Monday, February 16, 2026
भटकणे नि भरकटणें !
भटकणे नि भरकटणें…….!
नुस्ताच गॅलरीत बसून रस्त्यावरची वर्दळ पाहात बसलो होतो आणि मनात आलं की आपणही जरा फेरफटका मारून यावा. अर्थात कुठे जायचं ते अजिबात ठरिवलं नव्हतं. एऱ्हवी सुद्धा आम्ही कित्येक वेळा आधी काहीही न ठरिवतां बस् ‘निकल पडत होतो’ ! नवल म्हणजे हे ‘निकल पडणे’ बरेच वेळां ‘लांबचा पल्ला’ गाठत आलेले असे, मसलन् पांवस, प्रशांति निलयम किंवा औदुम्बर नृसिंहवाडी वगैरे. सुरुवातीला फटफटीवरून, मग स्कूटर, नंतर एष्टी, आणखी नंतर कारने नि कधी मॅटॅडोरने देखील. तथापि सर्वात हुकुमी म्हणजे मनोमनीं ! !
आज कुठे कुठे जाऊन आलो म्हणता ? आज चक्क लंडनभर फिरून आलो की राव अर्ध्या तासात ! मस्तपैकी स्नॅक् ची पाकिटं, ज्यूसची छोटी कार्टन्स, छत्री नि मोफत प्रवासाचा पास घेऊन, बायको नि मुलांना सांगून आणि अर्थातच मोबाईल घेत्साता बाहेर पडलो. समोर आली त्या बसमघे स्थानापन्न झालो आणि ‘बस’च्या शेवटल्या थांब्यावर उतरलो. समोरच ट्रॅमचे स्टेशन दिसले नि नुकतीच आलेली ट्रॅम परतीच्या प्रवासाला निघालेली पाहून सरळ आत घुसलो. चक्क विंबलडन् ला जाऊन थांबली की ती ट्रॅमगाडी ! दोनशे नंबरची बस दिसली म्हून मर्टनचं गणपती मंदिर पुन्हा एकदा फिरून आलो. अर्थात तिथे जरासा थांबून दर्शन वर्शन घेतलं, गंपतिबाप्पाला बाबाय् म्हणत पुन्हा तीच ट्राम पकडली आणि क्रॉयडनला ब्रेक जर्नी केला. कोण जाणे का पण मला तिथे फिरून यायला भारी आवडते. आजवर किमान दहाबारा वेळा फिरलोय तिथे मी. लुईशॅमची पंचाहत्तर नंबरची बस पकडून वाटेत नॉरवुडचे विस्तीर्ण जलाशय पुन्हा एकदा पाहून घेतले. तळीं, सरोवरें, तालाब, नद्या नि सागर-महासागर मला नेहमीच खुणावत राहतात. त्यांत दिसणाऱ्या निळ्या आकाशाचे हिरवे प्रतिबिंब मोहवून टाकते मला. असो.
भटकंती करायला एकटाच बाहेर पडलो की मला इथल्ल्या कोणत्याही लायब्ररीत किमान दोन अडीच तास घालवल्याशिवाय चैन पडत नाही बघा. पायांची भटकंती अंम्मळ थांबवून त्या ग्रंथसंपदेंत हरवून जावेसे वाटते नि ते मी करतोही. दरम्यान घरी एकदोन वेळा कॉल करून माझी व्हेअरअबाऊटस् सांगायची तसदी मी क्वचित घेतो कारण त्याआधी माझी वेळोवेळी खबरबात त्यांनी आधीच मिळवली असते.
थोडक्यात, ही मनोमनींची भटकंती नि भरकटणें सतत चालू असते, वानगीदाखल थोडेच कथन केले. कंटाळलात की नाही अजून ?
रहाळकर
१६ फेब्रुवारी २०२६.
Sunday, February 15, 2026
गुणगुणणें !
गुणगुणणें !
स्वयंपाकघरांत कामात व्यस्त असलेल्या उर्मिलेला सहज गुणगुणताना ऐकून मनात विचार आला की आपण देखील केव्हा कसे कधीतरी काय म्हणून एखादे गीत किंवा धून गुणगुणण्यात मश्गूल होऊन जातो ?
या निमित्त आठवली गदिमांची एक कविता, जिच्यात ते म्हणतात - ‘अर्धे अंतर चालून आलो…….वगैरे पण पुढे म्हणतात, ‘मी असाच चालणार आहे, मुखीं येईल तें गाणार आहे, शब्द सुचेनासा झालाच तर, नुसतीच शीळ भरीन’ !
शीळ घालणे नि गुणगुणणे कधी घडते ? जेव्हा आपण निवान्त, अव्यग्र, काळजीमुक्त, सहजपणे वावरत असतो तेव्हाच. विचार करून पहा, खूप राग आलेला असताना काळजीने व्यग्र असताना एखादी मुलाखात देण्याआधी परिक्षेच्या वेळी किंवा घोर संकटात असताना गाणे गुणगुणणे किंवा शीळ घालणे ( शिट्टी मारणे नव्हे ! ) शक्य असते का हो ? तथापि माझ्या एका ज्येष्ठ स्नेह्याने टेन्शनमुक्त राहण्यासाठी हा उपाय सुचवला होता.
वास्तविक प्रत्येकालाच आपल्या घरांत शांती, सौख्य, आनंददायक वातावरण कायम राहावे असे वाटत असते. विशेषकरून घरातील सुगृगिणी (आणि नवरोबा देखील ! ) एखादे गाणे गुणगुणताना पाहिले तर त्या घरात शांती, सुख, आनंदाचे वास्तव्य असल्याचा पडताळा येईल. तस्मात्, गुणगुणत राहा, निदान शीळ घालून पहा !
