गुरूत्वाकर्षण आणि मी !
झाडावरून सफरचंद खाली पडताना पाहून न्यूटन ला प्रश्न पडला. अगदी तसाच कोकणात नानामामा गेला असताना जमीनीतले पाणी शुध्द, निर्जंतुक होऊन उंच उंच माडाच्या झाडाला लटकलेल्या नारळात कसे चढते, असा काहीसा वेडगळ भासणारा प्रश्न त्याचेही मनांत उद् भवला होता ! वास्तविक दोघांचेही प्रश्न वेडगळ नाहीत हे लवकरच जगापुढे आले.
खरेतर अतिशय शाहाणे असलेले आपण असल्या विचित्र प्रश्नांना काय म्हणून सामोरे जात नाही ? तसलेच प्रश्न आपल्यालाही का पडत नाहीत ? त्याचे कारण आपण आजवर आजूबाजूच्या घडामोडी ‘टेकन फ़ॉर ग्रॅन्टेड’ अशा पध्दतीने पाहात आलो आहोंत (न्याहाळत नाही असे मुद्दाम म्हटले नाही कारण त्यांत प्रश्न अनुस्यूत आहे ! -आहे की नाही भाषा लालित्य ! ) असो.
मला या निमित्ताने माझ्यासाठी अत्यंत गहन असा सिध्दान्त जगापुढे म्हणजेच तुमच्या पुढे (माझे जग तुमच्यापुरतेच सीमित आहे ) मांडायचा आहे.
असे पहा, पृथ्वीच्या केन्द्रस्थानी गुरूत्वाकर्षण नामक महाशक्ती स्थिरावली असून पृथ्वीच्या परीघातील सर्व पदार्थ ती आपल्याकडे खेचून घेते त्या त्या वस्तूच्या ‘घनते’ प्रमाणे. (परीघ, त्रिज्या, घनता, टॅन्जेन्ट वगैरे शब्दांनी निदान मला तरी सहावी सातवींत हुडहुडी भरवलेली असे, पण तुमचे तसे नाही असे गृहित धरून पुढची कथा सांगूं !
मुळांत याला ‘गुरुत्वा’कर्षण का म्हटले ? गुरू म्हणजे ज्येष्ठ, गुरू म्हणजे श्रेष्ठ वगैरे वगैरे. अगदी तसेच आकाशात, नव्हे, अवकाशात तशीच शक्ती विद्यमान असली पाहिजे जी सूर्य चंद्र नक्षत्रें तारे वगैरेंना त्यांचे त्यांचे आंतरिक गुरूत्वाकर्षणाने अवकाशात स्थिर ठेवते, जरी ते आपल्या नि इतरां भोंवती अव्याहतपणे फिरत असले तरी ! ही अवकाशातील शक्ती कुठे स्थिरावली असेल ?
स्वामींनी एकदा ‘अल्लाह’ चा अर्थ ‘ऑल हाय’ असा सांगितला होता, पूर्णत: निर्गुण निराकार ! मग तो ‘अल्लाह’ नामक शक्तिस्त्रोत कुठे, कसा असेल ?
तेही असू देत. मला माहीत आहे ‘वेदान्त’ जाणणारी किंवा जाणू पाहणारी मंडळी सरसावून पुढे येतील आणि ‘सर्वम् इदम् ब्रह्मम्’ वगैरे कठीण शब्दांचा आपल्यावर भडिमार करतील. (माझे तसे नाही. एकतर मी त्या भानगडींत फारसा पडत नाही. मला नि इतरांना सहज समजेल असे शब्द नि शब्दार्थ मला अधिक भावतात. तुमचेही तसेच ना ? )
तर मूळ प्रश्न बाजूलाच पडतोय् अजूनही. ते ‘कर्षण’ किंवा आकर्षण याच्या उलट काही दूर सारणारी शक्ती सुध्दा अस्तित्वात असेल काय ! फिजिक्स मध्ये नाही का एक वाक्य - लाईक फोर्सेस ॲट्रॅक्च इच अदर ॲण्ड अनलाइक रिप्पेल ‘ (किंवा ‘व्हाईस व्हर्सा) ! तर मग ही ‘रिप्पेल्लिंग’ पॉवर कोणती ?
(कधी पडलेत तुम्हाला असले प्रश्न ? )
पहा जमलं तर नि वेळ असेल तर ! !
