रंथ. कित्येकांजवळ अमाप ग्रंथसंपदा असते (मात्र बरेच वेळा ती आलमारीचे वैभव एवढ्या पुरती मर्यादित राहते - असा माझा स्वानुभव आहे - कारण सर्वच ग्रंथ वाचून पालथे घालण्यासाठी नसून अडीअडचणीचे वेळी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरतात) . काही ग्रंथ पुन:पुन्हा हाती घेतले जातात ; कित्येकांचा अक्षरश: कीस काढला जातो तर कित्येकांवर पिढ्यानपिढ्या चर्चा रंगत राहतात - निरूपणे, व्याख्याने, कीर्तनें वगैरे स्वरूपांत.
मी मघा म्हटले की ग्रंथनिर्मिती योगायोगाने घडत असते. ‘मी आता एक ग्रंथ लिहायचे ठरवले आहे’ असे म्हणत कुणी ठाण मांडून बसला तरी अनेक योग जुळून यावे लागतात. मुळांत काहीतरी आराखडा असावा लागतो मनांत, एक ब्ल्यूप्रिंट, एखादा सिध्दांत, एक विचार जो फुलवून सांगण्याची विविक्षित पध्दत किंवा धाटणी आंखून घ्यावी लागते. बरें, तर्कसंगतपण, एक विशिष्ट लय, झुळझुळ वाहणारे कथानक असे सर्व योग जुळून यावे लागतात. येरा गबाळाचे काम नव्हे ते.
माझ्या माहितीत असे डझनावारी लेखक आहेत किंवा होऊन गेलेत ज्यांनी खंडीभर ग्रंथ रचलेत, मात्र देश-काल-परिस्थितींत टिकून राहिलेले खूपच विरळा. जवळजवळ प्रत्येकाला आपले ‘आत्मचरित्र’ लिहिण्याची ऊर्मी येत असते अधूनमधून ; काही लिहितात, काही पुढील जन्मीं असे म्हणत तो विचार झटकून टाकतात. मला सांगा, प्रत्येकालाच आपण आयुष्य किती सार्थकपणं जगलों हे सांगण्याचा खटाटोप कां करावासा वाटतो ? वास्तविक प्रत्येकाचे जग वेगळे असते इतर सर्वांहून. मग ते वेगळेपण सांगायचा तरी अट्टाहास काय म्हणून ?
गाडी खूपच डी-रेल होते आहे, तरी पण और सुनो !
मला जर कुणी विचारलंच, सहसा कुणीच ते धार्ष्ट्य करीत नाही माझेशी - की तुझा आवडता ग्रंथ कुठला किंवा कुठले, तर मी त्याला खुळचट म्हणेन -हा काय प्रश्न आहे असे म्हणत. अर्थातच मी म्हणेन ‘इत्यादि इत्यादि’ वगैरे ! मग जर मी हाच प्रश्न तुम्हाला टाकला तर बावचळून जाऊं नका कारण तुम्हालाही ते सहज सांगतां येणारच नाही, ‘कां’ असा माझा पुढील प्रश्न असणारच हे तुम्हाला ठाऊक आहे म्हणून !
खूप झाले हे स्वैर ‘चिंतन’ ! (जस्ट अ टाईमपास’ ! )
रहाळकर
२७ ऑगस्ट २०२१
Monday, August 23, 2021
हरि: ओम् तत् सत् !
हरि: ओम् तत् सत् !
आम्ही लहान असतांना काशीचे दोन साधू दररोज पहांटे सहा वाजता “हरि: ओम् तत् सत्, हरि: ओम तत् सत् “ असे मोठ्याने सुरात गात आणि खंजरी डफलीचे तालावर संपूर्ण गल्लीला जागे करीत असत. पंचाहत्तर वर्षांपूर्वी कानांवर पडलेले शब्द, ते साधू आणि त्यांचे खणखणीत स्वर स्पष्ट आठवतात. नंतर जवळजवळ पन्नास वर्षांनी गीता-ज्ञानेश्वरी हातात घेतली गेली आणि आतां गेले आठपंधरा दिवस या शब्दांनी माझी पुन्हा एकदा झोपमोड होते आहे !
अधिक चऱ्हाट न लावता मूळ मुद्दयांवर येईन म्हणतो.
