Sunday, September 29, 2024
नाटक नाटक !
नाटक नाटक !
आज सकाळी सकाळी एका प्रवचन करणाऱ्या व्सक्तीचे शब्द कानांवर पडले आणि ती संथ लय, जाणून बुजून व्यक्त होत असलेला शांत अविर्भाव, किंचित अतिरेकी वाटावी अशी विनम्रता आणि भगवंताचे नाव घेताना दाटून येत असलेला उमाळा ऐकून त्यावर जरासे चिंतन करावेसे वाटले. अर्थात अशा स्वरूपाची अनेक उद्बोधनें याआधी कानांवर पडली असली तरी आजच्या या प्रवचनाने त्या विशिष्ट ‘स्टाईल’ किंवा लहैज्याने आतून एक वेगळाच विचार उफाळून आला नि तो असा की खरंच का हो असे प्रवचनकार आपले दैनंदिन जीवन तसे जगत असतील ?
सर्वप्रथम आठवले स्वामी माघवनाथ, ज्यांची प्रवचनें आम्हाल सलग पाच वर्षे दररोज ऐकतां आली. त्यांचे व्यक्तिगत जीवन देखील जवळून पाहण्याचा अनुभव आला तसेच त्यांचा अमाप लोकसंग्रह सुध्दा. त्यांचे विषयीं मनात तसूभरही किंतु-परंतु नाही. खरोखरच ऋषितुल्य दैनंदिन जीवन होते त्यांचे.
जे कधीही ‘आस्तिक’ म्हणून ओळखले गेले नाहीत मात्र जीवन - वैयक्तिक नि पारलौकिक देखील- खरेखुरे आध्यात्मित जीवन जगले ते होते एस् एम् जोशी, ना ग गोरे प्रभृति ऋषितुल्य मंडळी. त्यांनी कधीही पारमार्थिक प्रवचने वगैरे केली नसली तरी त्यांनी मानवी मूल्यांशी प्रतारणा केली नसावी असे माझे प्रांजळ मत आहे, आणि म्हणून त्या अर्थी ते निश्चितच आध्यात्मिक किंवा आस्तिक होते.
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची अनेकानेक उद्बोधने ऐकायला मिळाली मला. केवळ शब्दप्रभूच नव्हे तर खोलवर दडून बसलेला त्यांच्यातील संत कधीच लपून राहिला नाही.
आमच्या इंदूरचे प्रा. प्र गो घाटे तशाच पठडीतले. त्यांचेही वैयक्तिक जीवन आदर्श असेच होते. म्हणजेच ‘कथनी नि करनी’ यांत या मंडळींत कधीही गोंघळ झाल्याचे निदान माझ्या ऐकीवात नाही.
मात्र याच्या अगदी उलट अशाही काही व्यक्ती नजरेपुढे येतात ज्यांच्या बोलण्यात नि वर्तनात काडीभरही एकवाक्यता नाही. अशांनाच तर ‘भोंदू’ म्हणतात ना ! अर्थात ते ‘नाटक’ नाटकापुरतेच मर्यादित राहते म्हणा ! !
रहाळकर
२९ सप्टेंबर २०२४.