# posted by prabhurahalkar.blogspot.com @ 5:55 AM
0 comments

अमृतानुफव - पुष्प बारावें
पुष्प बारावें
ओंवी क्र. दहा
‘जेणें देवें संपूर्ण देवी / जियेवीण काही ना तोगोसावी / किंबहुना येकोपजीवी / येकयेकांची//१०//‘
(गोसावी = स्वामी) (येकोपजीवीं = एकमेकांसापेक्ष )
शिवाच्या सत्तेवरच शक्तीला पूर्णत्व येते. मात्रनवल असे की शक्तिमुळेच शिवालास्वामीपणाचा मोठेपणा प्राप्त झाला आहे !म्हणूनच शिवशक्ती एकमेकांच्या आधारानेएकत्र नांदतात.
‘ज्या शिवामुळे प्रकृतीला प्रकृतिपण आहे तसेचशिवाचे शिवपण देखील प्रकृतिमुळेच आहे.प्रकृतीचे नामोनिशाण नसते तर शिवालाशिवपण येणे शक्य नव्हते, जसे सूर्याचे तेजत्याचे सूर्यपण टिकवते ! दोघांचे अस्तित्वएकमेकां मुळेच आहे, एकाचा नाश झाला तरदुसऱ्याचा होणारच.
म्हणजेच हीं पुरूष-प्रकृती परस्पर सापेक्ष होत.गूळ आणि गोडीचे जे नातें तेच या दोघांतआहे.
असे पहा, गोडव्याचे वर्णन करायला आधीकडवटपण काय ते माहीत हवे, किंवा प्रकाशदाखवण्यासाठी आधी अंधार तर हवाच ना !शहाणपणासाठी आधी वेडाचे अधिष्ठान असलेपाहिजे की ! किंवा, वेड शोधू म्हटले तर त्यालाशहाणपणाचे अधिष्ठान नको काय ? (थोडावात्रटपणा ! )
म्हणूनच पुरूष म्हटला की तिथे प्रकृतीअसणारच, कारण तीं एकमेकांचे ‘उपजिव्य’होत.
ओंवी क्र. अकरा
‘कैसा मेळु आला गोडिये / दोघें न माती जगींइये / कीं परमाणुही माजी उवायें / मांडिलीआहाती //११॥’
(मेळु = संयोग ; माती = मावणे ; उवायें =आनंदाने )
‘या दोघांच्या परस्पर प्रेमाचे कसे वर्णन करावे !त्याच्या व्यापकतेला त्रैलोक्यही अपुरे पडेल,मात्र परमाणूतही तीं दोघे आनंदाने नांदतअसतात.’
या ठिकाणी वस्त्राची उपमा सार्थ ठरेल. वस्त्रकितीही लहान किंवा मोठे असले तरी त्यांतएकच एक धागा आढळेल, तसे आहे यांचेपरस्पर प्रेम !
स्वामी स्वरूपानंद म्हणतात -
ह्यांचिया प्रीतीचा, असा काही मेळ, नटोनीकेवळ, जगद् रूपें ।
अणुअणूमाजीं, जरी ओतप्रोत, तरी उर्वरीत,राहती च ॥
ओंवी क्र. बारा
‘जिहीं येकयेकावीण / न कीजे तृणाचेहीनिर्माण / जियें दोघें जिऊप्राण / जिया दोघां //१२//‘
‘एकमेकंचया मदती शिवाय ही दोघे गवताचीकाडीही निर्माण करू शकत नाहीत, तींएकेकांची जीवप्राण होत.’
स्वामी म्हणतात -
‘ज्ञानवृत्तिरूप, शिवशक्तिविण, न हो निर्माण,तृण ते ही ।
दोघे एकमेकां, होती जीवप्राण, स्व-रूपींअभिन्न, राहोनयां ॥’
ओंवी क्र. तेरा
‘घरवातें मोटकीं दोघें / जैं गोसावी सेजे रिघे /तैं दांपत्यपणे जागे / स्वामिनी जे //‘
घरादारांत मोजकी ही दोघेच आहेत आणि पतीजेव्हा झोपी जातो त्यावेळेस ती एकटी जागीअसते. - या वाक्याचा मतितार्थ असा कीअखिल ब्रह्मांड या दोघांनीच व्यापलेले आहे.मात्र पती शिव जेव्हा झोपलेला असतो, अर्थात्अक्रिय असतो, त्या वेळेस देवी प्रकृतीच सर्वऐहिक आणि पारमार्थिक विस्तार जागी राहूनसांभाळते आणि परस्पर दांपत्यभाव निभवावते!
