Saturday, January 21, 2023
तोंडी परिक्षा…. !
तोंडी परिक्षा…..!
तोंडी परिक्षा आणि लेखी परिक्षा हे दोन्ही शब्द आपल्यातील कुणालाच नवीन नाहीत. लेखी परिक्षेसाठी जेवढी भीती आणि हुरहूर आपण अनुभवली त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी तोंडीच्या वेळी जाणवत असे. कारण सोपे सरळ असे मित्रांनो. लेखींत एक कागदाचे पान समोर असे तर तोंडीचे वेळी अक्राळविक्राळ भासणारा किंवा भासणारी कठोर व्यक्ती असे ! साहाजिकच अर्धेअधिक अवसान त्या परिक्षकाला पाहूनच गळून जात असे. (ही टिप्पणी सर्वसामान्यांना गैरलागू आहे, केवळ माझ्या सारख्या रणझुंजारां बद्दल आहे ! - खरा रणछोडदास ! ! ) कारण मी पाहिलेत असे बहाद्दर, जे परिक्षकावर ‘इम्प्रेशन’ मारण्यात वाकबगार असत आणि पाहता पाहतां फड जिंकून दाखवीत.
माझे ‘दिल दहलानेवाले’ किस्से तुम्हाला सांगितल्या बिगर चैन पडणार नाही आज. सबब अवधान एकले दीजे !
मेडिकलला असताना फार्मॅकॉलॉजी या विषयाची प्रिलिम् म्हणजे प्री-युनिव्हर्सिटी परिक्षा होती. माझा लेखी पेपर बरा गेला होता. प्रॅक्टिकलच्या वेळी घेण्यांत येणारा ‘व्हायवा’ म्हणजे तोंडी परिक्षा आमचे डेमान्स्ट्रेटर शिक्षक घेत होते -डॉ. अविनाश ऊर्फ ‘आम्ब्या’ भागवत, माझे स्नेही आणि नाटकातले सहकलाकार. साहाजिकच मी निर्धास्त होतो आणि लंचब्रेक मधे भरपूर चिकन चापून नि वर तंबाखूचे पान खात परिक्षेच्या हॉलमधे शिरलो. हाय दैवा, आम्ब्याच्या ऐवजी चक्क हेड आफ डिपार्टमेण्ट आणि प्रिन्सिपाल असलेले डॉक्टर बी. सी. बोस सर आले स्वत: वायव्हा घ्यायला ! मी गर्भगळित ! हातपाय लटपटू लागले, तोंडाला कोरड पडली नि मी घामाने ओलाचिंब ! माझी ती स्थिती पाहून त्यांनी ॲड्रिनलिनच्या काय ॲक्सन्स असतात असा प्रश्न केला. (ॲड्रिनलिनने मला वर झालेली सर्व लक्षणें होत असतात - अचानक उद्भवणाऱ्या संकटांवर ‘फाईट ऑर फ्लाईट’ असा तोडगा देणारी ! मला काहीच सुचत नव्हते, तोंडच उघडतां येईना - गालांत पान असल्याने- आणि पूर्ण स्मृतिविभ्रम झालेला. मी गपगार, घामहि पुसायचे भान नव्हते. त्यांनी मार्कशीटवर भलेमोठे शून्य काढले, मला दाखवले आणि चक्क गेट् आऊट म्हणाले हो मला ! (युनिव्बर्सिटी परिक्षेत एक्स्टर्नल बरोबर तेही अर्थात होतेच आणि अत्यंत ‘खिलाडूपणे’ माझी ‘आपबीती’ एक्स्टर्नलला माझ्यासमोरच सांगितली ! मात्र यावेळेस दैवाने साथ दिली, थिअरी छान झाली होती आणि कठिणातले कठीण प्रश्नांना मी छानच उत्तरें देऊ शकलो ! (आणि ‘पास’ ही झालों ! ! )
पॅथॉलॉजी वायव्हा मात्र न भूतो न भविष्यति असा झाला, कारण एकही पॅथालाजीचा प्रश्न मला विचारलाच नाही परिक्षकांनी ! खरंतर सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत परिक्षा सुरू होती, विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षकच खूप कंटाळले होते. त्या दिवशीच्या बॅचमधे मी शेवटला विद्यार्थी उरला होतो, तसा माझा थिअरी पेपर त्यांचे समोर होताच आणि त्यावर भरपूर मार्क्स आधीच देऊन झाले होते बहुधा ! माझा पेपर हातात घेऊन पहिला प्रश्न आला - मध्यप्रदेश के चीफ मिनिस्टर कौन हैं आजकल ? मी म्हटलं शंकरदयाल शर्मा. त्यावर मला विचारतात तुम्हारे भैय्या लागते हैं क्या वे ? उनका जिक्र करते हुवे ‘सन्माननीय डॉक्टर शंकरदयालजी शर्मा’ नही कह सकते ? ‘ आणि मग सुरू झालं ‘मान-सन्मानांवर’ एक’ बौध्दिक ! इन्टर्नल, एक्स्टर्नल, डेमान्स्ट्रेटर्स, मी आणि चहा आणणाऱ्या चपराशाने त्या ‘परिसंवादांत’ मनसोक्त नि यथेच्छ सहभाग घेतला ! (असा होता तो ‘न भूतो न भविष्यती’ असा वायव्हा अर्थात ‘तोंडी परीक्षा ! )
कशी वाटली आजची बंडलबाजी ?
रहाळकर
२१ जानेवारी २०२३