Thursday, March 31, 2022

 

अमृतानुभव - प्रकरण दुसरे - प्रास्ताविक

 अमृतानुभव - प्रकरण दुसरें - प्रास्ताविक 

अमृतानुभव - प्रकरण दुसरे - श्रीगुरूस्तवन 

शिवशक्तीशी एकरूप होण्याआधी आपल्या सर्व अहंभावाचा त्याग करीत करीत त्यांना वंदन करताना आपण त्यांच्यांत विलीन होऊन गेलो आहोत असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे

वास्तविक अहंभावाचा त्याग करणे सोपे नाही. एकवेळ सर्व काही त्यागणे शक्य आहे पण अहंभाव सोडणे महाकठीण खरेच. बरें, हा अहंभाव तरी कसा तर स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत आणि अज्ञान दशेपासून ते ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत त्याचे पदर एकामागे एक दडलेले असतात, इतकेच नव्हे तर आपण अहंकाराचा त्याग केला अशा अतिसूक्ष्म जाणीवेच्या रूपांतही तो चित्तांत लपून राहतोच ! तस्मात्, अहंकाराचे पदर असे एकामागे एक नाहीसे करावे लागतात. ज्ञानदेवांनी केळीच्या बुंध्याचे एकएक सोपटे काढून टाकता टाकतां त्या सोपट्यांनी लपविलेले मर्यादित आकाश हळू हळू विशाल आकाशांत प्रविष्ट होते, तसा माझ्या अहंभावाचा त्याग करीत करीत शिवशक्तींत समाविष्ट होत आपण त्यांना वंदन केले, असे म्हटले आहे. त्यांचे शिवशक्तिवंदन अद्वैतांत अशा रीतीने परावर्तित होते ! (‘रंभागर्भु आकाशें निघाला जैसा ! ! ) 


दुसऱ्या प्रकरणांत गुरूचा महिमा सुंदर ओंव्यांत व्यक्त करतात श्री ज्ञानदेव. खरेंतर ज्ञानेश्वरींत आपल्या गुरूंचा महिमा त्यांनी अनेक स्थळीं आणि निरनिराळ्या प्रकारांनी वर्णिला आहे. तेराव्या अध्यायांतआचार्योपासनम्या पदावरील त्यांचे सविस्तर भाष्य अजरामर तर आहेच, पण गुरूमहिमा गातांना त्यांनी अनेक ठिकाणी काव्यात्म वर्णने केली आहेत तर काही ठिकाणी रूपकांचा आश्रय केला आहे.

अगदी अनुभवामृतांत देखील जे गुरुवंदन येते त्यांत अर्ध्याहून अधिक भाग काव्यपूर्ण वर्णनाचा आहे. गुरू हाउपायवनवसन्तु’, आज्ञेचाअहेवतन्तूआणिकारूण्याचा मूर्त अविष्कारअसे म्हटलेंय. एवढेच नव्हे तरअविद्यारूपी अरण्यांत जीवपणाचे फेरे भोगत असलेल्या (जन्म-मृत्युचे फेरे ) जीवात्म्याला साहाय्य करण्यासाठी गुरू धांवून येतो आणि मायारूप हत्तीचा नाश करून त्याला मोक्षरूपी मोत्यांचा चारा जेवूं घालतो ! त्याने शिष्याला उपदेश केला की प्राप्त होणाऱ्या आत्मज्ञानाच्या कला पौर्णिमेच्या चंद्राची शोभा धारण करतात. गुरूची भेट होताच द्रष्टा नि नानारूपें असलेल्या दृष्य्यांचा मुखवटा गळून पडतो आणि नामरूपात्मक विश्वाचा सगळा आभास नामशेष होतो

उपासनेसाठी कष्ट करीत असलेल्या शिष्याच्या खटपटीला गुरूच्या शब्दामुळे अपार फळ प्राप्त होते. फलभाराने ज्याच्या फांद्या जमीनीपर्यंत टेकल्या आहेत अशा वृक्षाशीच त्याची तुलना होऊं शकते

तथापि, गुरूकृपा-दृष्टीरूप वसंतऋतुचा प्रवेशनिगमवनांत’, म्हणजे वेदांनी सांगितलेल्या ज्ञानांत होत नाही तो पर्यंत भक्ताला इष्ट फळाची प्राप्ती होत नाही

