Tuesday, April 23, 2024
चक्षुर् वै सत्यम् !
चक्षुर् वै सत्यम् !
बृहदारण्यक उपनिषदातील हे सूत्र काही केल्या स्वस्थ बसू देईना. तसं म्हटलं तर सत्य-असत्य, नित्य-अनित्य, शाश्वत-अशाश्वत वगैरेंवर आपल्या समाजात आणि संस्कृतींत अमाप सांगून झाले असले तरी आपणही त्यांत कणभर विरजण घालावे असे वाटले म्हणून हा उपद्व्याप.
असे पहा, ‘दिसतं तसं नसतं’ हाही वाक्प्रचार आपण ऐकत आले आहोत. तर मग चक्षुर्वै सत्यम् आणि या उक्तीतली तफावत कशी उकलतां येईल. प्रत्यक्षात हे विश्व द्वैताने भरलेले दिसत असले तरी त्यांतील अद्वैत ओळखणे ही खरी कसरत असते तारेवरची. आपल्या मातृभूमी असलेल्या खंडप्राय देशांत पहा ना किती किती वैविध्य भरून ओसंडत असले तरी तिलाही ‘एकं सत् बहुधा विप्र: वदन्ति’ हेच सूत्र लागू पडतेच ना. म्हणजेच अनेकांतील एकत्व अधोरेखित होत राहते की. मग खरें काय, अनेकत्व की एकत्व ? असे काही विचित्र प्रश्न कधीकधी बेजार करतात या वयात मला. तसे पाहिले तर तर्कशास्त्रा ऐवजी तर्कटपणावर माझा उदरनिर्वाह चालतो आतांशा आणि हे तर तुम्ही कधीच ताडले आहे. तथापि, ‘सत्य’ ही एकमेव अशी स्थिती असावी जेथे द्वैताचा मागमूसही दिसायला नको. दुसरी एक म्हण आठवली - ‘सत्त्यात् नास्ति परोधर्म: ’ , म्हणजे सत्याइतका अन्य धर्म नाही.
मागे कधीतरी वाचलेल्या एका कथेचे स्मरण या निमित्त झाले. जेव्हा भगवंताने या पृथ्वीतलावर वारंवार अवतार घेण्याचे ठरवले तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्म्याने केलेले स्तुतीपर स्वागत अतिशय विलोभनीय आहे. तो म्हणतो - ‘सत्य व्रतं सत्य परं त्रिसत्यम्, सत्यस्य योनीं निहितंच सत्यम्, सत्यस्य सत्यं ऋत् सत्य नेत्रम्, सत्यात्मकं त्वं शरणमं प्रपन्ना: ! ! ‘
ब्रह्म्याला याहून कमी दर्जाचे स्तुतीने समाधान नव्हते. ईश्वरासाठी अत्यंत संयुक्तिक नाव ‘सत्य’ हेच होते आणि या साक्षात्काराने तो इतका पुलकित झाला की प्रत्येक श्वासागणिक तो ‘सत्यं सत्यं सत्यम्’ असे घोकत राहिला.
बरेच विषयांतर होतेय हे जाणवत असले तरी मनात येतील ते मांडण्याचा हा प्रयत्न आहे. मला माहीत आहे की तुम्ही कोणीच येथपर्यंत वाचत राहणे कधीच थांबविले असेल, म्हणून नाईलाजास्तव आटोपते घेतो !
रहाळकर
२३ एप्रिल २०२४