Monday, October 25, 2021
श्री विष्णुसहस्रनाम श्लोक त्रेचाळीस चव्वेचाळीस
४३). “ओम् रामो विराजो विरतो मार्गो नेयो नयोSनय: ।
वीर: शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तम: ॥४३॥”
योगी ज्याचे ठिकाणी रममाण होतात तो ‘राम’ होय अशी राम या शब्दाची व्याख्या आहे. -“रमन्ते यत्र: योगिन: सह: राम: विराम:” ॥ तसेच ‘राम’ या शब्दात ओंकाराच्या तीनही मात्रा येतात. ‘र’ म्हणजे रममाण, म्हणजेच परब्रह्माशी संलग्न - एकरूप ! संपूर्ण विश्व नि त्यातील सर्व जीवांचे आनंदमय विश्रांतिस्थान असा हा ‘रामो’ होय.
सर्वसामान्य जीव आनंदप्राप्ती साठी नेहमीच आसुसलेले असतात, मात्र आनंदाचा मूळ स्त्रोत शोधून काढायची त्यांना सवड नसते. केवळ संत सत्पुरूष, योगी, भक्त नि ज्ञानी त्याचे ठिकाणी रममाण होऊन विश्रांतीचा अनुभव घेतात, विराम पावतात.
आपल्या परमानंदांत मग्न राहिल्याने त्याला मोहमाया किंवा विषयवासना छळत नाहीत, कारण तो निर्विकार, अलिप्त असतो - असा हा ‘विरतो’ (विषयांत ‘रत’ न होणारा म्हणून विरतो) !
श्रीकृष्णाने बंदीवान असलेल्या सोळा हजार कन्यांशी विवाह केला तो त्यांना बंदिवासातून सोडविण्यासाठी आणि त्यांच्यावर कोणतेही लांच्छन लागू नये म्हणून आणि गोपगोपींशी रासक्रिडा देखील विषयवासनेतून नव्हे तर निखळ परमानंदाचा अनुभव देण्यासाठी होती- हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. विषयवासना विसरून भक्तिमार्गावर अग्रेसर करणारा म्हणून श्रीमहाविष्णुला ‘विरजो’ किंवा ‘विरतो’ असे म्हटले आहे.
परमार्थ मार्गावर अग्रेसर करणारा हा ‘मार्गो’ आहे, तर ‘नेयो’ म्हणजे नेता आहे. मात्र याला स्वत:ला कोणी नेता नसल्याने हा ‘अनय’ आहे ! ‘नय’ या शब्दाचा नेणे असाही अर्थ होतो. तो नेतो पण नेला जात नाही म्हणून ‘अनय:’ होय !
हा श्रेष्ठतम नेता ‘धर्मो’ म्हणजेच नीतिमत्तेचा खंदा पुरस्कर्ता आहे आणि विदुत्तम: म्हणजे ज्ञानियांत सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ ! !
४४). “ओम् वैकुंठ: पुरूष: प्राण: प्राणद: प्रणव: पृथु: ।
हिरण्यगर्भ: शत्रुघ्नो व्याप्तो वायुर् अधोक्षज: ॥४४॥”
‘वैकुंठ’ म्हणजे विविध प्रकारच्या गतींचा अवरोध. असे पहा, सृष्टी निर्माण करण्यासाठी भगवंताने पंचमहाभूतें, तिन्ही गुण वगैरे एकत्र केले असले तरी त्यांतील प्रत्येकाचा गुणधर्म एकमेकांहून भिन्न आहेत, खरेतर विरोधी आहेत - पृथ्वीला अग्नी जाळतो, अग्नीला पाणी विझवते, पाण्याला वायू सुकवतो आणि वायू आकाशांत लुप्त होतो. त्रिगुणांचेही तसेच आहे.
मात्र यांतील प्रत्येकाच्या गुणांना कुंठित करून, योग्य त्या प्रमाणात एकमेकात मिसळून आणि त्या सर्वांवर कडक नियंत्रण ठेवून भगवंताने हे विश्व निर्माण केले आहे. म्हणून त्यालाच ‘वैकुंठ’ असे म्हटले जाते ! या सर्व निर्मितीच्या आधीपासूनच ‘तो’ अस्तित्वात होता आदिपुरूष म्हणून , सबब ‘पुरूष:’ अर्थात विश्वात्मा ! तो सर्वव्यापक तर आहेच.
सर्व चराचराला चैतन्यतेज देत जीवंत ठेवणारा हा सर्वांचा ‘प्राण:’ आहे, ‘प्राणद:’ आहे. खरेतर ओंकार स्वरूपात तो यत्र तत्र सर्वत्र आहे - सागराच्या तळा शी नि पर्वतमाथ्यावर देखील ! म्हणूनच त्याला ‘प्रणव:’ असे म्हटले.
प्रपंचरूपाने विस्तार पावणारा हा ‘पृथु’ घनदाट आहे.
‘हिरण्यगर्भ’ चा अर्थ आपण आधी पाहिला आहेच.
‘अधोक्षज:’ म्हणजे अर्धेन्मिलित नेत्र असलेला तो योगियांचा योगी होय.
क्रमश