Tuesday, November 12, 2024
मन भावन !
मन-भावन !
एक जुने सुंदर गीत नुकतेच ऐकण्यात आले - ‘बरसे बूंदियां सावन की, सावन की मन भावन की’ - लताजींच्या सुमधुर स्वरांत चिंब भिजलेले. लगेचच पं. अजोय चक्रब्रतींचेही ‘बरसे बदरिया सावन की’ हेही ऐकले आणि त्यांच्या मुलायम गंभीर स्वरांनी मंत्रमुग्ध करून टाकले. विशेषकरून ‘मीरा के प्रभु गिरिधर नागर, आनंद मंगल गावन की’ हा अंतिम चरण तर भावविभोर करून गेला !
मात्र इतके झकास मीरा भजन ऐकताना ‘मन-भावन’ या शब्दाने जणू ठाण मांडले हृदयात आणि त्यावर थोडे चिंतन करावेसे वाटले.
वास्तविक सुरेल गीत नि गंभीर चिंतन यांत परस्पर असा डायरेक्ट संबंध नसला तरी त्या गीतातील एखादा शब्द किंवा निव्वळ आलाप देखील मनाला हिंदोळे देऊ लागतो हा तुमचाही अनुभव असणारच म्हणा.
मन भावन म्हणजे मनाला भावणारे, आवडणारे, रिझवणारे नि सद्गद करणारे. कशामुळे घडते तसे ? जिथे आनंद आणि मांगल्याचे साम्राज्य असेल तिथेच मन रमते ना. कोणतेच मन कष्ट, दु:ख, मनस्ताप नि अपमान सहन करत नाही कारण मुळात ते आनंदस्वरूप, निरीच्छ नि स्वच्छ असते. मात्र बाह्य गोंगाट आणि अस्थिरता त्याला त्यांत गुरफटून टाकते.
एखादा अतिसुंदर देखावा, निसर्गाची मोहक छटा, शिल्पांत दडलेले भाव, चित्रकाराच्या विलक्षण रंगछटा, कवींच्या कल्पनेची झेप नि भरारी, उत्तम साहित्याविष्कार, इतकेच नव्हे तर बालकाचे निरागसपण , युवतींतील सौंदर्य, दानशूर माणसाची दिलदारी वगैरे कोणाचेही मन मोहरून टाकते ना !
हे सर्व मन भावन या सदरात मोडते यात दुमत असण्याचे कारण नाही.
रहाळकर
१२ नोव्हेंबर २०२४.