Thursday, March 30, 2023
परप्रांतीय !
परप्रांतीय !
आज सकाळी दोन गाणी सहज कानावर पडली, एक होते गुजराती गीत नि दुसरे बंगाली. दोन्ही गाण्यांचे स्वर, सूर आणि शब्द खरोखर मंत्रमुग्ध करणारे होते आणि मला खूप खूप उंच भिरभिरायला भाग पाडणारे !
त्या उंचीवर विहरत असतांना मला गुजराती, बंगाली आणि इतर सर्वच प्रांतांतील -अगदी दाक्षिणात्य देखील - गाणी, संस्कृती, सौहार्द्र, बोलीभाषा आणि राष्ट्रप्रेमाची प्रखरतेने जाणीव झाली, याद आली आणि अगदी अंत:करणापासून प्रेम आणि आपुलकी उफाळून आली. हा अनुभव विलक्षण होता.
खरोखर, आपण भारतीय किती भाग्यवान आहोत नाही ? एवढी प्रचंड विविधता असूनही सर्व प्रांतांतील, सर्व बोलीभाषांतून, सर्व साहित्यातून, सर्व प्रकारच्या कलाविष्कारांतून, अगदी खेळाचे मैदान किंवा सैन्यदलात त्या विविधतेतील एकत्वाचे किती सुंदर दर्शन घडत असते नाही !
वास्तविक या अनेकत्वातील एकात्मभाव आपण नेहमीच बोलत ऐकत आलो आहोत. मात्र त्याची प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी असे काही दुर्मीळ क्षण यावे लागतात. आज तशा अनुभवाने मी चिंब चिंब आहे, गीतेतल्या ‘मुहुर्मुहू’ सारखा !
हा आनंद तुमचेपर्यंत पोहोचवावा म्हणून केलेली आजची ही धडपड !
रहाळकर
३० मार्च २०२३
(श्रीराम आणि दासनवमी )
Saturday, March 25, 2023
ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे सत्तावीस
ज्ञानेश्वरी सौंदर्य - भाग एकशे सत्तावीस
‘दैवासुर संपद्विभाग योग’ या सोळाव्या अध्यायातील आसुरी संपदेविषयीं आपण मागील भागांत विवेचन पाहिले. आता माऊली काम-क्रोध-लोभ या त्रिकुटाचा संहार करत दैवी गुणांचे संपादन कसे करता येईल त्याचे विवेचन करतात.
ते म्हणतात -
‘धर्मादिकां चौहीं आंतु । पुरूषार्थाची तेचि मातु । करावी जैं संघातु । सांडील हा ॥’ - म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरूषार्थांपैकी एकाचा जरी अंगिकार करायचा असेल तर या कामक्रोधादि त्रिकुटाचा सर्वप्रथम बिंमोड करता आला पाहिजे.
खरंतर भगवंत या ठिकाणी म्हणतात की या त्रिकुटाचा नायनाट केल्याशिवाय माणसाचे कल्याण झाल्याचे मी कधीही ऐकलेले नाही !
‘जया आपणपें पढिये । आत्मनाशा जो बिहे । तेणे न धरावी हे सोये (संगत) । सावधु होइजे ॥’ (जो आपल्या स्वत:वर प्रेम करतो त्याला आत्मनाशाची भीती वाटणे साहाजिक असल्याने त्याने या त्रिकुटाची कधीच कास धरू नये. त्याने या बाबतींत नेहमीच सावध असले पाहिजे. )
माऊली विनोदाने म्हणतात की कोणी पोटाला धोंडा बांधून समुद्रात पोहायला शिरावा किंवा जेवणात जालीम विष कालवून खाण्यासारखे आहे ते !
