Sunday, April 20, 2025
रेसच्या घोड्यांची न संपणारी गोष्ट !
रेसच्या घोड्यांची न संपणारी गोष्ट !
तुमच्या आमच्या बालपणीं आधी आज्जी नि नंतर आई आपल्याला सर्वप्रथम काऊ-चिऊच्या गोष्टी सांगायची. नंतर आई छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप वगैरेंच्या गोष्टी सांगत आपल्यालाही शूरवीर करायचा प्रयत्न करायची. नंतरच्या पिढ्यांना कॉम्प्युटर नि मोबाईल्सची संवय जडली, नव्हे चटक लागली. माझ्या मुलांना उषाच गोष्टी सांगायची कारण मला ते कधी जमलेच नाही. मात्र नाती मागे लागल्या की एकच एक गोष्ट मी त्यांना सांगून भंडावून सोडत असे. ती गोष्ट आज सांगूं म्हटले तरी ती कधीच संपणारी नाही. अगदी ‘कापुसकांड्याची’ नसली तरी तींत वैविध्य असे, तोच तो पणा नव्हे !
काय आहे हो ही कधीच न संपणारी ‘रेसच्या घोड्यांची गोष्ट’ ? असे पहा, मुंबईच्या रेसचा सीझन संपला की बहुतेक त्याच घोड्यांना बॅंगलोरच्या रेसिंग सीझनसाठी रवाना केले जाई. रेसचे घोडे कितीही चपळ असले तरी प्रकृतीने अतिशय नाजूक साजूक ! त्यांना किती जपून हजार मैल लांब कसे न्यावे लागायचे ते माझे मलाच ठाऊक ! कारण त्या काळीं घोड्यांना विमानबंदी असावी. गाई-गुरांना टेम्पो-ट्रक मधून नेणे खूप कॉमन असले तरी घोड्यांना तसे नेणे भलतेच जोखमीचे असे कारण प्रत्येक घोडा किंवा घोडी लाखों रुपयांची. अगदी इन्शूरन्स करूनही ट्रक टेम्पोचा विचारही कुणी करत नसे. मग त्यांच्यासाठी गाद्या-गिरद्या बसवलेल्या स्पेशल व्हॅन्स तयार करण्यांत आल्या. त्यांत घोड्यांना अतिशय हळुवारपणे चढविले जाई. आणि त्या एयर-कंडीशन्ड व्हॅन्स मधून घोड्यांचा दक्षिणेकडील प्रवास सुरू होई. व्हॅनमध्ये त्यांच्या खाण्यापिण्याची छान सोय असली तरी एखादा अडेलतट्टू बाहेरच्या हिरवळीवर चरूं देण्यासाठी हट्ट धरून बसे आणि मग त्या निमित्ताने सर्वच घोड्यांना चरण्यासाठी बाहेर काढले जाई. चरून झाल्यावर बिसलेरीच्या पाण्याने त्यांची तहान भागवली जाई. मधेच दुसऱ्या कुणाला ताजी चंदी नि चण्याचा खुराक घ्यायची सुरसुरी येई नि पुन्हा प्रवासात खंड पडे !
अशा रीतीने मुंबईहून बंगलोरला निघालेले घोडे अजून पुण्याच्या पुढे गेलेच नाहीत. त्यातून अजून कात्रज-घाट ओलांडायचाय आणि म्हणून आमची गोष्ट कधीच न संपनारी आहे ती अशी ! !
मंडळी, इथपर्यंत वाचले असेल तर एव्हाना हातांत झाडू घेऊन तुम्ही माझा पत्ता शोधत याल हे ठाऊक असल्याने आधीच खंबाटकी घाट सर करीन म्हणतो ! बाय बाय् ! !
(हिंदींत एक वाक्प्रचार आहे - ‘यह जरूर लंबी रेस का घोडा है’, मात्र तो मी नव्हे बरे का. )
रहाळकर
२० एप्रिल २०२५