Tuesday, January 30, 2024
दहा नंबरचा पाना !
दहा नंबरचा पाना !
शीर्षक पाहून नवल वाटले ना ? पण हा शब्द कोणत्याही मेकॅनिकल इंजिनियर किंवा मेकॅनिकला नवा नाही. मी मेकॅनिक नसलो तरी घिसाडी म्हणून नक्कीच नावारूपाला येऊ शकलो असतो पण नशिबात माणसांचा (गुरांच्या ऐवजी ) डॉक्टर होणे विधिलिखित होते. ते असो.
आमच्या फोर्ड गाडीचा स्टार्टर अचानक जॅम होई आणि बोनेट उघडून केवळ दहा नंबरच्या रिंग पान्याने बोल्ट ढिला करताच स्टार्टर लगेच सुरू होई. एकदा या रिंग पान्यासाठी बारा मैल पायपीट केली आहे मी नर्मदे कांठच्या बडवाहचे जंगलातून . त्या वेळी गॅडोर ही एकमेव कंपनी उत्तम प्रकारचे पाना-सेट बनवीत असे. मात्र दहा नंबरचा पाना खरोखर नंबरी होता कारण बहुतेक बोल्ट्सना तो चपखल बसत असे. बंडलबाजी करत नाहीये मी कारण हॉर्न, रेडियेटर, बॅटरीच्या केबल्स नि कार्ब्युरेटर सुद्धा या दहा नंबरी पान्याने मी लीलया खोलीत किंवा टाईट करत असे. होय, ही सर्व कामें मी बरेच वेळा केली आहेत. प्रूफ काय विचारतां ? माझा शब्दच दगडावरील रेघ समजा ! शिवाय ती फोर्ड गाडी क्वचितच मेकॅनिकच्या गॅरेजमधे न्यावी लागे हे त्रिवार सत्य आहे. तेही असो.
हा बेटा दहा नंबर खरंच विशेष म्हटला पाहिजे. दशरथ, दहातोंड्या रावण, दसनंबरी शिणेमा, दहा डाऊनिंग स्ट्रीट, अशा कित्येक दहा दहाच्या चलनी नोटा अस्तित्वात आहेत. बाप नंबरी - बेटा दस नंबरी हा सिनेमा मी कित्येक वेळा पाहिला असूनही पुन्हा पुन्हा पाहू शकेन !
रहाळकर
३१ जानेवारी २०२४
श्रीमान न. शं. रहाळकर
श्रीमान न. शं. रहाळकर
श्रीमान नरहर शंकर रहाळकर ( १८८१-१९५७ ) हे मालव प्रांतातील एक प्रख्यात साहित्यिक, कवी, समीक्षक आणि अतिशय कर्तबगार उच्च पदस्थ अधिकारी होऊन गेले. अत्यंत सहृदय, संभाषण चतुर आणि चतुरस्त्र असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. मराठी, संसकृत, तसेच आंग्ल भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. राजदरबारी कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून कार्यरत असताना (होळकर स्टेट ) इंग्रज अंमलदारांशी त्यांनी केलेला पत्रव्यवहार तात्कालीन होळकर नरेश नेहमीच वाखाणिल असत. हल्लीच्या पद्म पुरस्कारांप्रमाणे ते वेळी त्यांना ‘मशीर बहादुर’ आणि ‘मुंतझिम-ई-खास बहादुर’ अशा बिरूदांनी त्यांचा गौरव करण्यांत आला होता. कॅबिनेट सेक्रेटरी या पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी जयपूर, भडोच आणि लाहोर येथें डायरेक्टर इंडस्ट्रीज या हुद्यावर अतिशय चोख कारभार केला.
तथापि ‘साहित्य सेवा’ हा त्यांचा मूळ स्वभाव होता. तात्कालीन दिग्गज साहित्यिक त्यांचे निकटचे मित्र होते. त्यातही कवी केशवसुत, भा. रा. तांबे, ग. त्र्यं. माडखोलकर, कवी ‘बी’ इत्यादि तर अधिकच निकटचे. त्यांनी लिहिलेला ‘केशवसुत आणि त्यांची कविता’ हा शोध प्रबंध पुस्तकरूपांत तत्कालीन पुणे मुंबई विद्यापीठांत क्रमिक पुस्तक म्हणून नावाजला गेला.
