Monday, June 29, 2026
अष्टावक्र गीतासार
अष्टावक्र गीतासार !
परवां माझे धाकट्या बंधूंनी अचानक प्रश्न केला की तुला अष्टावक्र गीतेबद्दल काय माहिती आहे. मी अचंभित झालो कारण परवांच पहाटे मला अष्टावक्र मुनींचे लहानपणी ‘कल्याण’ मासिकात पाहिलेले चित्र आठवले होते. हा एक विलक्षण योगायोग मानून मी लगोलग नेर्लेकर बुक डेपोकडे कूच केले नि हातीं लागले ते पुस्तक घेऊन घरी आलो. त्याच दिवशी संध्याकाळी हेही समजले की श्रीश्री रविशंकर महाराजांनी याचे छान विवेचन केले आहे. पुढेमागे ते हाती आलेच तर त्याचाही परामर्ष नक्कीच घेईन, तथापि आज तरी मला कळले तेवढे सांगून मोकळा होईन म्हणतो !
अष्टावक्र यांना ‘मुनी’ असं संबोधले जाते, म्हणून आधी ऋषी आणि मुनी यांतील पाठभेद समजून घेणे हितावह ठरेल. वसिष्ठ, विश्वामित्र किंवा इतर सर्व सप्तर्षी वगैरे, ऋषी या कॅटेगरींतले तर वेदव्यास नारद तुंबर शुक वगैरे मंडळींना मुनी म्हटले जाते. मुळांत ऋषी म्हणजे सिद्धावस्स्था प्राप्त होण्यासाठी कठोर तपाचरण करणारे तीव्र संवेगी साधक, ज्यांचे षडविकार अद्याप पूर्णत: संपलेले नाहीत, तर ‘मुनी’ म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झालेले सिध्द म्हणून नावलौकिक मिळवलेले ! भूल चूक लेनी देनी ! !
असो.
मुळांत अष्टावक्र मुनींचा उपदेश जनक राजासाठी होता, जे आत्मज्ञान किंवा आत्मबोध होण्यासाठी अतिशय उत्कंठित अवस्थेंत लीन झालेले होते.
आध्यात्मिक क्षेत्रांत तीन निष्ठा महत्त्वाच्या असतात - कर्म, ज्ञान आणि उपासना, तर एक पाश्चात्य मनोवैज्ञानिक नि गहन तर्कशास्त्री कार्ल यंग मनुष्याची दोन प्रकारांत विभागणी करतो - एक बहिर्मुख नि दुसरे अंतर्मुख. बहिर्मुख लोक कर्म नि भक्तीचा सहसा आश्रय घेतात आणि अंतर्मुख मंडळी बहुधा ध्यान धारणा आणि ज्ञान प्राप्तीसाठी अनुकूल असतात. बहिर्मुख व्यक्तीला ज्ञानमार्ग सहजगत्या उमगत नाही तर सहसा बुध्दिवान आणि चैतन्य तत्वाचा परिचय असणारे ज्ञानमार्गाची कास धरतात. कदाचित म्हणूनच सामान्य माणसांच्या जीवनांत अष्टावक्र मुनींचे तत्वज्ञान आणि उपदेश फारसा प्रचलित झालाच नाही.
अष्टावक्र मुनींच्या तत्वज्ञानांत कोणत्याही बाह्य उपचारांची वा सोपस्कारांची आवश्यकता नाही, तर अक्रिय राहून केवळ आत्मबोध म्हणजेच आपण शरीर, मन, बुध्दी अहंकार नसून आपण निव्वळ चैतन्यरूप आत्मतत्व आहोत ही जाण व जाणीव निरंतर प्रस्फुटित राहते.
भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद् गीतेंत ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा समन्वय असला तरी मुख्य भर अर्जुनाला युध्दप्रवण म्हणजेच ‘कर्मा’वर झुकते माप देणारा आहे. खरेतर भगवंताचा उपदेश सर्वसामान्य प्रापंचिकां साठी आहे पण अष्टावक्रांचा उपदेश केवळ मोक्षप्राप्तीच्या मुमुक्षूंसाठी आहे. कदाचित म्हणून सर्वसामान्य माणूस तिकडे ओढला जात नाही, निव्वळ ज्ञानप्राप्तीची (आत्मज्ञान) उत्कंठा असणाऱ्यांसाठी अष्टावक्र मुनींचा उपदेश अभिप्रेत आहे. श्रीकृष्णाप्रमाणे ते अनेक मार्गांचे विवेचन करत नाहीत तर केवळ ‘बोध’ (आत्मबोध) जो अद्वितीय, भावातीत, देश-कालातीत आहे, जो कोणत्याही दृष्टांतांशिवाय तर्कवितर्काच्या पलीकडचा सूत्रबध्द असा अविष्कार आहे. तो निव्वळ ऐकण्या-बोलण्याचा विषय नसून आत्मसात करण्यासाठी आहे हे विसरता कामा नये !
प्रखर वैराग्य अंगीं बाणविणे ही या मार्गाची पहिली पायरी आहे ! वैराग्य, अहंकार-शून्यता हीच ज्ञानप्राप्ती आणि अखेर ‘मुक्ती’ची गुरूकिल्ली, अष्टावक्र गीतेचे सार असल्याचे सर्व सूत्रें पाहिल्यावर आपसूक कळून येईल.
जनक महाराजांनी अष्टावक्र मुनींना विचारलेल्या प्रश्नांचा, शंकांचा संवाद म्हणून ‘जनक-अष्टावक्र-संवाद’ स्वरूपात अष्टावक्र गीता प्रसिध्दीस आली आहे.
जनक राजाला तरी आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी कोणती पात्रता होती याचा विचार केला तर अहंकार-शून्यता, संपूर्ण शरणागत भाव, देहासक्तीचा समूळ अभाव आणि सर्व बाह्योपचारांचा त्याग हीच त्यांच्या ‘पात्रते’ची गमक म्हणायला हवीत.
महर्षी पातंजलींनी चित्तवृत्तींचा निरोध म्हणजेच योग असे सूत्र सांगितले, म्हणजेच निर्विकार असणे, साक्षीभाव जोपासणे असले तरी त्यांत यम-नियमादि सोपस्कार वा विधी नाहीत. खरेतर कोणत्याही ‘क्रियां’ची बंधनेच अधिक छळत राहतात, त्यांत फलाशा आलीच, अपेक्षा नि प्रतिक्रिया तर जणू हातात हात घालून आलेल्या ! इतकेच नव्हे तर अष्टावक्र मुनी ‘समाधी’ ला सुध्दा मुक्तीला बाधा आणणारी असे मानतात ! कारण त्यांचा उपदेश ‘जागरणा’चा आहे, आपल्या स्व-स्वरूपाबद्दल जागरूक राहण्याचा ! ! त्या आत्मचैतन्याचा ‘बोध’ होणे हीच मुळांत मुक्ती होय. विषयांची आसक्ती विषाप्रमाणे त्याज्य झाली की ‘मोक्ष’ हाताशी आला असे मानायला हरकत नाही !
इति शम् ! !
क्रमश:………!
अष्टावक्र गीता - भावार्थ
अष्टावक्र गीता हा राजा जनक आणि महामुनी अष्टावक्र महाराजांमधील प्रश्नोत्तर रूपी सुसंवाद होय. अपेक्षेनुरूप तो साहाजिकच संस्कृत भाषेंत प्रचलित असल्याने तुम्हा आम्हाला किंचित सुलभ करण्याचा मानस आहे. माझे नि संस्कृत भाषेची फारशी घसट नाही, अगदी जुजबी थोडं थोडे पदरीं पडत असले तरी एकूण गोषवारा अंमळ डोक्यात घर करून जातो हेही नसे थोडके. प्रास्ताविकालाच इतके शब्द तुम्हाला कंटाळवाणे वाटू नयेत यास्तव सरळ मुख्य निरूपणाला सुरूवात करूं ! वास्तविक इतकी प्रस्तावना सुध्दा आवश्यक नाही हे पुढील भावांतर वाचताना तुमच्या सहज ध्यानीं येईल. तर तेही असो.
पहिल्या प्रकरणांत अष्टावक्र मुनी ‘विषयांचा त्याग करून चैतन्यमय मुक्त होणे हीच मुक्ती होय ‘ असे प्रतिपादन करतात.
