Sunday, October 17, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक वीस एकवीस

 


२०).     “ओम् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवास: सतांगति:      ।
              अनिरूध्द: सुरानन्दो गोविन्दो गोविदां पति:       ॥२०॥” 

श्रीमहाविष्णुच्या नि:श्वासांतून वेद प्रगट झाले असे आपण मानत आलेलो आहोंत. मात्र याच वेदज्ञानाने अखिल चराचराची निर्मिती झाली. खरेतर ओंकार या नादब्रह्मातून वेद निर्माण झाले, जे भगवंताच्या श्वासांत अनुस्यूत होते. ‘महेष्वासो’ या नामाची उपपत्ती अशी असावी. 
मही म्हणजे पृथ्वी आणि तिचे भरणपोषण करणारा ‘महीभर्ता’, तर लक्ष्मीपती, ऐश्वर्यवान असा ‘श्रीनिवास:’ होय. 
‘सतांगति’ म्हणजे साधू सज्जनांना    सदगतीकडे नेणारा, त्यांचे अंतिम आश्रयस्थान विश्रांतिस्थान. मात्र त्याचे अविरत चालणाऱ्या या महान् कार्यात कुणीच अडथळा घालण्यास धजावत नाही, म्हणून ‘अनिरूध्द’ ! 
‘सुरांना’ म्हणजे आपल्यासकट सर्व देवीदेवतांना अपार आनंदाची लयलूट करणारा हा ‘सुरानन्दो’ आहे, तर ‘गो’ म्हणजे इन्द्रियें , तसेच गाय आणि वाणी देखील. म्हणून या तिन्हींचा स्वामी असा हा ‘गोविदांपती’ आहे ! 

२१).     “ओम् मरीचिर्दमनो हंस: सुपर्णो भुजगोत्तम:         ।
               हिरण्यनाभ: सुतपा: पद्मनाभ: प्रजापति:       ॥२१॥” 

येथें ‘मरीचि’ चा उल्लेख सर्व सूर्यमालिका तसेच अखिल ब्रह्मांडाला तेजस्वी करणाऱ्या चैतन्य-सूर्याचा आहे, तर दुष्ट, अहंकारी प्रवृत्तींचे दमन करणारा ‘मरीचिर्दमनो’ देखील आहे. 
‘हंस’ या शब्दाची उपपत्ती मजेशीर आहे. सहसा सरस्वतीचे वाहन, अतिशय डौलदार दिसणे नि चालणे, नीरक्षीर-विवेक करणारा पक्षी (?) असे आपण जाणतो. मात्र ‘’अहं स:’ म्हणजे ‘मी तूंच आहे ‘ असे म्हटल्यावर संसारभयाची वार्ताच नको ! आणि म्हणूनच श्रीमहाविष्णुला  ‘हंस:’ हे नामाभिधान तंतोतंत लागू पडते ! (शिवाय पृथ्वीतलावर असंख्य अवतार घेऊनही आपले निज आत्मस्वरूप कधीही दृष्टिआड होऊं न देतां नि आपल्याच मायेंत न गुरफटणारा असा हा ‘नीरक्षीर विवेकी’ हंस आहे ! ! ) 

‘सुपर्णो’ चा एक साधा सरळ अर्थ होतो एक सुंदर पान, पिंपळपान - पर्ण ! मला सांगा, प्रलयकालीं जेव्हा सर्वकाही जलमय झालेले असते तेव्हा तें परब्रह्मरूप बालक केवळ एका तरंगत्या पर्णावर कसे खेळत पहुडलेले असते ! म्हणजे प्रलयकालीं देखील ते बालक नि ते पान शिल्लक असतेच ना ! (खूप विषयांतर झालंय खरं, पण राहवले नाही म्हणून लिहिले एवढेच. भूलचूक लेनी देनी ! ) 
दुसऱ्या अर्थाने उत्तम कान असाही होऊ शकतो.  माऊ लींनी श्री गणेशाचे वर्णन करतांना दोन्ही कानांना ‘मीमांसा’ म्हटले आहे - पूर्व मीमांसा म्हणजे कर्मकांड वगैरे तर उत्तर मीमांसा अर्थात ज्ञानकांड किंवा वेदान्त ! किंवा, प्रवृत्ति-निवृत्ती या दोन भक्कम पंखांच्या साहाय्याने आकाशांत उंच उंच भरारी घेणाऱ्या गरुडासमान ! (विष्णुचे वाहन म्हणून गरूडाचेच नाव पुढे येते ! ) 
कर्म नि ज्ञान या सुदृढ भुजांनी विश्वाचे व्यवहार उत्तम प्रकारे चालविणारा हा ‘भुजगोत्तम:’ आहे. केवळ कर्म किंवा निव्वळ ज्ञानाने हा भवसागर तरून जाणे शक्य नाही. कर्म नि ज्ञानरूपी दोन्ही भुजा आवश्यक असतात. या निमित्ताने ‘भावार्थ  रामगीते’तील राम लक्ष्मण यांचा आध्यात्मिक संवाद असा वर्णिला आहे - ‘अरे लक्ष्मणा, केवळ कर्म करून जीवास मुक्ती कशी लाभेल, उलट अनंत जन्मीं कर्में करूनही ज्ञानाविना तीं सर्व व्यर्थ होत. पक्ष्याला आकाशांत भरारी घ्यायला दोन पंख साहाय्य करतात. त्यांतील एक लुळा पडला तर उडणे शक्य नसते. अरे, ज्ञान नि कर्म हे दोन पंख होत, एक उत्तर नि दुसरा पूर्व. त्यांचे साहाय्याने ब्रह्मसापेक्ष, शाश्वत अपरोक्ष सुखाची प्राप्ती होत असते. त्या ज्ञानकर्मावांचुन सुख लाभेना जीवालागुन; त्जयावाचुन आत्सेमज्ञान नाही, जसे भोजनावाचून जीवाला तृप्ती मिळत नाही,’ (स्वैर भाषांतर ! ) 

आणखी एका अर्थाने अनंतनाग आणि वासुकी हे दोन भुजंग भगवंताच्याच विभूती असल्याने श्रीमहाविष्णु ‘भुजगोत्तम’ आहेत ! 
श्री विष्णूचे नाभिस्थानापासून आधी चतुराननु म्हणजे ब्रह्मदेव उत्पन्न झाले नि नंतर त्यांनी सर्व जीवमात्रांसह सृष्टी निर्माण केली असे पुराण सांगते. तें नाभिस्थान सुवर्णाप्रमाणे तेज:पुंज असल्याने ‘हिरण्यनाभ:’ म्हटले, तर कमलदलाप्रमाणे सुंदर नाभी असलेला हा ‘पद्मनाभ:’ होय. 
विश्वकल्याणार्थ ‘नर-नारायण रूपांत याने बदरिकाश्रमांत कठोर तप केले म्हणून याला ‘सुतपा:’ म्हणतात. 

क्रमश: 



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?