Monday, June 29, 2026

 

श्रीसंतर्थांचा दासबोध- एक विहंगावलोकन ‘ख’पुष्प तिसरें !

 श्रीसमर्थांचा दासबोध- एक विहंगावलोकन

पुष्प तिसरें

मंडळी, पंधरावीस दिवसांपूर्वी आपण समर्थकालीन सामाजिक नि राजकीय परिस्थितीचा धावता परामर्ष घेतला होता. माझी अशी श्रद्धा आहे की तुम्ही पहिले दोन्ही भाग निवान्तपणं वाचले असतील. खरं सांगूं का, कोणताही आध्यात्मिक ग्रंथ घाईघाईने वाचून संपवायचा नसतो तर थोडे थोडे चावून, रवंथ करीत म्हणा हवे तर, त्या ग्रंथाची खरी लज्जत चाखायची असते. आचरण ? मला वाटतं तो ग्रंथ छानपैकी पचविता आला तर आचरण आपसूक घडत जाते पहा ! वेगळी खटपट करावीच लागत नाही. असो.


श्रीसमर्थांनी शेकडो मठ आणि संन्यासी महंत निव्वळ लोकसंग्रहास्तव उभारले हे आपण मागील भागात पाहिले आहेच. दरम्यान देखील ते उदंड वांग्याची रचना करीत राहिले. करूणाष्टकें, मनाचे श्लोक, आत्माराम, षड्रिपुनिरूपण, जनस्वभावगोसावी, श्रीमत् दासबोध वगैरे तर सुप्रसिद्ध आहेत


दासबोधांतविवेकावर विलक्षण भर देणारे समर्थयत्नअर्थात प्रयत्नांना  देव मानत असत. (यत्न तो देव जाणावा ). मात्र विवेकाला यत्नाची जोड देणारे समर्थ अंत:करणाने किती कोमल, प्रेमळ नि भावोत्कट होते ही बाब त्यांचीकरूणाष्टकेंवाचताना प्रकर्षाने अनुभवास येतात. त्यांच्यापाशीं जबरदस्त प्रतिभा विद्यमान होती हे नि:संशय. त्यांची भाषा सोपी, सुटसुटीत, खरेतर रोखठोक असली तरी मोजक्या शब्दांत नेमका अर्थ नि:संदिग्धपणे सांगण्याची हातोटी त्यांचे विलक्षण प्रभावी व्यक्तिमत्व दर्शविणारी अशीच आहे


समर्थांचा दासबोध हा एक प्रमुख ग्रंथ मानला जातो. त्यांना जगाला जे काही सांगायचे होते ते सर्व त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे दासबोधांत. एकूण वीस दशकें, दोनशे समास आणि सात हजार सातशे एक्कावन्न ओंव्यांत त्यांनी दासबोधाची गुंफण केली आहे आणिहे वीस दशक आणि दोनशे समास साधकाने स्वस्थपणे सावकाश अभ्यासावेअसे आवर्जून सांगितले आहे


श्रीमत् दासबोधांत जे जीवनदर्शन किंवा तत्त्वज्ञान घडवले आहे त्यांत दोन प्रधान अंगें आहेत असे प्राचार्य के.वि.बेलसरे, सार्थ दासबोधाचे रचनाकार, सांगतात. एक अंग आहेअद्वैतसिद्धान्ताचे, तर दुसरेद्वैतकिंवा व्यावहारिक सिद्धान्ताचे. अद्वैत सिद्धान्त साहाजिकच पारमार्थिक स्वरूपाचा शाश्वत, कालातीत आहे, तो सर्व युगांत आणि देशांत सारखेपणाने सत्यपणे अस्तित्वात राहतो. तर दुसरीकडे द्वैत सिद्धान्त हा व्यावहारिक प्रपंचस्वरूपात असल्याने तो तात्पुरता, कालाधीन नि अशाश्वत होय.


श्रीदासबोध हा गुरूशिष्य-संवाद  असून प्रत्येक समासांत एक किंवा अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरें दिली आहेत. तथापि एखाद्या विषयावर सहसा ज्या शंकाकुशंका उठू शकतील किंवा तर्क-वितर्क निघू शकतील त्या स्वत: उपस्थित करून समर्थांनी त्यांचे निरसनही केलेले दिसून येईल.


