Wednesday, June 29, 2022
‘ऐतिहात के तौर…..!’
ऐतिहात के तौर !
हिन्दीतला हा वाक्प्रचार आपण अनेक वेळा ऐकला असेल. याचा सरळ सोपा मराठीत अर्थ होतो - ‘इन केस…..’ आणि कठीण इंग्रजींत - ‘काळजीखातर’’ !
आपण बरेच वेळी एखादी योजना आखतांना ‘प्लॅन बी किंवा प्लॅन सी आधीपासूनच ठरवून ठेवतो. उद्देश असा की समजा मूळ योजना फसली तरी दुसऱ्या वा तिसऱ्या पर्यायाने ती येनकेन प्रकारें फलद्रूप व्हावी.
खरंतर आपल्या संपूर्ण जीवनपटाचे सुध्दा हेच ब्रीद आपण कळत न कळत पाळत आलेले असतो. प्रत्येक कर्म किंवा कृती करण्या आधी आपण सहसा त्याचे मिश्र फलाची अपेक्षा ठेवत ‘ऐतिहात के तौर’ पर्याय मनांत ठेवून असतो. मला वाटतं वरील वाक्प्रचार आता बऱ्यापैकी ध्यानात आला असावा तुमच्या.
आत्तां आज या विषयावर का बोलावेसे वाटले मला असा प्रश्न पडेल कदाचित तुम्हाला, किंवा बहुधा नाहीही. तरी पण मला काही सांगायचंय यावर (देखील) !
असं पहा की आतांशा समाज-जीवनांत निरंतर स्थित्यंतरं, आक्रोश, अनरेस्ट आणि एकूणच नैराश्य भावना वाढलेली आढळते. गलिच्छ राजकारण, सवंग पत्रकारिता, वैयक्तिक हेवेदावे नि चिखलफेकीचा नको तितका सुळसुळाट पाहतोय आपण डोळ्यांवर झांपड ओढून. मले वाटते हे काही बराबर नाही चाललंय ! कोणीतरी उठेल, आव्वाज उठवेल, सुयोग्य अशी घडी बसवायचा प्रयत्न करेल, थोडक्यात एक मिनीक्रान्ती घडवून आणेल असा वेडगळ विचार कधीकधी खूप अस्वस्थ करून टाकतो मला.
या निमित्ताने मला सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी कविवर्य अनिलांची कविता याद आली. ‘सारेच दीप कसे मंदावले आतां’ असे शीर्षक होते त्या कवितेचे नि स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळांतही कित्येक वर्षे एकूणच सर्वसामान्य माणूस कसा भेदरलेला, निराश नि गलितगात्र झाला होता याचे विदारक चित्र त्या कवितेत अनिलांनी रेखाटले होते. अर्थात आज नरेन्द्र मोदींसारखा काबिल नेता आपल्याजवळ आहे पण देवेन्द्रची उणीव पावलोपावलीं जाणवते हेही वास्तव आहे. गेली दोन अडीच वर्षें अतिशय गलिच्छ वातावरण राजकीय क्षेत्रात आपण पाहात आले आहोत नि त्यातही गेला महिना दीड महिना तर किळस यावी अशा घडामोडींनी कमालीची निराशा वाटते. ‘कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र’ असे खडसावून विचारावेसे वाटतंय् आज !
तथापि, या वातावरणाचा अंत होऊन कल सुबह कुछ अच्छा सुनाई देगा अशी त्या परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो, निदान ‘ऐतिहात के तौर’ देवेन्द्रची तांतडीने नियुक्ती व्हावी असे वाटते मला.
(इथे ‘ऐतिहात’ कसा काय, हा तुम्हाला पडलेला प्रश्न मलेही पडलाय म्हणा ! ! )
रहाळकर
२९ जून २०२२
Friday, June 17, 2022
अंतरात्मा की आवाज़……..!
अंतरात्मा की आवाज़…….!
कालच श्री देशपांडे काकांनी ‘आपण आहोत तरी कोण ? ‘ असा प्रश्न उपस्थित करून अखेर त्याचे उत्तरही त्यांनी मोजक्या शब्दांत आणि आपल्या सुंदर शैलीत देऊं केले. त्यांचा व्यासंग आणि अनुभव अतिशय विपुल असाच आहे आणि म्हणून तो अनुभव नक्कीच आपल्याही मनांत सहज प्रविष्ट होतो. मात्र या वेळी तो इतका खोलवर रूतून बसला की त्याला पुन्हा अनुभवण्यासाठी मज पामराला कानांत सर्व शक्ती एकवटून त्याचा निदान प्रतिध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करता आला -‘अंतरात्मा की आवाज’ - या स्वरूपात !
नाही, या वेळी मी कोणताही बाष्कळपणा करणार नाही असे वचन देतो !