सूत्र क्र. १
‘कथं ज्ञानमवाप्नोति कथं मुक्तिर्भविष्यति /
वैराग्यं च कथं प्राप्तमेतद् ब्रुहि मम प्रभो //
ज्ञानप्राप्ती आणि मुक्तीच्या उद्देशाने जनकराजाने अष्टावक्र मुनींना जिज्ञासेपोटी प्रश्न केला की हे प्रभो, ज्ञान कसे प्राप्त होते, मुक्ती कशाने होते आणि वैराग्य कसे प्राप्त होईल ते कृपया मला सांगाल काय ?
आपण सर्व जाणतोच की ‘ज्ञान’ या शब्दाचा अर्थच मुळांत ‘आत्मज्ञान’ असाच होतो, इतर सर्व ‘विज्ञान’ होय - जे ‘बाहेरून’ आत येते ते, केवळ माहिती किंवा सूचना ! वास्तविक सर्व दृष्य सृष्टी केवळ एकमेव अशा चैतन्य-तत्वाचा अविष्कार आहे, एक प्रकटीकरण ! प्रत्येक पदार्थात, व्यक्तीत सामावलेल्या चैतन्य तत्वाला ‘आत्मा’ असे म्हणतात तर अखिल सृष्टीसह सर्व काही व्यापून असणाऱ्या त्याच चैतन्याला ‘ब्रह्म’ हे नामाभिधान आहे. खरंतर दोहोंत लेशमात्र अंतर नाही, दोन्ही एकच होत हे समजून घेणे हितावह ठरेल. उपनिषदांत असं म्हटलंय की ‘यस्मिन विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति’ अर्थात ज्याला जाणल्याने सर्व काही जाणले जाते, असे ते आत्मवस्तूचे किंवा आत्मतत्वाचे ज्ञान होतांच सर्व बाबींचं ज्ञान आपसूक प्राप्त होत असते.
पचनीं पडायला जरी अवघड वाटले तरी माणसाचे शरीर, मन, बुध्दी नि अहंकार म्हणजेच तो मनुष्य नव्हे हे शेंबड्या पोराला समजावणे फारसे कठीण नाही, केवळ माझा हात माझे डोके माझी अक्कल म्हणजे ‘मी’ नाही एवढी समज त्यालाही देतां येईल की ! केवळ तो ‘आत्मा’ होय हे समजायला मात्र त्याला कदाचित् बरीच पायमल्ली करावी लागेल, अनेक जन्म घ्यावे लागतील हे कटु असले तरी त्रिवार सत्य आहे ! (संवईनुरूप भरपूर विषयांतर झाले खरे, पण श्रोत्यांनी त्याबद्दल क्षमा केली पाहिजे. असो !
आणखी एक गुपित सांगून टाकू का, की अज्ञानी माणूस स्थूल किंवा दृष्य प्रकृतीला किंवा सृष्टीला सहज ओळखू शकतो, जी इंद्रियगोचर असते, मात्र ज्ञानी पुरूष अतिसूक्ष्म अशा चैतन्यालाही ओळखून असतात, जे इंद्रियातीत असते ! (लई भारी नाही ? )
आता साहाजिकच प्रश्न पडेल की हे तथाकथित ज्ञान किंवा आत्मज्ञान होण्यासाठी कुठली अट किंवा पात्रता असली पाहिजे ? मुनी सांगतात की ‘वैराग्य’ - प्रखर वैराग्य हीच ती पहिली पायरी होय. तर मग वैराग्य म्हणजे संसार किंवा प्रपंच त्यागणे, त्या पासून दूर पळणे नसून केवळ त्याची ‘आसक्ती’ सोडणे होय ! सोप्पं आहे, आसक्तीचा त्याग म्हणजे वैराग्य ! ! मुळांत संसाराचे बंधन असे नसतेच मुळी, असते ती निव्वळ त्या मायेची आसक्ती.
