Sunday, April 22, 2018

 

आरोग्य धाम (खंड सातवा)

आरोग्य धाम (खंड सातवा )
होस्टेल मधल्या सहचरांनी आणि मित्रांनी खरंतर जीवनला धोक्याचा इशारा दिला होता, पण आतां बराच उशीर झाला होता. त्यांना कसे कळणार की जीवन मंजरीत पूर्णपणे गुंतले आहेत ते, तिच्याकडून  अवहेलना झालेली असूनही. जीवनला कल्पनाही नव्हती की तो भप्पी नावाचा ढाण्या वाघ सुध्दां मंजरीवर टपून बसलाय् तें ! काही किरकोळ  गैरसमजांमुळे भप्पी त्या मुलीच्या घरी आतांशा जात नव्हता नि त्याच सुमारास आमच्या अस्वलाने त्या घरात प्रवेश केला होता !
जीवनपेक्षा वयाने बराच मोठा असला तरी खूप वेळा नापास झाल्याने एकच वर्ष पुढे होता भप्पी. मेडिकल स्कूलमधे त्याचा तोरा नि नवख्या मुलांना मोठ्या ऐटीत प्रश्न विचारून नामोहरम करण्याबद्दल त्याची ख्याती होती.
“ए पोरा, कुठून आला आहेस तू ? नाव काय तुझं भडव्या”, तो विचारत असे, विशेषत: गरीब नि खेड्याकडील मुलांना.
त्या काळीं श्रीमंतांना उलटून उत्तर द्यायला फारसे कोणी धजावत नसे. नवीन मुलें आपल्या गावाचे नाव अदबीने सांगत आणि मग सुरू होई प्रश्नांची सरबत्त्ती. “अस्सं . तर मग कोणता परगणा नि कोणते ठाणें? आमची पण जमीन आहे तिथे.” मनांत येईल तो आकडा तो सांगे जसे ७०५ किंवा ५०७.
मात्र जीवनशीं बोलताना त्याने जरा नरमपणा धरला होता, कदाचित् जीवनची तगडी शरीरयष्टी किंवा त्याचे भारी कपडे पाहून. एकट्या जीवनलाच तो ‘काय मित्रा’ असे काहीसे आदरयुक्त संबोधन करीत असे. “काय मित्रा, कुठून येणे केलेत ?” त्याने विचारले.
जीवनला ती जवळीक आवडली नव्हती पण काहीशा सावधपणे केवळ “नवग्राम” असे म्हणत त्याने काढता पाय घेतला. त्यावेळी जीवनला एक म्हण आठवली. ‘ओरबाडूं शकणारी नखें, तीक्ष्ण दात नि शिंगधारी प्राण्यांपासून दूर राहावे !’
पण भप्पी अडेलतट्टू निघाला. दोनच दिवसांनी तो जीवनच्या होस्टेल रूमवर दाखल झाला. “मला असं कळलंय् की तुझ्याकडे भारी तंबाखूचा बराच साठा आहे. बघूंया जरा”, तो हक्काने म्हणाला.
खरंतर जीवन सहसा कुणाला बधत नसे पण तो उर्मट नव्हता. जमीनदाराचा मुलगा असूनही त्याच्या रक्तांत श्रीमंतांची मग्रूरी नव्हती. शिवाय भप्पीबद्दल त्याच्या मनांत किंचित असूया सुध्दा होती, कारण तो एका नामवंत घराण्यांतला देखणा नि स्वत:चा डौल सांभाळणारा असा तरूण होता. जीवनने त्याला साजेसा आदर दाखवीत तंबाखूचे झुरके घेऊं दिले. बाहेर पडतापडतां त्याची नजर जीवनच्या डंबेल्सवर पडली. तीं हातात घेऊन तो उद्गारला, “अच्छा, तूं पैलवान पण आहेस तर !”

