Wednesday, April 22, 2026

 

बोराड प्रोजेक्ट !

 बोराड प्रोजेक्ट

आज अचानक हा शब्द आठवला आणि मन भूतकाळात रमून गेले काही काळ. माझ्या भावंडांनीही हा शब्द ऐकला असेल पण माझ्या काही आठवणी त्यांनाही माहीत नसतील कदाचित् ! अण्णा म्हणजे आमचे तीर्थरूप जरी रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्यें अघिकारी असले तरी काही काळ त्यांनी पीडब्ल्यूडी विभागात लॅंड ॲक्विझीशन ऑफिसर म्हणून डेप्यूटेशनवर काम पाहिले होते. ते ऑफ़िस इंदौरच्या पलासिया भागात होते. दररोज नाही पण कधीकधी पश्चिम निमाड मधील धामनोदच्या अलिकडे पाच मैलांवर जरासे उजवीकडे तीन मैलांवर एकबांधबांधण्याचे काम सुरू झाले होते. खेड्यापाड्यातल्या रस्त्यांवरून सहज जाऊ शकेल अशी हाय क्लियरन्सची व्हीएट कन्व्हर्टिबल फोर्ड कार अण्णांनी मुद्दाम विकत घेतली होती सरदार राहिंज यांचेकडून. मी त्याच गाडीवर ड्रायव्हिंग शिकलो आणि एकदा अण्णांबरोबर बोराड प्रोजेक्टच्या त्या डॅम साईटवर कार चालवीत गेलेले मला स्पष्ट आठवतेंय्. एवढेच नव्हे तर साईटवर दोन टिनशेड मधे राहणाऱ्या मराठी ओव्हसीयर कुटुंबासमवेत त्यांच्या त्या झोपडीवजा खोलींत त्यांनी अगत्याने बनवलेला चहा मी कधीच विसरणार नाही. ते मराठी ओव्हरसीयर कुटुंब म्हणजे पतिपत्नी नि त्यांची दोन गोंडस बछडी. त्यांनी एक बकरी देखील पाळली होती आणि बकरी दुधाचा असूनही तो चहा अक्षरश: अमृत-तुल्य लागला मला

अण्णांच्या संवईनुरूप त्यांनी श्रीरामावर बोलायला सुरूवात केली आणि रामनक्षेवर भर देऊ लागले. वडिलांना मधेच थांबवून  त्या उभयतांनी रामरक्षा म्हणायला सुरूवात केली आणि त्यांच्या बछड्यांनीही आपल्या बोबड्या शब्दांत त्यांची साथ दिली. खूप आनंद झाला अण्णांना आणि मी तर चक्क थिजलेला

मराठी सुसंस्कार कसे पाळामुळात रूजले होते त्या काळी हे आठवून अजूनही अंगावर आनंदाने रोमांच उठतात

रहाळकर

२२ एप्रिल २०२६.     


Monday, April 20, 2026

 

बखतगढ !

 बखतगढ

आत्तांच मथवाड-अलिराजपूरचे वर्णन पुन्हा वाचत असताना त्याच प्रदेशातील बखतगढ नि जोबट या सधन संस्थानांची याद ताजी झाली. वास्तविक मथवाड हेहिल स्टेशनमध्यप्रदेशच्या दक्षिण-पश्चिम भागाचे अखेरचे टोक असले तरी त्याच्या आधी येणारेबखतगढहे अधिक नयनरम्य होते कारण तें सातपुडा पर्वतरांगांच्या एका डोंगरावर वसलेले जुने गांव होते लहानसेच मात्र एक मिनि-संस्थान. फारसे श्रीमंत नसले तरी तेथील निसर्गशोभा लुभावनी होती खास. मला आठवतेय् आम्ही त्या भागांत एका ट्रक मधून फिरलेले. एका अवघड वळणावर मस्कऱ्या ड्रायव्हरने दाबून धरलेला ब्रेक सोडू काय असे आम्हा मुलांना विचारलेले स्पष्ट आठवतंय मला आणिनहीssss’ असे सर्वजण एकाच वेळी ओरडलो होतो कारण समोर चक्क दरी होती हो

