Sunday, January 21, 2024
रामायण
“रामायण” -
मत्प्रिय सुहृदहो !
आपण सर्व गेली कित्येक वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होतो तो आता केवळ काही तासांवर योऊन ठेपला आहे. याचे महत्व, औचित्य, प्रासंगिकता आपल्या साठी अतिशय मोलाची आहे हे खरे असले तरी त्यातील काही महत्वाचे पैलू दृष्टिआड होऊ नयेत म्हणून हे अल्पधारिष्ट !
वास्तविक सर्व विश्वात गुणवत्ता नि लोकप्रियता या दृष्टीने ‘रामायण’ हे महाकाव्य अद्वितीय आहे यात शंका नाही. या महाकाव्याचे जनक महर्षी वाल्मिकि यांना अर्थातच अग्रपूजेचा बहुमान अबाधित राहिला आहे. मानवी मूल्यांचे संपूर्ण दर्शन या महान ग्रंथात पदोपदी जाणवत राहते. यांत वीर, करूण, अद्भुत, रौद्र, श्रुंगार वगैरे सर्व नवरसांची रेलचेल पाहता येते. जगातील सर्व थरांतील रसिकांनी, विद्वानांनी, समीक्षकांनी आणि सामान्य जनांनी सदासर्वदा सर्वकाळीं ज्यावर निरपेक्ष नि:स्पृह प्रेम केले असा एक ग्रंथ म्हणून ‘रामायणा’कडे पाहिले जाते.
अशा या विश्वमान्य ग्रंथाची निर्मिती ज्या भारत देशात झाली तिथे तुम्हा आम्हाला जन्म मिळावा या सारखे महत्पुण्य नाही. ‘रामायण’ या चार अक्षरात आपण भारतीयांची अस्मिता गुंफलेली आहे. आपले लालनपालनच मुळात रामायणाच्या भातुकलीवर झालेले आहे. आपले महान आदर्श याच चार अक्षरात सामावले आहेत. अतुलनीय पराक्रमाची, असाधारण त्यागाची , अपार कारूण्याची वीरगाथा या चार अक्षरांत मूर्तिमान झाली आहेत. या ‘अमृत कलषांत’ चारही वेद, सहा दर्शने, सहा शास्त्रे तर आहेतच आणि सायुज्य मुक्तीची प्राप्ती करून देणारे ‘ज्ञान’ आहे, तर प्रापंचिक नि व्यावहारिक नैपुण्य देणारे ‘विज्ञान’ देखील आहे. अतिशय उत्कट असे पातिव्रत्य आहे तसाच अभिजात श्रुंगार आहे ; नेत्रदीपक शौर्याबरोबरच हृदयविदारक क्रौर्य सुध्दा यात मधेच डोकावून जाते ! यात कारूण्याचा हृदयंगम अविष्कार आहे तर निष्ठुरपणाचा अविचल डोंगरही ठाण मांडून बसलेला दिसेल.
इथे विशुद्ध ‘चारित्र्य’ ठायी ठायीं पदन्यास करताना पाहून मन मोहरून उठते ! मात्र त्याच बरोबर चारित्र्यहीन जीवांच्या लीला पाहून डोळ्यांपुढे काजवे चमकतात.
यात श्रीहनुमंताची परम उत्कट भक्ती आहे आणि बदसल्ला देणारी मंथरा देखील आहे. निव्वळ क्षुद्र स्वार्थापोटी पतीला पुत्रवियोगाचे दुष्कर हलाहल पाजून सर्वनाश ओढवून घेणारी कैकेयी आहे तर पितृवचन पालनार्थ गजान्तलक्ष्मीचे राजसिंहासन सोडून वनवासी होणारे प्रभु श्रीरामचंद्र आहेत !
यांत भरताचे श्रीरामांवरील अत्युत्कट प्रेम दृग्गोचर होते तर वाली सुग्रीव या दोन सख्ख्या बंधूंचे राज्यासाठी चाललेले रणकंदनही आढळते !
‘रामायण’ या चार अक्षरांत काय नाही ? आम्हा भारतीयांच्या सनातन जीवन मूल्यांचा मूलस्त्रोत म्हणजे श्रीरामायण, समुज्वल इतिहास म्हणजे रामायण, चिरंतन आत्मविचारांचा सागर म्हणजे रामायण, विशुद्ध चारित्र्याचा अमरकोष म्हणजे रामायण ! कर्म, उपासना, ज्ञान या त्रिवेणीचा संगम म्हणजे रामायण ! !
कित्येक शतकें, नव्हे युगें लोटलीत तरी रामायणाची मधुमधुरा गोडी सतत वृद्धिंगतच होत राहिलेली आपण आज अनुभवत आहोंत आणि हेच श्रीरामायणाचे असाधारण वैशिष्ठ्य म्हणूंया.
वास्तविक महामंगल प्रभु श्रीरामांचा अवतार होण्यापूर्वींच त्यांचे परमपवित्र असे चरित्र शब्दांकित करणारे अभूतपूर्व महाकवि म्हणजे श्री वाल्मिकी, त्यांचेही आदरपूर्वक स्मरण करूया !
जय श्रीराम, जय जय श्रीराम ! ! !
रहाळकर
२२ जानेवारी २०२४
<< Home