Friday, September 23, 2016

 
“कर्म-योगी”
प्रत्येक माणसाला त्याच्या भौतिक आणि पारमार्थिक उन्नतीसाठी कर्मयोगावांचून पर्याय नाही. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत, तमोगुणी प्रकृतीपासून शुद्ध सत्वगुणी प्रकृतीपर्यंत आणि साधकांपासून सिद्धांपर्यंत स्वत:च्या जीवनसाफल्याचा निश्चित मार्ग म्हणजे कर्मयोगच होय. भक्तीयोगी, ज्ञानयोगी, राजयोगी वा हठयोगी, इतकेच नव्हे तर सिद्ध आणि अवतारांसाठीही कर्मयोगाचे आचरण अटळ आहे !
       समर्थ रामदास स्वामी म्हणतात, “ जीवा कर्मयोगें जनीं जन्म झाला “, आणि मना त्वांचि रे पूर्व संचीत केलें, तयासारिखें भोगणें प्राप्त झालें !” म्हणजेच आपल्या कर्माचे फळ ‘संचित’ रुपाने जमा होते आणि तोच कर्मफळाचा भाग ‘प्रारब्ध’ म्हणून बरोबर घेवून आपण पुन्हा जन्म घेतो. या कर्मफळाला “ऋत” असेही म्हणतात.
          खरे तर कर्मयोग स्वहित साधण्याची जीवनप्रणाली होय. समर्थांचें असे सांगणे आहे की जाणतेपणाने कर्म केले तर गुणांचा विकास होऊन भाग्य आपसूक प्राप्त होते आणि जीवन सर्वार्थाने धन्य होते. कर्मयोगच सर्वसामान्यांना तारील हे जनमनाला समजावण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. ते म्हणाले :- “ सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणि स्वधर्म । सत्संग आणि नित्यनेम । निरंतर ।। ऐसे हे अवघीचि मिळे । तरीच विमल ज्ञान निवळे । नाहीं तर पाषांड संचरे । बळेच समुदायीं ।। “
        त्यांच्या साऱ्या शिकवणुकीचे सार म्हणजे ‘ परमार्थाचा मार्ग कर्ममार्गातच सुरू होतो, भक्तीमध्ये दृढ होतो, ईश्वराच्या ध्यानात स्थिर होतो आणि शेवटीं राजमार्ग होऊन ज्ञानात (आत्मज्ञानात ) संपतो. तात्पर्य, कर्मप्रवृत्तीतच माणसाने विवेक, वैराग्य आणि ईश्वराचें अनुसंधान ठेवावे.
       समर्थ रामदासांच्या नंतरच्या काळात भारतीय संस्कृतीची पुन्हा गळचेपी झाली. समाज भरडला गेला . नीतिमूल्यें हरवली. तरूण पीढी निस्तेज झाली. तेथे स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांनी “ उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत,” आचार: प्रथमो धर्म:” ही बोधवाक्यें अभिमंत्रित करून जनजागृती केली. लोकांना स्वकर्माचा मार्ग दाखवून प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल राखायला शिकवले. ‘कर्म उदंड करा ; देवावर, प्रारब्धावर भार टाकून आशाळभूत आणि नेभळट होऊ नका’ असा संदेश त्यांनी दिला.
         नंतर लोकमान्य टिळकांनी ‘ भक्तिप्रधान कर्मयोग ‘ हे निष्काम कर्मयोगातूनच होते असा गीतेचा सारांश ठामपणे सांगितला. “कर्तेपणाचा अहंकार’ कर्मयोगानेच क्षीण होतो, पण तोपर्यंत तुमचा कर्तेपणा जगाच्या परोपकारासाठी वापरा, समाजाच्या उन्नतीसाठी आणि राष्ट्रकार्याचा उदात्त हेतू लक्षात ठेऊन कर्म करा’ हा त्यांचा संदेश “केसरी” मधून समाज जागृती करीत राहिला.
         श्रीकृष्णाने अर्जुनाला समोर ठेऊन आपल्या सर्वांसाठी गीता सांगितली. श्रीकृष्णाने मोक्षप्राप्तीचा नवीन मार्ग ‘ निष्काम कर्मयोग ‘ सांगितला. म्हणाले, ‘ऊठ आणि आपले स्वधर्म कर्म कर ; त्यातून तुला इहलोक, परलोक आणि परमार्थ सारेच काही मिळेल ‘!
        मात्र थोड्याच काळात आम्ही हे सर्व विसरलो, म्हणून श्रीकृष्ण ज्ञानेश्वर महाराजांच्या रुपाने पुन्हा अवतरले. त्यांनी कर्मयोगी व्हा आणि प्राप्त कर्म ( विहित कर्म ) करा, हेंच सांगितले. ज्ञानेश्वरीत या संबंधी खूप ओव्या आहेत.
श्रीज्ञानेश्वर केवळ ओव्या लिहून थांबले नाहीत. या अवतारी संत पुरूषाला पुरेपूर ठाऊक होते आम्ही पुढे कसे वागणार ते !! त्यांनी “विश्वेशरावो” , परमात्म्याचे सगुण साकार रूप श्रीनिवृत्तिनाथ, यांच्याकडे कृपाप्रसाद मागितला. या जीवांच्या जीवनात ‘स्वधर्मसूर्य’ उगवून यांचा ‘अज्ञानाचा अंधकार’ नाहीसा होवो’ आणि या जीवांना ‘सत्कर्माची आवड लागो ‘; ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ‘ या पृथ्वीतलावर अवतरो व ते या सर्वांचे ‘ ‘सोयरे होऊन ‘ त्यांना स्वधर्म कर्माच्या मार्गात सर्व प्रकारें मदत करोत.’  त्यांचें मागणे श्रीनिवृत्तिनाथांनी मान्य करून आपल्या सर्वांना कृपाप्रसाद दान दिले !!!
               हरये नम:  । हरये नम: । हरये नम: ।।