असा हादासबोधसमर्थांनी काय म्हणून रचला असावा ? खरंतर सद्वस्तु ( ब्रह्म ), परमात्मा, अंतरात्मा, ईश्वर, मूळमाया, गुणमाया, दृष्य विश्व,, कालचक्र, जीव, जीवन्मुक्ती, ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि एकूणच मानवी जीवन नि त्यांची जीवन मूल्यें वगैरेंवर सिकवण देण्यासाठी लिहिला असावा असा प्राथमिक अंदाज आहे

पाहूंया शनै: शनै: जमेल तितुके ! ! 

रहाळकर

२९ जून २०२६

वट पौर्णिमा !     


Wednesday, June 24, 2026

 

भज गोविन्दम् !

 भज गोविन्दम्

श्रीमत् शंकराचार्यांनीमायानदी इतक्या सहजपणे ओलांडली जसे कोणी एखाद्या शेतावरील बांध्याला ओलांडून जावे ! त्यांनी वेदान्तावर अमाप लिखाण केले ज्यांत त्यांनीस्वकिंवा आत्म्याबद्दलचे ज्ञान प्रसृत करत असतानाच असंख्य स्तोत्रें देखील रचली. सर्वसामान्य लोकांत भक्तीचे बीज रूजावे म्हणून त्यांनी रचलेली स्तोत्रें मानवी समाजासाठी एक मोठी सेवा म्हणता येईल. यांतील एक - ‘भज गोविन्दम्हे स्तोत्र त्याचे उत्तम उदाहरण होय

काही विद्वान मंडळींना वाटते की भक्तिमार्ग हा ज्ञानमार्गापासून अगदी वेगळा आहे आणि त्यासाठी ते आपली मतें हिरिरीने मांडत आलेली आहेत, होय अजूनही. मात्र खरे सांगायचे तर बुद्धिज्ञान जेव्हा परिपक्व होऊन हृदयांत स्थिरावते तेव्हाच तेशाहाणेअर्थातवाईजम्हटले जाते ( एऱ्हवींअदरवाईज’ ! ) . असो.

शाहाणे झालेले शहाणपण जेव्हा दैनंदिन जीवनात मूर्त स्वरूपात दृग्गोचर होते तेव्हा त्यालाचभक्तीहे नामाभिधान देतां येईल. जे ज्ञान भक्तींत परिणत होत नाही ते व्यर्थ होय असे संत सांगतात


श्रीमत् शंकराचार्य सांगतात की जोंवरइंद्रिय-निग्रहसाधत नाही तोंवर खरे ज्ञान, शहाणपण हृदयांत स्थिरावणार नाही. तर मग हा इंद्रियनिग्रह प्रत्यक्षात कसा आणता येईल ? थिरूवलुवर या महान तमिळ संतांनीविचाराला’ ‘कृतींतकसे परावर्तित करता येईल याची युक्ती सांगितली आहे. ते म्हणतातईश्वराप्रत तुमची आसक्ती एवढी एकच आसक्ती बाळगा; त्या आसक्तिद्वारें इतर सर्व वासनांपासून तुम्ही मुक्त राहूं शकता. नाम्मलवर नावाचा दुसरा संत म्हणतो, ‘आसक्ती सोडली तर मोक्ष खात्रीने ठरलेलाच’ ! 

श्रीमद्भगव्द्गीतेंत हेच नाही का म्हटले, ‘विषयान् विनिवर्तंते निराहारास्य देहिना: रसवर्जम् रसोप्यस्य परम् द्रष्ट्वा निवर्तते’ ! 


तर मग आसक्तींचा मनापासून समूळ नाश आणि मनाला ईश्वराकडे वळवणे हाच एकमेव इंद्रियनिग्रहाचा मार्ग आहे


अजून एक तमिळ संत म्हणतो, ‘मी ज्या दुराग्रही शत्रूला जिंकायचा पराकाष्ठेने प्रयत्न करत होतो तो मार्ग म्हणजेप्रेमहेत्याने मला शिकवले, असे संत माणिक्कावाचागर म्हणतात. आणि हे दुराग्रही शत्रू कोण म्हणाल तर ते आहेत अहंकार नि वासना !