खरंतर रात्रीचे दोन वाजले होते तेव्हा, कारण दिवसभर रणरणत्या उन्हातले ( ४८-५० डिग्री ! ) अण्णांचे दौऱ्याचे काम झाल्यावर परतीच्या प्रवासात होतो आम्ही. रात्री दोन वाजतांही गरम हवांचे झोक बेचैन करत होते. प्रत्यक्षात अतिशय घनदाट जंगलातून ट्रक जात असताना अचानक वाघोबा तर झडप घालणार नाही ना या भीतीमुळे सर्वजण जागे होतो. त्यातून आज अमावस्या असल्याचे आईने सांगतांच सर्व बालबच्चे एकमेकांना घट्ट धरून होते. असो


जोबटहे त्या मानाने अधिक सधन, मात्र तेही दाट जंगलांत वसलेले. कुणास ठाऊक कसे पण जोबट पुरती तिथली लाल माती आठवतेय मला. त्या जंगलांत असंख्य चारोळीची झाडे होती, तशीच काही साखरेची देखील. होय, त्याच्या प्रत्येक चपट्या फुलातून एकेक साखरेचा दाणा निघत असे आणि खाली पडलेली मूठमूठ फुलें गोळा करून तेसाखरेचेकण जिभेवर ठेवत असूं. तो भाग एऱ्हवी अत्यंत मागासलेला, मूळ भिल्ल वस्तीचा. कदाचित् म्हणून तिथे ख्रिश्चियन चर्च आणि रूग्णालय उभारले गेले असावे. ( माझा अंतरंग मित्र प्रभू खरे तिथे दोन वर्षें सेवेंत होता अमेरिकेतून परत आल्यावर. ) 

जोबट संस्थानची फारशी माहिती नाही मात्र इंदोरला जोबट नरेशची लाल नंबरप्लेटची कॅडिलॅक खूप वेळा पाहिलीय् मी

पुरे करतो आता हे चऱ्हाट

रहाळकर

२० एप्रिल २०२६.    


Tuesday, April 14, 2026

 

मंझिल से कहीं रास्ते होते हैं !

 मंझिल से कहीं, रास्ते होते हैं


आज एक व्हीडिओ क्लिप पाहात असताना ती बनवणाऱ्या व्यक्कीचे हे शब्द खूप आवडले आणि वाटलं यावर काहीतरी भाष्य करावे

खरोखर, आपण एखादी सहल, गंतव्य वगैरे ठरवून प्रवासाला निघतो. गंतव्यावर पोहोचतांच वाट संपते मात्र त्या प्रवासाची लज्जत कायम घर करून राहते मनात. ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान ओंवी लिहिली आहे या संदर्भात. ते म्हणतात, ‘एखादे गाणे संपल्यावर त्याचे सूर आसमंतांत घुमत राहतातकिंवा गदिमांच्या एका कवितेंत रात्रीची महफिल संपल्यावर कोपऱ्यात उभी असलेली सतार, लोड-गाद्या नि जाजमांवरच्या सुरकुत्या, पानतंबाखूची उघडी पेटी वगैरे खूप काही बयॉं करून जातात. शिवाजीराव भोसले म्हणतात, ‘माणसांना पोहोचण्या आधी परत फिरायची घाई असते. वापरात नसलेली पायवाट त्यांना वारंवार बोलवत असूनही ती वाट वहिवाट करता येत नाही त्यांना’ ! 

अगदी तसंचमंझिल से कहीं रास्ते होते हैं’ ! खरंतर मंझिल येण्याआधी ती वाट कधी सरूंच नये असे वाटते. ‘वाटसरूहा शब्द कसा तयार झाला असेल ? सरणाऱ्या वाटेवर चालत राहणारा तोवाटसरूअसेल काय ? बोला, बोला काहीतरी

रहाळकर

१४ एप्रिल २०२६ 


This page is powered by Blogger. Isn't yours?