Monday, August 31, 2020
आनंदी आनंद गडे !
आनंदी आनंद गडे !
माझे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ स्नेही श्री देशपांडे काकांनी अकराव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मज भागवत चंद्रशेखरला एक यॉर्कर कम् बौन्सर टाकून मला गारद केले. तथापि म्यां हॅन्डिकॅप्ड बोलरने पहिले षटक् असे टाकायचे ठरवलें -
पण जरा धीर धरी रे रघुरामा !
त्याचे असे झाले की त्यांनी वाटस्ॲप वर माझेसाठी एक मेसेज पाठवून स्वत:च त्याचे उत्तरही कळवून टाकले. आदर्श गुरूप्रमाणे त्यांनी प्रश्न केला की ‘आपल्याला जीवनांत आनंदाचे प्रसंग वरचेवर येत राहतात पण त्या आनंदांत आणि ब्रह्मानंदांत काय फरक आहे’.
त्यावरचे त्यांचे विष्लेषण थोडक्यात पण मार्मिक आहे. ते म्हणतात, ‘काल नव्हता, आज आहे पण उद्यापर्यंत ही टिकत नाही तो जीवनानंद किंवा विषयानंद. मात्र जो काल अनेकपटींनी होता, आज अनेकानेक पटींनी आहे आणि उद्यां त्या आनंदाला पारावार नाही तो ब्रह्मानंद होय !’
व्वा ! क्या बात है ! !
आतां बी.एस्. चंद्रशेखरचा ‘रन अप्’ पाहूं -
मुळांत इन्द्रियांद्वारे मिळणारा आनंद नेहमीच हवाहवासा, न विटणारा असावा हे प्रत्येक मर्त्य माणसाचे ईप्सित असतेच, मात्र सॉक्रेटीसचा हा मर्त्य मानव त्या सुखाला नि आनंदालाही लवकरच ‘विटतो’ नि नवनवीन सुखाच्या मागे लागला असतानाच एखाद्या इंद्रियातीत, दैवी आनंदाची त्याला चाहूल लागते, जे त्याचे अंतर्मनाची तार छेडते. याच दिव्यानंदाचा ध्यास घेत तो आनंद पुन:पुन्हा घेत राहावा असे त्याला वाटू लागते आणि मग शब्द स्पर्ष रस रूप गंधादि विषयानंद हळूहळू मंदावत जातो. दिव्यानंद, आत्मानंद, ब्रह्मानंद इत्यादि शब्दांच्या वाग्जंजाळांतून बाहेर पडून तो हा आनंद ‘बाहेरच्या’ जगांत शोधू लागतो. पण त्याची इवलीशीही झुळुक त्याचे पर्यंत पोहोचतच नाही, कारण तो आनंद मुळांत बाहेर नसतोच मुळी ! तो तर आपल्याच अंतर्यामी दडून बसलेला असतो. त्याला टॅप करा, शोधा, खणून काढा असे सदग्रंथ, सत्पुरूष, संत नि महात्मे जीव तोडून सांगत असतात. आपण ते सर्व ऐकून न ऐकल्यासारखे राहतो, वागतो.
‘दॅट पेरेन्नियल स्प्रिंग ऑफ जॉय इज विदीन यू sss!’ The Saints say so !
माईंड यू, पेरेन्नियल वर लक्ष द्या - अवीट, अविच्छिन्न, कंटीन्युअस, अन्-इंटर्रप्टेड !
तो दिव्यानंद, परमानंद पाहण्याचे सदभाग्य मला लाभले आहे कित्येक सत्पुरूषांचे दर्शनांतून. त्यांचे तेज, ऑरा, कायम प्रसन्न व्यक्तिमत्व त्या ब्रह्मानंदाची खूण पटवून जातात. त्यांचे सान्निध्यांत ते सुख आपणही थोड्याफार प्रमाणांत अनुभवतो, मात्र केवल त्या ॲम्बियन्स मधे असेतोंवरच ! पुन्हा आपण आपल्या दैनंदिन प्रापंचिक सुखांत गुरफटून जातो.