रहाळकर
१५ फेब्रुवारी २०२६.
Friday, February 06, 2026
श्रीसमर्थांचे जीवनदर्शन !
श्रीसमर्थांचे जीवनदर्शन !
समर्थ श्रीरामदास स्वामींचे जीवनदर्शन अद्वैत सिद्धान्त आणि व्यावहारिक द्वैत अंगाने विनटलेले म्हणता येईल. त्याच संदर्भांत समर्थांचा समकालीन असलेल्या डच तत्ववेत्ता स्पिनोझाचाही उल्लेख नजरेस पडला. पुढे जाण्याआधी या स्पिनोझाचे विचार काय होते हे जाणून घ्यायची उत्कंठा लागली. सबब कायम जवळ असलेल्या गूगल् बाबाची मदत घेतली. गूगल् प्रमाणे स्पिनोझाचे तत्वचिंतन पूर्णत: व्यावहारिक किंवा सायन्टिफिक म्हटले तरी त्याला मूळ सिद्धान्ताचे कितपत पाठबळ असेल हे ज्ञात नाही. ईश्वर किंवा GOD बद्दल त्याचे म्हणणे असे की परमेश्वर ही एक अतिविशाल, सर्वसमावेशक, असीमित ‘वस्तु’ होय, जी अमर्याद गुणांनी (Attributes) युक्त अशी आहे. त्याचे म्हणण्यानुसार हे विश्व परमेश्वर-निर्मित नसून ते परमेश्वराचाच एक अंश आहे.
मला वाटतं या ठिकाणी त्याचे हे विचार आपल्या तत्वज्ञानाशी मिळतेजुळते आहेत.
आतां श्रीसमर्थांचे जीवन-दर्शन अर्थात मानवी जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोण काय होता ते पाहूं. आधी म्हटल्याप्रमाणे त्यांचे तत्वज्ञान अद्वैत आणि द्वैत या दोन्ही अंगांनी परिपूर्ण असे आहे. अद्वैत सिद्धान्त परमार्थ-स्वरूप असून तो शाश्वत, कालातीत, अमर्याद आणि सत्यस्वरूप आहे तर द्वैत सिद्धान्त हा प्रपंचरूप असून तो देश, काल, परिस्थितीनुरूप बदलणारा असा तात्पुरता, फसवा नि कालाधीन असतो. तो कल्पना, संकल्प-विकल्प, भाषा वगैरेंद्वारा व्यक्त होतो किंवा साकार होतो.
समर्थांचा परमार्थ हा सगुण साकार ईश्वराच्या (श्रीरामांच्या) भक्तिरसांत चिंब भिजलेला असला तरी व्यावहारिक दृष्ट्या त्या प्रेममय भक्तिरंगाला नीतिमत्तेच्या कोंदणांत बसवलेंय् त्यांनी. स्वत: आत्मसाक्षात्कारी संत असल्याने त्यांनी आत्म-प्रचीतीवर कायम भर दिलेला दिसून येईल. रोकडा अनुभव घ्यावा असा दंडक असे त्यांचा.
मुळांत दासबोध हा ग्रंथ गुरू-शिष्य-संवाद स्वरूपात अर्थात प्रश्नोत्तर स्वरूपात असला तरी शिष्याने विचारलेले प्रश्न त्यांनीच अतिशय चाणाक्षपणे निर्माण करून मग त्यांची समर्पक उत्तरें दिल्याचे सहज लक्षात येईल.
श्रीसमर्थांनी विशद केलेला भक्तिमार्ग विलक्षण बुद्धिप्रधान आहे, तेथे अंधश्रद्धेला अजिबात थारा नाही. विशेष म्हणजे समर्थांचा ‘विवेकावर’ विलक्षण भर होता. ( हाच विवेक स्पिनोझाच्या तत्वचिंतनात आढळून येईल ). असो.
समर्थांचा विवेक तत्कालीन भोंगळ रूढींचा नि:पात करणारा असून उत्तम वैज्ञानिकाप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवावर त्यांचा विशेष भर होता. विवेकाच्या जोरावर माणूस अंत:करणाने विशाल होत्साता आत्मज्ञानी होऊ शकतो हे त्यांचे सर्वोच्च तत्वज्ञान किंवा जीवनदर्शन म्हणता येईल.
तथापि, प्रापंचिक संसारी माणसांसाठी त्यांनी दिलेली गुरुकिल्ली - ‘आधी प्रपंच करावा नेटका’ विसरून कसे चालेल ? नीट विचार करणे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे त्यांचे ब्रीदवाक्य म्हणता येईल. अविवेक आणि आळस ही करंटेपणाची लक्षणे होत.
श्रीसमर्थ ‘साहित्या’ची शक्ती पुरेपूर जाणतात. जे दासबोधाचा अभ्यास करतील त्यांच्यांत आमूलाग्र परिवर्तन घडून येईल अशी ग्वाही ते देतात. ते म्हणतात - ‘अज्ञान, दु:ख व भ्रांती नाश पावून लगेचच वैराग्य अंगीं बाणेल. त्याला विवेकाची जोड मिळेल. बद्ध मुमुक्षु होतील. मूर्ख दक्ष होतील. अभक्त भक्त बनून मोक्ष पावतील. नाना दोष जाऊन पतित पावन होतील. देहबुद्धिचे धोके टळतील. संसारातील उद्वेग नष्ट होऊन अधोगती चुकेल आणि मनाला खरी विश्रांती मिळून अत्यंत समाधान लाभेल.
दासबोघाने अनेकांना हे फळ दिले आहे.
इति शम् !
रहाळकर
७ फेब्रुवारी २०२६