Saturday, February 03, 2024
चदरिया झीनी रे झीनी !
चदरिया झीनी रे झीनी !
चदरिया झीनी रे झीनी !
संतकवी कबीरांची एक उत्कृष्ठ निर्मिती आहे ही, जिला अनूप जलोटांनी खरोखर अजरामर करून टाकले आपल्या शैलीदार गायकीने ! या काव्याचा रसास्वाद घेत तो सर्वांना उपलब्ध करून द्यावा अशी सूचनावजा आज्ञा माझ्या धाकट्या बहिणीने केली. मी सुद्धा लगोलग हरभऱ्याच्या झाडावर चढायचे ठरवले आणि तिथूनच हे पाठवतो आहे. वाजली तर वाजली नाही तर आपण या गाजराच्या पुंगीला खायला मोकळे आहोतच की !
कबीर आधी काय म्हणतात ते पाहू -
‘कबीरा जब हम पैदा हुए,
जग हँसे हम रोये,
ऐसी करनी कर चलो,
हम हँसे जग रोये ।
(या पंक्ती समजायला सोप्या आहेत ) पुढे म्हणतात,
चदरिया झीनी रे झीनी,
राम नाम रस भीनी,
चदरीया झीनी रे झीनी ॥(“मी” पांघरलेली चादर म्हणजेच हे शरीर अतिशय तलम, मुलायम, झुळझुळीत असे आहे कारण ते रामनामाच्या दिव्य रसाने ओतप्रोत आहे ! )
अष्ट कमल का चरखा बनाया,
पांच तत्व की पूनी,
नौ दस मास बुनन को लागे,
मूरख मैली किनी,
चदरीया झीनी रे झीनी,
राम नाम रस भीनी,
चदरीया झीनी रे झीनी ॥( ‘माझ्या’ या शरीरात हटयोगात वर्णिलेले अष्टदल कमल अर्थात मूलाधारापासून सहस्त्रारा पर्यंतची आठ चक्रें विराजमान आहेत. हे शरीर पंचमहाभूतांनी बनवलेले आहे. याला पूर्णत्व यायला नऊ दहा महिने लागले. - खरोखर त्या माऊलीची कमाल आहे ! - तथापि मजसारख्या मूर्खांनी ही चादर मलिन करून टाकली - आपल्यातील विषयविकारांचे साहाय्याने , रामरसांत घोळलेली असूनही ! ! खरोखर, मूलत: आपले शरीर अत्यंत शुद्ध, पवित्र आणि समर्थ म्हणतात तसे शुचिष्मंत असते पण काम क्रोधादि षड्रिपु त्याचा सत्यानाश करीत राहतात. )
जब मोरी चादर बन घर आई,
रंगरेज को दिनी,
ऐसा रंग रंगा रंगरे ने,
के लालो लाल कर दिनी,
चदरीया झीनी रे झीनी,
राम नाम रस भीनी,
चदरीया झीनी रे झीनी ॥ ( ही माझी चादर पूर्णत्वास आल्यावर तिला सदगुरूरूपी रंगाऱ्याच्या स्वाधीन करण्यांत आले आणि नवल पहा, त्याने पाहता पाहतां असा काही रक्तिम रंग रंगवला की सर्वदूर लालीच पसरून गेली (कबीर कम्यूनिस्ट नव्हते बरे का, नव्हे ते खरेखुरे साम्यवादीच होते कारण खऱ्या साम्यवादाची दृष्टी त्यांना प्राप्त होती ! ! ! )
चादर ओढ़ शंका मत करियो,
ये दो दिन तुमको दिनी,
मूरख लोग भेद नहीं जाने,
दिन दिन मैली किनी,
चदरीया झीनी रे झीनी,
राम नाम रस भीनी,
चदरीया झीनी रे झीनी ॥( या चादरीला पांघरल्यावर कोणतीही शंका घेऊ नका - संशयात्मा विनश्यति - कारण ती तुमचेकडे दोनच दिवस असणार आहे. पण मूर्खांबद्दल काय बोलावे, त्यांनी त्या दोन दिवसांतच तिला मळवून टाकली, सत्य-असत्य, शाश्वत- अशाश्वत यांतील मर्मभेद न समजल्यामुळें ! )
ध्रुव प्रहलाद सुदामा ने ओढ़ी,
शुकदेव ने निर्मल किनी,
दास कबीर ने ऐसी ओढ़ी,
ज्यो की त्यों धर दिनी,
चदरीया झीनी रे झीनी,
राम नाम रस भीनी,
चदरीया झीनी रे झीनी ॥( या दोह्याचा अर्थ सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ शुभ्र आहे ! )
चदरीया झीनी रे झीनी,
राम नाम रस भीनी,
चदरीया झीनी रे झीनी ……….!
व्वा, थॅन्क यू उज्वल ! ! !
प्रभु रहाळकर
३ फेब्रुवारी २०२४