Sunday, April 22, 2018

 

आरोग्य धाम (खंड आठवा)

आरोग्य धाम (खंड आठ)
एखादे मंगल कार्य सुरूं करण्याची स्फूर्ती येते तेव्हा वेळ वांया न घालवतां ते त्वरित प्रारंभ करावे. एक म्हण प्रसिध्दच आहे, ‘ॲन एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप’ ! याच संकेतानुरूप जगत् बंधूंनी फाल्गुन महिन्याच्या अखेरीस व्याकरणाचा पहिला धडा जीवनला दिला.
 ‘आयुर्वेदाला’ पाचवा वेद म्हणतात कारण तो प्रत्यक्ष भगवन्ताच्या मुखातून प्रसृत झाला आहे त्या आधीच्या चार वेदांनंतर. तो संस्कृत मधे सांगितला नि लिहिला गेलाय् , ईश्वराच्या भाषेंत.
म्हणून पहिली प्राथमिकता ठरली त्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची. मात्र जीवनला व्याकरण शिकण्याची फारशी इच्छा नव्हती कारण त्याच्या मतें ती केवळ घोकंपट्टी असते. अर्थात् सोपी नक्कीच नव्हे. तथापि त्याला त्या भाषेच्या उपयुक्तते बद्दल आदर होता.
जगत् बंधू रूग्णांना तपासत असतांना जीवनने शेजारी बसून एकूणच प्रक्रिया अवलोकन करावी असे त्यांना वाटे. त्या नंतर प्रारंभ होई वनस्पतींपासून औषधें बनवण्याचा, ज्यांत त्यांचा मुलगा त्यांना साहाय्य करत असे.
त्यांनी आपल्या चिरंजीवाला निरनिराळे कंद नि झुडुपांची माहिती शिकवली आणि केवळ नजरेने त्यांना ओळखण्याची किमया सांगितली, ज्यांचा उपयोग औषध तयार करण्यांत व्हायचा.
मात्र जीवनला सर्वात जास्त आवडायची ‘नाडी-परिक्षा’. एका चिकित्सकाचा मुलगा असल्याने लहानपणापासूनच तो काही गोष्टी शिकत आलेला होता, जसे दररोज येणारा ताप किंवा एक नि दोन दिवसांआड येणारा. नि हे तो करायचा नाडीच्या स्पंदनांवरून. मात्र जेव्हा त्याच्या वडिलांनी नाडी परिक्षणाचा प्राथमिक धडा दिला त्यावेळेस तो अक्षरश: अचंबित झाला होता. त्याला अजूनही वडिलांचे ते शब्द स्पष्टपणे आठवतात.
आरंभीची प्रार्थना झाल्यावर जगत् बंधू म्हणाले होते – ‘रोगनिदान करण्यापूर्वी रूग्णाबद्दलची सर्व माहिती घ्यायची असते नि नंतर रूग्णाच्या खोलीत शिरतांच तिथला वास (दर्प) पडताळून पाहावा. पेशंटकडे नीट पहावें डोक्यापासून पायांपर्यंत. मग त्याला काय त्रास होतोय तें विचारावे. त्यायोगें आजारांची लक्षणे समजतील. मग सुरू होतो सर्वात महत्वाचा भाग – रूग्णाला तपासायचा. प्रथम तपासावी नाडी, मग जीभ, नंतर पोट नि आंतडी ; मात्र सर्वप्रथम नाडीच.’
जगत् बंधूंनी त्यावेळेस एक संस्कृत श्लोक म्हटला,
“आदौ सर्वेषु रोगेषु नाडी जिव्हाग्रे संभवम्
परीक्षाम् करयेत् वैद्यक पश्चाद् रोगम चिकित्सयेत्”