श्री दासगणू असे वर्णन करतात -
ही पुरूष-प्रकृती निर्घारीं । दोघेंच दोघें नांदतीघरीं । वडील धाकुटें कोणी दुसरी । कांही नसेते ठायां ॥ कुणाच्या लाजेची । भीती नसे तेथसाची । गाठ प्रकृति-पुरूषाची । कोणत्याहीअवस्थेंत ॥ पुरूष येतां सेजेस । वरी प्रकृतीजागृतीस । पती होतां निद्रावश । पत्नी जागीचपाहिजे ॥ तरीच ती पतिव्रता ॥ नातरी अवघेंवृथा । हे जाणूनियां चित्ता । जागी राहे प्रकृती॥
शिवाचे येणें शेजेकारण । तेच त्याचें तिरोधान। म्हणून प्रकृतीचे जागेपण । येत आहेअविर्भावा ॥ एक जेव्हा झांकते । तेव्हांचि दुसरेउदयास येते । पहा बहुरूप्याच्या सोंगातें ।विचार करून मानसीं ।।
असो जगत् शब्दें जे भासत । तेच प्रकृतीचेजागृतरूप । हे आणुनि ध्यानांत । विचार याचाकरावा ॥ ‘
क्रमश
# posted by prabhurahalkar.blogspot.com @ 12:46 PM
0 comments

‘त्यागार्थ बोलिजेल काही ! ! ‘
आज उषाने मला पूजनीय गुलाबराव महाराजांचा एक दृष्टांत सांगितला. कोणी पांगारकर नावाचे सद् गृहस्थ विठ्ठल प्रतिमेचे पंचामृत पूजन करीत होते. दुसऱ्या खोलींत महाराज बसले होते ते अचानक पूजास्थानी आले नि म्हणाले की अहो प्रतिमेला हलक्या हातांनी स्नान घाला, तुमच्या जोरात मर्दनाने आणि अंगठीमुळे मूर्तीवर पहा कसे ओरखडे आलेत, रक्तबंबाळ झाली आहे ती ! पांगारकरांनी मागे वळून प्रज्ञाचक्षु महाराजांकडे पाहिले आणि ते अचंभित झाले - गुलाबराव महाराजांचे अंगावर ओरखडे उठले होते नि काही ठिकाणी रक्तही आलेले होते. भक्त नि परमेश्वराचे ऐक्य तर त्यांनी दाखविलेच, पण माझ्या मनांत विचारांचे रान पेटवून दिले.
असे पहा, आपण कळत न कळत इतरांना किती सहज दुखावून जातो नाही ? प्रत्यक्ष नसले तरी अपरोक्ष किती तरी वेळा आपण दुसऱ्यां विषयीं विनाकारण बोलतो, त्यांची निंदा केली नाही तरी त्यांचेतील अवगुण किंवा दोष बोलून मोकळे होतो ! आपल्याला इतरांचे दोष दाखवण्यांत किंवा बोलून दाखविण्यांत इतका रस का असतो ?
मागे कधीतरी ‘अपैशून्य’ नि ‘पैशुन’ वर आपण चर्चा केली आहे. परनिंदा न करणे या सद् गुणाला अपैशून्य म्हणतात आणि त्यावर माऊलींनी बरेच काही सांगितले असले आणि त्यावर भरपूर चर्चा आपण करत असलों, तरी आपल्यातील किती जण त्याचे प्रत्यक्ष आचरण करतात ? माझ्या पासूनच सुरूवात करायची तर मी म्हणेन की मला तें अद्याप साध्य झालेले नाही. मुळांत मला इतरांतील दोष दिसतात कारण ते माझ्यात भरपूर प्रमाणात आहेत ! ते दोष मुळातून गेले तर मला इतरांतील केवळ दोष न दिसतां त्यांचे गुण अधिक प्रकर्षांने जाणवतील आणि मी फक्त गुणांचेच गुणगान करीन !
अवघड आहे ते, हे खरे असले तरी वरील दृष्टांत ऐकल्यावर तरी मी त्या दृष्टीने काही पाउलें टाकीन. ‘काया-वाचा-मनेन’ असे आपण सहज बोलून जातो, मात्र वाचा नि मन यांवर नियंत्रण ठेवत नाही. आधी वाचेवर नियंत्रण आणले तरच मनाला लगाम घालता येईल !
पहा कितपत साध्य होईल ते, पण इतरांचे दोषांची वाच्यता तरी नक्कीच टाळतां येईल ना ? खरेतर तोच आध्यात्मिक प्रगतीचा राजमार्ग म्हणता येईल !
आज कोणतेही प्रवचन देण्याचा हेतु नव्हता, केवळ एक लहानसा दृष्टांत ऐकून जे काही मनांत खदखदत होते खूप दिसांपासून ते उतरून काढले एवढेच ! क्षमाप्रार्थी हूं मै ! !
# posted by prabhurahalkar.blogspot.com @ 5:06 AM
0 comments
