Saturday, November 26, 2022
दुर्मीळ ग्रंथ !
दुर्मीळ ग्रंथ !
काल अचानक आळंदी संस्थान कडून फोन आला की तुमच्या इंग्रजी ज्ञानेश्वरीच्या सर्व प्रती संपल्या आहेत म्हणून आता तुमचे ‘बिल’ सादर करा !
मी चक्क उडालोच ! म्हणजे आता माझे (ही) पुस्तक ‘दुर्मीळ’ कॅटेगरीत गेले तर ! ! मागे काही वर्षांपूर्वी मला अचानक गुरूदेव रानडे यांचेबद्दल कोणीतरी काही पृच्छा केली होती. मी त्यांचेबद्दल अगदीच अनभिज्ञ असल्याने प्रथम पुण्यातला अप्पा बळवंत चौक पालथा घातला आणि नंतर मुंबईचा ठाकुरद्वार देखील. पण त्यांचे किंवा त्यांचे वरील एकही पुस्तक काही मला गावले नव्हते. मात्र काही दिवसांनी अचानक मला आपण होऊन कुणीतरी दोन ग्रंथ आणून दिले - कां, कसे ते ठाऊक नाही पण त्या विलक्षण योगायोगाची गंमत वाटली खरी ! यालाच तर म्हणतात ना ‘चमत्कार’ ?
ते असो. आज ‘दुर्मीळ ग्रंथांवर’ विचार करताना कित्येक किस्से सहज आठवले.
माझ्या आजोबांनी केशवसुत आणि त्यांची कविता यावर एक सुरेख प्रबंध लिहून तो पुस्तक रूपात छापला होता. ते पुस्तक त्या काळीं पुणे मुंबईच्या युनिव्हर्सिटींत एम् ए साठी ‘रेफरन्स बुक’ म्हणून वापरले जाई असे ऐकून होतो. त्या पुस्तकाची एकुलती एक उरलेली प्रत वडिलांनी जिवापाड जपून ठेवली होती. मात्र खरेखुरे दानशूर असलेल्या पिताजींनी ती प्रत एका मराठीच्या प्राध्यापकांना वाचण्यासाठी दिली आणि ती कायमची विस्मरणांत गेली !
असेच एकदा मला लहर आली म्हणून एबीसी मधल्या प्रभात टाकीजच्या समोरच्या बोळांत पटेल ब्रदर्स या दुर्मीळ पुस्तकांच्या दुकानांत शिरलो होतो. पन्नास वर्षांपूर्वी आम्ही मेडिकलला असताना पाचही वर्षें ज्या विनोदी एकांकिका वठवल्या होत्या ती पुस्तके मला पुन्हा चाळायची होती.. माझा उद्देश सफल झाला नि मी डझनभर पुस्तके शोधून काढलीच त्या जुन्या ढिगाऱ्यातून ! ती पुस्तके घेऊन मी लंडनला गेलो, मुलाच्या मित्र परिवाराने ती पुन्हा ‘स्टेज’ करावी म्हणून, पण हाय, मुलाच्या मित्राने ती कुठे हरवून टाकली न कळे. (यालाही म्हणतात ‘योगायोग’ असे ! ) असो.
खरंतर एखादा ग्रंथ दुर्मीळ होणे ही बाब नित्याचीच असते ना ? मला सांगा, आता जर मी कालीदासाचे ‘शाकुंतल’ किंवा ‘मेघदूतम’ वाचायचे ठरवलेच तर कदाचित ‘नेट् वर’ शोधा, सहज मिळतील असे कुणी सांगितले तरी त्या ग्रंथांचा ‘फील’ पुन्हा सापडेल काय, त्यांचा तो विशिष्ट गंध, ती जीर्ण पाने नि त्यां मागे दडलेल्या अनेकानेक आठवणी ? अशी खासियत असते दुर्मीळ ग्रंथांची !
आपली पीढी तसे पाहिले तर खूप भाग्यवान आहे कारण आपण कुठेतरी, केव्हातरी अनेक ग्रंथ हाताळले आहेत, त्यांचा आस्वाद घेतला आहे - नव्हे उपभोगला आहे. पुढच्या पीढ्यांना तो आनंद मिळेलच याची शाश्वती नाही. अर्थात् ‘आनंदु ना निरानंदु’ या सर्व गोष्टी सापेक्ष असतात नाही का ?
रहाळकर
२६ नोव्हेंबर २०२२ (मुंबई