Monday, October 06, 2025
पत्रलेखन !
पत्रलेखन !
आज दैनिक सकाळ मध्ये एक छान बातमी पाहिली. कुणीतरी पत्र लेखनावर चांगले भाष्य केलेले पाहून बरे वाटले. खरंच हल्लीं ‘मेसेज’ची देवाणघेवाण होताना ‘मजकूर’ गायब असतो, केवळ उभेआडवे अंगठे नमस्कार किंवा ‘स्माईलीं’वर भागवले जाते. या व्हाट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक वगैरे माध्यमांतून आपापली स्पष्ट मतें, विचार आणि प्रबोधन क्वचित आढळून येते.
एकेकाळीं पत्रव्यवहार हे एक उत्तम साधन होते संपर्क साधण्याचे. कित्येकजण अतिशय सुंदर पत्रें लिहीत पुन्हा पुन्हा वाचत राहावीत अशी. माझा पत्रसंग्रह देखील खूप मोठा होता जस्ट काही वर्षांपूर्वी. त्यांतील काही तर इतके वेळा वाचली गेली की ती तोंडपाठ झाली होती. आमच्या लग्नापूर्वी सतत सहा महिने आम्ही दररोज गुलाबी पत्रांची देवघेव करायचे मात्र विवाहानंतर सूचना नि उपसूचनांनी पोस्टकार्डें पुरेनाशी होत गेली ! !
प्रत्येक वर्तमानपत्रातले ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ खूप रंगतदार असत. अर्थात थोर व्यक्तींची पत्रे तर इतिहास घडवणारी असत. आमचे सद्गुरू प्रत्येकाशीच अत्यंत आत्मीयतेने पत्राद्वारे संवाद साधत. त्यांची संख्या शेकडोंनी भरेल. त्यांत त्यांच्या आगामी दौऱ्यांबद्दल माहिती तर असेच पण एखाद्या अनुयायाचे अनुचित वागणे ते दुसऱ्या कुणाच्या संदर्भाने अधोरेखित करीत त्या अनुयायाला प्रत्यक्ष न दुखावतां. स्नामींच्या पत्रांत देखील केवळ विशुद्ध अध्यात्माचेच विवरण असे. नेहरू-इंदिरेचा पत्रव्यवहार जगभर गेला. अब्राहम लिंकनचे पत्र (खरे वा ‘बनवलेले) आपण प्रत्येकाने वाचले असेलच असेल.
मी एकदा एका स्नेह्याला सांत्वनपर पत्र लिहिले होते मात्र त्याची पोंच त्यांनी ‘गालावरून मोरपीस फिरवावे’ एवढे हवेहवेसे वाटल्याचे लिहिले होते. पत्रात सुद्धा स्नेहभाव ओतप्रोत दिसला पाहिजे असे माझे प्रांजळ मत आहे.
खूप खूप वर्षांपूर्वी रबिन्द्रनाथ टॅगोरांचे ‘डाकिया’ वाचलेले आठवते. पोस्टमनच्या आगमनाची आणि तो बाळगत असलेल्या पात्रांची चळत पाहून कित्येकांनी छान छान लेख नि कविता लिहिल्या असतील. आता तर तो बिचारा कधीच अडगळीत गेला आहे. असो.
रहाळकर
६ अक्टूबर २०२५