Tuesday, October 12, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक चौदा व पंधरा

 १४).    “ओम् सर्वग: सर्वविद्भानु विश्वक्सेनो जनार्दन:       । 

            वेदो वेदविदव्यंगो वेदांगो वेदवित्कवि:                ॥१४॥” 
‘सर्वग:’ म्हणजे सर्वव्यापी. सर्व सूर्यमालिकांसह अखिल ब्रह्मांड व्यापून सर्वत्र संचार करू शकणारा सर्वगामी. अर्थातच सर्व विश्वाला जाणणारा असा ‘सर्वविद्’ आणि‘भानु’ म्हणजे सूर्याप्रमाणे सर्व ब्रह्मांडाला चैतन्यप्रकाश देणारा. 
पुढे ‘विश्वक्सेनो’ असे म्हटले. अखिल विश्वाचा सेनापती, ज्याचा दुष्ट शक्ती आणि शत्रू दरारा बाळगून असतात ! तथापि, भक्तांचे आश्रयस्थान, आशास्थान असणारा भक्त-कैवारी ‘जनार्दन’ ही आहे. आपल्या नि:श्वासांतून वेद निर्माण करणारा हा ‘वेदो’ आहे, तर ते वेदज्ञान जाणणारा ‘वेदविद्’ आहे. वेदज्ञानांत परिपूर्ण असल्याने अव्यंग आहे आणि याचे नि:श्वास म्हणजे प्रत्यक्ष वेद असल्याने ‘वेदांगो’ होय. वेदांच्या ऋचांना छंद, लय नि ताल असतात म्हणून हा ‘वेदविद् कवी’ आहे ! 

१५).    “ओम् लोकाध्यक्ष: सुराध्यक्षो धर्माध्यक्ष: कृताकृत:       । 
            चतुरात्मा चतुर्व्यूह:  चतुर्द्रष्ट: चतुर्भुज:                       ॥१५॥” 

विश्वेश्वर श्रीमहाविष्णु हा स्वर्ग, पाताळ, मृत्युलोकादि तिन्ही लोकांचा स्वामी, नियामक, ॲडमिनिस्ट्रेटर असा ‘लोकाध्यक्ष’ आहे, तसेच सुरांचा म्हणजे देवतांचाही अधिपती आहे. शिवाय धर्म-अधर्म यांचा विवेक करून आचरण करणाऱ्या प्रजेला योग्य ते फल देणारा असा ‘धर्माध्यक्ष’ देखील आहे ! 
विश्वसंचलन करणारा ‘कृत’ तर आहेच, पण विश्वनिर्मितीचे कारण म्हणून ‘अकृत’ असा ‘कृताकृत’ आहे ! 
जीवांचे चार प्रकार सांगितले आहेत, जसे अण्डज जारज स्वेदज नि उद्भिज. या चारही योनींत हा महाविष्णु आत्मरूपाने वास करतो म्हणून याला ‘चतुरात्मा’ म्हटले आहे. 
‘चतुर्व्यूह’ म्हणजे चारही दिशांचे व्यूह रचून हा विश्वनिर्मिती साधतो. वास्तविक वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरूध्द तसेच मन बुध्दी अहंकार व प्रकृती म्हणजेच स्वभावगुणधर्म यांना व्यूह असे म्हटले आहे. 
व्यूह या संज्ञेची दुसरीही एक बाजू सांगतां येईल - जागृती, स्वप्न, सुषुप्ती नि तुरिया या साधकाच्या एकाहून एक वरचढ अवस्थांचा व्यूह रचून साधकाला आपल्याकडे ओढून घेणारा असा श्री महाविष्णु आहे ! 
मात्र विश्वाचा लयही चार प्रकारचे व्यूह रचून तो साधत असतो, सर्वप्रथम पृथ्वीला संपूर्ण जलमय करतो, नंतर सूर्यासह संपूर्ण वातावरण प्रचंड ऊष्णता वाढवून जाळून टाकतो आणि मग शुध्द वायुरूप देऊन सर्व चराचराला सूक्ष्मांत आणत स्वत:त सामावून घेतो ! (हे सर्व वर्णन श्री दासबोधांत समर्थांनी केले आहे ). 
शेवटी, नृसिंह अवतारांत अत्यंत विक्राळ दाढा नि सुळे दाखवीत चतुर्द्ंष्ट आणि चतुर्भुजा धारण केल्या आहेत या श्रीमहाविष्णुने ! 

क्रमश:



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?