तरीही, त्या सोकॉल्ड ब्रह्मानंदाला, स्वरूपानंदाला, आत्मानंदाला सामोरे जाण्यासाठी दररोज काही काळ तरी आपल्याला जंगलांत जायला हवे, सर्व प्रापंचिक कर्में करत असतांनाही. स्वामी म्हणत, ‘हॅन्ड्स इन सोसायटी , हेड इन द फॉरेस्ट’ ! ओजे ओजें ध्यान करावे ध्यान धरावे ! बुध्दीचे ‘यान’ करावे. कठीण नाही ते, नि सोप्पे ही नाही हो !
माझं पहिलं षटक् निर्धाव गेलं बहुतेक, नि विकेटलेस ही ! !
प्रभु रहाळकर
३१ ऑगस्ट २०२०
Saturday, August 29, 2020
ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग एकशे पांच
ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग एकशे पांच
‘माये’ला संसारवृक्षाचे बीज असे म्हटले होते ज्ञानदेवांनी, तसेच ज्या भूमीवर हा संसाराचा डोलारा उभा असलेला दिसतो तीही मायाच होय असे सांगितले. तिलाच अ-तत्वांची म्हणजे विविध शक्तींनी भरलेली पेटी म्हटले. तिलाच विपरीत ज्ञान उजळवणारी दीपिका म्हटले, किंवा आकाशांत सामावणारा नि विश्वाचा आभास दाखविणारा मेघ म्हटले !
अशी ती ‘माया’ -
‘ते माया वस्तूचिया ठायीं । असे जैसेनि नाही । मग वस्तुप्रभाचि पाही । प्रगट होय ॥ (ती माया परब्रह्माचे ठिकाणी असून नसल्यासारखी असते, मात्र परब्रह्माच्याच तेजाने ती प्रगट होते, हे जाणून घे)
‘जेव्हा आपणया आली निद (निद्रा) । करी आपणपें जेवीं मुग्ध (मूढ) । का काजळी आणी मंद । प्रभा दीपीं ॥ (आपल्याला झोंप अनावर झाली की आपण जसे वेडेपिसे होतो, किंवा दिव्यावर काजळी धरतांच तिचे तेज जसे मंदावते - )
‘तैसी स्वरूपीं जाली माया । आणि स्वरूप नेणें धनंजया । तेंचि रूखा (वृक्ष) यया (या) । मूळ पहिलें ॥ (त्याप्रमाणे धनंजया, परब्रह्म-स्वरूपातूनच माया निफजली असूनही ती त्या स्वरूपाला जाणत नाही आणि हेच त्या संसारवृक्षाचें पहिले मूळ म्हणजेच घोर अज्ञान होय.)
‘वस्तूसी आपुला जो अबोधु (अज्ञान) । तो ऊर्ध्वीं आठुळैजे (बळावतो) कंदु । वेदान्तीं हाचि प्रसिध्दु । बीजभावो ॥ (परब्रह्म-वस्तूविषयीं अज्ञान हाच त्या मायेचा गाभा असून वेदान्तांत तो बीजभाव म्हणून प्रसिध्द आहे)
‘घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । हा फळभावो तियेचा ॥ (घोर अज्ञान नि गाढ निद्रा यांना बीजांकुर-भाव म्हणतात तर स्वप्न आणि जागृती त्यांचे फलित होय)
अशाप्रकारें वेदांतांत याचा कार्यकारणभाव सांगितला असला तरी त्याचे मूळ ‘अज्ञान’ होय, हे नीट जाणून घे. या वृक्षाच्या ऊर्ध्वभागीं शुध्द निर्मळ आत्मतत्व असून मध्यभागांत आणि खालीं मायेचा आत्मतत्वाशीं संबंध येऊन चहूं बाजूंनी खोलवर घुमारे फुटतात जे ऊर्ध्वभागास बळकटी देतात. चारही बाजूंनी फुलून आलेल्या अंकुरांतून पंचमहाभूतांचे झुपके निर्माण होतात. त्यांच्या डिऱ्यांतून सत्व-रजात्मक त्रिगुण आणि खाली तोंड असलेल्या डिरीतून एकला अहंकार निफजतो.
हा अहंकार बुध्दींत भेदाभेद वाढवतो आणि मनाला तरतरी देतो.