खरंतर मुळातच आपल्या सर्वांना तिहेरी लॉटरी लागलेली आहे - मनुष्यत्वं, मुमुक्षत्वं नि महापुरूष संश्रय: ! आपण सगळे द्विज म्हणून जन्मलों, जन्मदात्यांनी पुन्हा एकदा द्विजसंस्कार प्रदान केले - ‘सत्यं वद धर्मं चर’ अशी उपदेशवजा आज्ञा करीत, आणि नंतर सदगुरूंनी ‘तत् त्वम् असि’ अशी आपली आपल्याशी ओळख करून देत ‘आतां तुला त्या ‘तत्’ चा शोध तुझ्याच उपासनेतून तुलाच घ्यायचा आहे असे सांगत त्यासाठीची काही पथ्यें आवर्जून सांगितली.
येथपर्यंत गाडी छान रूळांवरून धावत होती, मात्र संसार-प्रपंचांतील विषय विकारांनी आपला पूर्ण ताबा घेतला नि पाहतापाहतां गाडीने सांधे बदलून ती भलत्याच वाटेवर सुसाट धावत सुटली. मला वाटतं माझ्याप्रमाणेच अनेकांची तशीच ‘वाट लागली’ असावी ! मात्र पुन्हा आपले दैव बलबत्तर असल्याची जाणीव झाली आपल्याला लाभलेल्या ‘महापुरूष संश्रय:’ चे निमित्ताने ! खरोखर, आयुष्याच्या वळणावळणांवर आपल्या सर्वांनाच तो लाभ मिळत गेलाय् नाही ? कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपण आपल्यांत खोलवर बुडी मारतो आणि हातीं येते ती लाकुडतोड्याची लोखंडी कुऱ्हाड नसून झळाळणारी सुवर्ण कुऱ्हाड ! ती सोन्याची कुऱ्हाड म्हणजेच ‘अंतरात्मा की आवाज’ असे नि:शंकपणे समजावें.
मला आज प्रकर्षांने जाणवतेंय ते असे की ही अंतर्मनाने दिलेली साद ही मुळात परा-वाणींत दडलेल्या प्रणवाचा केवळ एक प्रतिध्वनी असावा - ॲन ईको ! अखेर तो ओंकार परावाणींत बंदिस्त कसा राहणार ? कुंडलिनीला डिंवचल्यावर तिला जशी नागिणीप्रमाणे सळसळत उर्ध्वमार्गाने जाण्याची ओढ लागते तसेच प्रणवालाही परावाणीतील सर्व बंधने झुगारून बाहेरच्या अतिविशाल ओंकारांत विलीन होण्याची उत्कंठा लागत असेल काय ?
मला माहीत आहे की ही मल्लीनाथी कुणालाच पटण्यासारखी नसेल कदाचित्, पण काय करू, आत्तां तरी मला हा ‘अंतरात्म्याचा आवाज’ वाटतोय ना ! (या वरून एक जुना किस्सा आठवला. विषयांतर होत असले तरी माझी फेकाफेक किती पुरातन आहे याची तुम्ही खातरजमा करूं शकाल ! मी मेडिकलच्या चौथ्या वर्षांत शिकत असताना आमचे सर्जरीचे प्राध्यापक ‘बेड-साईड क्लिनिक’ मधे एका पेशंटच्या काही विशिष्ट आजाराबद्दल चर्चा करत होते. कर्मधर्मसंयोगाने मूळ गंभीर आजारा बरोबरच आणखीही एक गौण बाब तपासण्यांमधून पुढे आली होती. प्राध्यापकांनी त्या गौण बाबीबद्दल सर्वांना छेडले असताना माझ्याहून अधिक हुषार विद्यार्थी मूग गिळलेले पाहून मी अचानक बोलता झालो आणि त्यावेळेस मनांत आले ते भडभडा बोलून मोकळा झालो. मी सांगितलेले कोणत्याच पुस्तकातले नव्हते, कुणी सांगितलेले नव्हते आणि खरेही नव्हते. मात्र माझा आत्मविश्वास पाहून प्राध्यापक एवढेच म्हणाले की मिस्टर रहालकर, यू आर गोईंग टु राइट ए बुक ! हाऊएव्हर, व्हाटएव्हर यू सेड इज नीदर करेक्ट नॉर इव्हन वर्थ थिंकिंग ! ! - मी भुईसपाट ! ! ! असो. )
सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की माझी अशी फेकाफेकी कधीही मनावर घेऊ नका. तथापि, आपल्या ‘अंतरात्म्याच्या आवाजाला’ कधीही डावलूं नका कारण बहुतांश वेळी तो आपल्याला निश्चित अशी दिशा आणि निर्णय सुचवीत असतो. पहा पटलं तर !
रहाळकर
१७ जून २०२२