सतराव्या अध्यायात शुध्दसत्वाचे वर्णन करताना ज्ञानदेव काही सुंदर दृष्टांत देतात. ‘स्व-रूप दर्शनाची’ आस असणाऱ्याला ते कसे सहज साध्य आहे असे सांगताना ते म्हणतात की अरे, जेव्हा सूर्य सर्व चराचराला प्रकाशित करतो तेव्हा एखादी वस्तू सहज दृग्गोचर होते ना, अगदी तसेच, सत्वगुणांचे आचरण करत असतां जीवन्मुक्ती आपोआप घडून येते, मात्र त्यांतही एक खुबी आहे. असे पहा, शुध्द सोन्याच्या चकतीला जेव्हा राजमुद्रा लागते तेव्हा तिचे मोल कित्येक पटीने वाढते ; किंवा सुगंधित, निर्मळ, शीतल पाणी सुखकर असले तरी ते पवित्र तेव्हाच म्हटले जाते ज्यावेळीं त्याला तीर्थपण लाभते ! त्याचप्रमाणे सर्व सात्विक कर्में मोक्षप्रद असली तरी ते निर्विघ्नपणे घडावे म्हणून एक वेगळीच गहन शक्ती कार्यरत असते, जिचेबद्दल थोडा अधिक विस्तार करूं .
असे पहा, सर्व विश्व-उत्पत्तीचे कारण आणि अनादी विश्रांतिस्थान वास्तविक एकाच नावाने ओळखले जाते. तथापि त्याच एका पर-ब्रह्माला तीन प्रकारांनी दर्शवले गेले आहे. वेद-श्रुती या ब्रह्माला अ-नाम, अ-जाति असे संबोधत असल्या तरी सर्व जीव अज्ञानरूपी काळोखात भांबावून जातात आणि त्यांना ब्रह्माची खरी ओळख व्हावी म्हणून ही युक्ती वापरली गेली. संसार-दु:खांनी शिणलेल्या मुमुक्षूंनी जेव्हा आपली व्यथा बोलून दाखवली तेव्हा ते परब्रह्म ज्या नांवाला ‘ओ’ देते तीच ती ही खुबी होय !
‘जीव-ब्रह्माचा । अबोला फिटून । जीव व्हावा लीन । ब्रह्म-पदीं ॥ ‘म्हणोनियां वेदें । कृपाळु होवोन । काढिला शोधोन । ऐसा मंत्र ॥ ‘जया मंत्रें हांक । मारितां ब्रह्मास । सर्वत्र जीवास । दिसे ब्रह्म ॥ “
वेदांच्या अत्युच्च शिखरांवर ‘उपनिषद’ रूपी ज्या भव्य दिव्य नगरीत मुमुक्षु साधक कायम रमलेले असतात त्यांनाच ब्रह्मदेवा समवेत हा दिव्य नाम-मंत्र लाभत असतो. खरेतर या मंत्राचा वारंवार उच्चार करूनच प्रजापती ब्रह्म्याला सृष्टी निर्माण करण्याची शक्ती मिळाली आहे ! वास्तविक सृष्टी निर्मिण्यापूर्वीं तो एकलेपणामुळे अक्षरश: वेडापिसा झाला होता ! ! मज ईश्वराला यथार्थपणे ओळखूं न शकल्याने त्याला हे चराचर उभारण्याची शक्तीच नव्हती. मात्र या एका थोर मंत्राचे अर्थासह चिंतन केल्यामुळे तो सृष्टि-निर्मितींत समर्थ ठरला - केवळ ही तीन अक्षरें ओठांवर घेतांच !
मग त्या ब्रह्मदेवाने प्रथम ब्राह्मण निर्माण करून त्यांचेकडे वेद सोपवले. मात्र आचाराची रीत कळावी आणि निर्वाहाची सोय व्हावी म्हणून त्यांच्या हातांत ‘यज्ञ’ हे साधन दिले.
त्या नंतर ब्रह्म्याने अगणित प्रजा निर्माण केली आणि हे त्रिभुवन त्यांना आंदण म्हणून देऊन टाकले.
अशा प्रकारे या एका नाममंत्राने विधात्याला थोरपण लाभले आहे. त्याच नाममंत्राचे यथार्थ स्वरूप माऊली विशद करतात -
‘सर्व मंत्रांमाजीं । श्रेष्ठ जो ओंकार । तेच आद्याक्षर । मंत्राचें ह्या ॥ आणि दुजा वर्ण । तत्कार तो जाण । सत्कार तो वर्ण । तिजा तेथें ॥ ओम् तत् सत्’ ऐसें । पाहे ऐशापरी । असे हे तिहेरी । ब्रह्मनाम ॥
खरेंतर उपनिषदें सुध्दा याच एका मंत्राला सर्व मंत्रांचे सार मानतात. या एका ब्रह्मनामाला उच्चारित जेव्हा सात्विक कर्म घडते तेव्हा प्रत्यक्ष मोक्ष दोन्ही हात जोडून उभा असतो !