या व्यतिरिक्त ‘शाकुंतल सौंदर्य’ हा समीक्षा ग्रंथ विशेषत्वाने गाजला होता. ‘पुष्पांजली’, ‘होळकरांचा फटका’ वगैरे काव्यग्रंथ प्रकाशित झाले. तात्कालीन दिग्गज साहित्यिकां बरोबरच नवोदित कवी, लेखक वगैरेंचा नित्य राबता ‘रहाळकरांच्या माडीवर’ रंगत असे असे गौरवाग्गार माडखोलकरांच्या आत्मचरित्रांत पाहता येतील. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते दोनदां स्वागताध्यक्ष होते.
असा हा थोर साहित्यिक, कवी नि समीक्षक सात डिसेंबर एकोणीसशे सत्तावन सालीं पडद्याआड गेला, ठीक भास्करराव तांब्यांच्या पुण्यतिथी रोजीं ! त्या उभयतांना भावपूर्ण श्रद्घांजली ! !
डॉ. प्र. शं. रहाळकर (नातू)
पुणे 21
9860495045
Monday, January 29, 2024
गच्छत: स्खलनं क्वापि ….!
गच्छत: स्खलनं क्वापि……..!
संस्कृतमध्ये एक वचन येते - ‘गच्छत: स्खलनं क्वापि भवत्येव प्रमादत: / हसन्ति दुर्जनास्तत्र समादधति सज्जन्ना: // ‘ म्हणजे चालता चालतां कोणी पडला आणि त्याला इजा झाली तर दुष्ट प्रवृत्तीचा माणूस त्याला हंसेल ; मात्र सज्जन माणूस कळवळेल नि म्हणेल ‘अरेरे’ !
वरील वचन आणि त्याचा अर्थ समजून घेत असतांना मनांत विचारांचे काहूर उठले आणि मानवी मनाच्या जडणघडणीकडे अधिक विचार करावासा वाटला. आपल्या मनावर संस्कारांचे किती विलक्षण स्वामित्व असतं नाही ! सर्वच संस्कार खरंतर आपण आपसूक आपल्या गाठीशी बांधून घेत असतो, जन्मजात म्हणा हवे तर किंवा पूर्वजन्मांपासूनही कदाचित्. मात्र काहींना रूजविण्यासाठी अनेक घटक, घटना, व्यक्ती नि त्यांच्या प्रकृती कारणीभूत ठरतात. सुसंस्कार रूजविण्यासाठी ‘संस्कार वर्ग’ चालवले जातात हे खरे असले तरी मुळात ते अनुकरणाने रूजत असतात. थोर व्यक्तींचे अनुकरण करत असताना साहाजिकच त्यांची वर्तणूक ध्यानात घेतली जाते, निव्वळ शब्द नव्हेत. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावीं पाऊलें’ अशी म्हण आपण खूप लहानपणी ऐकलेली असते. कित्येक थोर पुरूषांची, संत सज्जनांची, देवी देवतांची चरित्रे ऐकत वाचत आपल्या मनाची जडणघडण होत जाते हेही खरेच आहे. तथापि आपला पिंड पोसला जातो अन्नाद्वारें, मग ते अन्न तोंडावाटे पोटात जाणारे असो वा कान नाक डोळे नि त्वचेच्या द्वारें ! मानवी शरीराच्या पंचकोषांपैकी अन्नमय कोष, प्राणमय नि मनोमय कोष यां सकट पाचही कोष किंवा आवरणें आत शिरत असलेल्या विविध प्रकारच्या ‘अन्ना’ वरच कार्यरत असतात. त्यांना निकोप, सुदृढ राखण्याचे भान किंवा तारतम्य असणे गरजेचे आहे.
या साठी अगदी सोप्या वाटणाऱ्या ‘ट्रिक्स’ कामाला येऊं शकतील. एक - ‘हेल्प एव्हर, हर्ट नेव्हर’ (जमेल तेवढी मदत करा, निदान कुणाला दुखवूं नका ) आणि ‘लव्ह ऑल, सर्व्ह ऑल’ ( सर्वांवर निर्व्याज प्रेम करा, सर्वांची यथायोग्य सेवा करा ) !
पहा गाडी कशी रूळ बदलत गेली ! !
रहाळकर
२९ जानेवारी २०२४