श्रीमत् आदिशंकराचार्य, ज्यांनी एक ओंजळभर घोटांत आख्खा ज्ञानसागर प्राशन केला असे म्हटले जाते, त्यांनी अशी स्तोत्रें गायिली ज्यांत ज्ञान आणि भक्तीचा विलक्षण संयोग आढळून येईल. खरंतर श्रीशंकरांच्याभज गोविन्दम्या गीतांत वेदान्ताचे सार आले आहे. खरोखर हे गीत विलक्षण गेय आहे, सुमधुर, मेलोडियस् ! भारतरत्न एम् एस् सुब्बुलक्ष्मींनी ते छानच गायिले आहे नै


या स्तोत्रांत एकूण एकतीस श्लोक असले तरी ते सर्व सहसा गात नाहीत कोणी, केवळ सहा सात श्लोक म्हटले जातात. ‘क्रमश:’ वगैरे भानगडींत अडकता जमतील तेवढेच श्लोक अभ्यासार्थ घेणार आहे…….! (अर्थात सर्व श्लोकांचा निचोड द्यायचा अवश्य प्रयत्न करीन. आजही प्रास्ताविकच खूप लांबले की महाराजा ! ) 


) “भज गोविन्दं भज गोविन्दं

         भज गोविन्दं मूढमते

     संप्राप्ते संन्निहिते काले

          नहि नहि रक्षति डुंक्रुंकरणे ॥१॥” 


आपल्या अत्यंत लाडक्या अशा शंकराचार्यांसाठी देवी सरस्वती शारदा जणू स्वत: हे गीत गाते आहे !

मृत्यूच्या दारापाशी उभा असताना तूं आजवर वाचलेले ग्रंथ, मिळवलेले भौतिक ज्ञान, प्रयत्नसाध्य कौशल्य वगैरे तुझ्या कितपत उपयोगाचे असणार आहे ? नव्हे, नक्कीच नाही ! केवळ ईश्वराला, गोविन्दाला शरण गेलास तरच तुझा निभाव लागेल. मृत्यूचे दूत तुला खुणावून आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतील तेव्हा तू मिळवलेले सर्व ऐहिक ज्ञान आणि कौशल्य तोकडे पडेल, कोणीच मदत करू शकणार नाहीत. केवळ एक गोविन्दच तुला तारून नेईल. तुझे सर्व पुस्तकी ज्ञान निखळ भक्तीविना निरुपयोगी असेल.. 


खरोखर, अनेक भ्रांत समजुतींत विद्वत्तेचा अहंकार फार मोठा आहे. शंकराचार्य म्हणतात की विद्वत्तेचा माज आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या कीर्तीची हांव ही मोठी भ्रांती होय. मात्र ईश्वरावरील प्रेममय भक्ती त्या भ्रांतीला नेस्तनाबूत करू शकते.

डुंकुंकरणेहा पाणिणीच्या व्याकरणातील एक म्हणण्याचा प्रकार आहे, घोकंपट्टी सारखा. शंकराचार्य चेष्टेने म्हणतात की निव्वळ घोकंपट्टी करून मृत्यू टाळता येईल काय. वास्तविक हा कटाक्ष सर्व विद्वद्जनांसाठी आहे हे तुम्ही ओळखले असेलच म्हणा. नुसते पुस्तकी ज्ञान निरुपयोगी असून भगवद्भक्तीची जोड नितांत आवश्यक असल्याचे संपूर्ण काव्यांत प्रतिपादन आहे.