‘इहीं कामक्रोध लोभेंसी । कार्यसिध्दी जाण तैसी । म्हणोनि ठावोचि पुसीं ययांचा गा ! ॥’
पुढे म्हणतात,
‘जैं कहीं अवचटें (चुकून, न कळत ) । हे तिकडी सांखळ तुटे । तैं सुखें आपुलिये वाटे । चालों लाभे ॥’ (जेव्हा कधी या त्रिकुटाची साखळी मोडेल तेव्हाच आपल्या कल्याणाच्या वाटेवर सुखाने जाता येईल ).
‘त्रिदोषीं सांडिले शरीर । त्रिकुटीं फिटलिया नगर । त्रिदाह निमालिया अंतर । जैसे होय ॥’ ( असे पहा, वात पित्त कफ या त्रिदोषांनी मुक्त असे शरीर किंवा चोरी चहाडी तंटामुक्त अशा त्रिकुटापासून मुकत असे गाव अथवा आधिभौतिक आधिदैविक नि आध्यात्मिक या त्रि-तापांनी न गांजलेले मन जसे समाधानी आणि सुखी असते, अगदी तसेच कामक्रोधमोहादि त्रिकुटाने मुक्त झालेला मनुष्य सुखी समाधानी होतो !
माऊली म्हणतात अशा माणसाला संतसज्जनांचा सहवास लाभतो आणि तो मोक्षमार्गावर अग्रेसर होतो.
‘मग सत्संगें प्रबळें । सच्छाशास्त्रांचेनि बळें । जन्ममृत्यूंची निमाळें (पडीक जमीन ) । निस्तरें रानें ॥
‘ते वेळीं आत्मानंदें आघवे । जे सदा वसले बरवें । ते तैसेचि पाटण (स्थान) पावे । गुरूकृपेचे ॥
‘ऐसा जो कामक्रोधलोभां । झाडी करूनि ठाके उभा । तोचि एवढिया लाभा । गोसावी (परम पद ) होय ॥’
(क्रमश: ……..
Wednesday, March 15, 2023
सिल्व्हर लायनिंग !
“ सिल्व्हर लायनींग ! “
सकाळी नेहमीप्रमाणे गॅलरीत चहाचा लुत्फ घेत निवान्त बसलो असताना आकाशात गोळा झालेले काही गडद ढग नजरेस पडले नि किंचित उदास वाटले. मात्र पाहता पाहतां जसजसा सूर्योदय होऊ लागला तसतसे त्याच ढगांना चांदेरी सोनेरी किनार आली आणि चक्क केशरी गुलाबी छटा देखील !
हरखून जावे असे ते दृष्य पाहून मन सुखावलें आणि ते तात्पुरते आलेले औदासिन्य कुठल्या कुठे गडप झाले. नि मग सुरू झाली विलक्षण विचार मालिका.
प्रपंचातही असेच काळे पांढरे मेघ येतात नि जातात. वास्तविक स्वामी म्हणत तसे लाईफ इटसेल्फ इज लाईक पासिंग क्लाऊड्स ! आकाशाला त्यांचे सुखदु:ख नाही का देणेघेणे नाही.
आपल्याला असे निरभ्र, मनमोकळे कसे राहतां येईल आकाशासारखे ? खरेंतर आपले मूळ स्वरूप असते निरागस, आपण लहान बालक असतांना ! पण नंतर तहान नि भूक समजूं लागते, आवड-निवड पिंगा घालू लागते नि सुरू होतात सर्वप्रथम जिभेचे चोचले ! आपण चटकन ‘रसनेंद्रियाचे गुलाम’ बनतो. मग दृष्टी आपले खेळ दाखवू लागते, माझे नि परके असा भेद करीत. त्यातून निर्माण होते ईर्षा ! त्याचेजवळ आहे ते माझ्याकडे का नाही असा सवाल करताना दबा धरून बसलेला दंभ नि अहंकार कसा उफाळून येतो पहा. हवे ते मिळाले नाही म्हणजेच इच्छापूर्ती झाली नाही तर क्रोध येणारच आणि क्रोधाच्या अतिरेकाने भ्रम व्हायला वेळ का लागतो ? आणि मग गीतेंत म्हटले तसे ‘प्रणश्यती’ - सर्वनाश ! !