प्र.शं.रहाळकर
लंडन २३ सप्टेंबर २०१६

       


Monday, September 19, 2016

 
एक स्फुट
आज यह चिंतन हिन्दी भाषा मे प्रस्तुत करने का प्रयास करना चाहूंगा ! वास्तव मे यह अजनबी महसूस नही होना चाहिये, गोया काफ़ी समय के बाद यह कोशिश करने का साहस जुटा रहा हूँ !!
कल शाम चिंतन में मश्गूल था और कुछ संस्कृत पंक्तियाँ याद आ गईं ! और उनका सम्बंध ईसा मसीह से जोड़ने का विचार दिमाग़ में बस गया !!
तीन संस्कृत वचनों में प्रथम है - “तस्यैवाहम् “ जिसका मतलब है - ‘ मैं उसका हूँ ‘ ; दूसरा है - “ तवैवाहम्” अर्थात् ‘ मैं तुम्हारा हूँ ‘ और तीसरा वाक्य है - “ त्वामेहम् “ याने ‘तुमही मैं हूँ ‘ !!  ( यह तीनों पंक्तियाँ ईश्वर के प्रति हैं !!!)

अब ईसा का इनसे सम्बंध कुछ इस प्रकार जोड़ा जा सकता है :- १. जब ईशूने पहली बार घोषणा की वह थी -- मैं ईश्वर का प्रेषित हूँ -  I Am the Messenger of God !
२. फिर कहा - मैं ईश्वर का पुत्र हूँ - I Am the Son of God
और बाद में पूर्ण ज्ञान के बाद घोषणा की, ३. मैं और स्वर्गमे विराजमान मेरे पिता और मैं एकही हैं - I and Father in the Heaven are One !!!

इसी विचार की अगली कड़ी है हमारे द्वैत, विशिष्ट अद्वैत और अद्वैत का सिध्दांत, जो रामानुजाचार्य, मध्वाचार्य और श्रीमत् शंकराचार्यजी की देन है और ऊपरनिर्देषित वाक्योंसे मिलतीजुलती लगती हैं !

आज बस इतना ही !

भवदीय,
डाक्टर प्र. शं. रहाळकर
१८ सितंबर २०१६
लंदन


Thursday, September 08, 2016

 
एक आवाहन !

प्रिय आत्मीय,
आज या पत्राच्या निमित्ताने माझे ह्रद्गत तुम्हाला सांगण्याचा मानस आहे. तुम्ही सर्वच आपापल्या व्यापात व्यस्त आहात, नुकतीच शाळा आणि महाविद्यालये सुरू झालीत आणि दैनंदिन व्यवहारांना गती मिळते आहे. त्यात माझे हे मनोगत निवांतपणे वाचणे अंमळ त्रासदायक होईल याची सुप्त जाणीव मला आहे ; तथापि तो धोका पत्करून हे आवाहन करतोय, त्याची कृपया दखल घ्यावी ; इति प्रस्तावना !!