मग पुढचा प्रश्न, ही आसक्ती कशामुळे निर्माण होते, नि उत्तर देतात ‘अहंकार’ मूल कारण असल्याचे. बरे, हा अहंकार तरी कधी एकटा असतो काय ? त्याचे सगेसोयरे असतात लोभ, मोह, वासना - जीं त्याला कर्माच्या जाळ्यांत अलगद ओढून घेतात ! वास्तविक या सर्व जंजाळाचे अंतस्थ कारण असते अज्ञान, ज्यामुळे तो या कर्मजंजाळांत गुरफटला जातो. येनकेन प्रकारेण ते घोर अज्ञान किंवा भ्रान्ती दूर सारता आली तर ज्ञानप्राप्ती हातांशी असतेच, मात्र त्यासाठी आधी मनुष्य मुमुक्षु असायला नको काय ? ज्ञानप्राप्ती म्हणजे खिरापत नव्हे, जी कोणतेही देवीदेवता वांटत सुटतील !
या ठिकाणी राजा जनक हा तीव्र संवेगी मुमुक्षु आहे, मुक्तीची अभिलाषा असलेला आणि अष्टावक्र आहेत पूर्ण ज्ञानी पुरूष, जे त्याचे अज्ञान लीलया दूर सारूं शकतात. जनक राजाचे तीन प्रश्नांत खरे तर संपूर्ण आध्यात्माचे सार गुंफलेले आहे.
खरोखर, राजा जनकाला तिहेरी लॉटरी लागलेली आपल्या ध्यानात येईल. एक तर तो मुमुक्षु आहे, ज्ञानप्राप्ती नि मुक्ती हे त्यांचे उद्दिष्ट आहे. दुसरे प्रखर वैराग्यामुळे त्याने ती पात्रता मिळवली आहे आणि तिसरे अष्टावक्रांसारखा ज्ञानी सदगुरू त्यांना लाभला आहे ! आणि यां मुळेच अष्टावक्रांनी तीन संक्षिप्त वाक्यात ज्ञानाचे सारतत्व राजाचे कर्णसंपुष्चांत ओतले आहे !
पुढच्या सूत्रांत मुनिवर्य ‘वैराग्या’चे विवेचन करतील, तेही अवश्य श्रवण करावे ही विनंती !
सूत्र २
‘मुक्तिमिच्छासि चेत्तात विषयान् विषवत्यज ।
श्रमार्जवदयातोषं सत्यं पियूषवद् भज ॥२॥
अष्टावक्र उत्तर देतात - हे जनकराजा, तुला मुक्तिचीच इच्छा असेल तर सर्व विषय विष समजून त्यांचा त्याग कर आणि क्षमा, आर्जव, सरलता, दया, संतोष आणि सत्य यांना अमृत समजून त्यांचा अंगिकार कर.
वास्तविक, विषयांचा त्याग हेच वैराग्याचे रहस्य म्हटले पाहिजे. विषयभोगाची वासना कधीही तृप्त होणारी नाही, उलट ती आगींत तेल ओतण्याचे काम करत राहते. अर्थात केवळ वासनांच्या त्यागाने आत्मज्ञान प्राप्त होत नसले तरी त्यासाठीची ‘पात्रता’ ते मिळवून देते हे नि:संशय.
सर्वच वासनांचे निर्मूलन करणे शक्य नसले तरी त्यांवर नियंत्रण ठेवणे अगदीच अशक्य नाही आणि म्हणूनच स्वामींनी ‘सीलींग ऑन डिझायर्स’ - वासनांवर नियंत्रण ठेवण्याची साधना सांगितली.
सूत्र ३
‘न पृथिवी न जलं नाग्निर्न वायद्यौर्न वा भवान् ।
एषां साक्षिणमात्मार्मं चिद्रूपं विद्धि मुक्तये ॥३॥
‘तू पृथ्वी नाहीस, जल नाहीस, अग्नी वा वायू नाहीस आणि आकाशही नाहीस, तर या सर्वांचा तूं साक्षी आहेस, चैतन्यरूपाने साक्षी आहेस ! ‘
ज्ञान कसे ‘प्राप्त’ होते या जनकराजाच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून आधी त्यासाठीची ‘पात्रता’ कशी निर्माण होईल ते अष्टावक्र मुनी सांगत आहेत आणि म्हणून प्रखर वैराग्य किंवा आसक्तीपासून मुक्ती हा फ़ॉर्म्युला सांगतात. त्या नंतर निजस्वरूप म्हणजे काय त्याचे विवेचन करतात. ते सांगतात की पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले शरीर म्हणजे तू नसून त्यांतील मन, बुध्दी वगैरे शरीरासह तुझे दास आहेत, तू आहेस त्यांचा ‘आत्मा’ नामक सम्राट ! तूं केवळ चैतन्यरूप साक्षी आहेस, हे जाणून घेणे म्हणजेच ज्ञानप्राप्ती होणे आहे.
