Thursday, February 08, 2024
कोsहम् सोsहम् वगैरे !
कोsहम् सोsहम् वगैरे !
प्रशांतिनिलयमला आम्ही शेकडो वेळा भेट देत आलेले आहोत असे मी मागे सांगून झाले आहेच. तिथे वारंवार जाण्याची अनेक कारणे असली तरी कधी कधी तिथल्या साऊथ इंडियन कॅन्टीनचा दर्वळ ओढून नेत असे हेही एक गुपित आहे. मात्र प्रत्येक भेटीचे वेळी तिथे दररोज सकाळी दहा ते अकरा या दरम्यान होणाऱ्या व्याख्यानांचा आस्वाद देखील मी न चुकता घेत असे. ती व्याख्यानें दररोज असत आणि बहुधा तेथेच स्थायिक झालेले विद्वान दिग्गज आम्हा नवशिक्यांना नि काही ‘फॉरेनर्स’ ना मार्गदर्शन करीत. त्यातील काही विशेष उल्लेखनीय म्हणजे अनेक देशांत भारतीय राजदूत म्हणून काम केलेले दिनकर हेजमाडी, रिझर्व बॅंकेचे सेवानिवृत्त डायरेक्टर ब्रह्मानंद माविनकुर्वे, अकोल्याचे प्रख्यात हृदयरोग चिकित्सक द. रा. भागवत, सनातन सारथी या मासिकांचे संपादक नरसिंहन, स्वामींचे चरित्रलेखक, कवी, ह्यूमरिस्ट आणि बहुभाषिक विद्वान प्रो. कस्तुरी यांचा आवर्जून नामनिर्देश होणे क्रमप्राप्त आहे.
मला स्पष्टपणे आठवतेंय प्रो. कस्तुरींचे एक संपूर्ण व्याख्यान, ज्यांत त्यांनी अतिशय खुमासदार शैलीत ‘कोsहम्, सोsहम्’ या विषयावर गुंतवून टाकणारे भाष्य केले होते. स्पष्टपणे आठवत असले तरी त्यांच्या विलक्षण शब्दांकनाचे वर्णन मला करता येणार नाही. तथापि त्या व्याख्यानाचा गोषवारा देण्याचा प्रयत्न करीन म्हणतो.
व्याख्यानाचा प्रारंभ शिरस्त्याप्रमाणे तीन दीर्घ ओंकारांनी झाला आणि कस्तूरींची वाक्गंगा प्रवाहित झाली. ते म्हणाले, बालक जन्माला येताच आधी ‘क्याहां क्याहां’ म्हणून रडते (आणि रडले नाही तर सुईण त्याला रडायला भाग पाडते ! ) या क्याहां क्याहांचा अर्थ ‘अरे मै कहां आ गया’ किंवा अधिक गंभीर स्वरूपात ‘कोsहम्’, ‘मी कोण आहे’ या स्वरूपांत होतो. आपल्यापैकी प्रत्येकालाच हा प्रश्न कधीना कधी पडत आलेला आहे हे काही गुपित नाही. तथापि कालांतराने या बालकाला समजते की तो म्हणजे एक शरीर आहे, ‘देहोsहम्’ ! या मानसिकतेंत तो अनेक वर्षे अगदी म्हातारा होईपर्यंत जगत राहतो. मात्र या दरम्यान त्याला कधी कधी आपण अपूर्ण असल्याची जाणीव होते आणि आयुष्य अधिक समृद्ध व्हावे या विचाराने त्याला सदगुरूची गरज भासूं लागते. कर्मधर्मसंयोगाने काहींना ते प्राप्त होतात आणि तोही त्यांचे सेवेंत निमग्न होऊं पाहतो नि म्हणतो - ‘दासोsहम्’. गुरूकृपा त्याला सांगते की तूच ‘तो’ आहेस, ‘तत्त त्वं असि’ आणि ‘सोsहम्’ साघनेची तो उपासना करू लागतो नि त्याला भान होते ‘अहं ब्रह्मास्मि’ किंवा रादर ‘अहम् अहम्’ असे ! आणि हा अहम् सुद्धा अखेर ‘ओम्’ मध्येच विलीन होतो ! म्हणजेच ओंकारापासून ओंकार हाच आयुष्याचा प्रवाह नि प्रवास ठरतो ! !
(मला ठाऊक आहे की वरील विवेचन खूपच तोकडे आहे, उथळ म्हणा हवे तर, पण अधिक सुबुद्ध जन यावर नक्कीच अधिक प्रभावीपणे बोलूं शकतील आणि त्यांनी तसे करावे म्हणून जरासे डिवचून पाहिले एवढेच ! ! ! )
रहाळकर
८ फेब्रुवारी २०२४