Monday, January 26, 2026
शाळा शाळा !
शाळा शाळा !
माझे शालेय शिक्षण सुरू झाले इन्दूरच्या जेलरोडवरील ‘बाल-निकेतन’ या मॉन्टेसरी शाळेपासून. अस्मादिक तेव्हा चारपाच वरूषांचे असावेत. डोईवर गोंडेदार टोपी, दोन्ही कानांत मोत्याचे डूल, लांब बाह्यांचे लाल स्वेटर, अर्धी चड्डी नि पायात कॅन्व्हासचे बूट आणि मोजे घातलेले हे गुटगुटीत बालक आईचे बोट धरून आणि मोकळ्या हातात छोटासा कडीचा डबा नाचवीत लुटुलुटु शाळेकडे जात असलेले माझेच चित्र काही केल्या मला विसरतां येणे शक्य नाही. डब्यात दररोज पोळीचा लाडू असे नि त्या साजूक तुपाची चव तर अजूनही ठाण मांडून बसलीय तेव्हापासून ! त्या बाल निकेतन मध्ये अभ्यास वाभ्यास कधीच नसायचा, फक्त तिथल्या रंगीत लाकडी ठोकळ्यांची पुन्हापुन्हा जुळवाजुळव करण्यांत दोनतीन तास सहज निघून जात आणि डब्बा खाऊन होतांच घरच्या सुंदराबाई या बाळाला कडेवर घेऊन घरी पोहोचवत !
मात्र दसऱ्याला नवी पाटीपेम मिळाली आणि सलग पंधरा दिवस आईने तीवर रेखाटलेली ‘श्री श्री श्री श्री’ शेकडो वेळा गिरवून झाली.
पहिलीत प्रवेश मिळाला लोधी मोहल्ल्यातील वागळ्यांच्या शाळेत. लौले मास्तरांनी अ पासून ज्ञ पर्यंत आणि सर्व बाराखड्या शिकवल्या त्या अजूनही विसरलो नाही मी. ‘सत्रावीचा नि अठ्ठावीसचा पाढा मात्र आजच्यासारखाच तेव्हाही कायम दगा द्यायचाच ! ) असो.
त्या पहिलीच्या वर्गात माझे सहाध्यायी म्हणून पुढे खूप नावारूपास आलेले यशवंत खिरवडकर, अरूण वाघमारे, वनमाली अत्रे वगैरे मित्र माझे खास आवडते, मात्र दांडग्या रविंद्र नाईकला मी नेहमीच घाबरायचो.
दुसरींत बढती मिळता मिळतां वडिलांची ‘गरोठ’ या राजस्थान सीमेनजीकच्या गांवी बदली झाली आणि निव्वळ एकच मराठी सिक्षक असलेल्या सर्कारी हिंदी शाळेत मला नि ताईला बसवले गेले. त्या शाळेत उधळीकर मास्तर हे पहिली ते पाचवी असे पाच वर्ग एकाच लांबड्या गॅलरीत हाकत असत. जाड भिंगाचा चष्मा लावणाऱ्या उधळीकर मास्तरांचे डोळे नेहमीच लालबुंद असत आणि ते नेहमीच रागावलेले भासत. मात्र घरी आम्हाला शिकवणुकीसाठी येऊ लागल्यावर ते आईअण्णांशी चक्क हसून बोलताना पाहून मला नि ताईलाही नेहमीच आश्चर्य वाटायचे. त्या शाळेत एकही मराठी मुलगा नव्हता, फक्त चारपाच मुली ज्यांच्याशी ताईची छान गट्टी जमली होती. सहसा मी घरून आणलेला डबा एकटाच खायचा मात्र ताई मैत्रिणींसोबत तिचा डबा खायची. तिच्या एका मैत्रिणीने आणलेली मेथीची भाजी तिने मला जबरदस्तीने चाखायला लावली नि ती (भाजी) मला चक्क आवडली हो ! ( ती ताईची मैत्रिण ताईपेक्षाही चार वर्षांनी मोठी, म्हणजे माझ्याहून सहा ! असो ! )
पन्नास सालीं अण्णांची बदली शिवपुरी या सुंदर शहरीं बढतीने झाली. ते आता डेप्युटी कलेक्टर झाले होते आणि साहाजिकच आमचेही भाव वधारले होते. तिथल्या हिंदी मीडियम सर्कारी शाळेत सुद्धा एकच मराठी मास्तर होते चितळे आडनावांचे. अतिशय देखणे, हंसतमुख आणि विलक्षण हुषार असे चितळे मास्तरसाहेब देखील पहिली ते पाचवी असे वर्ग एका लहानशा, दहा बाय दहाच्या खोलींत घेत. मराठी विद्यार्थी आम्ही पाचच- ताई, सुधी, मी, विनया देसाई आणि एक दहिभाते नामक मुलगा. सर शिकवायचे तर छानच पण घरी सुद्धा शिकवणुकीला येत तेव्हा दररोज नवनवीन गोष्टी साभिनय सांगत. गोष्टींत कुणाच्या मरणाचा उल्लेख आलाच तर ‘चारी खाने चित्त’ असा शब्दप्रयोग करीत असत ते.