सूत्र ४
‘यदि देहं पृथक्कृत्य चित्ति विश्राम्य तिष्ठसि /
अधुनैव सुखी शान्त: बंधमुक्तो भविष्यसि. //४//
आपल्याला देहापासून वेगळे करून चैतन्यरूप विश्रांतीचा अनुभव घेतलास तर तूं आत्तांच शांत, बंधमुक्त आणि सुखी होशील.
मुनिश्रेष्ठ सांगतात की वैराग्यामुळे तुला ज्ञानप्राप्तीची पात्रता मिळेल आणि सद्गुरूंकडून तत्वज्ञानाचा बोध झाल्यावर आत्मज्ञानही प्राप्त होईल. तथापि, मुक्तीसाठी निव्वळ आत्मज्ञान पुरेसे नाही. (म्हणजे मीच शुध्द चैतन्यरूप आत्मा आहे, केवळ साक्षी असल्याचा बोध). कारण आत्मबोधा नंतरही शरीराशी तादात्म्य राहिले तर पुनरपि जननम् हे ठरलेले आहे. म्हणजेच मुक्ती नाही !
वास्तविक आत्मज्ञान सविकल्प समाघीत देखील होऊं शकते, मात्र तिथे बीजरूपांत संस्कार दडून राहतात. निर्विकल्प समाधीत ते बीजही नष्ट करता येते आणि तीच मुक्ती होय ! (निर्विकल्प समाधी म्हणजे आपण शुध्द चैतन्यरूप आत्मा आहोत याचे निरंतर भान असणे - संकल्पविकल्प विरहित ! )
आणि म्हणून अष्टावक्र मुनी या सूत्रांत प्रतिपादन करतात की आत्मबोध झाल्यावर देहासक्ती सुटली तरच तू शांत, बंधमुक्त नि सुखी होशील.
खरेतर पातंजल प्रणीत अष्टांग योगात शरीर व आत्मा यांच्यातील सात पडदे किंवा आवरणे असतात ज्यांना एकएक करून दूर सारले की समाधी पर्यंत पोहोचतां येईल. मात्र अष्टावक्र त्या आवरणांना एक भ्रम मानतात, जे निव्वळ आत्मबोधाने नष्ट होऊ शकते. तिथे कोणत्याही ‘क्रिया’ वा ‘कर्तृत्वाची’ गरज नाही. मुळात योगाचे केंद्रस्थानी शरीर आहे आणि स्वत:ला देहापासून भिन्न मानले तर क्षणार्धात आत्मबोध होऊ शकेल, जसे दोरीवरचा सर्पाभास लख्ख प्रकाशात सहज दूर होतो. म्हणजेच जप तप, मंत्र तंत्र, कर्मकांड, हटयोग वगैरे काहीही न करता आत्मबोध होणे शक्य आहे. आणि तसे पाहिले तर ‘मुक्ती’ काही विविक्षित ठिकाणी नसते, केवळ अज्ञान दूर सारताच सर्व बंधने आपोआप गळून पडतात. शिव-गीतेत म्हटले आहे - ‘मोक्ष्यस्य न हि वासीस्ति न ग्राम्यान्तरमेव वा / अज्ञानहृदयग्रन्थि नाशो मोक्ष इति स्मृत: //‘ (मोक्ष दूरवर एखाद्या घरात किंवा गावांत राहात नाही , अज्ञानरूपी ग्रंथीचा नाश हाच मोक्ष होय ! )
म्हणून अष्टावक्र मुनींचा उपदेश असा की जो कोणी आपले आत्मस्वरूप ओळखून देहासक्ती सोडतो तो मुक्त होय.