अशाप्रकारें या वृक्षाचे मूळ बळकट झाल्यावर विकल्परूपी रसाने मन, बुध्दी, चित्त नि अहंकार असे चार कोंवळे लुसलुशीत कोंभ फुटतात. मग आकाश, वायू, तेज, पृथ्वी आणि आप असे पंचमहाभूतांचे सरळ फोंक तयार होतात. त्यांतून शब्द-स्पर्ष-रस-रूप-गंधादि तन्मात्रांची कोंवळी पालवी फुलून येते. या तन्मात्रांच्या आकांक्षा पूर्ण होण्यासाठी दहा इंद्रियांची नवी पालवी फुटते.
अशा प्रकारें पंचमहाभूतें, मन, बुध्दी नि अहंकार या सामुग्रीने संसार किंवा प्रपंच उभा राहतो. मात्र जेवढी शिंपली असेल तितकीच तिच्यावर चांदी भासते, तसा हा प्रपंचाचा आभास ज्या परब्रह्म-वस्तूवर ‘दिसतो’ त्याहून अधिक फोफावूं शकत नाही.
(कठीण आहे हे सर्व समजून घ्यायला, तथापि -)
‘का समुद्राचेनि पैसारें (विस्तारावर ) । वरी तरंगता आसारे (दिसते) । तैसे ब्रह्मचि होय वृक्षाकारें । अज्ञान मूळ ॥
‘आतां याचा हाचि विस्तारू । हाचि यया पैसारू । जैसा आपणपें स्वप्नीं परिवारू । एकाकिया ॥
पण तेही असू देत, या विचित्र झाडाला खालीं वाढणारे पंचमहाभूतांचे अंकुर येतात आणि याला ‘अश्वत्थ’ असे जाणते लोक का म्हणतात तेही सांगतो, ऐक !
अरे, ‘श्वा’ म्हणजे उद्या, म्हणजेच जे आज आहे ते उद्या नाही अर्थात् तो कधीच एकसारखा नसतो, सतत परिवर्तनशील. हा संसाररूपी वृक्ष कायम बदलत राहणारा आहे, क्षणोक्षणीं रंग बदलणाऱ्या मेघांप्रमाणे किंवा चमकून जाणाऱ्या विद्युल्लते सारखा ! पाण्यातल्या कमळाच्या पानावरचा थेंब जसा थरथरत असतो किंवा उद्विग्न माणसाचे चित्त जसे कायम व्याकूळ असते,
‘तैसीचि ययाचि स्थिती । नासत जाय क्षणोक्षणी । म्हणौनि ययाते म्हणती । अश्वत्थु हा ॥
‘अश्वत्थु येणे नांवें । पिंपळु म्हणती स्वभावें । परी तो अभिप्राव नोहे । श्रीहरीचा ॥
‘एऱ्हवीं पिंपळु म्हणतां विखीं (वृक्षाला) । मियां गति देखिली असे निकी । परि ते असो काय लौकिकीं । हेतु काज ॥ (तथापि या वृक्षाला पिंपळ म्हणायला माझी हरकत नाही, पण अशा लौकिक गोष्टींकडे काय म्हणून लक्ष द्यावे ?)
आणि म्हणूनच तुम्ही हा अलौकिक ग्रंथ (ज्ञानेश्वरी) ‘परिसावा’, नि क्षणभंगुरत्वा मुळे याला अश्वत्थ म्हणावे ! याचेवर ‘शाश्वतपणाचाही’ आरोप केला जातो, पण त्याचा गर्भित अर्थ असा आहे - ज्याप्रमाणे समुद्र एकीकडे बाष्पीभवनामुळे रिकामा होत असतो नि नद्यांचे प्रवाहांनी भरला जातो आणि कमी-जास्त न होतां कायम परिपूर्ण राहतो, तसे आहे या वृक्षाचे असणे नि नसणे. मात्र तार्किक लोक याला अव्यय म्हणजे कधींच न संपणारा असे अज्ञानवश म्हणतात.