‘एक अतिशय अवघड परीक्षा आहे केवळ नाडीचे ठोके तपासून रोगनिदान करण्याची. अर्थात् आरोग्यसंपन्न व्यक्तींची नाडीपरिक्ष त्या मानाने बरीच सोपी असते आणि माझ्या लक्षांत आलंय् की तू सुध्दा ती सहज करूं शकशील.” जगत् बंधू कौतुकाने स्मित करीत म्हणाले.
मात्र पुढच्याच क्षणीं ते गंभीर झाले नि म्हणाले, “या परीक्षेने रोगनिदान तर होईलच पण त्याच वेळी रोगाची व्याप्ती, बरे होण्यासाठी लागणारा कालावधी, इतकेच नव्हे तर आजार जीवघेणा असेल तर मृत्यूची निश्चित वेळ देखील कळूं शकते. ही खरोखर अतिसूक्ष्म अशी अनुभूती असते ज्ञाना पलीकडील. याची पहिली पायरी आहे कमालीचे ध्यान करण्याची संवय. सर्वसाधारणपणे नाडी तपासतांना डोळे आपोआप मिटून घेतले जातात कारण नाडीचे प्रत्येक स्पंदन अतिशय एकाग्र होऊन पाहायचे असते, त्या स्पंदनांचे स्वाभाविक स्वरूप नि ते कुठल्या दिशेने चालत आहेत याचा अंदाज घेत. तुमचे चित्त्त कशाने, अगदी कशानेही आजुबाजूच्या घटनांमुळे विचलित होता कामा नये. जाणीवेच्याही पलीकडे असणारी शक्ती, जी संपूर्ण विश्वनिर्मितीच्या मुळापर्यंत पोहोचते, तिचे आकलन होण्यासाठी एखाद्या योग्याची पात्रता असावी लागते. आयुर्वेदांत प्राविण्य मिळवलेला असा हा योगी आजाराचे स्वरूप नि त्याचे कार्य प्रत्यक्ष पाहून शकतो केवळ नाडी परीक्षेवरून. त्याला समजते त्रिदोषांमघले कुणाचे प्राबल्य आहे ते. वात, पित्त्त नि कफ किंवा श्लेष्म हे ते त्रिदोष होत. त्याचप्रमाणे त्या दोषाची व्याप्तीसुध्दा कळते कोणकोणत्या अवयवांपर्यंत पोहोचलेली किंवा रक्तांत भिनलेली, अगदी गणिताच्या समीकरणा सारखी ! आणि नंतर –“

जगत् बंधू अधिकच गंभीर झाले. “तुम्ही जर आयुर्वेदाचा तात्विक अभ्यास  नि या नाडीपरीक्षेत यशस्वीपणे नैपुण्य मिळवले तर रोगाचे मुळापर्यंत पोहोचण्याचे, नव्हे रोगाचे निश्चित कारण ओळखण्याचे सामर्थ्य  तुम्हाला प्राप्त होऊं शकते.”
जगत् महाशय मुलाकडे रोखून पाहात पुढे बोलूं लागले. “माझ्या वडिलांना एका संन्याशाकडून सर्प-दंशावर एक रामबाण इलाज मिळाला होता. मात्र त्या संन्याशाने वडिलांना सांगितले होते की अशाही काही केसेस असतील ज्यांचेवर हा इलाज यशस्वी ठरणार नाही ; अशा केसेस ज्या प्रत्यक्ष मृत्यूने सर्पदंशाच्या स्वरूपात पाठविलेल्या असतील. अशांसाठी कुठलाही उपचार नक्कीच व्यर्थ ठरतो. त्यावेळेस तो दंशच अंतिम ठरतो. आणखी एक गोष्ट ध्यानात ठेव. बहुधा सर्व आजार उपचार करून बरे करता येतात ; मात्र मृत्यूची सावली आधीच पडलेले आजार बरे करता येत नाहीत. त्यांच्यासाठी सर्व उपचार व्यर्थ ठरतात. आपला पेशा वैद्यकीचा असल्याने परिणामाची तमा न करता सर्वतोपरी उपचार करणे आपले कर्तव्य ठरते. तुम्ही जर नाडीपरीक्षा चोखपणे केलीत तर तुम्हाला खात्रीपूर्वक कळेल की आजार आपल्या धोपटमार्गाने जाईल की मृत्यूच गिळंकृत करील अखेरीस.”
अवाक् होऊन जीवन ऐकत राहिला नि हे सर्व ऐकत असतांना त्याचे अंतर्विश्व जणूं कोलमडून पडले. त्याकाळीं तिथले डॉक्टर रंगलाल हे त्याचा आदर्श बनले होते, एक डॉक्टर कसा असावा या बाबतींत. एक ख्यातनाम डॉक्टर असलेले रंगलाल डॉक्टर पांढऱ्या घोड्यावर स्वार होत, रेशमी कोट घालणारे, सोन्याची चेन परिधान करणारे नि भरपूर मान सन्मान कीर्ती आणि वैभवशाली असलेले. याच डॉक्टरांमुळे त्याला पाश्चात्य मेडिसीन शिकण्याची ऊर्मी आली होती.
मात्र आज वडिलांचे भाषण ऐकताना एका वेगळ्याच ज्ञानाचे दार उघडले गेले त्याच्यासमोर. तो आपले स्वप्न विसरून गेला. “ज्ञानाचे दार उघडा नि तुम्हाला सापडेल अमरत्वाची गुरूकिल्ली !” त्याच्या वडिलांचे उद्गार होते हे. आश्चर्य म्हणजे, जीवनला जणूं त्याची झलक अनुभवतां आली त्यांच्या बोलण्यातून.
त्याचे वडील म्हणत, “एखादी गोष्ट शिकणे वेगळे नि ती समजणे वेगळे. दोन्ही गोष्टी अगदी वेगळ्या असतात.” आणि जीवन या बाबतींत पूर्ण सहमत होता. धर्मग्रंथांत काय सांगितले आहे याचा ते दाखला देत. “शिक्षण, पाठांतर वगैरे कोणी आत्मसात करेल एकवेळ, पण खरेखुरे गहन ज्ञान केवळ गुरूकृपेनेच प्राप्त करतां येते. तो त्यांचा आशीर्वाद असतो. जेव्हा तुम्ही प्राप्त करून घेतलेले शिक्षण ज्ञानात परावर्तित होते तेव्हा जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पार बदलून जातो. आणि मगच तुम्ही दृष्टी पलीकडले पाहू शकता, जाणिवेच्या पलीकडील संवेदना अनुभवू शकता नि मग नाडी-परीक्षा होते खरें ज्ञान ; तुम्ही मृत्यूची चाहूल जीवंतपणांतच ओळखू शकता.”

