Saturday, January 30, 2021
नि:संगाचा सांगाती
“नि:संगाचा सांगातु..........!
‘म्हणौनि तो भगवंतु । जो नि:संगाचा सांगातु । तो म्हणें पार्था दत्तचित्तु । होई आतां ॥ .....
ही ओंवी वाचता वाचतां ‘नि:संगाचा सांगातु’ या शब्दावर चांगलाच रेंगाळलों ! अचानक अनिलांच्या ‘सांगाती’ या काव्यसंग्रहातल्या कवितेचे शब्द झर्रकन तरळून गेले. !
‘हातीं हात धरून माझा
चालवणारा कोण तूं ?
जेथे जातो तेथे माझा
काय म्हणून सांगाती ?
आवडतोस तूं मला
की नावडतोस ?
येवढे मात्र जाणवते कीं
माझा हात धरून असे चालवलेलें
मला मुळीच खपत नाही !
स्वच्छंदाला माझ्या त्याचा करकोचा पडतो ना ! !
झिडकारून तुझा हात
म्हणून दूर पळून जातो
बागडतों, अडखळतों, धडपडतों
केवळ तूं कनवाळू पाठीशीं उभा म्हणून
माझे दु:ख जाणवून
उगाच किंचाळत सुटतों -
एऱ्हवीं तूं नसतांना
पडलों अन् लागलें तर
पुन्हा उठून हुंदडतों ! !
खांद्यावर हात माझ्या सदोदित
असा ठेवूं नकोस ना !
अशानेच माझी वाढ खुंटत जाते
असे मला वाटते ना ! !
बरोबरीचे वागणें हें खरोखरीचे आहे का ?
खूप खूप माझी उंची एकाकी
माझी मलाच वाढवूं दे -
तुझ्याहून नसली तरी तुझ्यासमान होऊं दे
तोंवर असे दूरदुरून,
तुझा हात दूर करून
मान उंच उभारून
तुझ्याकडे धिटकारून पाहूं दे ! ! ! ‘
कवी अनिलांचा हा सांगाती आणि माऊलींचा सांगाती एकच आहेत असे नि:संदिग्धपणे मानले तरी माऊली सर्वसंग परित्याग करून त्या ‘सांगाती’ ला आळवतात तर कवी आपल्या ‘स्वत्वा’ला बाधा येऊ न देतां, स्वच्छंदावर गदा येऊ न देतां, त्याला दुरून अनुभवतोय - तो संगट आहे या विश्वासाने !
बुचकळ्यात टाकणारे हे विधान वरवर पाहिले तर निराळे भासले तरी मुळात अनुभव एकच आहे ना ? श्रेयस की प्रेयस ? ?
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती - !
रहाळकर
३० जानेवारी २०२१
Wednesday, January 27, 2021
एका कलंदर मित्राची गोष्ट !
एका कलंदर मित्राची गोष्ट !
माझ्या अनेक मित्रांचा उल्लेख मी नुकताच केला होता. त्यांत नव्वदी उलटलेले पोहनेरकर यांचेविषयीं खूप सांगायचे राहून गेले होते. ती वांच्छा आज पुरी करीन म्हणतो. मी अनेकांजवळ अनेकवेळां म्हटलेंय की माझे बहुतेक सर्व मित्र विलक्षण बुध्दिमान आणि प्रतिभावंत होते हे खरोखर माझे सदभाग्य होय.
प्रोफेसर पोहनेरकर हे त्यांतील एक. मराठी आणि इंग्रजीत एम्. ए. नि एम्. फिल्. असलेले काका ओस्मानिया विद्यापीठांत इंग्रजी चे विभागप्रमुख होते. चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे काका अतिशय प्रतिभासंपन्न होते हे नि:संशय. विलक्षण दांडगा व्यासंगाबरोबरच काव्य स्वरूपात त्यांनी खूप साहित्य निर्मिती केली. त्यांच्या शेकडो कवितांपैकी काहींना प्रकाशनार्थ निवडण्याचे काम त्यांनी माझ्यावर सोपविले होते. खरेतर प्रचंड रत्नभांडारातून काही रत्नें निवडणे सोपे नाही याची प्रचीती मला तात्काळ आली.
गेली काही वर्षें आम्ही दररोज दूरध्वनीवर अर्धाअर्धा तास विविध विषयांवर बोलत असूं . त्या संभाषणांतून त्यांचा निगर्वीपणा आणि स्वत:कडे कायम कमीपणा घेण्याची वृत्ती मला नेहमीच अचंभित करत असे. समोरच्या व्यक्तीवर स्तुतिसुमनांचा मारा करण्यात मात्र ते कधीच कंजूष नसत. प्रत्येक वाक्यागणीक “व्वाS” , “सुंदर” अशी उत्स्फूर्त दाद देत असतांना लहान मुलाप्रमाणे ते मोठ्याने खळखळून हंसत. असे अनुभव घेता घेतां घट्ट मैत्रीबंध कधी जुळले ते कळलेच नाही !
डॉ. कार्ल यंग या पाश्चात्य मनोवैज्ञानिक आणि तत्वचिंतक संशोधकाने एकूणच माणसांचे दोन प्रकार सांगितले आहेत. त्यांतील बहुतांश लोक बहिर्मुख असतात, तर काही अंतर्मुख. बहिर्मुखांची दृष्टी विश्वाची जडणघडण, स्थित्यंतर किंवा नवनवीन शोध लावण्याकडे असते, तर अंतर्मुख व्यक्तींची त्याने चार प्रकारांत विभागणी केली.
