Wednesday, May 10, 2023
आमरस पार्टी
आमरस पार्टी !
सुमारे पंचाहत्तर वर्षांपूर्वीचे प्रसंग आहेत हे. कित्येकांना आता ते अप्रासंगिक वाटले तरी मला नि माझ्या भावंडांसाठी ते अनमोल खजाने आहेत हे आता ऐंशी पार केल्यावर अधिकाधिक जाणवूं लागले आहे. त्या काळी आम्ही मनसोक्त अनुभवलेले ते प्रसंग कदाचित तुमचे थोडेबहुत मनोरंजन करतील अशा (अजूनही) भाबड्या समजुतीने ते सांगायचा प्रयत्न करीन, वाटल्यास यू मे क्विट राइट नाऊ !
तर मी सांगत होतो त्या काळच्या आमरस पार्ट्यांबद्दल. त्या काळी राजरोसपणे संध्याकाळी ‘जरा बसूंया’ असे घडणे दुर्मीळ असे. मात्र आमरस किंवा दालबाटी पार्ट्या हमखास रंगत. दोन्हीसाठी मुळांत खवैय्येगिरी आणि त्यासाठी लागणारी पूर्वतयारी नि भरपूर वेळ साहाजिकच अत्त्यावश्यक असे.
आंबे खरेदीसाठी काही विशिष्ट व्यक्तींवरच ती जबाबदारी सोपवली जाई. अर्थात बरोबर आम्ही लहान बालकें नि बालिका आवर्जून जात असूं. ‘मार्केट’ मधले कित्येक ‘ठेलेवाले’ प्रत्येकाच्या हातावर चव दाखवण्यासाठी भरपूर रस पिळत निरनिराळ्या आंब्यांचा. बरीचशी घासाीस करत पाचसहा मोठाल्या पिशव्या भरून आंबा खरेदी होई. त्या काळीं आंबे ‘शेकड्याने’ विकत. एक शेकडा म्हणजे दोनशेबारा नग ! आक्षरश: शेकडोंनी आंबे विकत घेतले जात.
माझ्या वडिलांचे सात जिवलग मित्र होते - नि ते ‘बी सेव्हन’ या नांवाने ओळखले जात. बहुतेक सर्व बालपणापासूनचे मित्र असल्याने त्यांचे संवाद किंवा दंगामस्ती पाहून आम्हालाही आश्चर्य वाटे ! आर्थिक दृष्ट्या सर्वांमध्ये खूप विषमता असली तरी त्यांची मैत्री कित्येक वर्षें, नव्हे पिढ्या कायम राहिली हे विशेष.
मला स्पष्ट आठवत आहे डॉ. दातार काकांचे सरकारी क्वार्टर. ती क्वार्टर्स ‘लाल अस्पताल’ ते ‘एलोरा टॉकीजच्या’ दरम्यान दोन्ही बाजूस होती. त्यांच्या राहत्या क्वार्टर मधे सातही मित्र सहकुटुंब सहपरिवार जमले होतो. पुरूषांनी दोन मोठाली पातेली भरून रस पिळला होता आणि आम्हा मुलांना सालीकोयी चोखायला बसवले होते. दरम्यान त्या सातही मित्रांची भरपूर थट्टामस्करी सुरू होती नि स्त्रीवर्ग तोंडाला पदर लावून त्या थट्टामस्करीचा आनंद लुटत होता.
अशीच एक डाळबाटी पार्टी ‘राऊ’ येथील मिनी-बंगल्यात झालेली स्मरते. राऊ रेल्वेस्टेशन नजीक रेल्वे ट्रॅकला लागून या सात पैकीं पाच जणांनी दोन दोन हजार रूपयांत एकसारख्या अशा पाच मिनी-बंगल्या बांधून घेतल्या होत्या आणि दर दोन बंगलीं दरम्यान एकेक विहीर देखील. तिथे राहायला कोणी गेल्याचे माहीत नाही पण तिथे सर्व मित्रपरिवाराने रंगवलेली दाल-बाफले-बाटी पार्टी चांगलीच आठवतेंय. रणरणीत उन्हात बाहेर पेटवलेली कंड्यांची झगरी, त्यांत अडीच तीन तास खरपूस भाजलेल्या बाट्या आणि तिखटजाळ ‘दाल’ कधीच विसरणे शक्य नाही.
पुढे कित्येक वर्षें ट्रेनने जातायेतां ती पाच टुमदार घरें पाहतांना जीव नकळत व्याकूळ होई !
रहाळकर
१० मे २०२३