जीवनला उमगले होते तें सत्य ! आता जीवन दत्त्त न कचरतां जगाला सांगू शकणार होते ते सत्य वस्तुस्थिती असल्याचे. त्यांच्या प्रदीर्घ आयष्यांतले हे सत्य कधीच झाकोळले गेले नव्हते.

त्याने मोती गोळा करणाऱ्या गोताखोरांची कथा वाचली होती. समुद्राच्या तळाशी मोत्यांचा शोध घेणारे अद्यावत पोषाखांतीले गोताखोर. मात्र खोल पाण्याखालीं दडलेले विलक्षण मनोहारी दृष्य पाहताच ते देहभान विसरून निसर्गाची ती किमया पाहता पाहतां मोती शोधण्याचे विसरून जातात.
आज वडिलांचे भाषण ऐकताना जीवनची अगदी अशीच अवस्था झाली. तो आपली सर्व स्वप्नें, आशा-आकांक्षांना विसरून तो एका वेगळ्याच वातावरणांत वावरूं लागला, मोती शोधणाऱ्या गोताखोरां प्रमाणे. कीर्ती, पैसा नि वैभव यांचा जणूं विसर पडला त्याला.
याच संदर्भांत त्याने एक विचित्र कथा ऐकली वडिलांकडून रोग नि मृत्यूविषयीं आणि त्यांचा परस्पर संबंध उलगडून दाखविणारी. निश्चितपणे एक सुंदर कथा. जगत् बंधू महाशय अस्खलित वक्ता होते. त्यांच्या बोलण्याच्या पध्दतीने मुलगा जीवन मंत्रमुग्ध झाला. ते बोलत राहिले –“अर्थात प्रत्येक रोग आपल्यासोबत मृत्यूचा स्पर्ष घेवूनच येतो. महाभारतांत सांगितलंय् की सुरूवातीला ईश्वराने जेव्हा निर्मितीचा प्रारंभ केला तेव्हा त्याला आपल्या कर्तृत्वाचा फार आनंद झाला नि तो न थांबतां निर्मिती करत सुटला. त्याने एकापेक्षा एक सुंदर वस्तू नि प्राणी बनवण्याचा धडाका लावला.
मात्र त्यावेळेस फक्त निर्मिती होत राहिली, विनाशा शिवाय. केवळ जन्म, अंता बिगर. त्याला अचानक एक अस्पष्ट हुंदका ऐकू आला नि पाठोपाठ असह्य दुर्गंध . दचकून ईश्वराने आपल्या निर्मितीकडे पाहिले. काय झाले असेल ? त्याच्या निर्मितीतला एक मोठा भाग जीर्ण, सुरकुतलेला आणि घाणेरडा झाला होता. अती झालेल्या प्रजेच्या भाराने पृथ्वी विव्हळत होती, प्राणी हताश झाले होते नि त्यांची शरीरें दुर्गंधीने व्यापलेली.
विश्व-निर्माता ब्रह्मा विचारांत गढून गेला. एरव्हीं प्रसन्न असलेल्या त्याच्या कपाळावर काळजीच्या रेषा दिसू लागल्या, जणूं स्वच्छ निळ्या आकाशांत काळे मेघ जमून यावेत. आणि अचानक त्याच्या शरीरातून एक सावली बाहेर पडली. त्या सावलीने एका स्त्रीचे रूप घेतले, भगवे वस्त्र परिधान केलेली नि कमल-कळ्यांनी श्रृंगार केलेली. तिचे केंस नि डोळे आणि शरीराचा रंगसुध्दा पिवळा होता. दोन्ही हात जोडून ती नम्रपणे विधात्यासमोर उभी राहिली. खाली वाकून तिने ईश्वराला विचारले – “देवा, कोण आहे मी ? मी काय करायला हवे आहे ? माझी निर्मिती कशास्तव?”