पुढे…..
सूत्र क्र. ५
‘न त्वं विप्रादिको वर्णो नाश्रमी नाक्षगोचर: /
असंगोsसि निराकारो विश्वसाक्षी सुखी भव //‘
तूं ब्राम्हण किंवा इतर कोणताही अन्य वर्ण (वैश्य, शूद्र वगैरे) नाहीस आणि कुठल्याच आश्रमांचा ‘आश्रमी’ नाहीस. (ब्रह्मचारी, गृहस्थ इत्यादि) . तूं नि:संग, निराकार मात्र साक्षीरूप आत्मा आहेस हे ध्यानांत ठेवून सुखी राहा.
सूत्र ६
‘धर्माsधर्मो सुखं दु:खं मानसानि न ते विभो /
न कर्ताsसि न भोक्ताsसि मुक्त एवासि सर्वदा //‘
हे विभो ! धर्म आणि अधर्म, सुख आणि दु:ख हे मना’चे विषय आहेत, तुझे नाहीत ! तू ना तर कर्ता आहेस ना भोक्ता. तू तर सदैव मुक्तच आहेस.
खरोखर, आत्मा चैतन्य आहे असीम आहे मुक्त असून सर्वत्र व्यापून आहे - यत्र तत्र सर्वत्र ! अर्थात शरीर, मन, बुध्दी यांना मर्यादा आहेत, मात्र तू आत्मा असल्याने व्यापक, नित्यमुक्त, असीम आहेस - इतके समजले तरी बास् ! !
सूत्र ७
‘एको दृष्टीsसि सर्वस्य मुक्तप्रायोsसि सर्वदा /
अयमेव हि ते बन्धो दृष्टारं पश्यसीतरम् //‘
तू सर्वांचा द्रष्टा आहेस, सदैव मुक्त असा. मात्र इतरांना तू द्रष्टा मानतोस हे तुझे अज्ञान तुला बंधनांत अडकवून ठेवते !
या ठिकाणी अष्टावक्र अद्वैताची ओळख करून देतात. द्वैतभावामुळे आत्मा-परमात्मा वेगळे असल्याचे वाटते. प्रत्यक्षात दोन्ही (?) अभिन्न होत, एकमेवाद्वितीय ‘ब्रह्म’ ! तुझ्यातला आत्मा आणि परमात्मा एकच एक असल्याने द्रष्टेपण देखील एकच. मात्र अज्ञानापोटी तू ते द्रष्टेपण सुध्दा भिन्न मानतोस. वास्तविक तूच सर्वांचा द्रष्टा आहेस.
सूत्र ८
‘अहं कर्तेत्यहंमान महाकृष्णाहि दंशित: /
नाहं कर्तेति विश्वासांमृतं पीत्वा सुखी भव. //८//‘
‘मी कर्ता आहे’ या अहंकाररूपी कालसर्पाने तुला दंश केला आहे ; सबब, ‘मी कर्ता नाही’ अशा विश्वासरूपी अमृत-प्राशनाने तू सुखी व्हावे.
वास्तविक ‘देहाहंकार’ हेच सर्व दु:खाचे मूळ कारण असल्याचे सांगत तू स्वत:ला कर्ता मानतोस. ‘मी’ नि ‘माझे’ ही भावना तुला ब्रह्म किंवा चेतनेपासून दूर ठेवते, तथापि मी कर्ता नसून एक उपकरण किंवा साधन आहे असे ‘दृष्टि-परिवर्तन’ होणे आवश्यक आहे.
सूत्र क्र. ९
‘एको विशुद्ध बोधव्योsहमिति निश्चयवन्हिना. /
प्रज्वाल्याज्ञानगहनं वीतशोक: सुखी भव. //‘
“मी एक विशुद्ध बोध, ज्ञानमात्र आहे” अशा निश्चित धारणारूपी अग्नींत आपले घोर अज्ञान जाळून तू शोकरहित आणि सुखी व्हावेस.
खरेतर अज्ञानाला अस्तित्व नाहीच, तेथे केवळ ज्ञानाचा अभाव असे म्हणता येईल. म्हणजेच खरे ज्ञान होईपर्यंतच अज्ञान राहील.
