Friday, February 06, 2026
श्रीसमर्थांचे जीवनदर्शन !
श्रीसमर्थांचे जीवनदर्शन !
समर्थ श्रीरामदास स्वामींचे जीवनदर्शन अद्वैत सिद्धान्त आणि व्यावहारिक द्वैत अंगाने विनटलेले म्हणता येईल. त्याच संदर्भांत समर्थांचा समकालीन असलेल्या डच तत्ववेत्ता स्पिनोझाचाही उल्लेख नजरेस पडला. पुढे जाण्याआधी या स्पिनोझाचे विचार काय होते हे जाणून घ्यायची उत्कंठा लागली. सबब कायम जवळ असलेल्या गूगल् बाबाची मदत घेतली. गूगल् प्रमाणे स्पिनोझाचे तत्वचिंतन पूर्णत: व्यावहारिक किंवा सायन्टिफिक म्हटले तरी त्याला मूळ सिद्धान्ताचे कितपत पाठबळ असेल हे ज्ञात नाही. ईश्वर किंवा GOD बद्दल त्याचे म्हणणे असे की परमेश्वर ही एक अतिविशाल, सर्वसमावेशक, असीमित ‘वस्तु’ होय, जी अमर्याद गुणांनी (Attributes) युक्त अशी आहे. त्याचे म्हणण्यानुसार हे विश्व परमेश्वर-निर्मित नसून ते परमेश्वराचाच एक अंश आहे.
मला वाटतं या ठिकाणी त्याचे हे विचार आपल्या तत्वज्ञानाशी मिळतेजुळते आहेत.
आतां श्रीसमर्थांचे जीवन-दर्शन अर्थात मानवी जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोण काय होता ते पाहूं. आधी म्हटल्याप्रमाणे त्यांचे तत्वज्ञान अद्वैत आणि द्वैत या दोन्ही अंगांनी परिपूर्ण असे आहे. अद्वैत सिद्धान्त परमार्थ-स्वरूप असून तो शाश्वत, कालातीत, अमर्याद आणि सत्यस्वरूप आहे तर द्वैत सिद्धान्त हा प्रपंचरूप असून तो देश, काल, परिस्थितीनुरूप बदलणारा असा तात्पुरता, फसवा नि कालाधीन असतो. तो कल्पना, संकल्प-विकल्प, भाषा वगैरेंद्वारा व्यक्त होतो किंवा साकार होतो.
समर्थांचा परमार्थ हा सगुण साकार ईश्वराच्या (श्रीरामांच्या) भक्तिरसांत चिंब भिजलेला असला तरी व्यावहारिक दृष्ट्या त्या प्रेममय भक्तिरंगाला नीतिमत्तेच्या कोंदणांत बसवलेंय् त्यांनी. स्वत: आत्मसाक्षात्कारी संत असल्याने त्यांनी आत्म-प्रचीतीवर कायम भर दिलेला दिसून येईल. रोकडा अनुभव घ्यावा असा दंडक असे त्यांचा.
मुळांत दासबोध हा ग्रंथ गुरू-शिष्य-संवाद स्वरूपात अर्थात प्रश्नोत्तर स्वरूपात असला तरी शिष्याने विचारलेले प्रश्न त्यांनीच अतिशय चाणाक्षपणे निर्माण करून मग त्यांची समर्पक उत्तरें दिल्याचे सहज लक्षात येईल.
श्रीसमर्थांनी विशद केलेला भक्तिमार्ग विलक्षण बुद्धिप्रधान आहे, तेथे अंधश्रद्धेला अजिबात थारा नाही. विशेष म्हणजे समर्थांचा ‘विवेकावर’ विलक्षण भर होता. ( हाच विवेक स्पिनोझाच्या तत्वचिंतनात आढळून येईल ). असो.
समर्थांचा विवेक तत्कालीन भोंगळ रूढींचा नि:पात करणारा असून उत्तम वैज्ञानिकाप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवावर त्यांचा विशेष भर होता. विवेकाच्या जोरावर माणूस अंत:करणाने विशाल होत्साता आत्मज्ञानी होऊ शकतो हे त्यांचे सर्वोच्च तत्वज्ञान किंवा जीवनदर्शन म्हणता येईल.
तथापि, प्रापंचिक संसारी माणसांसाठी त्यांनी दिलेली गुरुकिल्ली - ‘आधी प्रपंच करावा नेटका’ विसरून कसे चालेल ? नीट विचार करणे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे त्यांचे ब्रीदवाक्य म्हणता येईल. अविवेक आणि आळस ही करंटेपणाची लक्षणे होत.
