Saturday, May 28, 2022

 

क्या पाया, क्या खोया …..!

 क्या पाया, क्या खोया……!

 या जिन्दगानींत मी काय मिळवलं नि काय काय हरवून बसलो याचा लेखाजोखा घेताना खूप मझा येतो आणि आपण आपल्यांत गुम होऊन  जातो. कधीमधी बरा असतो असा विरंगुळा कारण आला दिवस मागे ढकलण्याच्या नादांत बऱ्यापैकी थकावट जाणवते आतांशा. या आधी असे क्वचित घडत असे ; उद्याचेच नव्हे तर पुढचे दोनतीन तास मला काय करायचंय याचे प्लॅनिंग मनांत तयार असे नि बहुतेक वेळी त्याचे कार्यान्वयन होत असे. हल्ली हल्ली मात्र खूप काही करत राहावे असे वाटेनासे झाले असले तरी स्वत:च्या मनांत दडलेला मनोवैज्ञानिक म्हणतो की असे वागणे बरे नव्हे. यू मस्ट कीप युवरसेल्फ बेटर ऑक्युपाईड


तर लेखाजोखा ! या जिन्दगींत तर खूप काही कमावलं भैय्या आपण . मुळात उत्तम कुटुंब, आईवडील, सगेसोयरे, मित्र परिवार, पत्नी, मुलें, जांवई नि नातवंडें अगदी छानच गावली. नशीब देखील छानच म्हटले पाहिजे. कर्तृत्व थोडेफार जमले असले तरी दैव साथ देत गेले, संधी मिळत गेल्या, बहुतांश वेळी त्यांना योग्य तो सन्मानही मिळाला. यशापयश एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने मूळ नाणें कायम हातीं राहिले

उत्तम संस्कारांबरोबरच उत्तमातले उत्तम असे वैद्यकीय शिक्षण तर मिळालेच पण त्या वैद्यकीय शिक्षणाने माणसाच्या अगतिकतेचे, वेदनेचे, आशा-निराशेचे द्वंद्व तसेच विलक्षण इच्छाशक्तीचे मनोज्ञ दर्शन घडत गेले. कित्येक प्रसंगीं अशक्य वाटणारे शक्य झालेले पाहून कृतार्थ वाटले तर सहजसाध्य भासणारे नकळत हुलकावणी देणारे विदारक सत्य देखील अनेक वेळी  प्रत्ययास आले

बालपणी अत्यंत आळशी, कामचुकार, गुळाचा गणपती असलेला पाहता पाहतां पौगंडावस्थेत चक्क शारीरिक नि बौध्दिक कसरतीच्या मागे लागलों ! होय, आता माझाच विश्वास बसणार नाही इतका व्यायाम केला, भरपूर वाचन घडले नि ते सुध्दाहट् केकॅटेगरीतले, जसे निबंध, उत्कृष्ठ काव्य, राजकीय नि सामाजिक तत्वज्ञान वगैरे. अर्थात थोड्याफार प्रमाणात कथा कादंबरी, रहस्यकथा आणिपिवळ्यापुस्तिका पण

आध्यात्मिक ग्रंथांची नि साहित्याची गोडी खूप खूप उशीरा लागली, जवळ जवळ सत्तरी नंतर ! ! तथापि आता या घडीला तेच माझे सर्वोत्कृष्ठ मित्र नि सांगाती आहेत एवढे मात्र खरे

वाडवडिलांची पुण्याई नि परमेश्वर कृपेने आता सर्व बाबतींत स्थैर्य आले आहे, मी कृतार्थ आहे - कृतज्ञ आहे. म्हणूनच माझे कोणाकडे, अगदी ईश्वराकडेही, काहीच मागणे नाही. जे काही मिळाले नि मिळतेंय त्यात मी पूर्ण समाधानी आहे, संतुष्ट आहे


काय काय गमावले विचारतांय् ? कशाला हवा आता तो विचार, रात गई सो बात गई हेच खरे, इतका छान सूर जुळून आल्यावर आता बेसूर काय म्हणून व्हावे ? सबब पूर्ण विश्राम

रहाळकर

२८ मई २०२२


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?