Friday, July 24, 2020

 

पुत्र सांगतो चरित पित्याचे.......!

पुत्र सांगतो चरित पित्याचें........!”


आपल्या तीर्थरूपांचे गुण-गौरव-गान करणे तसे नवीन नाही. अगदी लव-कुशांचे जमान्या पासून ती परंपरा कायम आहे. अनेक दिवसांपासून हा विचार माझ्याही मनांत घर करून होता, मात्र याला चालना दिली आळंदीच्या श्री दिक्षित यांनी. एकदा माऊली-दर्शनासाठी गेलो असताना त्यांनी माझे वडिलांच्या उदंड व्यासंगाची स्तुती केली आणि मी त्यांचे विषयीं लिहावे अशी जणू आज्ञा केली. शिवाय त्यांच्या विविध पैलूंचे दर्शन  व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सबब हा अल्पसा प्रयत्न

खरें सांगायचे तर आमचे पूर्वायुष्यांत वडिलांचा सहवास तसा कमी राहिला, कारण जवळजवळ पंधरा सोळा वर्षे ते नोकरीतल्या बदल्यांमुळे घरापासून लांब राहिले आणि आम्हा सर्व भावंडांचे शिक्षण सलग पूर्ण व्हावे म्हणून आम्ही आई समवेत इंदौरला वास्तव्यास होतो. आणि त्यांचे सेवानिवृत्तीचे सुमारास आमच्या नौकऱ्यांमुळे आम्ही लांब राहिलो ! असो

तथापि, आतां आम्हा दोघांच्याही सेवानिवृत्ति नंतर त्यांचे अनेकविध पैलूंचे दर्शन होत आहे, आणि आतां ते थोडे थोडे कळू लागलेत. खरं सांगायचं तर आपण आपल्यालाच कुठे ओळखत असतो ? ‘दुसऱ्यालासमजून घेण्याच्या नादात आपण आपलेच प्रतिबिंब शोधत असतो ! त्या मुळे वडिलांच्याअसण्याच्याशोधात मीच मला सापडलो तर आश्चर्य वाटू नये


सबब, ‘वडिलांचे चरित्र थोडक्या शब्दांत मला लिहून द्याया श्री दिक्षितांचे विनंतीवजा आज्ञेला मान देऊन वडिलांचे मला माहीत असलेले आणि कळलेले वस्तुनिष्ठ दर्शन घडवण्याचा प्रांजळ प्रयत्न करणार आहे


त्यांचीजीवनीऊर्फबायो-डेटाथोडक्यांत अशी

श्री शंकर नरहर रहाळकर, १२ जुलै १९१४ सालीं इन्दौर येथे जन्म. त्यांचे वडील ख्यातनाम साहित्यिक, कवि, समीक्षक आणि होळकर राज्यांतमशीर बहादुरनिमुन्तझिम--खास-बहादुरइत्यादि सन्माननीय बिरूदें मिळविलेले. माझे वडिलांचे म्हणजे अण्णांचे शिक्षण एम्. . इकॉनॉमिक्स आणि एच्. सी. एस्. (होळकर सिव्हील सर्व्हिस) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. साहित्यांत वडिलोपार्जित रूची, स्वत: साहित्य प्राज्ञ साहित्य अलंकार. कॉलेज जीवनांत लेख आणि कविता प्रकाशित. आधीं होळकर राज्यांतअमीन’, मग अमीन दरबार वकील, नंतर मध्यभारत आणि मध्यप्रदेशांत व्हिलेज पंचायत ऑफिसर, तहसीलदार, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, लॅंड ॲक्विझीशन ऑफिसर, डेप्यूटी कलेक्टर आणि शेवटीं संपूर्ण मध्यप्रदेश राज्याचे कॉलोनायझेशन ऑफिसर (कलेक्टर रॅंक) ! १९६७ सालीं शासकीय सेवेतून सन्मानपूर्वक निवृत्ती. कुठलाही खोटानाटा आरोप किंवा डाग लागतां सेवा घडली म्हणून परमेश्वराला थॅंक्स देण्यासाठी सोळा-सोमवार चे कठीण व्रत घेऊन ते पार पाडले