श्रीसमर्थ ‘साहित्या’ची शक्ती पुरेपूर जाणतात. जे दासबोधाचा अभ्यास करतील त्यांच्यांत आमूलाग्र परिवर्तन घडून येईल अशी ग्वाही ते देतात. ते म्हणतात - ‘अज्ञान, दु:ख व भ्रांती नाश पावून लगेचच वैराग्य अंगीं बाणेल. त्याला विवेकाची जोड मिळेल. बद्ध मुमुक्षु होतील. मूर्ख दक्ष होतील. अभक्त भक्त बनून मोक्ष पावतील. नाना दोष जाऊन पतित पावन होतील. देहबुद्धिचे धोके टळतील. संसारातील उद्वेग नष्ट होऊन अधोगती चुकेल आणि मनाला खरी विश्रांती मिळून अत्यंत समाधान लाभेल.
दासबोघाने अनेकांना हे फळ दिले आहे.
इति शम् !
रहाळकर
७ फेब्रुवारी २०२६
Monday, January 26, 2026
शाळा शाळा !
शाळा शाळा !
माझे शालेय शिक्षण सुरू झाले इन्दूरच्या जेलरोडवरील ‘बाल-निकेतन’ या मॉन्टेसरी शाळेपासून. अस्मादिक तेव्हा चारपाच वरूषांचे असावेत. डोईवर गोंडेदार टोपी, दोन्ही कानांत मोत्याचे डूल, लांब बाह्यांचे लाल स्वेटर, अर्धी चड्डी नि पायात कॅन्व्हासचे बूट आणि मोजे घातलेले हे गुटगुटीत बालक आईचे बोट धरून आणि मोकळ्या हातात छोटासा कडीचा डबा नाचवीत लुटुलुटु शाळेकडे जात असलेले माझेच चित्र काही केल्या मला विसरतां येणे शक्य नाही. डब्यात दररोज पोळीचा लाडू असे नि त्या साजूक तुपाची चव तर अजूनही ठाण मांडून बसलीय तेव्हापासून ! त्या बाल निकेतन मध्ये अभ्यास वाभ्यास कधीच नसायचा, फक्त तिथल्या रंगीत लाकडी ठोकळ्यांची पुन्हापुन्हा जुळवाजुळव करण्यांत दोनतीन तास सहज निघून जात आणि डब्बा खाऊन होतांच घरच्या सुंदराबाई या बाळाला कडेवर घेऊन घरी पोहोचवत !
मात्र दसऱ्याला नवी पाटीपेम मिळाली आणि सलग पंधरा दिवस आईने तीवर रेखाटलेली ‘श्री श्री श्री श्री’ शेकडो वेळा गिरवून झाली.
पहिलीत प्रवेश मिळाला लोधी मोहल्ल्यातील वागळ्यांच्या शाळेत. लौले मास्तरांनी अ पासून ज्ञ पर्यंत आणि सर्व बाराखड्या शिकवल्या त्या अजूनही विसरलो नाही मी. ‘सत्रावीचा नि अठ्ठावीसचा पाढा मात्र आजच्यासारखाच तेव्हाही कायम दगा द्यायचाच ! ) असो.
त्या पहिलीच्या वर्गात माझे सहाध्यायी म्हणून पुढे खूप नावारूपास आलेले यशवंत खिरवडकर, अरूण वाघमारे, वनमाली अत्रे वगैरे मित्र माझे खास आवडते, मात्र दांडग्या रविंद्र नाईकला मी नेहमीच घाबरायचो.
दुसरींत बढती मिळता मिळतां वडिलांची ‘गरोठ’ या राजस्थान सीमेनजीकच्या गांवी बदली झाली आणि निव्वळ एकच मराठी सिक्षक असलेल्या सर्कारी हिंदी शाळेत मला नि ताईला बसवले गेले. त्या शाळेत उधळीकर मास्तर हे पहिली ते पाचवी असे पाच वर्ग एकाच लांबड्या गॅलरीत हाकत असत. जाड भिंगाचा चष्मा लावणाऱ्या उधळीकर मास्तरांचे डोळे नेहमीच लालबुंद असत आणि ते नेहमीच रागावलेले भासत. मात्र घरी आम्हाला शिकवणुकीसाठी येऊ लागल्यावर ते आईअण्णांशी चक्क हसून बोलताना पाहून मला नि ताईलाही नेहमीच आश्चर्य वाटायचे. त्या शाळेत एकही मराठी मुलगा नव्हता, फक्त चारपाच मुली ज्यांच्याशी ताईची छान गट्टी जमली होती. सहसा मी घरून आणलेला डबा एकटाच खायचा मात्र ताई मैत्रिणींसोबत तिचा डबा खायची. तिच्या एका मैत्रिणीने आणलेली मेथीची भाजी तिने मला जबरदस्तीने चाखायला लावली नि ती (भाजी) मला चक्क आवडली हो ! ( ती ताईची मैत्रिण ताईपेक्षाही चार वर्षांनी मोठी, म्हणजे माझ्याहून सहा ! असो ! )
पन्नास सालीं अण्णांची बदली शिवपुरी या सुंदर शहरीं बढतीने झाली. ते आता डेप्युटी कलेक्टर झाले होते आणि साहाजिकच आमचेही भाव वधारले होते. तिथल्या हिंदी मीडियम सर्कारी शाळेत सुद्धा एकच मराठी मास्तर होते चितळे आडनावांचे. अतिशय देखणे, हंसतमुख आणि विलक्षण हुषार असे चितळे मास्तरसाहेब देखील पहिली ते पाचवी असे वर्ग एका लहानशा, दहा बाय दहाच्या खोलींत घेत. मराठी विद्यार्थी आम्ही पाचच- ताई, सुधी, मी, विनया देसाई आणि एक दहिभाते नामक मुलगा. सर शिकवायचे तर छानच पण घरी सुद्धा शिकवणुकीला येत तेव्हा दररोज नवनवीन गोष्टी साभिनय सांगत. गोष्टींत कुणाच्या मरणाचा उल्लेख आलाच तर ‘चारी खाने चित्त’ असा शब्दप्रयोग करीत असत ते.