त्यांत आधीं येतात ‘विचारवंत’, दुसरे ‘संवेदनशील’, तिसरे ‘भावनाप्रधान’ आणि चौथे ‘प्रतिभावंत’.
प्रतिभावंतांत कवी, चित्रकार, लेखक, उत्तम वक्ता इत्यादि ‘मोडतात’ !
मला वाटतं काकांमध्ये हे सर्व गुण एकवटले आहेत. आपल्या संभाषण चातुर्याने ते मैत्रीचा धागा इतका घट्ट विणतात की जन्मोजन्मींच्या ऋणानुबंधांची ओळख पटावी ! स्वत:ला खूप काही सांगायचे असताना त्यांची अफाट सर्वज्ञता ठळकपणे जाणवते. तथापि त्यांची तृप्ती झालेली नाही, कारण तो ज्ञानप्रकाश देखील त्यांना अल्पायुषी, क्षणभंगुर, आभासमय वाटतो. ‘ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान’ ही मिथ्या त्रिपुटी ओलांडत असतानाच ते पुन्हा द्वैतांत माघारीं फिरतात आणि मग सुरू होतो विलक्षण कल्पनाविलास, नि त्यातून नवनवीन कविता स्फुरतात, आकार घेतात ! !
अगदी खरं सांगायचं तर या कविता मुळांत वेगवेगळ्या नसतात, केवळ एकाच मोठ्या खंडकाव्याचा विविध रूपाने झालेला मनोहर अविष्कार असतो तो !
त्यांच्या कवितांच्या काही ओळी वाचतांना या कलंदर कवीचा कल्पनाविलास आणि शब्दब्रह्माची किमया सहज जाणवते. उदाहरणार्थ,
“भव-प्रभवाच्या कांठावरती, उभा राहुनि असा एकटा - काय पहावें, काय पाहतो संबंधच हा कळे वांझोटा “ !
किंवा
“इतक्या उन्नत शिखरीं आणिलें, नको परतवूं मागे - भेट घडूं दे अव्यक्ताची , तिथेच तेच विराजे “ ! !
अथवा
“ओंकाराची प्रस्फुट जाणीव, अवकाशाला देई गौरव - ध्वनी उमटतो वायु सौरव, शब्दाद्याचे स्थान भूषले “ .
पुढे म्हणतात,
“हा असत् पणाही सत्याधिष्टित, म्हणून त्याचे मोल प्रतिष्ठित ! “
किंवा
“चकवा, चकवा, बुध्दिलाच हा अमोघ लकवा ! ! “
मग अचानक म्हणतात
“तुझी कीर्ति ख्याति गातां, सरो माझी वाणी - अखंडचि स्मृती राहो, श्रेय प्रेय लाणी ! “
समोरच्याचे शांतपणे नि तितक्याच आत्मीयतेने आधी ऐकून घेण्याची हातोटी त्यांना साधली आहे. मात्र त्यानंतर आपले सांगणे अतिशय उत्कटपणे बोलल्यावाचून त्यांना चैन पडत नाही. आधीं एक उत्तम श्रोता आणि नंतर वैचारिक नि अभ्यासपूर्ण प्रतिपादन हे गुणविशेष त्यांच्यांत प्रकर्षांने जाणवतात. आणि म्हणूनच त्यांचे सखोल अनुभवज्ञानाची प्रचीती आपल्याला आपसूक येते.
त्यांनी नुकतेच प्रकाशित झालेल्या आपल्या ‘उन्मेषवाणी’ या काव्यसंग्रहांत ‘पैतृक मिरास’ या मथळ्याखालीं आपली कन्या, पुत्र, सुना नि नातवंडें यांचा अतिशय आत्मीयतेने आणि कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. त्यांच्या सुविद्य पत्नीचे नुकतेच निधन झाले परन्तु हा कुटुंबवत्सल गृहस्थ मुलांच्या संसारांत पूर्ण रस घेतो, त्यांचे सुखदु:खात समरस होतो, पण कमलपत्रा प्रमाणे अलिप्त नि कलंदर वृत्तीचा आहे याची साक्ष त्यांचेशी बोलतांना आणि त्यांच्या कविता वाचताना प्रकर्षांने जाणवते. अशा वेळी कवी सुरेश भटांच्या दोन पंक्ती सहज तरळून जातात - ‘रंगुनी रंगांत साऱ्या, रंग माझा वेगळा - गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा !’
खऱ्याखुऱ्या दर्दी कवीप्रमाणे त्यांची प्रत्येक कविता म्हणजे निव्वळ आत्मसंवाद आहे. ज्ञानप्रकाशांत न्हाऊन निघालेल्या त्यांच्या भावोत्कट कविता वाचताना आपल्याही चित्तवृत्ती अतिशय तरल, सूक्ष्म आणि हळुवार झाल्या तरच तें रसग्रहण नि रसास्वाद !
माऊली म्हणतात तसे - “हें शब्देंवीण संवादिजे / इंद्रियां नेणतां भोगिजे .......!”
इति लेखन सीमा !
रहाळकर
२५ जानेवारी २०२१