Tuesday, March 06, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग पाचवा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग पाचवा)
अर्जुन-विषाद अजून संपत नाही हे पाहून भगवंत आता अर्जुनाची कठोर शब्दांत कानउघाडणी करतील. दोन्ही सैन्यांच्या मध्ये हताशपणे बसलेल्या अर्जुनाला हसल्यासारखे करून श्रीकृष्ण म्हणतात,
“अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्व नानुशोचन्ति पंडिता: ॥” (ज्या विषयीं शोक करू नये, त्याबद्दल तू शोक करीत आहेस आणि वर पांडित्याच्या गोष्टी करतोस ! कारण पूर्ण ज्ञानी पुरूष मेलेल्या तसेच जीवंत दोघांविषयी शोक करीत नाहीत. )

भगवंत अर्जुनाला म्हणतात, तू या लढाईच्या धामधूमीत भलताच विषय उकरून काढलास याचे मला खरंच आश्चर्य वाटतंय् . तू स्वत:ला बुध्दिमान समजतोस पण मूळ अज्ञान झटकुन टाकणे तुला साधलेच नाही. त्यातही तुला काही शिकवूं म्हटलें तर तूंच आम्हाला शहाणपण सांगू लागतोस. एखादा आंधळा माणूस जर भ्रांतिष्ट झाला तर तो जसा सैरावैरा धावूं लागेल, तसे आहे तुझे शहाणपण ! तूं स्वत:लाच नीटपणे जाणत नाहीस नि त्या कौरवांची काळजी करत फिरतो आहेस. याचेच मला पुन:पुन्हा नवल वाटतेंय.
मला सांग, तुझ्यापासून हे त्रैलोक्य निर्माण झालेंय, की ही अनादिपासूनची विश्वरचना फोल आहे? एकाच आदिपुरूषापासून सगळे प्रणी निर्माण झाले असे जे मानले जातें या जगात, तें धादांत खोटे ठरते काय ? आत्तां जे कुणी आहेत ते आणि जे कुणी जन्मतील त्यांचा सृजनकर्ता अथवा जे मरतील त्यांचा विनाशक तू आहेस काय ? तूं भ्रमाने नि अहंकारापोटीं ज्यांना मारणार नाही असे म्हणतोस, ते कधी मरणारच नाहीत काय ? तुझा हा भ्रम आहे की कुणी एक मारणारा नि इतर मरणारे आहेत. हे येणेजाणे, जन्म-मृत्यू अव्याहत आणि स्वाभाविकपणे चालत आलेले आहेत, मग तुला त्याचें दु:ख कशापायीं ? तरी पण तूं मूर्खासारखा, समजून न घेतां चिंता करू नये त्याची चिंता करतो आहेस आणि वर मलाच नीतिमत्ता शिकवतोस ! जे विचारवंत, विवेकवंत, सारासार जाणणारे ज्ञानी असतात ते या ‘येण्या-जाण्याला’ केवळ आभास म्हणत त्याचा विचार करीत नाहीत.

जमके पिटाई हो रही है इस वक्त अर्जुन मियां की ! असो.

पुढे म्हणतात, अर्जुना, अजून ऐक ! इथें तू, मी आणि हे सगळे राजेरजवाडे
आहोत त्या स्थितींत राहूं किंवा न राहूं. ‘असणे’ किंवा ‘नसणे’ या भ्रामक कल्पनांचा नाश केला तर त्या दोन्ही कल्पना चुकीच्या असल्याचे कळून येईल.

जे काही निर्माण होते किंवा नाश पावते, ते अज्ञानापोटीं किंवा ‘माये’मुळे ‘दिसतें’ अथवा भासमान होते. खरें तर ती ‘वस्तू’ नाशरहित आहे. (“वस्तू” म्हणजे आत्मा, परब्रह्म वगैरे.) एका सोप्या उदाहरणाने स्पष्ट करतात. असे पहा, वाऱ्यामुळे पाणी हलतें नि तरंग तयार होतात. अशावेळी नवीन असे काय जन्मलें ? वाऱ्याचे वाहणे थांबले की पाणी पुन्हा सपाट होते;  तर मग, कशाचा नाश झाला?
किंवा, शरीर एकच असले तरी वयाप्रमाणे त्यात भेद जाणवतो. बाल, तरूण, वृध्द ही सगळी एकाच शरीराची स्थित्यंतरें नाहीत काय ? त्या स्थित्यंतरां दरम्यान शरीर काही नाश पावत नाही.
अगदीं तसेच, चैतन्याच्या बाबतींत घडते. शरीरें येतात-जातात पण  चैतन्याचा नाश होत नाही. आणि हे जो पूर्णपणें जाणतो त्याला व्यामोह-दु:ख म्हणजेच भ्रांती नि अज्ञानामुळे होणारे दु:ख देखील नाही.

