Saturday, February 03, 2024
आठवणी दाटतात !
आठवणी दाटतात…..!
सुमती टिकेकर यांनी गायिलेले एक भावगीत सहज आठवले आणि मी नेहमीप्रमाणे जुन्या नव्या खयालों मे जैसे डूब गया ! माणसाच्या अंतरंगात कधीही न आटणारा, न सुकणारा अखंड झरा असतो आठवणी म्हणजे नाही ! ! मुळात कोणत्याही आठवणी ताज्या होण्यासाठी कुठलेही क्षुल्लक निमित्त पुरेसे ठरते. त्यातून दुसरे काहीच करायचे नसले तरी आपापल्या कटुगोड आठवणी क्षणार्धात पिंगा घालू लागतात. मजसारख्या रिकामटेकड्याला तर त्यांचा उच्छाद सतत सहन करावा लागतो आणि मग मी तुम्हालाही वेठीस धरू पाहतो ! असो.
आठवणी म्हणजे नक्की काय हो ? आपापल्या आयुष्यात घडून गेलेल्या सुख नि दु:खरूप प्रसंगांची मनातल्या मनात चाललेली उजळणी ! ती उजळणी कधी सुखावते तर कधी विषण्ण करते ; कधी हसवते तर कधी नुसत्याच गुदगुल्या करून जाते ; कधी कधी मात्र चांगलेच ठाण मांडून बसते, कुणाला तरी सांगेपर्यंत !
खरंतर आठवणी म्हणजे एक अथांग डोह असावा, एक चक्रव्यूह ज्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करणे भाग पडते. संत सांगतात की मागचा विचार फार करू नका, वर्तमानात जगा. कसे शक्य व्हावे ते, कारण आपले अस्तित्वच मुळात घडून गेलेल्या किंवा घडू पाहणाऱ्या प्रसंगांवर उभे असते ना ?
त्या भावगीताच्या ओळी काही पिच्छा सोडत नाहीत आत्तां तरी. म्हणून यू-ट्यूबवर ते गाणे पुन्हा ऐकून पाहिले. अरेच्चा, मी आत्ता म्हटले तेच तर त्या विदुषी गात होत्या ! म्हणजे ‘जे घडले ते सगळे, सांग कसे विसरावे - आठवणी दाटतात’ ! वगैरे.
आणि अचानक, ‘चहा निवतोय्’ या हरळीने भानावर आणले ! ! !
रहाळकर
३ फेब्रुवारी २०२४