तथापि, कधीकाळीं कापुराचा सुंदर अलंकार केला तरी तो अंगावर कसा मिरवता येईल ? तसेच तोंडाने हे ब्रह्मनाम उच्चारून सत्कर्म करू म्हटले तरी त्याचा विनियोग, म्हणजेच योग्य वापर किंवा उपयुक्तता ठाऊक नसेल तर सर्व खटाटोप व्यर्थच की !
असे पहा, संत-महंतांचा मेळावा सहज घरीं चालत आला असतांना मूर्खपणे त्यांचा अनादर घडला तर सर्व पुण्य संपून जावे, किंवा सोन्याचे अनेक दागिने एका पुरचुंडींत बांधून ते गांठोडे गळ्यांत मिरवावे, तसे मुखांत ब्रह्मनाम नि हातीं सात्विक कर्म असले तरी सुयोग्य विनियोगाशिवाय ते वांया जाते.
‘तैसे जरी तोंडीं । जडे ब्रह्मनाम । घडे हातीं कर्म । सात्विक ते ॥
‘तरी धनंजया । विनियोगावीण । तेंही सर्व जाण । वायां जाय ॥
अरे, लहान बालकाला भूक लागली आणि जवळच अन्नाचा ढीग असला तरी ते कसे खावें हे माहीत नसल्याने ते उपाशी नाही का राहणार ? किंवा, तेल वात नि काडेपेटी हाताशी असूनही ती कशी पेटवायची तेच जर माहीत नसेल तर प्रकाश कसा मिळणार ?
‘तैसे जरी कर्म करावया चांग । लाभला प्रसंग यथोचित । आणि आठवला मंत्र । तरीही तें जाण । विनियोगाविण । वृथा सर्व ॥
आणि म्हणून परब्रह्माचे हे जे तिहेरी नाम आहे त्याचा विनियोग कसा करावा ते आतां तुला सांगतो (असे भगवंत ज्ञानदेवांच्या मुखें सांगत आहेत ! )
अर्जुना, ओम तत् सत् या तीन अक्षरांची योजना प्रत्येक कर्माचे प्रारंभी, दरम्यान नि अखेरीस करावीत. खरोखर, ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मवेत्त्यांना ब्रह्मसाक्षात्कार याच एका मंत्राने होत आला आहे आणि ज्ञानी मंडळी परब्रह्माशी एकरूप होण्यासाठी हाच मार्ग चोखाळतात. वेदशास्त्रांनुरूप सर्व यज्ञ, तप, दान वगैरे समजून उमजून आचरतात.
ध्यानधारणेने ते प्रथम ओंकार पाहतात आणि मुखाने तो उच्चारतात. अशाप्रकारें ओंकार प्रकट करून स्पष्टपणे उच्चारल्यावरच ते कर्म करण्यास प्रवृत्त होतात - त्या प्रणवाचे वर्म जाणून !
अरे, अंधारांत जसा दिवा पेटवावा किंवा सामर्थ्यवान मित्र रानांत बरोबर असावा - ‘तैसा कर्मारंभीं । जाणावा ओंकार । समर्थ साचार । मुक्तिदाता ॥
असे पहा, स्वधर्म पाळून मिळवलेले धन ईश्वराला अर्पण करण्यासाठी अग्नी आणि ब्राह्मण यांच्या साहाय्याने ते निष्काम भावनेने यज्ञव्यवहार आरंभितात. ज्या ज्या उपाधी त्रासदायक असतील त्या सर्वांचा त्याग करतात, शिवाय नीतिन्यायपूर्वक मिळवलेले द्रव्य, भूमी वगैरे ते देशकाल आणि सत्पात्रीं दान करून टाकतात.
या व्यतिरिक्त, कठोर व्रतें आचरून उग्र तपश्चर्या करीत शरीरातील सातही धातूंना शोषून घेत जे काही ‘बंधक’ म्हटले जाते त्या सर्वांचा या ओंकारनादाने ते समूळ नायनाट करतात.
