Tuesday, March 17, 2026
थोडक्यात पण महत्वाचे !
थोडक्यात पण महत्वाचे !
इसवी सन एकोणीसशे ऐंशी ते नव्वद दरम्यान मला सलग दहा वर्षें श्रीसत्यसाई संघटनेच्या पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने कार्यरत राहण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणांप्रमाणेच सत्यसाई सेवा संघटना प्रचार-प्रसारात कधीच गुंतून राहिली नाही. अर्थातच नवीन ‘भक्त’ तयार करण्याची जबाबदारी नव्हती. केवळ आपल्या सेवेच्या माध्यमातून आणि स्वामी ज्यांना निवडत असेच नवीन स्त्रीपुरूष संघटनेत दाखल होत गेले. त्या सर्व भक्तांची एकत्र मोट बांधून विविध सेवाकार्यें पूर्व नियोजनासह हाती घेणे आणि कार्यान्वित करणे एवढीच जबाबदारी होती. साहाजिकच सदस्यांच्या वेळोवेळी बैठका आणि अभ्यास-शिबिरें आयोजित केली जात. मात्र मी मूळचा मुखदुर्बळ असल्याने तेव्हाही माझे निवेदन लिखित स्वरूपात सांगत असे. तथापि एका राज्यव्यापी चिंतन शिबिरात एक लेख सादर केला होता कारण त्या बैठकीत कित्येक नवीन सदस्यांचा भरणा अधिक होता आणि म्हणून मला अगदी मूलभूत मुद्दे मांडणे अनिवार्य होते.
आज तुमच्या सोयीसाठी ते पाठवीत आहे, सवडीनुसार अवश्य ग्रहण करावे ही विज्ञापना !
“श्रीसत्यसाईबाबा हे युगावतार आहेत, एक महान विभूती आहेत याची जाणीव आपण सर्वांना आहे. स्वामींचे समग्र जीवन आणि अवतार-कार्य यांचा सर्वंकष मागोवा घ्यायचा झाला तर ते कार्य फार प्रचंड होईल आणि तुम्हा-आम्हा सेवकांना पूर्ण आकलन व्हायलाही अवघड जाईल. तथापि आपण स्वत: श्रीसत्यसाईंचे भक्त, नव्हे साईसेवक म्हणून समाजात वावरताना आपल्या स्वत:च्या जबाबदाऱ्या काय आहेत, आत्मोन्नतीसाठी आपल्याला काय करायला हवे, स्वामीकार्यांत आपला अल्प का होईना कितपत उपयुक्त सहभाग असू शकतो अशा विचारांनी प्रेरित होऊन हे मुक्त चिंतन करण्याचे धारिष्ट्य आहे !
खरंतर व्यक्किव्यक्तीं मघील प्रवृत्तींपासून निवृत्तीमार्गावर आणण्याचे सामर्थ्य स्वामींजवळ आहे. अत्यंत चंचल, अचपळ असे जे मन, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र ते शिकवतात. आपल्या दुर्वासना काढून एकूणच वासनांवर नियंत्रण घालायला शिकवतात, मनापासून त्याग करायला शिकवतात, परोपकार करण्यावर भर देतात, सेवेला प्राधान्य देतात. मात्र सर्वोच्च भर प्रेमावर, प्रेममय जीवन जगण्यावर देतात. मानवाच्या दिव्यत्वाची प्रचीती घ्यायला उद्युक्त करतात !
अशा प्रकारे संपूर्ण समाजजीवन नैतिक अनुष्ठानावर, वेदउपनिषदांतील मूल्यांवर पुन्हा प्रस्थापित करण्याचे अवतारकार्य ते करीत आहेत. प्रत्यक्ष भेटींत, वार्तालापांतून, प्रवचनांतून, लिखाणांतून, स्वप्नांत मार्गदर्शनांतून करतानाही हे कार्य अव्याहत चालू आहे. माणूस ‘घडविण्याचं’ हे कार्य सिद्धीस नेण्याचा त्यांचा दृढ संकल्प आहे. अनेक ‘चमत्कार’ देखील घडत राहतात आणि ते केवळ त्यांच्या दिव्यत्वाची प्रचीती देण्यासाठी होतात, श्रद्धा बळकट होण्यासाठी असतात - प्रदर्शनासाठी नाहीत एवढे नीट समजून घेणे पुरेसे आहे.
वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीं ‘मी शिरडीला देह ठेवताना दिलेले वचन - आठ वर्षांनी पुन्हा अवतारित होऊन माझे उर्वरित कार्य पूर्ण करण्याचे’ पाळण्यासाठी मी पुन्हा आलो आहे, या सत्यसाईची माझे भक्त नि कार्य वाट पाहात आहेत’ असे जाहीर करणारे स्वामी आज कोटिकोटी भक्तांच्या हृदयांत वास करीत आहेत.
अशा भक्तांनी एकत्र येऊन ‘श्रीसत्यसाई सेवा संघटना’ स्थापन केली, तिला आता पंचवीस वर्षें होत आलीत. केवळ भारतातच नव्हे तर जगातील कानाकोपऱ्यातील एकशेवीस देशांत संघटनेचे कार्य जोमात सुरू आहे. या कार्याचा, स्वामींच्या महान दैवी संकल्पाचा केवळ एक लहानसा भाग म्हणून संघटनेच्या कार्य-व्याप्तीचा आलेख काढूंया, तद्वारा आपण अधिक समंजसपणे, अघिक प्रयत्नपूर्वक, अघिक निष्ठेने स्वामींच्या सिद्धसंकल्पास पूरक असे वातावरण निर्माण करू, स्वामींचे सेवक म्हणून स्वाभिमानाने समाजात आपले आचरण राहील आणि आपल्या आचरणाद्वारें समाज आपल्या परमोच्च सद्गुरूंना, आपल्या ‘मालिक’ला ओळखू शकेल !
संघटनेच्या कार्यपद्धतीची रूपरेषा सांगण्याआधी आपल्यातील प्रत्येकाला जे प्रश्न पडतात किंवा विचारले जातात त्यांचा प्रथम परामर्ष घेऊया. यांतील संभाव्य प्रश्ने आणि त्यांचे निराकरण कसे असावे याचाही विचार करणे अगत्याचे आहे. उदाहरणार्थ- जर मी सत्यसाईंचा भक्त झालो तर मला काय करायला हवे ? उत्तर सोपे आहे. असे पहा, स्वामी प्रेममूर्ती असल्याने आपला व्यवहार प्रेममयच असला पाहिजे. येशू म्हणाले त्याप्रमाणे ‘जसे मी तुमच्यावर प्रेम करतो तसेच तुम्हीही इतरांवर करा’ ! खरंतर ‘सेवा’ म्हणजे चालतेबोलते प्रेम नव्हे काय !
दुसरा एक संभाव्य प्रश्न- ‘मानव देहांत दैवी अवतार’ या संकल्पनेवर माझा विश्वास नसेल तर ? साईबाबांची ‘देव’ म्हणून पूजा करण्याची आवश्यकता नाहीच मुळी ! त्यांनी स्वत:च म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमचा धर्म किंवा इष्टदैवत ‘बदलण्याची’ अजिबात गरज नाही. ज्यांना स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचीती येते ते स्वामींनाही पूजनीय मानतात. स्वामी म्हणालेत की मानव देहांत दैवी अवतार होतो ते एवढेच सिद्ध करण्यासाठी की मानव हा ईश्वर-रूपच आहे, ईश्वररूप होणे प्राप्य आहे. मानवी मन हे निर्गुण निराकार तत्वाला गंवसणी घालूं शकत नाही कारण परब्रह्म शब्दातीत आहे, मानव बुद्धीच्या आवाक्या बाहेरचं !
‘इतरांतील दोष शोधण्यापेक्षा स्वत:तील दोष ओळखा, त्यांचे समूळ उच्चाटन करा. इतरांमधील शेकडो दोष शोधण्याऐवजी स्वत:तील एक जरी काढला तरी पुरे’ !
