Monday, February 03, 2025
ध्यायतो विषयान्पुंस: ……!
ध्यायतो विषयान्पुस: ……..!
आज स्वाध्याय करण्यासाठी ज्ञानेश्वरी उघडली आणि समोर श्लोक आले दुसऱ्या अध्यायातील बासष्ट नि त्रेसष्ट. वाटले यांवरच थोडेसे चिंतन करावे. तर मग चला माझ्या बरोबर !
“ध्यायतो विशयान्पुंस: संगस्तेषूपजायते । संगात्संजायते काम: कामात्क्रोधोभिजायते ॥६२॥
आणि
“क्रोधाद् भवति संमोह: संमोहात् स्मृतिविभ्रम: ।
स्मृतिभ्रंशाद् बुध्दिनाशो बुध्दिनाशात् प्रणश्यति ॥६३॥”
या दोन श्लोकांवर माऊलींनी केलेले निरूपण आधी पाहूं.
ते सांगतात -
‘जरी हृदयीं विषय स्मरती / तरी निसंगाही आपजे संगती / संगीं प्रगटे मूर्ती / अभिलाषाची // ( मनात विषयांची नुसती आठवण जरी झाली तरी नि:संग झालेल्या म्हणजेच सर्वसंगपरित्याग केलेल्या पुरूषाला देखील विषयांची ओढ लागून ते प्राप्त करण्याची इच्छा होते )
‘जेथ कामु उपजला / तेथ क्रोधु आधीच आला / क्रोधीं असे ठेविला / संमोहु जाणें // (जेव्हा कामना जागृत होते आणि कामनापूर्ती जेव्हा होत नाही त्या वेळीं क्रोध आधीच दबा धरून बसलेला असतो आणि त्या सुप्त क्रोधात भ्रांती देखील दडून असते.)
'संमोहा जालिया व्यक्ती / तरी नाशु पावे स्मृती / चंडावातें आहत / ज्योती जैसी // (ज्याप्रमाणे सोसाट्याचे वाऱ्याने दीप विझून जातो तसे संमोह निर्माण होताच उपदेशात्मक स्मृती नष्ट होत असते)
‘कां अस्तमानें निशी / जैसी सूर्य-तेजातें ग्रासी / तैसी दशा स्मृतिभ्रंशी / प्राणियांसी // (अथवा सूर्यास्ताचे वेळीं येणारी रात्र सूर्यतेजाला गिळून टाकते, अगदी तसेच स्मृतिहीन माणसाची दयनीय अवस्था होते.)
‘मग अज्ञानांध केवळ / तेणें आप्लविजे (बुडणे) सकळ / तेथ बुध्दी होय व्याकुळ / हृदयामाजीं // (अशा वेळीं सर्व ज्ञान मावळून सर्वत्र अज्ञानाचा अंधार तेवढा शिल्लक उरतो आणि म्हणून कोणताही अन्य विचार करता येत नसल्याने बुध्दी अत्यंत व्यग्र होते.)
एक सोपा दृष्टांत देतात माऊली -
‘जैसे जात्यंधा (जन्मत: आंधळा) पळणीं पावे / मग ते काकुळती सैरा धांवे / तैसे बुध्दिसी होती भंवें (भ्रमण) / धनुर्धरा // (एखादा जन्मत:च आंधळा माणूस काही कारणाने जर धावपळीत अडकला तर निरूपायाने तो जसा दीनवाणा सैरावैरा पळत सुटेल, तशी बुध्दीची अवस्था होते.)
‘ऐसा स्मृतिभ्रंश घडे / मग सर्वथा बुध्दी अवघडे (घोटाळते) / तेथ समूळ हें उपडे (नष्ट होते) / ज्ञानजात // (असा स्मृतिभ्रंश होताच बुध्दी गोंधळून जाते आणि मिळवलेले सर्व ज्ञान लोप पावते.)
आतां कळीच्या मुद्यावर येऊन सांगतात की हे अर्जुना,
‘चैतन्याच्या भ्रंशीं / शरीरा दशा जैसी / तैसें पुरूषा बुध्दिनाशीं / होय देखैं //
‘म्हणौनि आइकें अर्जुना / जैसा विस्फुल्लिंग लागे ईंधना / मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना / पुरों शके //
‘तैसें विषयांचे ध्यान / जरी विपायें वाहे मन / तरी येसणें (एवढें) हे पतन / गिंवसीत पावे (शोधीत येते) //
आतां, वरील सर्व ओंव्या वाचल्यावर सायकल स्टॅंडवर उभ्या केलेल्या सायकली पहिलीला जरासा धक्का देताच जशा एकमेकांवर कोलमडतात, तसे निव्वळ विषयांच्या स्मरणाने कसा संगदोष, त्यातून अभिलाषा, मग क्रोध, संमोह, स्मृतिभ्रंश, भ्रांती नि बुध्दीची अगतिकता आणि संपूर्ण अज्ञानावस्था नि ‘प्रणश्य’ निफजते हे समजले तरी मुळात ‘विषयांचे’ स्मरण होणे अगदी स्वाभाविक नाही काय ? थेट बालवयापासून आजतागायत आपण कोणीही विविध विषयांपासून कधीच वेगळे राहिले नसतो. तर मग विषयांची आठवण देखील न राहण्यासाठी कोणते खटाटोप किंवा साधन करायला हवे ? जरा त्रासदायक आणि कठीण वाटत असले तरी कुणी तज्ञ मंडळी यावर मार्गदर्शन करतील काय ?
रहाळकर
३ फेब्रुवारी २०२५