मात्र एक दिवस ठिणगी पडलीच. सिन्हांच्या घरासमोर तो प्रसंग घडला. जीवन त्यांच्या घरात शिरत असतानाच भप्पी विडा चघळत बाहेर पडत होता. त्याच्या मागे बंकिम नि पाठोपाठ त्याची आई पण येत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांची पुन्हा दिलजमाई झाली होती. अर्थात् जीवनला त्याची कल्पना नव्हती.
जीवनने काही भेटवस्तू आणल्या होत्या. एका टोपलीत आंबे, काही फळभाज्या नि गवताच्या पेंढींत गुंडाळलेली मासळी. त्याच्या गावचा एका  इसमाने ती टोपली धरली होती. भप्पीला जीवन तिथे येईल अशी कल्पना नव्हती. त्याने फिसकारत जीवनला विचारले, “हॅलो मिस्टर पैलवान ! तुम्ही इकडे कुठे वाट चुकले ?”
आंतून मंजरीचा खणखणीत आवाज उमटला, “तो आमच्या नात्यांतला आहे; चुलत चुलत आजोबा !” “काय आणले आहे आजोबा तुम्ही आमच्यासाठीं ?” ती बाहेर येऊन आपले हंसू लपवित उद्गारली.
“पाहूंया तरी पैलवान आजोबांच्या टोपलींत काय आहे ते”, भप्पी मागे वळत म्हणाला. त्याने टोपलीत हात घालून खालपर्यंत पाहिले. एक आंबा हातात घेवून त्याने चावा घेतला नि दुसऱ्याच क्षणीं थुंकून टाकला. “हा काय आंबा आहे ? मी उद्याच तुला अस्सल आंबा काय असतो ते दाखवतो. गुलाब-खास नि किशन-भोग. प्रत्येक फळावर लेबल असेल ते कधी खाण्यालायक पिकेल ते !”
तो तरातरा निघून गेला. मंजरीच्या आईने जीवनचे स्वागत केले. “ये, घरीं सर्व मजेत आहेत ना ?”
“होय, सर्व ठीक आहे. पण मला जायला हवे, सर्व सामान बाहेर वऱ्हांड्यात टाकून मी इकडे आलोय हे सर्व द्यायला”. खरंतर भप्पीचे बोलणे त्याला चांगलेच बोंचले होते. त्याला थांबायची इच्छा नव्हती.
“काही तरी खाऊन जा.”
“क्षमा करा. आमचा गाडीवान इथे नवखा आहे. त्याच्यासाठी मला लवकर गेले पाहिजे.”
नंतर खोलीतल्या मित्रांशी बोलताना त्याने आपला संताप व्यक्त केला. मित्रांच्या अविरत प्रश्नांमुळे त्याला घडलेला सर्व प्रकार सांगावा लागला.
“तूं भलतेच साहस करतो आहेस मित्रा. दूरच राहा. मंजरी भप्पी बोसची आहे.”
“असं कसं म्हणतोस ती भप्पीचीच आहे म्हणून ?”
“सहजच. झंझट टाळायचे असेल तर तिच्यापासून चार हात दूरच राहा.”
जीवन थोडा वेळ गप्प राहिला. मग त्याने पुन्हा विचारले, “त्यांचे लग्न ठरलंय् का किंवा साखरपुडा झालाय् ?”
“नाही. तरी पण …..”
“मी जीवन दत्त आहे. तुम्हाला लवकरच कळेल कोण मिळवेल तिला ते. ती अजूनही तिच्या वडिलंचीच आहे ना ? झाले तर मग.”
जीवनने आपल्या आईला गुप्तपणे पत्र लिहून पन्नास रुपये तातडीने पाठवायला सांगितले. तेव्हाचे पन्नास रुपये म्हणजे आजचे जवळपास दोन हजार रुपये !

आणि मग खऱ्या अर्थाने लढाई सुरू झाली.
भप्पी बोसने सुरूवातीला याला फारसे महत्व दिले नाही. त्याला ठाऊक होते पहिल्याच भेटीत जीवनचे अस्वल म्हणून झालेले नामकरण. ते ऐकून त्याला आश्चर्य नि आनंद झाला होता. मंजरीने बहाल केलेले हे नाव त्याला मनापासून आवडले होते. शिवाय आंबट आंबे किंवा एखाद्या मासळीने तिला जिंकणे शक्य नव्हतेच. त्यापरीस उत्तम आंबे नि विविध भेटवस्तूंमुळे त्याचे पारडें नक्कीच जड होते. शिवाय आपल्या देखणेपणाची जाणीव असल्याने त्याने जीवनला संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून कधीच मानले नव्हते.