पण मला विशेषत्वाने सांगायचंय ते त्यांच्या अनेकविध पैलूं विषयीं . मला ठळकपणे आठवताहेत ते दिवस जेव्हा संत महात्मे साधू सत्पुरूष यांचे दर्शन स्पर्षन नि संभाषणासाछी ते जीवाचे रान करीत अक्षरश: दऱ्याखोऱ्यांत अरण्यांत नि नर्मदेकांठच्या मठांत ऊन वारा पाऊस यांची तमा बाळगतां मैलचे मैल तुडवीत जात. मात्र त्यांचे तेथील स्वागतही त्याच तोलामोलाचे होई. तेथील साधू सत्पुरूष त्यांना अतिशय प्रेमादर पूर्वक वागवीत. ही मंडळी आपसांत एवढे तासनतास काय बोलतात ते माझ्या बालबुध्दिला कळत नसे, अजूनही समजणार नाही कदाचित. पण त्या वातावरणाचा ठसा खोलवर कुठेतरी उमटला आहे हे निश्चित. परत निघतांना वडिलांच्या आणि त्या सत्पुरूषांच्या चेहेऱ्यावरील समाधान आणि आनंद मनांत घर करून राहिला आहे.

मी थोडा मोठा झाल्यावर, म्हणजे मला शिंगें फुटू लागल्यावर, मी एकदां कार्ल मार्क्स चे एक वचन - ‘अध्यात्म ही अफूची गोळी आहे’ - त्यांनासुनावण्याचंधार्ष्ट्य केलं होतं. त्यावर ते नुसतेच हंसले होते. मात्र त्या नंतर केवळ पंधराच दिवसांनी त्यांनी नाथमंदिरांतसंतांचा साम्यवादयांवर दीड तास प्रवचन केलेलं मला चांगले स्मरतेंय् ! आणि या विषयावर त्यांची क्षमा मागायची कुवत ही माझ्यांत नव्हती ! असो

साधू, संत, विप्र यांचा सन्मान ते स्वत: त्यांचे चरण-प्रक्षालन करून पूजन करीत. श्रीमत् शंकराचार्यांची पाद्यपूजा ते आमचे राहत्या घरी आले असतांना आजोबांसमक्ष केलेली मला ठळकपणे आठवतेंय. खूप थाटांत झाला होता तो सोहळा. तथापि एऱ्हवीं सुध्दा त्यांना विप्रपूजन अतिशय प्रिय असते. इतकेच नव्हे तर वाघोलीतील वसतिगृहातील मुलांचें अनवाणी पाय पाहून श्रीराम लक्ष्मण सीता यांचे अरण्यांतील अनवाणी चालणे आठवते नि मुलांसाठी तांतडीने पायतणांची सोय केली जाते. यांतील भगवत् भाव मला महत्वाचा वाटतो आणि त्या अनुभूती प्रत जाण्यासाठी आपल्याला अजून किती पायमल्ली करायची आहे ही जाणीव बेचैन करते


त्यांचा व्यासंग दांडगा आहे. संतवांग्मयाचं त्यांचे वाचन नि आकलन अचाट आहे. त्यांतील रसग्रहणा बरोबरच त्यातील त्रुटी किंवा विसंगतींवर ते कधी कधी अतिशय आक्रमकपणे प्रतिपादन करतात. गोस्वामी तुलसीकृत रामचरित मानस त्यांना मुखोद्गत आहे. अत्यंत आवडता ग्रंथ आहे तो त्यांचा. त्यांतील अनेकानेक बारकावे आणि खुब्या त्यांना कंठस्थ आहेत. ‘मानसाबद्दल बोलतांना ते भावविभोर होतात, अवरूध्द कंठाने ते तरी बोलत राहतात. नातवंडांनाकाक-भ्रुशुंडीच्या गोष्टी सांगतांना ते सर्व कथानकांत आकंठ बुडालेले असतात. सुनांना, आणि ऐकायला समोर मुलें असलीच तर, त्यांना गोस्वामी कुठे, काय, कोणत्या संदर्भांत कां म्हणाले ते रसाळपणे सांगतात. आपले म्हणणे आग्रहाने नि जोरांत मांडतात.


