Monday, August 31, 2020
आनंदी आनंद गडे !
आनंदी आनंद गडे !
माझे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ स्नेही श्री देशपांडे काकांनी अकराव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मज भागवत चंद्रशेखरला एक यॉर्कर कम् बौन्सर टाकून मला गारद केले. तथापि म्यां हॅन्डिकॅप्ड बोलरने पहिले षटक् असे टाकायचे ठरवलें -
पण जरा धीर धरी रे रघुरामा !
त्याचे असे झाले की त्यांनी वाटस्ॲप वर माझेसाठी एक मेसेज पाठवून स्वत:च त्याचे उत्तरही कळवून टाकले. आदर्श गुरूप्रमाणे त्यांनी प्रश्न केला की ‘आपल्याला जीवनांत आनंदाचे प्रसंग वरचेवर येत राहतात पण त्या आनंदांत आणि ब्रह्मानंदांत काय फरक आहे’.
त्यावरचे त्यांचे विष्लेषण थोडक्यात पण मार्मिक आहे. ते म्हणतात, ‘काल नव्हता, आज आहे पण उद्यापर्यंत ही टिकत नाही तो जीवनानंद किंवा विषयानंद. मात्र जो काल अनेकपटींनी होता, आज अनेकानेक पटींनी आहे आणि उद्यां त्या आनंदाला पारावार नाही तो ब्रह्मानंद होय !’
व्वा ! क्या बात है ! !
आतां बी.एस्. चंद्रशेखरचा ‘रन अप्’ पाहूं -
मुळांत इन्द्रियांद्वारे मिळणारा आनंद नेहमीच हवाहवासा, न विटणारा असावा हे प्रत्येक मर्त्य माणसाचे ईप्सित असतेच, मात्र सॉक्रेटीसचा हा मर्त्य मानव त्या सुखाला नि आनंदालाही लवकरच ‘विटतो’ नि नवनवीन सुखाच्या मागे लागला असतानाच एखाद्या इंद्रियातीत, दैवी आनंदाची त्याला चाहूल लागते, जे त्याचे अंतर्मनाची तार छेडते. याच दिव्यानंदाचा ध्यास घेत तो आनंद पुन:पुन्हा घेत राहावा असे त्याला वाटू लागते आणि मग शब्द स्पर्ष रस रूप गंधादि विषयानंद हळूहळू मंदावत जातो. दिव्यानंद, आत्मानंद, ब्रह्मानंद इत्यादि शब्दांच्या वाग्जंजाळांतून बाहेर पडून तो हा आनंद ‘बाहेरच्या’ जगांत शोधू लागतो. पण त्याची इवलीशीही झुळुक त्याचे पर्यंत पोहोचतच नाही, कारण तो आनंद मुळांत बाहेर नसतोच मुळी ! तो तर आपल्याच अंतर्यामी दडून बसलेला असतो. त्याला टॅप करा, शोधा, खणून काढा असे सदग्रंथ, सत्पुरूष, संत नि महात्मे जीव तोडून सांगत असतात. आपण ते सर्व ऐकून न ऐकल्यासारखे राहतो, वागतो.
‘दॅट पेरेन्नियल स्प्रिंग ऑफ जॉय इज विदीन यू sss!’ The Saints say so !
माईंड यू, पेरेन्नियल वर लक्ष द्या - अवीट, अविच्छिन्न, कंटीन्युअस, अन्-इंटर्रप्टेड !
तो दिव्यानंद, परमानंद पाहण्याचे सदभाग्य मला लाभले आहे कित्येक सत्पुरूषांचे दर्शनांतून. त्यांचे तेज, ऑरा, कायम प्रसन्न व्यक्तिमत्व त्या ब्रह्मानंदाची खूण पटवून जातात. त्यांचे सान्निध्यांत ते सुख आपणही थोड्याफार प्रमाणांत अनुभवतो, मात्र केवल त्या ॲम्बियन्स मधे असेतोंवरच ! पुन्हा आपण आपल्या दैनंदिन प्रापंचिक सुखांत गुरफटून जातो.
तरीही, त्या सोकॉल्ड ब्रह्मानंदाला, स्वरूपानंदाला, आत्मानंदाला सामोरे जाण्यासाठी दररोज काही काळ तरी आपल्याला जंगलांत जायला हवे, सर्व प्रापंचिक कर्में करत असतांनाही. स्वामी म्हणत, ‘हॅन्ड्स इन सोसायटी , हेड इन द फॉरेस्ट’ ! ओजे ओजें ध्यान करावे ध्यान धरावे ! बुध्दीचे ‘यान’ करावे. कठीण नाही ते, नि सोप्पे ही नाही हो !
माझं पहिलं षटक् निर्धाव गेलं बहुतेक, नि विकेटलेस ही ! !
प्रभु रहाळकर
३१ ऑगस्ट २०२०