जीवनने मात्र पक्का निश्चय केला होता आपल्या साधारण दिसण्यावर मात करण्याचा. त्याने काही खर्चिक संवई आत्मसात केल्या. वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे त्याचे वडील चिंताक्रांत झाले पण पुत्रस्नेहापुढे ते नकार देवूं शकले नाहीत. अधिक पैशांच्या हव्यासापोटी तो आईकडून देखील पैसे उकळायचा.
आणि याची त्याला कधीच खंत वाटली नाही. काय म्हणून वाटावी ? शेवटीं तारूण्याच्या मस्तींत एका सुंदर मुलीला जिंकून घेण्यासाठी तो तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यावर मात करायला निघाला होता. अशी मस्ती फ्क्त तारूण्यातच असते असे नाही. वयाने प्रौढ पुरूष सुध्दा अशा हिकमती करतात ! एखाद्या स्त्रीला जिंकून तिला आयुष्यभर सांभाळण्याची शेखी मिरवणें हा देखील उन्माद म्हणायला हवा. जीवनने सुध्दा आपल्या जमीनदारीचा काही हिस्सा सहज खर्चीं घातला असता, मंजरीला जिंकून घेण्यासाठी. नि याबद्दल त्याला कधीच खंत वाटली नसती.
ज्याप्रकारें त्याची वाटचाल सुरू होती ती याच फलश्रूतीकडे नेणारी स्पष्टपणे दिसत होती. घराकडून आलेले पैसे संपताच त्याने उसने पैसे मागायला सुरूवात केली आणि जीवनला ते सहज मिळणे अवघड नव्हते, कारण अखेर तो एका श्रीमंत बापाचा मुलगा नव्हता काय ? त्या मुलीच्या घरीं अनेक प्रकारच्या भेटवस्तू पाठवण्याचा त्याने धडाका लावला.
रस्त्याने चालतांना दुकानदार त्याला आदरपूर्वक बोलवायचे. “कुठे निघालांत बाबूजी ?” त्याकाळी कांदी शहरात ‘बाबूजी’ हा शब्द जादा आदराचे द्योतक मानला जाई. ‘बाबू’ म्हणजे एक सद्गृहस्थ ; आणि ‘जी’ लावल्यावर तो अधिक मानाचा ! हा शब्द ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटींत रूढ झालेला.
जीवन बाबूजींनी समाधानाने मंद स्मित केले. त्याची उस्मान शेख नावाच्या सर्वात मोठे स्टेशनरीचे दुकान चालवणाऱ्या इसमाशी घनिष्ट मैत्री झाली होती. जीवन त्यांना चाचा जान या नावाने संबोधत असे नि ते त्याला प्रेमाने बाप जान म्हणत. उस्मान स्टेशनरी सामानाबरोबरच उत्तम बूट आणि तंबाखूचा ही व्यवसाय करीत होता. पक्का बनिया असलेल्या उस्मानने जीवनच्या नावावर उधारीची वही सुरू केली होती. जीवनला काही खरेदी करायची नसतानाही ते त्याला अगत्याने दुकानात बोलवून घेत.
“हॅलो बाप जान, या आंत या”.
“कशासाठी चाचा जान ?”
“अरे, मी तुझी तीन चार दिवसांपासून वाट पाहतोय. मुर्शिदाबाद हून एक खास परफ्यूम आणलंय् तुझ्यासाठी. पाहा तर खरं “. त्यांच्यातला व्यापारी उद्गारला. “अत्त्तर झक् मारेल याच्यापुढे, मुर्शिदाबादच्या व्यापाऱ्याचे चॅलेन्ज आहे हे. घेऊन जा तुमच्या राजपुत्रासाठी !” म्हणून आणलंय् ते तुझ्यासाठी. दोन बाटल्या आहेत या, एक तुझ्यासाठी नि दुसरी —-“ तो हसून बोलायचा थांबला.
त्यांनी दोन्ही बाटल्या व्वस्थित पॅक करून जीवनच्या हातांत कोंबल्या.
“किती पैसे ?”
“त्याची फिकिर नको. खरं तर भप्पी चाचाला कळलंय् यांच्याबद्दल नि त्याने मागितल्यासुध्दा. पण मी त्याला शिल्लक नाहीत म्हणून सांगितलंय्. गुपचुप घेऊन जा. वहीत रक्कम लिहून ठेवीन मी, लवकरच आदा कर म्हणजे झालं.”
त्यानंतर जीवन जाणूनबुजून भप्पीच्या आसपास राहूं लागला परफ्यूम लावलेल्या रूमालाने मुद्दाम वरचेवर चेहरा पुसत. भप्पीच्या प्रश्नार्थक नजरेने त्याला गुदगुल्या होत राहिल्या. मंजरी वापरत असलेले परफ्यूम याच्याकडे कसे हा प्रश्न भप्पीला भेडसावत राहिला.
जीवनला मात देण्यासाठी भप्पीने अगदी तसेच परफ्यूम येनकेन प्रकारेण मिळवलेच. दुसऱ्या दिवशीं जेव्हा ते परफ्यूम मिरवित भप्पी जवळून गेला तेव्हा जीवनला वाटले की त्याने ते थेट मुर्शिदाबाद हून मागवले असावे. पण त्याला कल्पनाही नव्हती की जीवनने मंजरीला दिलेली ती भेट भप्पीच्या कधीच स्वाधीन केली होती प्रत्यक्ष मंजरीनेच !!

