Wednesday, March 13, 2024
उत्सव !
उत्सव !
आज अचानक पाडगावकरांच्या ‘उत्सव’ या कविता संग्रहाची याद आली. लगेचच ती पुस्तिका शोधून काढली आणि आधाशा सारख्या एका पाठोपाठ सगळ्या कविता मोठ्याने वाचून काढल्या. चोवीस मे एकोणीसशे चौसष्ट साली मी नि विकास फाटक नर्मदा नदीच्या काठावरच्या डोंगरांवरून चक्क बारा मैल पायीं तुडवत बडवाह पर्यंत ऐन उन्हात चालत गेले होतो. मात्र हातात हेच पुस्तक होते आणि दोघेही मोठमोठ्याने त्यातल्या कविता वाचत वाटचाल करत होतो. बारा मैल उन्हातान्हात आणि तेही मे महिन्यात सोपे नक्कीच नव्हते. मात्र जवानीचा जोष नि सोबत कवितेचे पुस्तक यामुळे विलक्षण जीवघेण्या तहानेशिवाय कोणताच त्रास जाणवला नव्हता. माझी खात्री आहे की विकास देखील तो प्रसंग विसरला नसणार !
खरंतर ‘उत्सव’ या संकल्पनेवरच मला बरंच काही सांगायचे आहे, पण त्या कवितेच्या पुस्तकाने गाडी ‘हायजॅक’ केली. ( बारा मैल पायी का तुडवावे लागले होते असे विचारताय ? अरे हो, गाडीवरून आठवले, आमची फोर्ड गाडी मधेच जंगलात रूसून बसली आणि तिला लागणारा दहा नंबरचा रिंग पाना किंवा ‘स्पॅनर’ आणायला आम्हाला पिटाळण्यात आले होते बडवाहच्या बाजारात. आता कळलंच ना पायपिटीचे कारण, तर मग ‘उत्सवावर’ बोलूं काही ! ! )
आम्ही संघटनेच्या विविध सेवा कार्यात हिरिरीने भाग घेत असताना एका ज्येष्ठ स्नेह्याने सुचवले होते की ‘कोणतेही कार्य करत असताना त्याला उत्सवाचे स्वरूप द्या. ते काम पूर्ण तयारीनिशी तपशीलवार तर हवेच मात्र तें नेत्रदीपक सुद्धा असले पाहिजे. लक्षात ठेवा, ‘सत्यम शिवम् सुंदरम्’ असे उगीचच नाही म्हटले जात !’
मला आठवतेय आमचे पहिलावहिले रक्तदान शिबिर. सर्व स्वयंसेवकांनी अतिशय कल्पकतेने ‘हुजूरपागा’ मधील तो भलामोठा हॉल पताका, रांगोळ्या आणि फुलांनी सुशोभित केला होता. रक्तदात्यांच्या सेवेप्रीत्यर्थ त्यांना विशेष अल्पोपहार, भेटवस्तु आणि सुवासिक फुलांचे गुच्छ दिले गेले. प्रत्येकाची आस्थेने चौकशी नि देखभाल करण्यात आली आणि स्वेच्छा रक्तदानाबद्दल संघटने मार्फत विशेष आभारपत्र दिले गेले. एकूणच तो रक्तदान सोहळा न भूतो न भविष्यति असा झाला. नव्हे, न भविष्यति असा नव्हे कारण आमचे सगळेच कार्यक्रम अतिशय देखणे होत गेले हे नि:संशय, मग ती आरोग्यशिबिरें असोत, अमृतधारा व्याख्यानें, झोपडपट्ट्यातली सेवा, वृद्धाश्रम वा अंधशाळेतली सेवा, अपंग पुनर्वसनाचे कार्यक्रम, खेड्यातल्या विविध सेवा वगैरे असोत. उत्सव स्वरूपात करत गेल्याने त्यांत वैविध्य नि सातत्य राहिले हे मी अभिमानाने सांगू शकतो. असो.
खरंतर आपल्या देशात नि विशेषत: महाराष्ट्रात उत्सवांची परंपरा कित्येक शतकांपासून प्रचलित आहे. समर्थांनी उत्सवांना पुनर्जीवित केले, लोकमान्यांनी सार्वजनिक ‘गणेशोत्सव’ गल्लीगल्ली, मोहल्ला मोहल्ल्यात, गावागावांतून आनंदोत्सव आणि प्रबोधनात्मक स्वरूपात रूजवला. गणेशोत्सव खरोखरच अतिशय उत्तम प्रकारें साजरे होत असत. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात ‘उरूस’ होतात. या गावजत्रेंत बाहेर गावी असलेले स्थानिक लोकही आवर्जून येतात सण साजरा करायला. एका अतिशय सुसंस्कारित समाजाची बांधिलकी असते ती.
माणूस हा नेहमीच उत्सवप्रिय असतो, काही दुर्दैवी अपवाद वगळतां. आपला आनंद समूह स्वरूपात वाटायचा हा अद्भुत प्रकार आहे खरा. सर्वे भवन्तु सुखिना या साठी उत्सवांसारखे अन्य साधन नसेल.
रहाळकर
१२ मार्च २०२४