नव्हे, मला असे चित्र अजिबात रंगवायचे नव्हते. स्वच्छ सुंदर आकाशांत मनोहारी रंगबिरंगी ढग पाहतांना मला खरंतर संसाराच्या कॅनव्हासवर स्पष्ट दिसत असलेले चित्र पाहायचे होते, त्या संसाररूपी रथावरून थेट आकाश-अवकाशापर्यंत मजल मारायची होती, नव्हे गवसणी घालायची होती. या संसारचक्राचे रहस्य समजून घ्यायचे होते !
खरंच, संसार चक्राचे अगदी तसेच नाही काय ? मधेच लहानमोठी संकटें, भीती, हुरहुर या रूपात गडद ढग गोळा होतात. एऱ्हवीं व्यवस्थित चालत असलेला हा संसाररथ मधेच लडखडतो, खुडबुडतो आणि जरासे वंगण घालताच पुन्हा कुरकुर न करता धावायला लागतो.
आतां या चालत्या रथात वंगण कोण पुरवतो ? परमेश्वर ? सदगुरू ? नशीब किंवा प्राक्तन ? नव्हे नव्हे, केवळ आपली इच्छाशक्ती ! नाही पटत ? सांगतोच तर मग, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या परमेश्वरावर !
मला सांगा, कुठे असतो हो हा ‘परमेश्वर’ ? मंदिरांत, मसजिदींत, गुरुद्वारात आणि चर्चमध्ये पाहिलाय का तुम्ही ? मला तर शोधूनही सांपडला नाही आजवर. अर्थात मीही फारसे लक्षच दिलेले नाही त्या विषयावर हेही खरे आहे म्हणा ! मात्र एका सत्पुरूषाचे आश्वासक शब्द आठवले, ‘गॉड इज विदीन यू - अराऊंड यू - आऊटसाईड यू - ॲबोव्ह यू - बिलो यू - जस्ट बाय युअर साईड टू ss ! इन फॅक्ट यूS आर गॉड युवरसेल्फ !’ मात्र आपण त्याची दखल घेत नाही.
त्याला खरोखर पाहायचेच असेल, अनुभववायचेच असेल तर बाहेर इतरत्र न शोधतां आपल्यांतच तर तो दडून बसला नाही ना हे शोधावे. अरे, ‘तुझे आहे तुजपाशीं परी तू जागा चुकलासी’ असे होऊं नये !
मी म्हणतो की परमेश्वर एकटा असा कधी नव्हताच मुळांत, ‘एकोSहम बहुस्याम्’ ही थिअरी मला पटत नाही. कारण त्याचे सोबत किंवा खरे तर अंगभूत अशी ‘त्याचीच’ माया होती, जी ‘अनेक होण्या’ची इच्छाशक्ती होती. त्याच दुर्दम्य इच्थाशक्तीचे बळावर ‘परमेश्वराने’ ब्रह्मांडाची रचना केली, त्याला आंजारले गोंजारले नि भातुकली सारखे विस्कटून टाकण्याची ‘प्रेरणा’ देखील तीच !
खूप खूप विषयांतर झाले आहे याची मला नम्र जाणीव आहे, पण मुळांत विषय असा नव्हताच ! मेघांप्रमाणे विचार आले नि गेले, काही शिंतोडे या कागदावर उडवीत ! वाटले तर घ्या, नाहीतर पुसून टाका ! (माऊलींचा एक सुंदर दृष्टांत आहे - स्वातीचा थेंब शिंपल्यांत पडला तर त्याचा मोती होतो नि सर्पमुखांत पडला तर कालकूट ! ‘ )
मला इतकेच म्हणायचे होते की सोनेरी रूपेरी केशरी गुलाबी रंग पहांटेच्या अवकाळी मेघांत पाहावे आणि ते विरणारच याचेही भान असू द्यावे, या फालतू बडबडीसारखे ! !
रहाळकर
१५ मार्च २०२३