आतां इतक्या वर्षांनंतर जीवन महाशयांना हंसू फुटतेय् ते प्रसंग आठवतांना. ते खरंच प्रेम म्हणायचं की तारूण्यसुलभ मूर्खपणा, ज्यामुळे त्यांचे आयुष्य ढवळून निघाले होते.
अखेरचा पडदा पडेपर्यंत जीवन हेच समजून होता की दोघांमध्ये तोच वरचढ आहे नि तोच जिंकणार मंजरीला. भप्पीलाही तशी कल्पना असावी अशी त्याला खात्री होती.
खरंतर भप्पीसुध्दा जरा साशंक झाला होता प्रतिस्पर्ध्याच्या श्रीमंतीचे प्रदर्शन पाहून. अगदी क्षुल्लक कारणांवरून दोघांत वरचेवर खटके उडत नि जीवनला मजा येई त्याला अधिकाधिक चिडवण्यांत. आपल्या दंडांवरील बेटकुळ्या मुद्दाम फुगवीत तो जणूं आव्हान देई भप्पीला. त्याने आपला व्यायाम खूप वाढवला होता नि पंचवीस तीस पोळ्या तो सहज मटकावत असे एकाचवेळीं. त्याची शरीरयष्टी पाहून भप्पीला खरंच भीती वाटे नि विजिगीषु वृत्त्तीने जीवन खिदळणे राही. त्याचे पारडें नक्कीच जड होते शरीरसंपदा नि श्रीमंतीमुळे. पूर्ण विजयासाठी आणिक काय हवे ?

मात्र मानवी अहंकार नि त्यामुळे येणारा फाजील आत्मविश्वास विचित्र  म्हणायला हवा आणि त्याचबरोबर एका स्त्रीचे अंत:करण ! दोन्हीही अनाकलनीय.
पण एकें दिवशीं जीवनचे भप्पी बोसशी कडाक्याचे भांडण झाले आणि वर्चस्व मिळवण्याची त्याची सर्व स्वप्नें चक्ककाचूर झाली. वसंत ऋतूतला होळीचा दिवस होता तो, जेव्हा इतरांवर रंगांची उधळण केली जाते.
त्या दिवशी जीवन भेटवस्तूंचे भलें मोठे खोके घेऊन तिच्या घरी गेला. मंजरीला तोंवर कुणीच रंगवले नव्हते नि जीवनची तीव्र इच्छा होती तिच्या सांवळ्या मोहक चेहऱ्यावर रंग फासण्याची. तो घरात शिरताच प्रथम दिसली मंजरीची आई. त्याने खोकें खाली ठेवले.
“माझ्या आईने तुम्हाला नमस्कार सांगितलाय. तुमच्याविषयीं बरेच वेळां बोललोय् मी तिच्याशी.”
मंजरीची आई सहसा गंभीर नि अबोल असायची. जीवनला तिच्या वागण्याचे आकलन होत नसे.
“हे बरोबर नाही जीवन.” तथापि ते खोके घेऊन ती वर गेली. आतां तेथे जीवन नि मंजरी दोघेच उरले. तिच्या नजरेत एक प्रकारचा खुनशीपणा होता. ती त्याच्याशी तुसडेपणे वागत असे नि त्याची टांग ओढण्यात तिला मजा येई. मात्र त्यामुळेच ती त्याला जास्तच आवडूं लागली नि तो तिच्याकडे ओढला जाऊं लागला.
त्याने गुलालाची पुडी काढली नि म्हणाला, “ आतां मी माझ्या नातीचे तोंड लालीलाल करणार आहे.”
“जरा थांब. मी आतून माझी पुडी आणते.”
खरंतर ती अजून तिथेच उभी राहिली आपले दोन्ही हात मागे लपवित. जीवन तर अवाक् होऊन पाहातच राहिला नि त्याने तिच्या चेहऱ्यावर नि केसांत गुलाल उधळण्या आधीच ती उडी मारून पुढे आली नि काळ्याशार डांबरांत बुडवलेल्या हातांनी तिने त्याचा चेहरा माखून काढला.

