Tuesday, January 30, 2024
श्रीमान न. शं. रहाळकर
श्रीमान न. शं. रहाळकर
श्रीमान नरहर शंकर रहाळकर ( १८८१-१९५७ ) हे मालव प्रांतातील एक प्रख्यात साहित्यिक, कवी, समीक्षक आणि अतिशय कर्तबगार उच्च पदस्थ अधिकारी होऊन गेले. अत्यंत सहृदय, संभाषण चतुर आणि चतुरस्त्र असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. मराठी, संसकृत, तसेच आंग्ल भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. राजदरबारी कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून कार्यरत असताना (होळकर स्टेट ) इंग्रज अंमलदारांशी त्यांनी केलेला पत्रव्यवहार तात्कालीन होळकर नरेश नेहमीच वाखाणिल असत. हल्लीच्या पद्म पुरस्कारांप्रमाणे ते वेळी त्यांना ‘मशीर बहादुर’ आणि ‘मुंतझिम-ई-खास बहादुर’ अशा बिरूदांनी त्यांचा गौरव करण्यांत आला होता. कॅबिनेट सेक्रेटरी या पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी जयपूर, भडोच आणि लाहोर येथें डायरेक्टर इंडस्ट्रीज या हुद्यावर अतिशय चोख कारभार केला.
तथापि ‘साहित्य सेवा’ हा त्यांचा मूळ स्वभाव होता. तात्कालीन दिग्गज साहित्यिक त्यांचे निकटचे मित्र होते. त्यातही कवी केशवसुत, भा. रा. तांबे, ग. त्र्यं. माडखोलकर, कवी ‘बी’ इत्यादि तर अधिकच निकटचे. त्यांनी लिहिलेला ‘केशवसुत आणि त्यांची कविता’ हा शोध प्रबंध पुस्तकरूपांत तत्कालीन पुणे मुंबई विद्यापीठांत क्रमिक पुस्तक म्हणून नावाजला गेला.
या व्यतिरिक्त ‘शाकुंतल सौंदर्य’ हा समीक्षा ग्रंथ विशेषत्वाने गाजला होता. ‘पुष्पांजली’, ‘होळकरांचा फटका’ वगैरे काव्यग्रंथ प्रकाशित झाले. तात्कालीन दिग्गज साहित्यिकां बरोबरच नवोदित कवी, लेखक वगैरेंचा नित्य राबता ‘रहाळकरांच्या माडीवर’ रंगत असे असे गौरवाग्गार माडखोलकरांच्या आत्मचरित्रांत पाहता येतील. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते दोनदां स्वागताध्यक्ष होते.
असा हा थोर साहित्यिक, कवी नि समीक्षक सात डिसेंबर एकोणीसशे सत्तावन सालीं पडद्याआड गेला, ठीक भास्करराव तांब्यांच्या पुण्यतिथी रोजीं ! त्या उभयतांना भावपूर्ण श्रद्घांजली ! !
डॉ. प्र. शं. रहाळकर (नातू)
पुणे 21
9860495045