Friday, September 24, 2021
गडी, घरगडी, रामा-गडी, देवराम वगैरे !
गडी - घरगडी - रामागडी - देवराम वगैरे !
आज हे काय भलतेच, असंच वाटलं ना तुम्हाला ? पण मला सांगा, आतांशा ती जमात लुप्त होतेय् असं नाही वाटत तुम्हाला ? एकेकाळी बहुतेक घरांत ही मंडळी राजरोस वावरत, अगदी घरचेच असल्यासारखी. कित्येकदा त्यांच्या कित्येक पिढ्या त्या त्या घरकुलांत सुखेनैव नांदलेल्या मला ज्ञात आहेत.
मुंबईचे रामा-गडी सहसा कोंकणी, तर आमच्या मध्य भारतांतले बहुतांश देवराम राजस्थानी पल्लीवाल असत. दोन्ही जमाती अतिशय कष्टाळू नि प्रामाणिक. रामागडी कायम घाईत तर देवराम संथपणे मन लावून कार्यमग्न ! सततची बडबड मात्र रामा कडून ऐकताना प्रारंभीं खूप मजेशीर वाटे. त्याचे विविक्षित हेल काढून बोलणे नि प्रत्येक संवादांत नाक खुपसण्याची त्याला भारी हौस.
कालांतराने त्यांची जागा बहुतांश मोलकरीणींनी घेतली. आतांशा बहुतेक घरांत त्यांचीच ‘हुकुमत’ चालते. कामाचे स्वरूप, मेहनताना, वेळा, सुट्ट्या आणि ‘दांड्या’ त्यांचे मर्जीनुरूप ! बरं गृहिणींना फारसा पर्याय राहिलेला नाही कारण गेली दीड दोन वर्षें ‘अहो’, ‘ह्यांनी’ अशी बिरूदें मिरवणाऱ्या नवरोजींनी ‘गडे’ किंवा खरेतर ‘गड्या’चा रोल मारून मुटकून का होईना आदा करत आणलेला आहे ! (पटतंय् ? घर घरकी बात जो कह रहा हूं ! )
या निमित्ताने मला आठवताहेत रामलाल, चुन्नीलाल, भंवरलाल वगैरे आमचे पुख्तैनी देवराम. सणासुदीं सकट सर्व कार्यभार लीलया नि हंसतमुखाने उचलणारे. सहसा अत्यंत मनमिळाऊ असलेले ‘देशा’ ची याद येतांच त्यांचे डोळे डबडबून येत, कंठ अवरूध्द होई त्यांचा……!
खरंच, आपल्या मातीची ओढ प्रत्येकालाच असते नाही ! आमचेच पहा ना. इन्दौरचा नुसता संदर्भ येताच आमच्या संवादात आपापल्या आठवणी अहमअहमिकेने सांगण्याची चढाओढ सुरू होते !
जी व्यथा देवरामांची तीच रामा-गड्यांची. कधी एकदाचे गणपती येतात नि गांवीं पळतो अशी तुरबुर लागते त्यांना.
आपलीही परदेशस्थ मुलें हाच भाव बाळगून असतील नाही ? मात्र त्यांनी इकडे आल्यावर केवळ इथल्या अडीअडचणी सोडवत न बसतां या मातीचा भरपूर सुगंध मनसोक्त सांठवून घ्यावा आणि तो पुन:पुन्हा भरून घेण्यासाठी वर्षातून किमान एकदा तरी मायभूमीला भेट द्यावी (असे प्रत्येक म्हातारा-म्हातारीला वाटत राहते ). असो.
(विनाकारण विषयांतर करायची खोड जडली आहे मला ! )
लिहिता लिहितां अचानक आठवली ‘वाऱ्यावरची वरात’ मधली पुलंची ‘एक रविवार सकाळ’. तो रामा-गडी किंवा लग्नसराइतला प्रत्यक्ष गडी नसलेला हरकाम्या ‘नारायण’ ही पात्रें ठसठशीतपणे रंगवणाऱ्या पुलंचे खरोखर कौतुक वाटते. खरं तर आपल्या अंवतीभंवती अशी अनेक पात्रें वावरत असतात. आपल्या जवळ जराशी तिरकस दृष्टी मात्र हवी. (आता माझेच पहा ना, ‘गड्यां’वर किती सुंदर भाष्य करून मोकळा झालों ! )
रहाळकर
२३ सप्टेंबर २०२२