Sunday, March 31, 2024
विरासत, धरोहर, सियासत वगैरे !
विरासत, धरोहर, सियासत वगैरे !
आपण मराठी माणसें हिन्दी न्यूज चॅनल्स पाहात असताना वरील काही शब्द वारंवार ऐकत असतो, विशेषत: त्यांतील रटाळ चर्चा ऐकत असताना. अर्थात त्या शब्दांचा मूळ अर्थ आपण ढोबळ मानाने समजतो पण त्यावर फारसा विचार करत नाही. मला तूर्त काहीच कामधाम नसल्याने थोडी मुशाफिरी करीन म्हणतो या शुद्ध हिंदी शब्दांवर. तसेही शुद्ध हिंदी देखील हल्ली क्वचित कानांवर पडते काही सन्माननीय अपवाद वगळतां. सर्वश्री राजनाथसिंहजी, बिग बी अमिताभजी आणि एकेकाळी मंत्रमुग्ध करून टाकणारे स्व. अटलजी, सुषमा स्वराज वगैरे दिग्गज वक्ते कायम श्रवणीय असत. मी आत्तांच ‘सर्वश्री’ हा शब्दप्रयोग केला कारण प्रत्येक व्यक्तीच्या मागे श्री किंवा नंतर पुन्हा पुन्हा ‘जी’ लावणे म्हणजे कंटाळवाणे किंवा अप्रस्तुत वाटते मला. या निमित्त मला आठवतात स्व. राजेंद्र माथुर, एके काळचे माझे इंग्रजीचे प्राध्यापक आणि नंतर ‘नई दुनिया’ नि ‘नवभारत टाईम्स’चे प्रधान संपादक. त्यांचे लिखाण ‘पिछाला सप्ताह’ या सदरांत छापून यायचे आणि आम्ही (तेव्हाचे) तरूण त्यावर तुटून पडत असूं. ती सर्वच लिखाणें केवळ तत्कालीन राजकारणावर असत आणि पं. नेहरू हे केवळ नेहरू असत, इंदिरा गांधी फक्त इंदिरा, मार्शल टिटो निव्वळ टिटो नि माओ त्से तुंग फक्त माओ ! श्री, जनाब, जी, साहेब किंवा राव वगैरेंची गरजच पडत नसे त्यांना. आणखी एक गंमत म्हणजे प्रत्येकाचा केलेला एकेरी उल्लेख. खरं म्हणजे त्यामुळेच त्या त्या दिग्गजांशी सहज नाळ जोडली जायची.
मी स्वत:ला भाग्यवान मानतो कारण मला कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात ऐकता वाचता आली. मुंबईत काही काळ राहिलो असतो तर कधीच धेडगुजरी होऊन गेली असती माझी वाचा. नशीब बलबत्तर म्हणून आधी इंदोर नि नंतर पुण्यपत्तनी वास्तव्य झाले (त्यातही सदाशिव पेठेत ! )
मी मागे केव्हातरी म्हटले होते की इन्दौरच्या भाषेंत हिंदी, मऱ्हाटी, माळवी नि उर्दूचा बराचसा वापर होतो. तथापि कोणताही खरा इन्दौरी यांत सहसा सरमिसळ खपवून घेत नाही, कोणतीही भाषा वापरली तरी ती शुद्ध असलीच पाहिजे यावर त्याचा कटाक्ष असतो. इतकेच नव्हे तर इंग्लंडांत राहूनही जर कोणी चुकीचे इंग्रजी बोलला तर आपल्या कानांना झिणझिण्या तर येतातच पण त्याच्याही कानशिलांत त्या उठवाव्या असा अतिरेकी विचार डोकावून जातो !
पुण्यातली ओरिजिनल मराठी म्हणजे अतिशुद्ध, त्यातून महामहोपाध्याय वगैरे मंडळींचे मराठी म्हणजे निव्वळ ‘डोक्याला शॉट ! नव्हे, माझ्या म्हणण्याचा उद्देश इतकाच की कितीही शुद्ध असली तरी ती क्लिष्ट असू नये. महा-महोपाध्यांबद्दल मलाही आदर आहे पण तोच आदर किंचित पातळ होतो क्लिष्टपणामुळे. मला सांगा, मी कितीही शुद्ध भाषा वापराण्याचा प्रयत्न करत असलो तरी तुम्हीही ती आवर्जून वाचण्याचा तेवढाच प्रयास करताच ना ?
मूळ मुद्दा बाजूलाच राहिला की राव. ‘विरासत, धरोहर, सियासत’ वगैरे म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहीत नसले तरी मज हिंदी-प्रेमी माणूस ते शब्द नीट जाणून आहे बरे का !
रहाळकर
३१ मार्च २०२४