Sunday, October 31, 2021

 

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक त्रेसष्ठ ते सदुसष्ठ

 

६३).       “ओम् शुभांग: शान्तिद: स्त्रष्टा कुमुद: कुवलेशय :        ।
               गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिय :             ॥६३॥” 

सर्वांगसुंदर आणि शुभलक्षणी असा ‘शुभान्गो’ भगवान् श्रीमहाविष्णु आहे. (मानवी शरीर हे शुभ आणि अशुभ असे दोन्ही लक्षणांचे असते. खरेतर सर्वच प्राण्यांच्या बाबतींत ते लागू पडते, कारण अजूनही , विशेषत: खेडोपाडीं जनावरांचा सौदा करताना शुभाशुभ लक्षणे पडताळून पाहतात. फार पूर्वी वधुपरिक्षेच्या वेळी एखाद्या चाणाक्ष वृध्देचा सल्ला आवर्जून घेतला जाई. या शुभाशुभ लक्षणांचेही एक शास्त्र आहे जे पूर्वापार चालत आले आहे.) असो. 
परमेश्वर ‘शान्तिद:’ आहे हे वेगळ्याने सांगायची गरज नाही, कारण अशांत ईश्वराकडे कुणी ढुंकूनही पाहिले नसते. तो स्वत: शांतचित्त असल्यानेच तो आपल्याला शांती प्रदान करू शकतो ! 
पंचमहाभूतांपासून सृष्टी रचणारा हा ‘स्त्रष्टा’ आहे, तर ‘कुमुद:’ म्हणजे पूर्ण विकसित कमळाप्रमाणे आल्हादक, आनंददायक. 
‘कुवलेशय :’ म्हणजे शेषनागाच्या वेटोळ्यांवर अथांग जलाशयांत शयन करणारा - श्रीविष्णु ! 
‘गो’ या शब्दावर आपण आधी वाचले आहेच. गाय, इंद्रियें, पृथ्वी आदि सर्वांचे हित करणारा नि त्यांचा स्वामी असा ‘गोहितो गोपति ‘, तर ‘गोप्ता’ म्हणजे विश्वनिर्मिती, तिचे लालनपालन नि लय ही स्वत: गुप्त, अदृष्य राहून करणारा ! (खरेतर मायेने स्वत: ला वेढून घेतलेला ! ) 
‘वृष’ म्हणजे धर्म हेही आपण या आधी पाहिले आहेच. धर्म, नीती, न्याय याच दृष्टिकोणामुळे तो वृषभाक्षो आहे, तर अत्यंत धर्मप्रिय असल्याने ‘वृषप्रिय:’ ! 

६४).       “ओम् अनिवर्ती निवृत्त्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिव :     ।
              श्रीवत्सवक्षा : श्रीवास : श्रीपति : श्रीमतांवर :        ॥६४॥” 

‘अनिवर्ती’ म्हणजे   दुष्टदमनार्थ  होणाऱ्या संग्रामातून  कधीही  माघर न घेणारा आणि धर्माला (सदाचरणाला ) कधीही विन्मुख न होणारा ! 
‘निवृत्तात्मा’ म्हणजे सर्वकाही करूनसावरूनही स्वत: नामानिराळा राहणारा अलिप्त, निवृत्त ! 
‘संक्षेपात्मा’ हा शब्द खरोखर गूढ आहे, कारण विश्वनिर्मिती ते प्रलय हे सर्व तो अतिसूक्ष्म रूपात राहून करतो, एखाद्या लहानशा बीजाप्रमाणे. मात्र तोच ‘अणूरणियन् महतोमहीयान्’    या उक्तीचा वारंवार प्रत्यय देत राहतो ! तो चैतन्याने कायम परिपूर्ण असल्याने स्वस्थ राहूच शकत नाही. 
‘क्षेमकृच्छिव :’ म्हणजे कायम क्षेम नि कल्याण इच्छिणारा नि करणारा मंगलमय शिव !  भगवंताच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे, कारण तो भक्तवत्सल आहे. 
‘श्रीवास :’ नि ‘श्रीपती’ म्हणजे लक्ष्मींचा पति , कायम ऐश्वरंयांत लोळणारा असे नसून लक्ष्मी ज्याचेपाशी  नित्य वास करते असा ! असो. 
‘श्रीमतांवर :’ म्हणजे पराकोटीचा श्रीमान, ज्ञान नि ऐश्वर्यांत सर्वश्रेठ असा. 

