Wednesday, April 23, 2025
आरती आत्मारामाची !
आरती अंतर्यामी असलेल्या श्रीरामचंद्रांची !
परम आदरणीय श्री चिमणपुरे सरांनी अशी सूचना केली की सोबत दिलेल्या आत्मारामाच्या आरतीवर काही चिंतनात्मक लिहावे. वास्तविक सरांचा स्वत:चा व्यासंग अतिशय दांडगा आहे, मात्र अख्खी हयात विद्यार्थी घडविण्यांत घालवलेल्या सरांना मज पामराची तोंडी परिक्षा घ्यावीशी वाटली असावी म्हणून पुन्हा एक धाडस करण्याचा हा प्रयत्न समजावा.
तथापि आधी त्या आरतीचे शब्द पाहूं कारण ही रचना प्रथमच नजरेसमोर आली आहे.
“ उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनि लिंगदेह लंकापुर विध्वंसुनी / कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी / देह-अहंभाव रावण निपटोनी //१// जय देव जय देव जय निजबोघा रामा / परमार्थें आरती, सद्भावें आरती परिपूर्णकामा / जय देव // १ // प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला / लंकादहन करूनी अखया मारिला / मारिला जंबूमाळी भुवनीं त्राहाटिला / आनंदाची गुढी घेऊनिया आला // २ // निजबळें निजशक्ती सोडविली सीता / म्हणुनि येणे झाले अयोध्ये रघुनाथा // आनंदें वोसंडे वैराग्य भरता / आरती घेउनी आली कौसल्या माता // जय देव //३// अनाहतध्वनि गर्जती अपार / अठरा पद्में वानर करती भुभु:त्कार / अयोध्येस आले दशरथकुमार / नगरीं होत आहे आनंद थोर // ४ // सहज सिंहासनी राजा रघुवीर / सोहंभावें तया पूजा उपचार / सहजांची आरती वाद्यांचा गजर / माघवदासा स्वामी आठव ना विसर / जय देव जय देव जय निजबोधा रामा / परमार्थें आरती सदभावें आरती परिपूर्ण कामा //“
प्रथमदर्शनी या आरतींत प्रभु रामचंद्र, सीतामाई, हनुमंत, भरत, कौसल्या माता, महाराज दशरथ आणि रावणाचा उल्लेख वाचतांना हे ‘मिनी-रामायण’ वाटते खरे पण ही ‘आत्मारामाची’ आरती आहे हे विसरून चालणार नाही. प्रत्येकाच्या देहांत जसा तो आत्माराम विराजमान आहे तसेच कामक्रोधादि रिपु ठाण मांडून बसले आहेत. सर्वांत मोठा असा देहाहंकार, देहालाच सर्वस्व मानणारा तर क्षणोक्षणी फुत्कार सोडत असतोच.
तथापि समर्थांचा आत्माराम ‘सहज-सिंहासनावर’ विराजमान आहे. सर्व कोलाहला पासून अलिप्त अशा सोहंहंस: या हिंदोळ्यावर डुल्लत असलेला हा परिपूर्ण श्रीराम निजबोध, स्व-स्वरूपाची ओळख करून देत असताना भक्ताला आठवण नि विसर यांचे भानही राहात नाही इतका तो त्या आनंदांत मश्गूल होऊन राहतो.
मला माहीत आहे की ही केवळ शब्दचावटी आहे. सरांनी विचारलेल्या प्रश्नावर मख्ख राहणे देखील शहाणपणाचे नाही. तथापि या निमित्त अघिक प्रगल्भ विचार कोणीतरी नक्की मांडेल या भरंवशावर हे धाडस केले. क्षमस्व !
रहाळकर
२३ एप्रिल २०२५
Sunday, April 20, 2025
रेसच्या घोड्यांची न संपणारी गोष्ट !
रेसच्या घोड्यांची न संपणारी गोष्ट !
तुमच्या आमच्या बालपणीं आधी आज्जी नि नंतर आई आपल्याला सर्वप्रथम काऊ-चिऊच्या गोष्टी सांगायची. नंतर आई छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप वगैरेंच्या गोष्टी सांगत आपल्यालाही शूरवीर करायचा प्रयत्न करायची. नंतरच्या पिढ्यांना कॉम्प्युटर नि मोबाईल्सची संवय जडली, नव्हे चटक लागली. माझ्या मुलांना उषाच गोष्टी सांगायची कारण मला ते कधी जमलेच नाही. मात्र नाती मागे लागल्या की एकच एक गोष्ट मी त्यांना सांगून भंडावून सोडत असे. ती गोष्ट आज सांगूं म्हटले तरी ती कधीच संपणारी नाही. अगदी ‘कापुसकांड्याची’ नसली तरी तींत वैविध्य असे, तोच तो पणा नव्हे !
काय आहे हो ही कधीच न संपणारी ‘रेसच्या घोड्यांची गोष्ट’ ? असे पहा, मुंबईच्या रेसचा सीझन संपला की बहुतेक त्याच घोड्यांना बॅंगलोरच्या रेसिंग सीझनसाठी रवाना केले जाई. रेसचे घोडे कितीही चपळ असले तरी प्रकृतीने अतिशय नाजूक साजूक ! त्यांना किती जपून हजार मैल लांब कसे न्यावे लागायचे ते माझे मलाच ठाऊक ! कारण त्या काळीं घोड्यांना विमानबंदी असावी. गाई-गुरांना टेम्पो-ट्रक मधून नेणे खूप कॉमन असले तरी घोड्यांना तसे नेणे भलतेच जोखमीचे असे कारण प्रत्येक घोडा किंवा घोडी लाखों रुपयांची. अगदी इन्शूरन्स करूनही ट्रक टेम्पोचा विचारही कुणी करत नसे. मग त्यांच्यासाठी गाद्या-गिरद्या बसवलेल्या स्पेशल व्हॅन्स तयार करण्यांत आल्या. त्यांत घोड्यांना अतिशय हळुवारपणे चढविले जाई. आणि त्या एयर-कंडीशन्ड व्हॅन्स मधून घोड्यांचा दक्षिणेकडील प्रवास सुरू होई. व्हॅनमध्ये त्यांच्या खाण्यापिण्याची छान सोय असली तरी एखादा अडेलतट्टू बाहेरच्या हिरवळीवर चरूं देण्यासाठी हट्ट धरून बसे आणि मग त्या निमित्ताने सर्वच घोड्यांना चरण्यासाठी बाहेर काढले जाई. चरून झाल्यावर बिसलेरीच्या पाण्याने त्यांची तहान भागवली जाई. मधेच दुसऱ्या कुणाला ताजी चंदी नि चण्याचा खुराक घ्यायची सुरसुरी येई नि पुन्हा प्रवासात खंड पडे !
अशा रीतीने मुंबईहून बंगलोरला निघालेले घोडे अजून पुण्याच्या पुढे गेलेच नाहीत. त्यातून अजून कात्रज-घाट ओलांडायचाय आणि म्हणून आमची गोष्ट कधीच न संपनारी आहे ती अशी ! !
मंडळी, इथपर्यंत वाचले असेल तर एव्हाना हातांत झाडू घेऊन तुम्ही माझा पत्ता शोधत याल हे ठाऊक असल्याने आधीच खंबाटकी घाट सर करीन म्हणतो ! बाय बाय् ! !
(हिंदींत एक वाक्प्रचार आहे - ‘यह जरूर लंबी रेस का घोडा है’, मात्र तो मी नव्हे बरे का. )
रहाळकर
२० एप्रिल २०२५