असे पहा, जी नौका जमीनीवर जड वाटते तीच पाण्यावरून लीलया तारून नेते, अगदी तसेच जी कर्में बंधक वाटतात तीच या नामोच्चाराने कैवल्यप्राप्ती करून देतात.
तथापि, ओंकाराचे साहाय्य घेऊन जी काही यज्ञादि कर्में फलद्रूप होतात तेव्हा ‘तत्काराचे’ प्रयोजनही करावेच लागते.
सर्व चराचराच्या पलीकडे असून त्यावर नजर ठेवणारे जे परब्रह्म आहे, त्याची खूण दाखवण्यासाठी ‘तत्’ या शब्दाचे प्रयोजन आहे. अशा त्या अनादि ततब्रह्माचे अंत:करणांत चिंतन करीत आणि तो ‘तत्’ उच्चारित ते कर्मफलत्याग साधतात.
‘समर्पोनि ऐसी । यज्ञयागादिक । कर्में तदात्मक । ब्रह्मालागीं ॥
‘धनंजया जाण । कर्मबंधातून । “न मम “ म्हणोनि । मुक्त होती ॥
अशाप्रकारें जे काही ओंकाराने आरंभिले ते तत्काराने ब्रह्मरूप होऊन जाते. तरीही, जोंवर कर्ता वेगळा राहतो तोंवर ते कार्य अपूर्ण राहते. पाण्यांत मीठ विरघळून नामशेष झाले तरी क्षारपण मागे राहतेच, तसे सर्व कर्में ब्रह्मरूप झाली तरी ‘कर्तेपणाचे’ द्वैत शिल्लक राहतेच ! आणि म्हणून हे न्यून घालवण्यासाठी, म्हणजेच कर्ता हा परब्रह्माहून भिन्न नाही हे दाखवण्यासाठी ‘सत्’ या शब्दाची योजना परमेश्वरानेच केली आहे. सत् या शब्दामुळे अभेद आनंद प्राप्त होतो.
आतां ‘सत्’ या शब्दाचा विनियोग कसा करावा ते भगवंत सांगतात.
मूलत: ‘असत्’ पदार्थांचा निरास करून ईश्वराने ब्रह्म्याला ‘सत्’ शब्द बहाल केला, जो देश-काल यांचे पलीकडचा, विकाररहित, नित्य, अखंडित असून आपल्याच ठिकाणी आपणच आपल्याला पाहणारा, असा आहे ! (लई भारी ! ! )
अशा प्रकारे आत्मरूपाचा अनुभव येतांच सर्व जग मिथ्या होते आणि त्या सच्छब्दांत तल्लीन होऊन ‘कर्तेपण’ गळून पडते नि कर्म तसेच कर्ता स्वत:च ब्रह्मरूप होऊन जातो. (खरेंतर कर्मामध्ये जे काही न्यून असेल ते ‘सत्’ हा शब्द भरून काढतो. )
पुढे सांगतात की ज्याप्रमाणे एखादा वाटसरू वाट चुकतो किंवा चांगल्या रत्नपारख्या कडूनही कधी कधी चूक होते, तसे नकळत घडलेला प्रमाद सांवरून घेण्यासाठी ‘सत्’ शब्दाचे प्रयोजन आहे. अर्जुना, ओंकार-तत्कार या दोन्हीपेक्षा सत् हा शब्द अधिक थोर होय -
‘लोखंडासी व्हावा । परिसाचा स्पर्ष । भेटावी ओढ्यांस । गंगा जैसी ॥ किंवा मृतालागीं । कराया सजीव । अमृत-वर्षाव । व्हावा जैसा ॥ तैसें दुष्कर्मासी । कराया पावन । जाण प्रयोजन । सत् शब्दाचें ॥
अशा रीतीने सत् या शब्दाचे थोरपण असामान्य आहे आणि एकूण ‘नाम’ हेच तत्वत: परब्रह्म होय हे ध्यानांत येईल. ‘ओम् तत् सत्’ हे नाम स्वभावत:च अतिशुध्द असून तें निर्विशेष म्हणजेच भेदरहित आहे. हे नाम ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणते आणि म्हणूनच ही तीन अक्षरें मूर्तिमंत ब्रह्मच होत !
तथापि सर्व कर्में ब्रह्मार्पण केली तरच ती ब्रह्मरूप होतात हे विसरून चालणार नाही !
२३ ऑगस्ट २०२१
क्रमश: