Sunday, October 13, 2024
असतोsमा सद्गमय…..!
‘असतोsमा सद्गमय
तमसोsमा ज्योतिर्गमय
मृत्योर्माs अमृतं गमय’
बृहदारण्यक उपनिषदातील हा पवनाम मंत्र हजारों वर्षांपासून भारत खंडांत उच्चारला जातोय आणि त्याने देशोदेशीच्या लाखों करोडो भाविकांची हृदये हेलावून सोडली आहेत. याचे मूळ कारण म्हणजे मानवी जीवन वेळोवेळी निराश, अश्रद्ध नि दु:खाच्या खाईंत गुदमरत राहिले आहे.
मात्र तेव्हाही वेगवेगळ्या स्थळीं नि कालखंडांत संत-सत्पुरूष, महात्मे, ऋषि-मुनी, आणि कवी यांनी अवतार घेतले आणि मानव जातीला ‘सत् चित् आनंद’ यांची ओळख करून दिली. ‘सत्त्या’ची वाट दाखवणारे हे वाटाडे दीपस्तंभा प्रमाणे यात्रेकरूंना मार्ग दाखवीत राहिले. ज्ञान-प्रकाशाने अमृतत्वाची जाणीव करून देत आले. या सत्यबोधकांनी स्वत:पासून दूर जात असलेल्या मानव जातीला त्याच्या उगमाकडे, मूळ स्त्रोताकडे पुन्हा परत येण्यासाठी नि त्याची यथार्थ ओळख करून देण्यासाठी मार्ग दाखवला.
वास्तविक समस्त मानवजात आज एका विचित्र वळणावर उभी आहे याची कुणकुणही अनेकांना नाही. महाकाय यंत्र तंत्र निर्मिती, शस्त्रात्रें नि दारूगोळा, इतकेच नव्हे तर ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ सारख्या नवनवीन हत्त्यारांमुळे माणसाचा अहंकार इतका शिगेला पोहोचलाय की त्या अहंकाराच्या भयानक विषापोटीं समस्त प्राणिजातही एका भयंकर वादळाच्या वावटळींत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्राराष्ट्रांतील वैमनस्यामुळे एकमेकांवर सतत गुरगुरणे आणि कुरापती काढून विश्वाला वेठीस धरून अशांतता माजविणे हा कुटिल उद्योग सुरू आहे.
हे सर्व समजून उमजून घेत समाजातील प्रत्येक हितैषीने यांवर प्रभावी मात्रा शोधून काढणे आज काळाची गरज बनली आहे. प्रबोधनाद्वारें, वैयक्तिक आचरणातून आणि संघशक्तीने या कुटिल कारस्थानांचा वेळीच नाश करणे फार अगत्याचे झाले आहे असे मनापासून वाटूं लागले आहे मला ! ! (मूळ विषय जरा बाजूला पडला त्याबद्दल क्षमस्व. )
रहाळकर
१३ अक्टूबर २०२४.