Saturday, January 30, 2021
नि:संगाचा सांगाती
“नि:संगाचा सांगातु..........!
‘म्हणौनि तो भगवंतु । जो नि:संगाचा सांगातु । तो म्हणें पार्था दत्तचित्तु । होई आतां ॥ .....
ही ओंवी वाचता वाचतां ‘नि:संगाचा सांगातु’ या शब्दावर चांगलाच रेंगाळलों ! अचानक अनिलांच्या ‘सांगाती’ या काव्यसंग्रहातल्या कवितेचे शब्द झर्रकन तरळून गेले. !
‘हातीं हात धरून माझा
चालवणारा कोण तूं ?
जेथे जातो तेथे माझा
काय म्हणून सांगाती ?
आवडतोस तूं मला
की नावडतोस ?
येवढे मात्र जाणवते कीं
माझा हात धरून असे चालवलेलें
मला मुळीच खपत नाही !
स्वच्छंदाला माझ्या त्याचा करकोचा पडतो ना ! !
झिडकारून तुझा हात
म्हणून दूर पळून जातो
बागडतों, अडखळतों, धडपडतों
केवळ तूं कनवाळू पाठीशीं उभा म्हणून
माझे दु:ख जाणवून
उगाच किंचाळत सुटतों -
एऱ्हवीं तूं नसतांना
पडलों अन् लागलें तर
पुन्हा उठून हुंदडतों ! !
खांद्यावर हात माझ्या सदोदित
असा ठेवूं नकोस ना !
अशानेच माझी वाढ खुंटत जाते
असे मला वाटते ना ! !
बरोबरीचे वागणें हें खरोखरीचे आहे का ?
खूप खूप माझी उंची एकाकी
माझी मलाच वाढवूं दे -
तुझ्याहून नसली तरी तुझ्यासमान होऊं दे
तोंवर असे दूरदुरून,
तुझा हात दूर करून
मान उंच उभारून
तुझ्याकडे धिटकारून पाहूं दे ! ! ! ‘
कवी अनिलांचा हा सांगाती आणि माऊलींचा सांगाती एकच आहेत असे नि:संदिग्धपणे मानले तरी माऊली सर्वसंग परित्याग करून त्या ‘सांगाती’ ला आळवतात तर कवी आपल्या ‘स्वत्वा’ला बाधा येऊ न देतां, स्वच्छंदावर गदा येऊ न देतां, त्याला दुरून अनुभवतोय - तो संगट आहे या विश्वासाने !
बुचकळ्यात टाकणारे हे विधान वरवर पाहिले तर निराळे भासले तरी मुळात अनुभव एकच आहे ना ? श्रेयस की प्रेयस ? ?
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती - !
रहाळकर
३० जानेवारी २०२१