Monday, May 30, 2022
आनंदाचे डोहीं आनंद तरंग…..!
आनंदाचे डोहीं आनंद तरंग !
आज पेपरमधे एक झकास व्यंगचित्र पाहिले नि मनापासून दाद द्यावीशी वाटली. त्यांत एक माणूस दुसऱ्या एकाला पोलिस ठाण्यांत आणतो आणि महागाई, भ्रष्टाचार, अठराविश्वें दारिद्र्यांत राहूनही हा कायम हंसतमुख आणि आनंदी असतो म्हणून त्याचेवर कायदेशीर कारवाई करावी अशी फिर्याद करतो ! खूप आवडली मला ती थीम !
खरंच, इतकाले संत सत्पुरूष आणि सर्व ग्रंथ तुम्ही केवळ आनंदस्वरूप आहांत असे घसा खरवडून सांगत आलेत. त्यातील क्वचित् काही कायम प्रसन्न, आनंदी असलेले देखील पाहिले ऐकले आहेत, पण खरंच अत्यंत विरळा, दुर्मीळ !
जरा हट् के बोलीन म्हणतो ! आम्ही मेडिकलला असतांना प्रत्येक प्रोफेसर आम्हाला सांगे की पेशंटला हात लावण्या आधी ‘वॉच हिम इंटेंटली’ - काळजीपूर्वक त्याला आधीं ‘न्याहाळा’ , तो कसा आत आलाय कसा बसलाय त्याची चेहेरेपट्टी काय म्हणते वगैरे नीट पहा. खरेतर तुमचे निदान करण्या आधीच नीट न्याहाळणे तुम्हाला निश्चित अशी दिशा देतील.
मला ते कौशल्य कितपत जमले ते माहीत नाही, पण मूळव्याधीने ग्रस्त पेशंट कायम स्टूल किंवा खुर्चीवर पुढे सरकून बसेल, बद्धकोष्ट किंवा कॉन्स्टिपेशन असलेला कायम दुर्मुखलेला असेल असे काही जुजबी ठोकताळे मला उपयोगी पडलेत !
बद्धकोष्टावरून एक ‘टिप’ द्यावीशी वाटते - ज्याचा कोठा वेळचेवेळी साफ नि रिकामा असेल तोच आनंदयात्री होऊ शकेल ! तस्मात्, अधूनमधून रेचक घेत राहावे ! !
आता पाचकळपणा जरा बाजूला ठेऊन मूळ मुद्यावर येतो. खरंतर या विखानाला किंवा बखानाला दुसरेही एक कारण घडले. पहाटे पहांटे लताजींचे ‘आनंदाचे डोहीं’ कर्णसंपुष्टावर आदळले आणि त्या व्यंगचित्राचे नि या स्वरांचे औचित्य मनांत ठसले.
आपण खरंच कायम आनंदी, हंसतमुख राहू शकतो काय - राहावेच हे खरे असले तरी ? मग त्यासाठी मला काय करायला हवे हा विचार मनांत येतांच श्रीसमर्थांचा दासबोध पुन्हा हातीं घेतला आणि सहाव्या सातव्या पानावरच्या सगळ्या एकोणसाठ ओंव्या नजरेखालून घातल्या. त्यातील काही मोजक्याच आत्तां तरी अवश्य पाहाव्या अशी विनवणी करितो सलगीची !
समर्थ म्हणतात,
‘जन्मदु:खे जरा दु:खे । नित्य दु:खे पुन: पुन: ।
संसार त्यागणे जाणे । आनंदवनभूवनीं. ॥
(जन्मत:च पदरीं पडलेले नि आधिव्याधींचे पुन्हापुन्हा दु:ख टाळण्यासाठी संसाराचा त्याग करून सरळ आनंदवनभूवनांत प्रविष्ट व्हावे. मला माहीत आहे की हा अनुवाद बरोबर नाही, तथापि संसार त्यागणे म्हणजे मनाने त्यापासून अलिप्त राहून आपल्यातच विराजमान आनंदाच्या घनदाट अरण्यांतल्या राजभुवनांत वस्तीला जावे - असा सरळ सोपा अन्वयार्थ करता येईल ! )
प्रत्यक्षांत संसाराचे गाडे हांकत असतांना त्यातील दु:खांची जाणीव ज्याची त्यालाच ठाऊक असते, तरी पण समर्थ सांगतात ‘परंतु येकदा जावे । आनंदवनभूवनीं ॥
पुढे म्हटलेय
कष्टलो, कष्टलो देवा । पुरे संसार जाहला । देहत्यागास येणे हो । आनंदवनभूवनीं ॥
अजून पुढे म्हणाले -
स्वर्गींची लोटली जेथे । रामगंगा महानदी । तीर्थांसि तुळणा नाही । आनंदवनभूवनीं ॥
ग्रंथीं जे वर्णिले मागे । गुप्तगंगा महानदी । जळात रोकडे प्राणी । आनंदवनभुवनीं ॥
नंतर,
निर्मळ जाहली पृथ्वी । आनंदवनभूवनीं ॥
उदंड जाहले पाणी ।स्नान संध्या करावया । जप तप अनुष्ठानें । आनंदवनभूवनी ॥ नाना तपें पुरश्चरणे । नाना धर्म परोपरी । गाजली भक्ति हे मोठी । आनंदवनभूवनीं ॥
बंड पाषांड उडाले । शुध्द अध्यात्म वाढले । रामकर्ता, रामभोक्ता । आनंदवनभूवनीं ॥
अखेर रामकर्ता रामभोक्ता हीच खूण मनांत ठसली तर ‘मला’ काहीच करणे नाही, निवान्तपणे त्या आनंदवनभूवनांत वस्ती करावी !
(कित्ती कित्ती सोप्पं आहे नै बोला-ऐकायला ? तरी पण ते पोट साफ ठेवण्याचे पाहा बुवा ! ! )
रहाळकर
३० मई २०२२