६५).        “ओम् श्रीद : श्रीश : श्रीनिवास : श्रीनिधि : श्रीविभावन :     ।
                श्रीधर : श्रीकर : श्रेय :  श्रीमान् लोकत्रयाश्रय :            ॥६५॥” 

( हा एक अतिशय सुंदर नि मला खूप आवडणारा श्लोक आहे ! )
हा विश्वेश्वर विश्वाला धनधान्य, समृध्दी, संपत्ती पुरवणारा, साक्षात लक्ष्मींचा भर्ता, ज्ञानवंत, कृपावंत, ऐश्वर्यवान नव्हे ऐश्वर्याचे भांडार, सुख शांती समाधान देणारा, तीनही लोकांचे आश्रयस्थान असा हा श्रीमहाविष्णु आहे ! 

६६).        “ओम् स्वक्ष : स्वंSग : शतानन्दो नन्दिर् ज्योतिर् गणेशवर :     । 
                विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिर् च्छिन्नसंशय :             ॥६६॥” 

विश्वंभर श्रीमहाविष्णु हा स्वयंभू, विश्वात्मा, ब्रह्मांडावर आत्मप्रभेने नजर ठेवणारा असा ‘स्वक्ष :’ आहे. (त्याचे नेत्र आत्मज्योतिस्वरूप आहेत ) खरेतर अखिल ब्रह्मांड हेच मुळी त्याचे तेजोमय अंग आहे ! असा हा ‘स्वंग :’ आहे. तो स्वत: केवळ आनंदरूप असल्याने त्या दिव्य आनंदाचा आस्वाद तो कायम घेत असतो. ‘नन्दिर्ज्योतिगणेश्वर’ म्हणजे सर्व ग्रह तारे नक्षत्रे इत्यादि गणांना प्रकाशमान करणारा. ‘विजितात्मा’ म्हणजे मनासकट सर्व चराचरावर नियंत्रण असलेला . ‘अविधेयात्मा’ म्हणजे ज्याला सिध्द करायला कोणतेही प्रमाण लागत नाही असा. 
षड्गुणैश्वर्यसंपन्न   असल्याने त्याची कीर्ती त्रिभुवनात दुमदुमत राहते असा हा ‘सत्कीर्ति :’ होय. दृढनिश्चयी आणि कोणतीही शंका न येणारा हा ‘च्छिन्नसंशय :’ आहे. 

६७).        “ओम् उदीर्ण : सर्वतश्चक्षुर् अनीश : शाश्वत: स्थिर :          । 
                 भूशयो भूषणो भूतिर्विशोक : शोकनाशन :                 ॥६७॥” 

‘उदीर्ण’ म्हणजे सर्वश्रेठ. पुरूषसूक्तांत वर्णन केल्याप्रमाणे सर्व शिरें, हातपाय, नेत्र वगैरे सर्व त्या एकाच ‘पुरूषाचे’ असल्याने सर्वतचक्षु : असे म्हटले. ‘अनीश : ‘ म्हणजे स्वत: सर्वसत्ताधीश असल्याने इतर कुणाचीही त्याचेवर सत्ता नाही. हा शाश्वत नि स्थिर कसा हे आपण पूर्वी पाहिले आहेच. 
श्रीरामचंद्र वनवासात असताना आणि सीतेचा शोध घेताना सागरकिनारीं भूमीवर शयन केले म्हणून ‘भूशयो’, तर अखिल भरतखंडाचे दैदिप्यवान् ‘भूषण’ ! सीतेचे अपहरण झाल्यावर ‘सीते सीते’ असा शोक केला असला तरी मुळांत तीही केवळ ‘माया’ आहे हे तो जाणून होता, मात्र मानव देहात वास्तव्य असल्याने त्या ‘भूतिर्शोकनाशना’ला शोक करण्याचे सोंग करावे लागले ! 
वास्तविक केवळ स्मरण केल्याने, नाम घेतल्याने सर्व भय, चिंता, शोक, उद्वेग वगैरे नाहीशा होतात असा अनेकांचा अनुभव असेल ! 

क्रमश: 



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?