Friday, February 19, 2021
ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे सोळा ११६
ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे सोळा
श्री ज्ञानेश्वर महाराज ‘पुरूषोत्तम योगा’चा समारोप करताना म्हणाले की
‘श्रीहरीवक्त्रींची अक्षरें । संजयो सांगितली आदरें । तिहीं ‘अंधु’ तोही अवसरें । सुखिया जाला ॥’ (श्रीहरीचे मुखातून आलेले शब्द संजय आदरपूर्वक अंध धृतराष्ट्राला सांगता झाला, जेणे करून अंतसमयीं तो अंध देखील सुखी झाला)
‘तेंचि मऱ्हाटेनि विन्यासें । मियां उन्मेषें ठसेंठोंबसें । ती जाणें नेणें तैसें । निरोपिलें ॥ (तेच श्रीकृष्ण वचनामृत मी मराठी भाषेंत ओबडधोबड रीतीने विस्तारपूर्वक आणि माझ्या बुध्दी नि कुवतीनुसार सांगितले आहे )
‘सेवंतीये अरसिकांही । आंग पाहतां विशेषु नाही । परी सौरभ्य नेलें तिहीं । भ्रमरीं जाणिजे ॥ (अरसिक माणसाला शेवंतीकडे ती कांटेरी असल्याने पाहाणे फारसे रुचत नाही, मात्र तिच्या फुलांचा दरवळणारा सुगंध भ्रमरालाच कळतो ! )
‘तैसें घडतें प्रमेय घेइजे । उणें ते मज देइजे । जे नेणणे हेचि सहजें । रूप कीं बाळा ॥ (त्या प्रमाणे (या गीताग्रंथातील) जे सिध्दान्त स्वीकारार्ह वाटतील ते घ्यावे आणि न्यून वाटतील ते मला परत करावे ; कारण सर्वकाही न समजणे हेच बालकाचे सहज स्वरूप आहे ! )
‘परी नेणतें जऱ्ही होये । तऱ्ही देखोनि बाप की माये । हर्ष केही न समाये । चोज करिती ॥ (तथापि ते बालक अज्ञानी असले तरी आई-बापांनी त्याला पाहतांच त्यांचा आनंद ओसंडून वाहतो आणि ते त्याचे कोडकौतुक करतात ! )
‘तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजे । तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजो जी ॥ (तसे तुम्ही संत श्रोते माझे माहेर आहांत महाराज, आणि तुम्ही भेटलांत म्हणून या ग्रंथाच्या निमित्ताने मी तुमचेशी लडिवाळपणा केला हे कृपया लक्षात घ्यावे ! )
‘आतां विश्वात्मकु हा । माझा स्वामी निवृत्तिराजा । तो अवधारू वाक् पूजा । ज्ञानदेवो म्हणे ॥ (आता विश्वरूप असलेले माझे सदगुरू निवृत्तिराय माझी वाणीरूप पूजा स्वीकारोत एवढीच या ज्ञानदेवाची प्रार्थना आहे ! )
किती किती सुंदर समारोप मागील अध्यायाचा ! तीच उन्मेषवाणी सोळाव्या ‘दैवासुरसंपद् विभागयोगातील प्रास्ताविकांत अधिकच बहरलेली लक्षात येईल !
