Wednesday, December 08, 2021
आर्तवाणी
प्रिय आत्मीय,
नुकतेच एक पुस्तक हातीं घेतले आणि त्यातील एक सुंदर कवन खूप आवडले. असे म्हणतात ना की आपल्याला झालेला आनंद इतरांना वाटून टाकला की त्या आनंदाचे मोल शतपटींनी वाढते. आणि म्हणून तें कवन जसेच्या तसे खालीं देत आहे. ‘मना’चे श्लोक’ म्हणताना आपण जसे एक ठेका धरून वाचतो तसे हे कवन वाचून पहावें.
“अतां मागणे एवढें एक आहे ।
झिजावी तनू आंस ही पोटीं राहे ।
तुझे कारणीं चिंतनीं काळ जावो ।
सदासर्वदा त्वत् कृपालाभ होवो ।।
तुझे संगतीचा सदा योग व्हावा ।
जगीं वागतां मोकळा भाव यावा ।
असे रंजले गांजले ते सुखी हो ।
समस्तांस देवा तुझे प्रेम लाहो ।।
तुझा धर्म तो नित्य नांदो जगांत ।
जनां आकळो कोमला सत्य हेत ।
सदा सज्जनां सात्विकें वागतांना ।
तयांना न हो दु:ख क्लेषादि नाना ।।
मती दुर्जनांची बहू शुध्द होवो ।
अधर्मांतरीं जीव ना कोणी राहो ।
बहुतां मतां एकता यावी लोकीं ।
असंख्यात जे जीव होवो विवेकी ।।
घडो एकता सांप्रदायीं मतांची ।
जडो प्रेमभावें स्मृती साधनेची ।
झडो द्वेष रागादिकें आत्मभावें ।
सदासर्वदा सौख्य लोकीं असावें ।।
(ग्रंथनाम - ‘मनोपदेश’ -पूज्य बाबामहाराज आर्वीकर, माचणूर सोलापुर)
संकलन - रहाळकर ८ डिसेंबर २०२१