चितळे मास्तरसाहेब अण्णांचीही काही कामें स्वेच्छेने नि आनंदाने करीत. मला आठवतेय की अण्णांनी त्यांना काही तांतडीच्या कामासाठी ग्वालियरला आपल्या बरोबर नेले होते दोन दिवसांसाठी आणि त्यांची जुनीपुराणी सायकल ते ठेवून गेले होते. मात्र त्याच दिवशीं मी त्यांची सायकल तेलपाण्याने स्वच्छ धुवून, ऑयलिंग ग्रीजिंग करून ठेवलेली पाहून त्यांच्या डोळ्यांत आलेले पाणी पाहताच मला धन्यधन्य वाटले हे मात्र खरे हो.
तीन वर्षें शिवपुरीच्या साळेत घालवल्यावर पुन्हा इंदोरला बदली झाली अण्णांची नि पाचवीची परिक्षा न देताच मार्च महिन्यात आम्ही इंदूरला आलो. मे किंवा जून मधे माझी एक दिवसांची लेखी परिक्षा महाराजा शिवाजीराव हायस्कूलच्या उप-प्राचार्यांनी ( नामजोशी सरांनी ) घेऊन मला ‘पाचवी पास’ असा दाखला हातोहात देऊन टाकला. सहावी ते आठवी पूजनीय पांढारकर मास्तरांच्या शुद्ध मराठी शाळेंत, बोझांकेट मार्केट स्थित फायनल स्कूल मधे मोठ्या आनंदांत पार पडले. त्या शाळेंत मी खूप काही शिकलों, फार मोठी पुंजी मिळवली आणि चक्क बुद्धिमान विद्यार्थ्यांत गणला जावू लागलो ( बुद्धिमान पण विलक्षण गबाळा नि आळशी ! ) तिथे उत्तम इंग्रजीचे धडे मिळाले बुचडे सरांकडून, जे स्वत: अतिशय निर्धन आणि दलित समाजातले असूनही त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व भल्याभल्यांना बुचकळ्यांत टाकत असे. नुकतीच यूरोप सफर करून आलेल्या हंडियेकर डॉक्टरांशी ते बराच वेळ इंग्रजींत वार्तालाप करताना पाहून हेडमास्तरांसकट सर्वच अचंभित झालेले मी प्रत्यक्ष पाहिले आहेत.
मराठी भाषा नि त्यातही कवितांची गोडी चौधरी सरांमुळे लागली हे मला कृतज्ञतापूर्वक नमूद केलेच पाहिजे. हिंदी आणि क्रॅफ्टचे शिक्षक दुबे सर ( डुबे जी ! ) छान सोपे हिंदी शिकवीत आणि मी परिक्षेत लिहिलेला लांबलचक निबंध - ‘एक गांव का सफर’ त्यांनी संपूर्ण शाळेसमोर ग्यादरिंग मधे स्वत: मोठ्याने वाचून दाखवीत खूप कौतुकही केलेले छानपैकी स्मरतेंय मला. सायन्स नि गणिताचे दोन्ही सर चांगले असले तरी माझ्या बुद्धीपलीकडचे निघाले दोन्ही विषय ! असो. त्या शाळेत सहाध्यायी असलेले कित्येकजण नंतर आंतरराष्ट्रीय पटलावर चमकत असलेले मला माहीत आहेत.
खरोखर, त्या फायनल स्कूलने मला भरभरून दिले हे निर्विवाद.
नववी दहावी महाराजा शिवाजीराव हायस्कूल मधून बऱ्यापैकी पार पडली आणि अकरावी ऑनवर्ड होळकर कॉलेज वगैरे.. तत्पूर्वी मी कायम हाफ निकरमधे राहिलो, पहिला कुर्ता-पायजामा कॉलेज प्रवेशानंतरच ! कॅन यू बिलीव्ह दॅट ?
रहाळकर
२६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिवस, रिपब्लिक डे ! !