श्री ज्ञानदेव आपली गुरूवंदना अतिशय रोमहर्षक शब्दांत आणि विलक्षण उपमा अलंकारांसह मुखरित करतात, ‘कवीं कवीनां’ ही उक्ती सार्थ करीत ! - (बहुतेक सर्व शब्द आता प्रचलित नाहीत म्हणून शब्दार्थ आवश्यक ठरतात. सांभाळून घ्यावे ही विनंती ! )
‘माळववीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु । अद्वयाब्जिनी-विकाशु । वंदूं आतां ॥ (ज्ञानदेवांनी येथे सदगुरूंवर ज्ञानसूर्याचे रूपक रचले आहे - विश्वाचा आभास नष्ट करणारा , अद्वैतरूपी कमलिनीचा विकास करणारा सूर्य मोठ्या दिमाखात उदय पावला आहे, त्याला मी वंदन करतो. )
‘जो अविद्यारातीं रूसोनियां । गिळी ज्ञानाज्ञानचांदणियां । जो सुदिनु करी ज्ञानियां । स्वबोधाचा ॥ (जो ज्ञानरूप सूर्य अज्ञानरूपी रात्रीवर ‘रूसतो’ म्हणजे त्याला नष्ट करतो, तसेच जगांतील अज्ञान आणि ज्ञानरूपी देखील चांदण्यांना गिळून टाकतो ; जो ज्ञानीजनांना आत्मबोधाची चैतन्यरूप पहांट करून देतो ! )
‘जेणें विवळतिये (उगवल्यामुळे) सवळे (पक्षी) । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे । सांडिती देहाहंतेची अविसाळें (घरटीं) । जीवपक्षी ॥ (ज्ञानसूर्याच्या उदयामुळे जीवांचे आत्मज्ञानरूपी नेत्र उघडतात आणि ‘मी देह आहे’ अशा अहंकाररूपी घरट्यांतून ते जीवपक्षी बाहेर पडतात ! ! )
‘लिंगदेह कमळाचा पोटीं । वेंचु तया चिद्भ्रमराचा । बंदिमोक्षु जयाचा । उदैला होय ॥ (लिंगदेह रूपी कमळांत जो जीवरूपी भ्रमर अडकून पडला होता तो गुरूकृपेची पहांट होतांच सहज मोकळा होतो )
‘शब्दाचिया आसकडीं (अडचणींत) । भेदनदीच्या दोहीं थडीं । आरडातें (ओरडते) विरहवेडीं । बुध्दिबोधु ॥
(शब्दांच्या जंजाळात अडकलेले भेद-अभेद किंवा द्वैत अद्वैत, अथवा बुध्दी आणि बोध , नदीच्या दोन्ही काठांवरून दोन पक्षी (चक्रवाक् जोडी) एकमेकांना विरहव्याकुळ होत साद घालतात.
(अवघड आहे हे समजायला, पण येथे चक्रवाक् पक्षाच्या जोडीचा संदर्भ आहे. कवि-कल्पनेनुसार या पक्षाचे नर-मादी दिवसां एकत्र असले तरी रात्रीं वेगवेगळे असतात आणि रात्रभर एकमेकांना साद घालत राहतात. श्री ज्ञानेश्वर महाराज या नर-मादीच्या जोडीला ‘द्वैत-अद्वैत’, ‘भेद-अभेद’ किंवा बुध्दी नि बोध (आत्मज्ञान) असे संबोधतात.)
‘तया चक्रवाकाचे मिथुन । सामरस्याचे समाधान । भोगवी जो चिद् गगन । भुवनदिवा ॥ (त्या दोन पक्षांना मैथुनातून मिळणारे समाघान किंवा आनंद जो सूर्योदय मिळवून देतो (बुध्दी नि आत्मबोधाचे ऐक्य घडवून आणतो) तोच श्रीगुरूसूर्य चैतन्यरूपी आकाशांत लावलेला जणू दीप होय ! )
लई लई भारी होतंय् ! असो !
‘जेणे पाहलिये पाहांटे । भेदाची चोर-वेळ फिटे । रिघती आत्मानुभव वाटे । पांथिक योगी ॥ (ज्या सूर्याचा पहांटे उदय होतांच अंधाराची चोर वेळ संपते आणि आत्मानुभव मिळवण्यासाठी जीवरूपी पाथस्थ योगी मार्गक्रमण करू लागतात ). (वास्तविक आत्मज्ञान प्राप्त होतांच द्वैत नाहीसे झाल्याने मुमुक्षु आत्मानंदांत रमून जातात ! )
श्री ज्ञानदेव सदगुरूंचे स्तवन करत असतांना इतक्या भावोत्कट स्थितींत असतात की त्याचे वर्णन शब्दांत करणे अशक्यप्राय व्हावे ! थोड्या विश्रांतीनंतर त्यांनीच सांगितलेले निरूपण पुढे लिहीन म्हणतो !
क्रमश:.....