पुढे……..!
आज अचानक श्री रमण महर्षींचे अष्टावक्र गीतेच्या सूत्रांचे भाषांतर, जे मुळात तेलुगु भाषेंत आहे, त्याचा इंग्रजी अनुवाद हातीं आला. जमेल तेवढे मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करतो.
सूत्र-क्र. १०
“ यत्र विश्वमिदं भाति कल्पितं रज्जु सर्पवत् / आनन्द परमातन्द सबोधस्त्वं सुखं चर “ ।।९॥
‘That ( Consciousness ) in which this universe appears, being conceived like a snake in a rope, is Bliss- Supreme Bliss. You are That Consciousness. Be Happy.’
दोरीवर सर्पाचा भास व्हावा तसे हे विश्व त्या महान चैतन्यांत भासते. ते चैतन्य म्हणजे निखळ आनंद होय, केवळ परमानंद ! तूं तेच चैतन्य आहेस, सुखी राहा !
सूत्र क्र. ११
“ मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि ।
किं वदन्तीह सत्येयं या मति: सा गतिर्भवेत् ॥”
( One who considers oneself free is free indeed. And one who considers oneself as bound remains bound. “As one thinks, so one becomes” is a popular saying in this world, which is true. )
ज्याला मुक्तीची ओढ आहे तो मुक्त होतो आणि ज्याला बंधनात राहण्यात मोठेपणा वाटतो तो बंधनात बांधलेला राहतो. ही लोकसमजूत खरीच आहे की जशी मती असेल तशी गती मिळते .
अजून एक सूत्र म्हणते की ‘अंत मति सो गती’ म्हणजे मृत्यूसमयीं जशी मती असेल तशी गती प्राप्त होते.
तथापि अनासक्त राहून कर्म केल्यास माणूस परमपदाला पोहोचतो हे गीतेतही म्हटले आहे. राजा जनक ज्ञानी पुपूष असल्याने आसक्तिरहित कर्म केल्यामुळे त्यांना परमसिद्धी प्राप्त झाली. गीतेंत असेही सांगितले आहे की ‘योग: कर्मसु कौशलम्’ (योग म्हणजे कर्म-कुशलता होय). जो योगबुद्धीने अर्थात सिथ्तप्रज्ञ राहून जो कार्यशील असतो तो मुक्ती मिळवण्यास पात्र होतो.
मुळात कर्म स्वत: बंधनकारक नाही तर कर्म करण्यात जी आसक्ती आहे ती बंधनकारक होते, तशीच फलाची आशा बंधनकारक ठरते. याचाच अर्थ असा की पाप-पुण्य कर्मात नसून आसक्तीत आहे. निष्काम कर्म बंधनकारक नाही. तसेच ज्या कर्मांत रागद्वेश अर्थात ईर्ष्या, बदला घेण्याची भावना नाही ते बंधनकारक नाही. मुळात कर्माचे कारण शरीर नसून मन आहे. मृत्यूनंतर शरीराची सोबत सुटून मन बरोबर जाते आणि त्यांच्यासोबत विचार, वासना, आकांक्षा, इच्छा, अपेक्षा याही जोडल्या जातात. यालाच मती असे म्हणतात. उपनिषदात म्हटले आहे ‘यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी’ ( ज्याची जशी भावना तशी त्याला सिद्धी मिळते.
अखेर पाप-पुण्याचे फळ कर्मात तर नसतेच, कर्मफळातही नसते तर ते कर्म करणाऱ्याच्या भावनेंत असते !
आणि म्हणून अष्टावक्र म्हणतात, ‘मी मुक्त आहे असे तो मानतो तो मुक्त असतो नि जो स्वत:ला बद्ध मानतो तो बद्ध असतो. मुक्ती ही कर्मातून मिळत नसून ते ज्ञानाचे फळ आहे. अगदी आत्मज्ञानीसुद्धा स्वत:ला बद्ध मानील तर तोही मुक्त नाहीच ! ( वास्तविक हे सूत्र आत्मज्ञानी माणसांसाठी आहे, अज्ञानींसाठी नव्हेच ! )
क्रमश:……
रहाळकर
२९ जून २०२६.