केवळनिरवयवअसलेले आकाशसावेवहोण्याचीहावधरते, म्हणजेच आपल्याला साकार रूप प्राप्त व्हावे अशी इच्छा धरते. गुरू म्हणजेकोण्ही एक भरीव आकाशआहे ! शीतल प्रकाश असलेला चंद्र गुरूमुळे अस्तित्वांत आला आहे, तर सूर्याला त्याचे तेज गुरूमुळे प्राप्त झाले आहे एवढेच म्हणून ज्ञानदेव थांबत नाहीत, तरसामर्थ्याचेनि बिकें / शिवतेंही गुरूत्वें जिंकेम्हणजे सामर्थ्याचे दृष्टीने विचार केला तर गुरू साक्षात शिवाला जिंकतो असे ते म्हणतात

गुरूकृपा झाल्यावर आत्मवस्तुचे अनुभवाच्या दृष्टीने जीवाची इतकी प्रगती होते कीजें शिवपणही वोविळें (ओंवळे)  / आंगी लावी //“ ; 

अथवा, आपली मूळ सच्चिदानन्द अवस्था पुन: प्राप्त करून घेण्यासाठीशिऊ मुहूर्त पुसे / जया जोशियातें ! // “ , असे उल्लेख ज्ञानदेव करतात आणि गुरूचे स्थान शिवाहूनही वरचे आहे असे ठणकावून सांगतात


वरील सर्व विवरण अर्थातच काव्यपूर्ण वर्णनाचे आहेत हे जाणकारांना वेगळ्याने सांगण्याची गरज नाही ! मात्र तेही वर्णन श्रीज्ञानदेवांनी परब्रह्म-भावानेच केले आहे हेही त्रिवार सत्य आहे


प्रत्यक्ष गुरूस्तवनाचे प्रकरण सुरू करण्यापूर्वीं प्रारंभीच मंगलाचरणांत आलेल्या दोन श्लोकांचा पुन्हा परामर्ष घेणे उचित ठरेल


क्रमश


Wednesday, March 30, 2022

 

अमृतानुभव - पुष्प सव्वीसावें

 अमृतानुभव - पुष्प सव्वीसावें 

प्रकरण पहिले

ओंवी क्र. एकोणसाठ

अहो ! ऐक्याचे मुद्दल ढळे / आणि साजिरेपणाचा लाभु मिळे / तरी स्वतरंगाची मुकुळें / तुरंबु का पाणी //५९//‘ 


(साजिरेपण = सुशोभित ; मुकुळ = पुष्प, कमळ ; तुरंबु = वास घेणे, परिधान करणे


आपल्या ऐकत्वाला धक्का लागता पाण्याला जर आपल्याच तरंगांनी शोभा येत असेल, तर पाण्याने आपल्या तरंगांचा आस्वाद का घेऊ नये ? म्हणूनच एकत्व मोडता जर विलास घडत असेल तर त्यांत विशेष ते काय


निज ऐक्या धक्का नसतां तरंग शोभा तत्वतां भोगण्यास्तव मिळत असतां कां सांगा भोगावी ?

तरंग रूपी कमळास भोगूनि घेई त्याचा वास जल आपल्या जलपणास उणीव नाणतां थोडीही ’ 


मोडिता कांही, आपले अद्वैत, होय शोभा प्राप्त, पाणियासी

तरी लाटारूप, कळ्यांचा सुगंध, होवोनि स्वच्छंद, बागडो तें.   ” 



ओंवी क्र. साठ

म्हणौनि भूतेशु भवानी / वंदिली करूनि सिनानी / मी रिघालों नमनीं / ते हें ऐसे //६०//‘ 


(सिनानी = वेगळाली ; रिघालों = उद्युक्त झालो


म्हणून शिव आणि शक्ती यांना अभिन्न मानून मी वंदन करतो. - असा हा माझा वंदनाचा सोहळा आहे


ह्या शिवशक्ति प्रत त्यांच्यांत आणि माझ्यांत आणिकीं किमपि द्वैत मीं तीं उभयतां वंदिलीं

जेवीं सूर्यप्रभेने वंदणें सूर्याकारणें वा जलें जलासी न्हाणणें तैसेच हे


शिवशक्ती लागीं, म्हणोनि अभिन्न, जाणोनि वंदन, केलें ऐसे ” 


ओंवी क्र. एकसष्ट

दर्पणाचेनि त्यागें/ प्रतिबिंब बिंबी रिगे / कां बुडी दीजे तरंगे / वायूचा ठेला //६१//‘ 