आतां अज्ञानाचें मूळ सांगतात, नि ते आहे इंद्रियाधीनता ! खरोखर, इंद्रिय सुखांच्या ओढीपोटी मन, बुध्दी, चित्त नि अहंकार त्यांत पूर्णत: गुंतून राहतात नि उरतो केवळ भ्रम. इंद्रियें विषयसुख किंवा त्यांपोटीं येणारे दु:ख भोगतात. बरें, या विषयांमध्येही एकवाक्यता नसते ; थोडे सुख नि जास्त दु:ख हाच सर्वसाधारण अनुभव असतो.

शब्दांचीच व्याप्ती पहा. निंदा आणि स्तुति रोष अथवा लोभ निर्माण करतात. मृदुता नि काठिण्य हे स्पर्षाचे गुणधर्म, जे संतोष किंवा खेद उपजवतात. भयानक किंवा सौंदर्य हे रूपाचे गुण, ज्यांमुळे भीती अथवा प्रीतीचा उदय होतो. त्याचप्रमाणे सुगंध किंवा दुर्गंध आनंद अथवा किळस निर्माण करतो. जिभेला कडू, गोड, आंबट, तिखट, तुरट किंवा बेचव कळते नि त्यानुसार आपण त्या रसाचा आस्वाद घेतो किंवा तिटकारा करतो !

तात्पर्य असे की माणूस इंद्रियांच्या स्वाधीन झाला की त्याला सुखदु:खाचा अनुभव येतोच येतो आणि तो आपोआप सुखदु:खाच्या आवर्तांत ओढला जातो. विषयांवाचून दुसरे काहीच सुखावह नाही असे भासवण्याचा इंद्रियांचा गुणविशेष आहे.

आणि हे विषय तरी कसे आहेत ? मृगजळ किंवा स्वप्नात पाहिलेल्या गजांतलक्ष्मी सारखे केवळ भासमान ! हे खरोखर अल्पजीवी आहेत. त्यांना झटकून टाक, त्यांचा मुळीसुध्दा संग करू नकोस. ज्यांच्यावर विषयांची सत्ता चालत नाही त्यांना सुखदु:खांचा स्पर्षही होत नाही की गर्भवासही पुन्हा घडत नाही. पार्था, जो इंद्रियसुखांपासून अलिप्त असतो तो पूर्ण ब्रह्मरूप आहे असे समज.

लई भारी होतंय् नाही ! फिर भी आगे बढें क्या ? कारण आता भगवंत जे सांगतील त्यांत अध्यात्माचे जणूं सार सांठवले आहे !

भगवंत म्हणतात, हे पार्थ ! तत्वज्ञानी पुरूष पूर्ण विचार केल्यावर एक तत्व निखालसपणे जाणून घेतात, ते असे की या जगांत एकुलते एक ‘चैतन्य’च केवळ भरलेले आहे, जे अदृष्य स्वरूपात गच्च भरून असते.
तत्वज्ञानी पुरूष ते कसे जाणून घेतात याचे बहारदार उपमांनी ज्ञानदेव वर्णन करतात. उदाहरणार्थ, दूध नि पाण्याच्या मिश्रणातून राजहंस केवळ दूध निवडून काढतो. किंवा, चाणाक्ष सुवर्णकार अग्नीमध्ये जाळून सुवर्णातील हिणकस गदळ दूर करीत शुध्द सोनें मिळवतो. अथवा, बुध्दीचा वापर करीत दही घुसळून लोणी काढतां येते, किंवा कोंडायुक्त धान्य वाऱ्यावर धरून उपणले की सारभूत असलेले वजनदार धान्य खाली उरते नि पोकळ असलेले फोलकट वाऱ्याबरोबर उडून जाते.
अगदीं तसेच, प्रपंच मिथ्या आहे असे अनुभवांतीं जाणून ज्ञानी किंवा तत्वदर्शी पुरूष त्याचा त्याग करतात आणि त्यांना ‘सत्य-वस्तू’ ची प्राप्ती घडते. याचे मुख्य कारण म्हणजे ‘उपाधी’ आणि ‘चैतन्य’ यांतील फरक त्यांना समजलेला असतो. उपाधी ही नेहमीच अनित्य, अशाश्वत तर चैतन्य म्हणजे नित्यसिध्द, शाश्वत होय. एक आहे ‘असार’ म्णजे मिथ्या तर दुसरे आहे ‘सार’ म्हणजे स्वाभाविकपणें नित्य असलेले.
खरें तर या त्रिभुवनांत जे दृष्यरूपात विनटलेले अतिसूक्ष्म चैतन्य आहे त्याला नाव, रंग, रूप वगैरे लक्षणें नाहीत. तें सर्वव्यापक, जन्ममृत्यूरहित, अविनाशी असल्याने करूं म्हटले तरी त्याचा नाश करणे शक्य नाही.

पुढच्या श्लोकांत सर्व विश्वाला व्यापून असणाऱे चैतन्य कसे अविनाशी आहे नि अविनाशी तत्वाचा नाश कसा असंभवनीय असतो हे मोठ्या खुबीने समजावून सांगतील भगवंत ज्ञानदेव ! (क्रमश:……


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?