हे सत्यसाईबाबा कोण आहेत ? ते दक्षिण भारतातील बंगळूरनजिक पुट्टपर्थीला राहतात. ते परमेश्वराचा मानवी अवतार असल्याचे मानले जाते . भगवन्त म्हणालेत, ‘साधूसज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या संहारासाठी आणि नितिधर्माच्या पुनरूत्थानासाठी मी युगायुगीं अवतार घेतो’ ! असा हा भगवन्त मानवी रूप एवढ्यासाठी धारण करतो की त्यामुळे समस्त मानवजातीला तो आपल्यातीलच एक वाटतो, मात्र त्याच वेळी अतिमानवी अशा उंचीवर जातो ज्यायोगें मानवाला त्या अत्त्युच्च शिखरावर पोहोचण्याची ऊर्मी उत्पन्न व्हावी आणि अंतत: तें स्थान त्यानेही प्राप्त करून घ्यावे ! प्रत्येकाच्या अंतर्यामी परमेश्वर वास करीत असतो हे पटवून देण्याच्या ईर्षेनेच तो मानवी रूप धारण करीत असतो.”
साईबाबांच्या शिकवणुकीचा गाभा कोणता ? १) परमेश्वराच्या अस्तित्वावर नितान्त श्रद्धा,, २) आपण अंगिकारलेल्या धर्मातील शिकवणुकींचे परिपालन, ३) सत्य, प्रेम, शांती, अहिंसा आणि सदाचरणाचे पपिशीलन, ४) रूग्ण, दरिद्री, गरजू अशा व्यक्तींची नि:स्वार्थ सेवा ; आंधळे, बहिरे, मुके, अपंग यांची सेवा- एक साघना म्हणून ! ५) अन्नदान आणि नारायण-सेवा म्हणजे गरजू भुकेल्यांची अन्नाद्वारें सेवा ६) परमेश्वराचे अहर्निश चिंतन व नामस्मरण, प्रत्येक श्वासोच्छासा बरोबर.
सर्व काही परमेश्वर-स्वरूप मानून सर्वांवर प्रेम करा, शक्य ती सेवा करा मात्र कुणालाही दुखवू नका कारण कर्मकांडापेक्षा ते अघिक महत्वाचे आहे. सेवा म्हणजे व्यक्त प्रेम.
बाबा चमत्कार करतात हे खरे आहे काय ? होय, आणि ते लक्षावधी लोकांनी प्रत्यक्ष पाहिले आहेत. मात्र त्यांचा सर्वात मोठा आणि अचुक चमत्कार म्हणजे माणसाचं हृदय आणि मन यांत आमुलाग्र परिवर्तन ! ते म्हणतात, ‘तुम्ही स्वत: पहिला चमत्कार घडवू शकतां नि तो म्हणजे स्वत:चे दोष शोधून काढणे आणि इतरांतील सद्गुण’ ! !
बाबा स्वत:बद्दल काय म्हणतात ? त्यांचे काही उद्गार आपण आत्ताच वाचलेत पण अजून बरेच सांगतां येतील. ‘मी साईबाबा या नावाने अवतार घेतला असला तरी ईश्वराच्या इतर नावांना किंवा रूपांना मी अजिबात कमी लेखत नाही. एक अघिक महत्वाचा नि दुसरा कमी मानत नाही . तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेची आराधना करीत राहायला हवी. त्यायोगें तुम्हाला जाणवेल की तुम्ही आपसूक माझ्या अघिकाधिक जवळ येत आहांत, कारण सर्व नामें आणि रूपें माझीच तर आहेत ! मला पाहिलं किंवा ऐकलं म्हणून तुम्हाला आपले इष्टदैवत बदलण्याची गरज नाही. मी तुम्हाला आत्मानंदाची अनुभूती घेण्याची गुरुकिल्ली देण्यासाठी आलो आहे. परमेश्वराला स्वत:चा प्रचार करण्याची आवश्यकता नसते, मला प्रचारकांची गरज नाही. जिथे श्रद्धा आणि सचोटी असते तिथे मी असतोच असतो.’
क्रमश: ………!
रहाळकर
१७ मार्च २०२६.