“तूं आहेस माझी कन्या – मृत्यू”, ईश्वर म्हणाले. “तूं निर्माण झाली आहेस विनाश करण्यासाठी – नि हेच कार्य मी तुला सोपवीत आहे.”
कापरेच भरले मृत्यूला ! ती निषेधाने किंचाळली, “एका स्त्रीला तुम्ही असे काम कसे देऊ शकतां ? हे काही स्त्रीचे काम नाही. मला तर हा विचारदेखील सहन होत नाही.”
ईश्वराने प्रेमपूर्वक स्मित केले. “दुसरा पर्याय नाहीये. आणि ज्या कारणासाठी मी तुला निर्माण केलेय् ते तुला करणे क्रमप्राप्त आहे.”
“पण नाही जमणार मला तें.”
“तुला करावेच लागेल.”
मृत्यूने कठोर तपश्चर्या सुरूं केली. अखेर परमेश्वर प्रसन्न झाला. “मी तुला एक वर देईन,” ईश्वर म्हणाला.
“तर मग मला या क्रूर कर्मातून मुक्त करा.”
ईश्वराने नकार दिला. म्हणून तिने अधिकच कठोर तप आरंभले. ईश्वराला पुन्हा प्रगट व्हावे लागले पण तिने तोच वर पुन्हा मागितला. तो देखील नाकारण्यांत आला.
मृत्यू, प्रत्यक्ष ईश्वराच्या मुलीने, क्षणभर आकाशाकडे पाहिले  नि तिने असे ऊग्र तप सुरूं केले ज्याचा कोणी कधी विचारही केला नसेल. ईश्वर जेव्हा पुनःश्च अवतरला त्यावेळेस तिचे ओठ थरथरले नि डोळ्यांतून अविरत अश्रूपात सुरू झाला. ईश्वराने ते अश्रू आपल्या ओंजळींत गोळा केले नि तो तिला म्हणाला, “हे अश्रू पृथ्वीची राखरांगोळी करतील.” त्याच क्षणीं प्रत्येक थेंब एकेका दुष्ट प्रवृत्त्तींत परिणत झाला. “हे सर्व रोग आहेत, ते तुला साहाय्य करतील.”
“पण मी एका नवऱ्याला तिच्या शेजारी झोपलेल्या पत्नीपासून कशी दूर करणार किंवा आईपासून तिचे बाळ कसे हिरावून घेणार ? कुठल्या घोर पापात ढकलताय् तुम्ही मला ?”
“तुला पाप लागणार नाही. शिवाय, तू लोकांना त्यांच्या दु:खांतून मुक्त करशील नि त्यांना नवीन जन्म घेतां येईल. आपल्याच चुकीच्या वागण्याने ओढवून घेतलेल्या रोगांपासून मुक्ती देत तूं त्यांचा उध्दार करशील.”
“पण मी त्यांच्या जवळच्यांचे शोकविव्हल दु:खी चेहेरे पाहूच शकणार नाही. असे प्रसंग मी कसे सहन करणार ?”
“ठीक आहे, मी तुला आंधळे करीन, म्हणजे तुला काहीच दिसणार नाही.”
“पण ऐकू तर येईल ना मला ?”
“छान, तर मग मी तुला बहिरी ठेवीन ! काहीच ऐकतां येणार नाही तुला.”