चितळे मास्तरसाहेब अण्णांचीही काही कामें स्वेच्छेने नि आनंदाने करीत. मला आठवतेय की अण्णांनी त्यांना काही तांतडीच्या कामासाठी ग्वालियरला आपल्या बरोबर नेले होते दोन दिवसांसाठी आणि त्यांची जुनीपुराणी सायकल ते ठेवून गेले होते. मात्र त्याच दिवशीं मी त्यांची सायकल तेलपाण्याने स्वच्छ धुवून, ऑयलिंग ग्रीजिंग करून ठेवलेली पाहून त्यांच्या डोळ्यांत आलेले पाणी पाहताच मला धन्यधन्य वाटले हे मात्र खरे हो.
तीन वर्षें शिवपुरीच्या साळेत घालवल्यावर पुन्हा इंदोरला बदली झाली अण्णांची नि पाचवीची परिक्षा न देताच मार्च महिन्यात आम्ही इंदूरला आलो. मे किंवा जून मधे माझी एक दिवसांची लेखी परिक्षा महाराजा शिवाजीराव हायस्कूलच्या उप-प्राचार्यांनी ( नामजोशी सरांनी ) घेऊन मला ‘पाचवी पास’ असा दाखला हातोहात देऊन टाकला. सहावी ते आठवी पूजनीय पांढारकर मास्तरांच्या शुद्ध मराठी शाळेंत, बोझांकेट मार्केट स्थित फायनल स्कूल मधे मोठ्या आनंदांत पार पडले. त्या शाळेंत मी खूप काही शिकलों, फार मोठी पुंजी मिळवली आणि चक्क बुद्धिमान विद्यार्थ्यांत गणला जावू लागलो ( बुद्धिमान पण विलक्षण गबाळा नि आळशी ! ) तिथे उत्तम इंग्रजीचे धडे मिळाले बुचडे सरांकडून, जे स्वत: अतिशय निर्धन आणि दलित समाजातले असूनही त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व भल्याभल्यांना बुचकळ्यांत टाकत असे. नुकतीच यूरोप सफर करून आलेल्या हंडियेकर डॉक्टरांशी ते बराच वेळ इंग्रजींत वार्तालाप करताना पाहून हेडमास्तरांसकट सर्वच अचंभित झालेले मी प्रत्यक्ष पाहिले आहेत.
मराठी भाषा नि त्यातही कवितांची गोडी चौधरी सरांमुळे लागली हे मला कृतज्ञतापूर्वक नमूद केलेच पाहिजे. हिंदी आणि क्रॅफ्टचे शिक्षक दुबे सर ( डुबे जी ! ) छान सोपे हिंदी शिकवीत आणि मी परिक्षेत लिहिलेला लांबलचक निबंध - ‘एक गांव का सफर’ त्यांनी संपूर्ण शाळेसमोर ग्यादरिंग मधे स्वत: मोठ्याने वाचून दाखवीत खूप कौतुकही केलेले छानपैकी स्मरतेंय मला. सायन्स नि गणिताचे दोन्ही सर चांगले असले तरी माझ्या बुद्धीपलीकडचे निघाले दोन्ही विषय ! असो. त्या शाळेत सहाध्यायी असलेले कित्येकजण नंतर आंतरराष्ट्रीय पटलावर चमकत असलेले मला माहीत आहेत.
खरोखर, त्या फायनल स्कूलने मला भरभरून दिले हे निर्विवाद.
नववी दहावी महाराजा शिवाजीराव हायस्कूल मधून बऱ्यापैकी पार पडली आणि अकरावी ऑनवर्ड होळकर कॉलेज वगैरे.. तत्पूर्वी मी कायम हाफ निकरमधे राहिलो, पहिला कुर्ता-पायजामा कॉलेज प्रवेशानंतरच ! कॅन यू बिलीव्ह दॅट ?
रहाळकर
२६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिवस, रिपब्लिक डे ! !