त्यांच्यातील अभिजात कवी ज्ञानेश्वरी सारख्या भगवंताच्या गीताकडे वळता तरच नवल ! या आधी अनेकवेळां वाचून, ऐकून, अभ्यासून झालेल्या या ग्रंथाकडे ते आता एका नव्या प्रयोगाकडे वळले आहेत. “ज्ञानेश्वरींत आलेली भगवंताची अनेक सहस्त्र नामे आणि त्या नामांचा प्रभावअसे त्यांचे शोधकार्य चालू आहे. अर्धेअधिक अंतर त्यांनी कधीच कापले आहे. तरूणांना लाजवणाऱ्या उत्साहाने आणि जोमाने हे कार्य हल्ली ते अव्याहतपणे करीत आहेत.

हा जोम नि उत्साह त्यांना कुठून मिळतो ? त्यांचेच आंखीव रेखीव नियमबद्ध चाकोरीतून. आजही ते सूर्योदयापूर्वी अनेक तास आधी उठतात. स्वत:ची खोली झाडून काढतात. अंथरूण-पांघरूण मच्छरदाणी आवरून ठेवतात. नियमितपणे ओंकार, ध्यान, भजन, योगासने करतात. पहिला चहा स्वत: करून घेतात. रेडिओवर पहांटेची सनई, बातम्या नि चिंतन हे सदर ऐकून दीड तास मोकळ्या हवेंत फिरून येतात. आंघोळ, संध्या, जप वगैरे झाल्यावर दूध आणि नाश्ता घेतात. दररोजरामचरित मानस गानऐकून थोडा वेळ विश्रांती घेतात. अर्ध्या पाऊण तासातच पुन्हा उठून त्यांचे वाचन लेखन सुरू होते. माफक जेवण नि थोडीशीच वामकुक्षी करून पुन्हा लेखन वाचन सुरू ! चार चा चहा झाल्यावर पुन्हा एकदा तास-सव्वा तास पायीं फिरून येतात. संध्याकाळी अगदी हलके जेवण - म्हणजे एक ते दीड फुलका नि दूध आणि साडे आठ वाजता झोपी जातात

या सर्व दिनचर्येंत सहसा कधीच बदल होत नाही. त्यामुळे त्यांचे विलक्षण इच्छाशक्तींत सातत्य टिकून राहात असावे. प्रत्येक गोष्ट नीटनेटकी आणि वेळचेवेळी करण्याचा त्यांचा दंडक असतो.त्यांना येणाऱ्या प्रत्येक टपालाची पोंच पत्रोत्तर कधीच पेंडिंग पडून राहात नाही


सेवा निवृच्तीनंतर अनेकांना आता पुढे वेळ कसा काढावा ते समजत नाही. मात्र अण्णांनी स्वत:ला इतके गुंतवून घेतले आहे की त्यांना दिवसाकाठी चोवीसच काय पण अठ्ठावीस तास मिळाले तरी ते अपुरे पडतील ! प्रवचनें, कीर्तन, सत्संग, व्यासंग, लेखन इत्यादींमधे त्यांनी स्वत:ला इतके जिरवून घेतलंय् की ऐहिक व्यवहार, उणीदुणी, मानापमान, स्तुति-निंदा यांकडे ते सहज दुर्लक्ष करू शकतात. आमच्या आईचे निधनानंतर ते काही काळच विचलित झालेसे वाटले पण पुन्हा लवकरच सांवरून मोक्षसंन्यासयोग प्रत्यक्ष जगत आहेत अशी आम्हा सर्वांची भावना आहे. आमची आई आणि अण्णांनी आम्हा चारही भावांना आणि दोन्ही बहिणींना उत्तम प्रकारेशिक्षितनिसुसंस्कारितकेले हीच आमचे दृष्टीने भली मोठी प्रॉपर्टी दिली आहे अशी आम्हा सर्वांची खात्री आहे.


वास्तविक या लिखाणाचाचरित्रलेखनहा उद्देश अजिबात नव्हता. याच्या कित्येक शतपट गोष्टी लहानपणापासून आजवर भावल्या. त्यांचा समावेश करू म्हटले तर ते काही खंडांत होईल ! मात्र तसा विचार नसून ही केवळ भावांजुळी आहे आणि ती तीर्थरूप अण्णांचे चरणीं सादर समर्पण


प्रभु रहाळकर 

१२ जुलै १९९९ 

वाघोली पुणे 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?