मला असं म्हणायचंय की बाहेरच्या जगातली इत्थंभुत माहिती आणि ज्ञान तर आता तुमच्या बोटांवर आहे ; क्षणार्धात तुम्हाला हवे ते तुम्ही वाचतां, ‘शेअर’ करता, मनसोक्त आनंद देखील घेतां ! पण मला खरे खरे सांगा, यातले कितपत तुमच्या कायम स्मरणात राहते ? त्याचा कितपत कायम स्वरूपीं उपयोग टिकतो ? मी कदाचित चुकत असेन, पण कितीजण हातात ग्रंथ किंवा पुस्तके घेतलेली दिसतात ? काही सन्माननीय अपवाद वगळतां अत्यल्पच.
या जमान्यात ग्रंथांची आवश्यकताच काय असा प्रश्न साहाजिक आहे, कारण आता सगळेच ‘ओनलैन मिलते नथी’?!

हा बाह्य जगातला व्यवहार पाहतांना आपल्या अंतरंगातला व्यवहार आपण जाणून घेणार आहोत कां? त्याची गरज कदाचित जाणवत नसेल या घडीला. पण जरासे अंतर्मुख व्हायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे ?

 काय म्हणून ??

मित्रानो ! आपण कोण, कुठले, इथे काय करतोय, काय करायला हवे आहे, हे जग नि सगेसोयरे कुठले, हे जगच निर्माण का झाले, असेच का झाले, पुढे यांचे नि माझे काय होणार वगैरे वगैरे वगैरे प्रश्न बालपणापासून आजपावेतो कधी ना कधी प्रत्येकाच्या मनांत येऊन गेले असणारच. काही प्रश्नांची तरी शहानिशा झाली काय ?

विश्वास ठेवा, यांतील काही प्रश्न केवळ अर्धा इंच ‘अंतरंगात’ डोकावून मिळतील ! यासाठी कुणी गुरू, सत्संग, मंदिर-मस्जिद धुंडत बसायला नको ; पूजा पाठ, जप जाप्य, आराधना, व्रतवैकल्यें नकोत. बस् दररोज थोडा वेळ नियमितपणे स्वत:शी स्वत: निश्चळपणे ‘असणें’ !

यांत नवीन ते काय, आम्ही रोजच स्वत:शी स्वत: एकटेच तर असतो ; आम्ही पण ध्यान धारणा वगैरे वगैरे करतोच की !! चोक्कस ! पण त्यातून कितपत ऊर्जा मिळते? कितपत अधिक शांती लाभते? कितपत ‘प्रकाश’ मिळतो?
खरे तर ‘ध्यानाच्या’ अपरंपार पद्धती प्रचलित आहेत, इतक्या की, जस्ट कन्फूजिंग ! मी कुठलीच रिकमेंड करणार नाही; प्रत्येकानेच आपापल्या सोयीची पद्धत निवडावी, मात्र तींत अग्रेसर मात्र व्हावे !!
दासबोध, गाथा, गीता, ज्ञानेश्वरी सारखे अप्रतिम ग्रंथ मराठीत उपलब्ध आहेत. दररोज नाही तरी आठवड्यातून एकदा तरी ते चाळावेत , जमल्यास अभ्यासावे, पहा तर खरे एकदा तरी करून ! घरात यांतील काही असतील तर उत्तमच, नसतील तर उसने घ्यावे पण वाचावे नक्की !
(आपल्या पुस्तकाची जाहिरात करण्यासाठी हा पत्रप्रपंच नाही; केवळ पोटतिडकीने हे आवाहन करतोय. मला स्वत:ला हे सर्व जाणवायला पंचाहत्तर वर्षें लागली ! निदान तुम्ही तरी वेळच्यावेळीं मनावर घ्या अशी मनोमन कळकळ आहे, म्हणून हे आगांतुक आवाहन !!)

आवश्यकतेपेक्षा जरा जास्तच लांबण लागली, तरी क्षमस्व !!
तुमचाच,
प्र. शं. रहाळकर
८ सप्टेम्बर २०१६


This page is powered by Blogger. Isn't yours?