‘तर, मृत्यू नेहमीच आंधळा आणि बहिरा असतो.’ जगत् बंधू महाशयांनी कथेचा समारोप केला. मृत्यूला ओढून आणतात तिचीच मुलें, म्हणजे  रोगराई ! तरी पण या सर्वांवर अधिपत्य गाजवते ‘नशीब’ !! जेव्हा एखाद्याची ‘वेळ’ भरते तेव्हा त्याला जावेच लागते. अर्थात् कधीकधीं अकाली मृत्यू देखील घडतात पण तो दोष असतो त्या व्यक्तीचाच. कारण तें फळ असते त्याने केलेल्या पापांचे.
मात्र जेव्हा मृत्यूला नशीबाची साथ नसते तेव्हां आपला आयुर्वेद मदतीला धांवून येतो प्रतिकार करायला, रोगाशी झुंज द्यायला. अशा वेळीं रोग मागे सरतो, आंधळा नि बहिरा मृत्यू देखील माघारीं फिरतो.
तथापि जेव्हा एखादी व्यक्ती या पृथ्वीवरचे आपले आयुष्य पूर्णपणे जगली असेल त्यावेळेस नाडीचे स्पंदन स्पष्टपणे दर्शवते की आता मृत्यूचाच विजय अटळ आहे. याचे कारण आता तिला नशीबाची साथ आहे. हा केवळ काळाचा खेळ आहे कारण आता तुम्ही निश्चित वेळ ओळखूं शकतां मृत्यूची, अगदी मिनिट सेकंदाच्या तपशीलासह;  आणि हे शक्य आहे नाडी परीक्षेतून !!
आपल्या मुलाशी हे बोलत असतांनाच भिंतीवरील पाल चुकचुकली. जगत् बंधूंनी वर पाहिले नि जाणीवपूर्वक स्मित केले, “पाहिलंस !”
जीवनला वाटलं की त्याचे वडील पालीचे चुकचुकणे त्यांच्या बोलण्याला अनुमोदन मानत आहेत. पण नाही ! त्याच क्षणीं त्याने पाहिले की ती पाल एका किड्याकडे झेपाऊन त्याला तोंडांत धरते आहे, नि मग सुरू होते सुटायची धडपड !
“अगदी असेच,” प्राणी आणि माणसांतील साम्य दर्शवीत जगत् बंधू  म्हणाले, “जेव्हा माणूस दोन आपत्त्तींशी एकाच वेळी झुंज देत असतो सुसरीने पकडल्या सारखा, तेव्हा त्याचे विव्हळणे नाडीच्या ठोक्यांत स्पष्टपणे जाणवते. अगदीं प्रत्यक्ष पाहात असल्यासारखे” !
नाडी परीक्षेवरून त्यांनी पहिल्यांदा केलेल्या प्रसंगा बद्दल ते सांगू लागले.. “नवग्रामच्या कुण्या गिरीश बाबूची आई अडखळून पडली नि बेशुध्द झाली. त्यावेळेस माझे वडील हयात नव्हते आणि मी बराच नवशिका होतो. जराशा दोलायमान अवस्थेत मी गेलो. नाडीची तऱ्हा काळजी करण्यासारखी भासली पण खात्रीपूर्वक नव्हे. कदाचित् अचानक बसलेल्या आघातामुळे नाडी उच्छ्रुंखल झाली असेल, तरी पण माझा संशय कायम राहिला. मी त्या मंडळींना मला जे वाटले ते सांगितले. मृत्यू नजीक आहे मात्र तुम्ही वाटल्यास अधिक अनुभवी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. त्याप्रमाणे पुरूलिया हून संध्याकाळीं वयस्क डॉक्टर आले नि त्यांनी तिला तपासले. नंतरचे तीन दिवस अतिशय महत्वाचे आहेत, ते म्हणाले. तिने तोंवर तग धरला तर ठीक, मात्र वर्षाच्या आतच मृत्यू अटळ आहे त्याच सांध्याच्या अति वेदनेमुळे.
गिरीश बाबू अघटित घडण्याच्या भीतीने आईला गंगा घाटावर घेऊन गेले पालखीत घालून. त्या म्हातारीची सुध्दा मनापासून इच्छा होती त्या पवित्र नदी तीरावर प्राण सोडण्याची. मात्र तिला चौथ्या दिवशीं सकाळीच शुध्द आली नि तिला बरे वाटू लागले. एकदा गंगा घाटावर अखेरचे म्हणून गेल्यावर परत येण्याची पध्दत नसल्याने ती तिथेच राहिली. वर्ष पुरे होण्याच्या आठच दिवस आधीं त्याच व्याधीने तिच्यावर पुन्हा हल्ला चढवला, अगदी त्या डॉक्टरांच्या सांगण्या प्रमाणेच. चोवीस तास ती वेदनेने विव्हळत राहिली, नंतर बेशुध्द झाली नि बारा तासांनी मृत झाली.

माझा पहिलाच अनुभव होता तो निश्चित निदानाचा. त्यानंतर अनेक आले. तुलाही कळेल ते. याला खरं तर कुठलेही स्पष्टीकरण देतां येणार नाही. तुम्ही भाग्यशाली असाल तर तुम्हाला ती अंत:प्रेरणा येऊं शकते. तुम्ही किती भाग्यवंत आहांत त्यावर अवलंबून आहे ते, बाळा !

(क्रमश: ………




Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?