‘एऱ्हवीं दानशीळु पुरूषु । वेंचकपणेंचि संचकु (खर्चिक पण सांठवणारा) । तैसा व्ययेंही हा रूखू (वृक्ष) । अव्ययो गमे (वाटतो) ॥
असे पहा, वेगाने पळणाऱ्या रथाचे चाक जसे भूमींत रूतल्यासारखे स्थिर भासते, तसे कालचक्राच्या वेगामुळे या प्रपंचवृक्षाची एखादी वाळलेली भूतशाखा खालीं पडली तरी तिला त्या ठिकाणीं असंख्य शाखा फुटतात. मात्र त्यांतील एखादी कुठे गेली किंवा अनेक कशा वाढल्या ते सांगणे कठीण आहे, जसे आषाढांतले ढग केव्हा कुठे नि कसे निर्माण झाले हे सांगणे दुरापास्त असते.
कल्पांताचे वेळी सर्व सृष्टीचा नायनाट होऊन सर्व जलमय होते आणि त्या वेळच्या प्रचंड वाऱ्यामुळे संसारवृक्षाची सालडीं गळून पडतात. मात्र कल्पाच्या प्रारंभीं नव्या सृष्टीचा पुन्हा अविष्कार होत असतो.
ऊंसाच्या पेऱ्या एकापुढे एक वाढून तो जसा वाढत जातो तसे एका मनूचा काळ संपून दुसऱ्या मनूचा कालखंड सुरू होतो आणि नवनवीन वंशावळी निर्माण होतात.
कलियुग संपले की चारही युगांचा अंत होतो नि पुन्हा कृतयुगाचा आरंभ होतो. चालू वर्ष संपून नवे कधी सुरू झाले, किंवा दिवस जातो आहे की येतो आहे हे सांगता येत नाही, अथवा वाऱ्याची एक झुळुक येऊन दुसरी कधी आली ते सांगवत नाही. कारण त्या दोन झुळुकांमधे सांधाच लक्षात येत नाही. अगदी तसेच या संसारवृक्षाच्या शाखा कधी आल्या किंवा पडल्या ते सांगतां येत नाही ! आणि म्हणूनच याला अव्यय अविनाशी असे म्हणतात.
‘जैसे वाहते पाणी जाय वेगें । तैसेचि आणिक मिळे मागें । येथ असंतचि असे जगें । मानिजे संत ॥ (अस्थिर असलेल्या या वृक्षाला स्थिर मानतात !)
‘कां लागोनि डोळा उघडे । तंव कोडीवरी (कोट्यावधी) घडे मोडे । नेणतया तरंगु आवडे । नित्य ऐसा ॥ (डोळ्याची पापणी लवते न लवते एवढ्यांत समुद्रांत कोट्यावधी तरंग उठतात नि निमतात, मात्र अज्ञानी माणूस त्यांना नित्य समजतो)
कावळा एकच बुबुळ दोन्ही बाजूस फिरवून पाहतो, मात्र पाहणारा तो दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळीं सारखेपणाने पाहतो असे समजतो. किंवा जमीनीवर वेगांत फिरणारी भिंगरी जमीनींत रूतून स्थिरावली असे भासते, अथवा अंधारांत खूप जोराने कोलीत फिरवले तर ते चक्राकार भासते -
‘हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा । न देखोनि लोकु पिसा (वेड्याप्रमाणे) । अव्ययो मानी ॥
‘परि ययाचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे । जाणे कोडिवेळां निमिखें (कोट्यावधी क्षणांत) । होत जात ॥
‘नाही अज्ञानावांचूनि मूळ । ययाचें असलेपण टवाळ (खोटे) । ऐसे झाडचि सिनसाळ (संपूर्ण) । देखिले जेणे ॥
‘तयातें गा पंडुसुता । मी सर्वज्ञुही म्हणे जाणता । पैं वाग्ब्र्ह्म सिध्दांता । वंद्यु तोचि ॥ (अर्जुना, अशा पुरूषाला मी सर्वज्ञ असूनही ‘जाणता’ म्हणतो कारण वेदांच्या सिध्दांतांना तो वंदनीय असतो )
शिवाय अशा पुरूषाला समग्र योगज्ञान प्राप्त झाले असे खुशाल समजावे, ज्याने हा संसारवृक्ष मिथ्या नि अनित्य आहे हे जाणलें. अशा पुरूषाचे वर्णन कसे करणार ?
क्रमश:........