निराश झालेला जीवन पुढच्या दाराकडे तीरासारखा निघाला पण त्याच वेळी ‘टायगर’ भप्पी बंकिम बरोबर आत शिरत होता.
दोघांची समोरासमोर भयानक टक्कर झाली. मजबूत बांध्याच्या जीवनच्या धडकेने भप्पी पार उताणा पडला. जीवनने त्याला आधार देत उठवले नि त्याचे कपडेसुध्दा झटकले. मात्र भप्पी संतापाने पेटून उठला. त्याने पायातील चप्पल काढून जीवनवर हाणायला सुरूवात केली. खरंतर जीवनच्या जोरदार धडकेने भप्पी पडला ही वस्तुस्थिती जीवनच्या लक्षांत आल्याने तो थोडा वरमला होता पण चपलांचा मार नि सोबत भप्पी देत असलेल्या अर्वाच्य शिव्यांमुळे जीवनची तोल सुटला. होळीच्या निमित्ताने आज त्याने थोडी भांग देखील घेतली होती त्यानुळे त्याचा स्वत:वर ताबा राहिला नाही आणि त्याने भप्पीच्या नाकावर ठोसा मारला. मात्र तो प्रहार इतका जबरदस्त होता की त्याने भप्पीचे नाकाडच फोडले. तो रक्तबंबाळ झाला, इतकेच नाही तर जीवनच्याही अंगावर रक्ताचे शिंतोडे उडले.

भप्पी त्या गावचा इनामदार होता आणि यापुढे तेथे राहाणे धोक्याची होते. सबब जीवन तेथून जो पळाला ते खेट आपल्या गावाकडे, आडवळणी नि लांबच्या वाटेने. जाताना मयूराक्षी नदीत त्याने कपड्यांवरचे रक्ताचे डाग धुतले नि कुणालाही संशय येऊं नये म्हणून त्या डागांवर मातीचा थर लावला.

अशा रीतीने मेडिकल स्कूलमधे शिकण्याचे त्याचे स्वप्न कायमचे भंगले. आणि या सर्व फलश्रुतीचे कारण ठरली मंजरी. होय, मंजरीच.

जीवनच्या आई वडिलांना त्याची ही स्थिति पाहून धक्काच बसला. “काय झालंय् जीवन, तूं परत काय आलास ?”
जीवनने उत्तर दिले नाही. तो आपल्या पायाच्या अंगठ्याकडे पाहात राहिला.
त्याच्या आग्रही वडिलांना देखील खरे काय घडले ते कळूं शकले नाही. कुठल्याही परिस्थितींत तो मंजरीचे नाव सांगणार नव्हता. अनेक दिवसांनी त्याने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली, मात्र अर्धवट. त्याने सांगितले की एका श्रीमंत बापाच्या मुलाने त्याला जोड्याने मारले म्हणून त्याने प्रतिकार करीत त्याला हाणले. पण त्याच्या दुर्दैवाने मार जरा जास्तच लागला. दुखापत झालेल्या त्या मुलाने कदाचित् माझा खून केला असता म्हणून मी तेथून पळालों. आता मी तिथे परत जाणार नाही. कदाचित बर्द्वान च्या सरकारी उच्च विद्यालयांत किंवा दुसऱ्या एखाद्यांत जाईन मी शिकायला.
“तूं कुठेही जाणार नाहीयेस. मी तुला आपली पारंपरिक वैद्यकी शिकवीन.” वडील म्हणाले.
ते हलक्या आवाजात बोलत पण ते खडकासारखे कठोर असायचे नि ते ऐकून जीवनच्या अंगावर काटा आला. त्याला माहीत होते की वडील आपला शब्द खरा करतात. त्याला आठवतोय तो प्रसंग जेव्हा नवग्रामच्या एका दारूड्या रूग्णावर उपचार करायला त्यांनी साफ नकार दिला होता. तो रूग्ण आपल्या ताकदीबाहेर दारू प्यायचा. जगत्बंधूंनी त्याला ताकीद देवूनही त्याने दारू सोडली नव्हती. पुढच्या वेळी ते त्याला पाहायला गेले असतांना त्यांना कळले नि ते तडक माघारीं फिरले त्याच्याकडे ढुंकूनही न पाहतां. नातेवाईकांनी खूप मनधरणी करूनही त्यांचा नकार कायम राहिला. त्यांचा नकार अंतिम असे.
आजचा त्यांचा निर्णय ऐकून तीच हुकमत त्याला प्रकर्षांने जाणवली. दचकून त्याने क्षणभर वडिलांकडे पाहिले आणि पुन्हा नजर खाली वळवली. त्याला जाणवले की तो वडिलांचा अंतिम आदेश आहे ते.

जगत्बंधूंनी पंचांग काढले अभ्यास सुरू करण्याच्या मुहूर्तासाठी.

(क्रमश: ………




Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?