दुसऱ्या श्लोकात संपत्तीच्या हव्यासावर ताशेरे ओढतात. - 

).  “मूढ जहीहि धनागमतृष्णा

            कुरू सग्बुद्धि मनसि विकुष्णाम्

      मल्लभसे निजकर्मोपात्तं 

             वित्तं तेन विनोदय चित्तम् ” 


भज गोविन्दम् हे गीत प्रत्येक माणसासाठी, अगदी रस्त्यावरच्या निर्धन अडाणी माणसापासून सर्वांसाठी उपयुक्त आहे. भक्ती आणि ज्ञान हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अघिकार आहे. श्रीमत् शंकराचार्यांची शिकवण केवळ संन्यासी मंडळींसाठी नसून सर्वसामान्यांसाठी आहे. स्व-कष्टाने मिळालेल्या संपत्तीवर ज्याचात्याचा पूर्ण हक्क आहे, तो त्याचा कसाही उपयोग करो , मात्र त्यात त्याचे समाधान आवश्यक आहे. मात्र अधिकाधिक संपत्ती मिळवायची हांव किंवा तृष्णा त्यांना मान्य नाही.


). “नारीस्तनभरनाभीदेशं

           दृष्ट्या मा गा मोहवशेम्  

      एतन्मांसवसादविकारं 

            मनसि विचिन्तय वारं वारं ॥३॥” 

या श्लोकात स्त्रीदेहाचे वर्णन असून लंपटपणा टाळण्यासाठी त्याकडे काम-वासनेने पाहू नये असे सुचवले आहे, अर्थातच परस्त्रीकडे ! म्हटलेच आहे, ‘नजर चंचल तर मन चंचल’ ! ! 


चौथ्या श्लोकात कमळाच्या पानांवर थरथरणाऱ्या पाण्याच्या थेंबांचे रूपक सांगतात. मानवी जीवन अगदी तसेच अस्थिर, अशाश्वत, क्षणभंगूर असल्याचे सांगतात


पांचव्या श्लोकात म्हणतात की जोंवर तुम्ही धनदौलतीचे  स्वामी आहांत तोपर्यंतच सगेसोयरे, इष्टमित्र, नोकरचाकर तुमच्याकडे लक्ष देतील आणि ते संपताच कोणी ढुंकूनही पाहणार नाही तुमच्याकडे ! आणि म्हणून शंकराचार्य सांगतात की सर्व ऐहिक, क्षणभंगूर वस्तूंचा नाद सोडून गोविन्दाचे चरणांचा ध्यास धरा


सहाव्या श्लोकात म्हणतात की जो पर्यंत श्वासोच्छ्वास चालतोय तोंवरच पत्नी, मुलें, सगेसोयरे तुमच्या आजूबाजूस दिसतील. मात्र तो थांबतांच प्रेत म्हणून घराबाहेर काढायची लगबग करतील ! खरंतर त्या प्रेताला पत्नी उंबरठ्यापर्यंत पोंचवील, मुलें नि सगेसोयरे स्मशानापर्यंत आणि अग्नी चितेपर्यंतच ! पुढचा प्रवास फक्त गोविन्दाच्याच संगतींत असणार आहे


सातव्या श्लोकात म्हणतात की बालपण खेळण्यांत निघून जाईल, तारूण्य नासले, वार्धक्यात आजार नि चिंतांनी बेजार केले. तथापि स्वत:ला जाणून घेण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही


आठव्यात विचारतात की जिच्यावर तू अतोनात प्रेम केलेस ती पत्नी कोण, पुत्र कोण, आणि ज्याला जिवापाड जपत आलास तो तू स्वत: कोण ? हा संसार खरोखर मायाबाजार आहे. कुठून आलास तू नि कुठे जाणार


नवव्यात म्हणाले सत्संग आणि सत्यसंगाची कास धरली तर अनेक वासनांवर विजय मिळवता येतो, मन:शांतीचा लाभ होतो. मुख्यत: भ्रांती दूर होते. हा श्लोक उधृत करायलाच हवा

सत्संगत्वे नि:संगत्वं

      निस्संगत्वे निर्मोहत्वं

  निर्मोहत्वे निश्चलचित्तं

        निश्चलत्वे जीवनमुक्ति: ॥९॥” 


तसे पाहिले तर अजून एकतिसाव्या पर्यंत वाटचाल करायची आहे, पण तुम्ही कंटाळला असाल ना एव्हाना, म्हणून थांबतो

रहाळकर

२४ जून २०२६.   


This page is powered by Blogger. Isn't yours?