(वायूचा ठेला = वायूचे थांबणे

आरशांत मुखाचे प्रतिबिंब दिसते आणि तो दूर झाला की प्रतिबिंब मूळ मुखांत मिसळून जाते, जसे वाऱ्यामुळे पाण्यावर लाटा दिसतात मात्र वारा थांबतांच त्या पाण्यात विरून जातात


दूर केल्या दर्पणातें प्रतिबिंब बिंबीं मिळते वा तरंग विरती जलातें वायू बंद होतांची ।।

येथें वायू आरसा द्वैतपण मी प्रतिबिंब लहरीसमान तें द्वैत गेल्या निघून मी निजबिंबीं मिसळलों


जैसें प्रतिबिंब, बिंबीं होय लीन, सारितां दर्पण, एकीकडे

नातरी तरंग, सागरीं विलीन, वाहता पवन, थांबतां चि.    ” 


ओंवी क्र. बासष्ट

नातरी नीद जातखेवों / पावे आपुल्या ठावो / तैशी बुध्दित्यागे देवीदेवो / वंदिलीं मियां //६२//‘


(नीद = निद्रा ; जातखेवों = जाताक्षणीं


त्याप्रमाणे शिवशक्तिच्या एकरूपतेचा विचार केला असतां द्रष्टा नि दृष्य दोन्हीही उरत नाहीत. अशा अंतर्बाह्य एकरूप शिवशक्तिला माझे वंदन असो


निद्रा जीवभावाची सरतां शिवपण जागृतीची प्राप्ती तात्काळ होते साची लागतां येक क्षण

म्हणून स्वप्नस्थितीचे भान जें सुखदु:खादि मी तूं पण त्याचे होय निरसन निद्रेचिया बरोबरी

ही चि जागृतीची प्रचीती कीं मी आणि शिवशक्ती एकरूप निश्चिती एकपणें एक असूं ’ 


किंवा जैसी निद्रा, संपतांचि साच, मूळ जागृतीच, प्राप्त होय

तैसी अहंबुध्दि, सांडूनि स्वभावें, वंदिली मी भावें, देवोदेवी” 


ओंवी क्र. त्रेसष्ठ 

सांडुनी मीठपणाचा लोभु / मिठें सिंधुत्वाचा घेतला लाभु / तेवीं अहं देऊनि शंभू- / शांभवी झाला //६३//‘ 


मीठाने आपल्या वेगळेपणाचा लोभ सोडून जसा सागराशी एकरूपतेचा लाभ घ्यावा, त्याप्रमाणे मी माझेअहंपणत्यागून त्या शिवशक्ति-स्वरूपात विलीन झालों


मिठें मीठपणाचा लोभ सोडोनि सिंधुचा लाफ घेतल्या साचा सिंधुएवढें ते होई

आतां मिठाचे मीठपण ते तत् ठायींचे काठिण्य काठिण्याची हीच खूण कीं पातळीचें घन झाले

तेव्हांच मिठाचा मीठपणा आला प्रचीतीस जाणा घनत्व या अभिमाना धारण केले पातळानें


मिठें मीठपण, आपुलें सांडोन, रहावें होवोन, सागर चि  

तैसा झालों मी हि , शिवशक्तिरूप, मुळीं होतां लोप, अहंतेचा ” 


ओंवी क्र. चौसष्ठ 

शिवशक्ती समावेशें / नमन केलें म्यां ऐसें / रंभागर्भ आकाशें / रिगाला जैसा //६४//‘ 


(रंभागर्भ = केळीचा गाभा


केळीच्या गर्भांत आकाशाशिवाय काहीच नसते .त्याप्रमाणे माझ्या अहं आणि ममतेची सालपटें काढून टाकून माझे जे गर्भरूप शिवशक्ति आहे, त्यांत विलीन होत माझे हे वंदन आहे


काढितां सोपटे, केळीतील गाभा, जाय जैसा नभा, मिळोनियां

शिवशक्ति-रूपीं, एकत्वें वंदन, अहंता सांडोन, केले तैसें.   ” 


इति श्रीमत् अमृतानुभवे शिवशक्ति समावेशन नाम प्रथमोध्याय: परिपूर्णते” 

                  हरये नमो, हरये नमो, हरये नम



This page is powered by Blogger. Isn't yours?