Monday, May 31, 2021
न रूचणारे काहीबाही -पुढे.....!
पुढे.......
आज माझ्या धाकट्या बंधूंनी परम पूज्य नानामहाराज तराणेकर यांचे एक उद्बोधन सांगितले. ते म्हणाले होते, “आत्मज्ञान होण्यासाठी नास्तिक व्हावे लागते” !
त्याने एवढेच वाक्य कळवले असले तरी माझ्या मन:चक्षूंपुढे मी तो प्रसंग उभा करून पाहिला. कुणा साधकाने त्यांना प्रश्न केला असणार ‘आस्तिक आणि नास्तिक’ यांना मिळणाऱ्या फलप्राप्तीचा.
आतां, श्री नाना म्हणाले असणार की आस्तिक माणसाची फलप्राप्ती ‘भक्ती’ असेल नि नास्तिकाचे ‘आत्मज्ञान’ !
खरोखर, माऊली म्हणतात तसे भक्ती हे फल आहे सर्व कर्मयोग, ध्यानयोग नि ज्ञान-साधनेचे. खरीखुरी प्रांजळ भक्ती मिळवण्यासाठी माणूस कित्येक कल्प पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो आणि मगच हातीं येते गीता, ज्ञानेश्वरी, सदगुरू आणि नि:सीम भक्ती - अविचल, असीम, ज्ञानोत्तर नि परमनंट !
आत्मज्ञान होण्यासाठी म्हणजेच स्वत: स्वत:चा शोध घेण्यासाठी कोणतेही बाह्योपचार नकोत, आपल्या अंतरंगात बुडी मारता आली पाहिजे आणि ‘माझ्यावाचून’ इतर काहीही अस्तित्वात नाही अशी जाणीव दृढ व्हायला पाहिजे. व्हाय, ती जाणीवही नष्ट व्हायला पाहिजे. (‘जाणीव नेणीव जेथ न रिगे ! अशी अवस्था. ) (अशी हायपॉथेटिकल अवस्था खरोखर शक्य आहे काय याचे उत्तर कोण देणार ? गुरू, ग्रंथ, भगवंत यांना जर मी मानत नसलो तर उत्तर कसे मिळणार ? मला खरंच नास्तिक होता येईल का कधीतरी, निदान माझा माझ्यावर तर विश्वास असणारच ना ? आणि असलाच तर मी नास्तिक कसा ? म्हणूनच केवळ नास्तिक आहे असे म्हणता येत नाही आणि म्हणूनच ‘आत्मज्ञान’ वगैरे दुरापास्त, नॉट माय कप ऑफ टी ! !
त्यापरीस थोडे थोडे आस्तिक असणे अधिक कन्व्हीनियंट नाही काय ? तथापि, माझा आक्षेप आहे तो दिखावू आस्तिकतेला. कोणतेही स्तोम न करता मनोमनीं आस्तिक राहावे अशी माझी भूमिका आहे. स्तोत्रें, जपजाप्य, पूजाअर्चा वगैरे सर्व बाह्य उपचार सोडून आपल्या इष्टाचे स्मरण करत राहावे, त्याचे दर्शन स्पर्षन संभाषण नि उद्बोधनाचा मनोमन आनंद घेत राहावा निवान्तपणे, अशी माझी आस्तिकतेची धारणा आहे.
(नास्तिक ‘होण्याचा’ विचार मी आजच सोडला आहे ! ! )
२७ मई २०२१