Friday, July 24, 2026
अष्टावक्र गीतासार सूत्र क्र. १८,१९,२०
अष्टावक्र गीतासार
सूत्र क्र. १८
“साकारमनृतं विद्धि निराकारं तु निश्चलम् /
एततत्वोपदेशेन न पुनर्भवसम्भव: //१८//“
आत्तां जे साकार दिसतंय् ते मुळात निराकार आहे, तसेच जे निराकार आहे ते शाश्वत, स्थिर आहे हे जाणून घे. या तत्व-उपदेशाचा स्वीकार केल्यावर उत्पत्ती किंवा पुनर्निर्मिती होत नाही.
या सूत्रांत पुनर्जन्माचे जणू रहस्य सांगून गेलेत अष्टावक्र मुनी ! साकार किंवा निराकार, जड वा चैतन्यशील, स्थूल किंवा सूक्ष्म, प्रकृती नि पुरूष किंवा सृष्टी आणि परमात्मा हीं सर्व एकाच चैतन्य-तत्वाची रूपें होत. साकार, जड, स्थूल, प्रकृती किंवा सृष्टी ही सर्व त्या निराकार सूक्ष्मतत्वाची अभिव्यक्ती आहे.
असं म्हटलंय् की ‘मॅटर ॲंड एनर्जी आर इंटरचेंजिएबल’ - हा पाश्चात्य सिद्धान्त वरील विधानाशी सुसंगत असाच आहे. खरंतर अष्टावक्र आग्रहाने सांगतात की ही ‘दिसणारी’ सृष्टी दिसते तशी नाही कारण ती क्षणोक्षणीं बदलत राहणारी आहे, म्हणूनच तिला सत्य किंवा शाश्वत म्हणता येत नाही.
याच तत्वानुसार ‘सुख किंवा दु:ख’ ‘मना’वर अवलंबून असते जे स्वत:च अतिचंचल, अस्थिर असते. एवढेच नव्हे तर आपले शरीर देखील क्षणोक्षणी बदलत राहात असल्याने ते तर अजिबात विश्वासार्ह नाही. तथापि त्यांत असलेले चैतन्य, प्राण किंवा आत्मा शाश्वत असाच आहे कारण तो त्या परब्रह्मस्वरूपाचा एक अंश आहे !
सूत्र क्र. १९
“यथैवादर्शमद्ध्यस्थे रूपेsन्त: परितस्तु स: /
तथैवास्मिच्छरीरेsन्त परित: परमेश्वर: //१९//“
ज्याप्रमाणे आरसा त्याच्यातील प्रतिबिंबस्वरूपात आहे तसाच तो त्या प्रतिबिंबाच्या बाहेरही आहे, अगदी तसाच तो परमात्मा या शरीराच्या आत आणि बाहेरही अस्तित्वात आहे.
वास्तविक सर्व सृष्टीचा नियंता, चालक, मालक असा पपमेश्वर काही एकदेशीय नाही, तो यत्र तत्र सर्वत्र व्यापून आहे. श्रीज्ञानदेव याचे एकाच शब्दात सुरेख वर्णन करतात ‘सबाह्यअभ्यंतरीं’ !
सूत्र क्र. २०
“एकं सर्वगतं व्योम बहिरन्तर्यथा घटे /
नित्यं निरन्तरं ब्रह्म सर्वभूतगणो तथा //२०//“
ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश हे मडक्याच्या आंत आणि बाहेरही व्यापून आहे, तसेच नित्य व निरंतर असे ब्रह्म सर्व भूतमात्रांना व्यापून आहे.
समजा ते मडके फुटले तर आतले आकाश बाहेरच्यांत विलीन होण्यासाठी काही सायास पडतात काय ? अगदी तसेच आत्मतत्वाचे आहे पहा, तेथे ‘शरीरपण’ आड येत नाही ! वास्तविक आत्मा आणि परमात्मा वेगळे नाहीतच, घटांतल्या नि बाहेरच्या आकाशासारखे.
अष्टावक्र मुनींनी हा ‘बोध’ इतक्या सहजपणे नि सोपे दाखले देत सांगितला की जनकराजाला तो सहजगत्या प्राप्त झाला. ( इथे ‘प्राप्त झाला’ हे म्हणणेही धाडसाचे ठरेल कारण त्यांचे ‘पात्रतेमुळे’ तो त्यांचेपाशीं होताच, मुनींनी केवळ शेवाळे दूर सारले एवढेच !
रहाळकर
२४ जुलाय २०२६