Sunday, March 25, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग चौदावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग चौदावा)
भगवान् श्रीकृष्णांनी स्वधर्मपालनाची निकड अर्जुनाला समजावून सांगितली. आतां स्व-धर्माचे आचरण म्हणजेच निष्काम बुध्दीने केलेले विहित कर्म बंधनकारक कुणा कुणाला नसते तें सांगतात.
“देखें असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में । जो अखंडित रमे । आपणपांचि ॥ (असे पहा, सर्व देहधर्म चालू असतांनाही जो आत्मानंदांत तल्लीन झालेला असतो त्याला कर्मफलाचें बंधन राहात नाही.)
याचे कारण आत्मबोध किंवा आत्मज्ञान झाल्यामुळें तो कृतार्थ आणि पूर्ण संतुष्ट असतो.
तथापि अर्जुना, जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ति होत नाही तोंवर स्वधर्म पालनाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून तूं इंद्रियनिग्रह करून निरपेक्ष बुध्दीने तुझ्या वांट्याला आलेले (म्हणजे युध्द करणंयाचे) कर्म नि:संकोचपणें कर. ज्या कुणी निष्काम बुध्दीने आपले विहित कर्म केले ते मृत्युलोकात असूनही तत्वत: कैवल्यपदास (मोक्ष) पोहोचले. असे पहा, या आधीं जनक राजाप्रमाणें अनेक क्षत्रियांनी स्वधर्मपालन करीत मोक्षसुख मिळवलेले आहे. म्हणून अर्जुना, स्वकर्माविषयीं निरंतर आस्था बाळगावी. यामुळें इतर कार्येंसुध्दा आपसूक मार्गी लागतात. शिवाय, स्वधर्माचरण इतर लोकांसाठी एक आदर्श उदाहरण ठरते ते वेगळेच.

“देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयांही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥”  (जे कृतकार्य होऊन नैष्कर्म्य अवस्थेला पोहोचले आहेत अशा श्रेष्ठ व्यक्तींना देखील लोकसंग्रहार्थ, लोकांना आत्मबोध व्हावा या उद्देशाने, कर्म करावेच लागते.)
“मार्गीं अंधासरिसा । पुढे देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनि ॥” (आंधळ्या माणसाबरोबर त्याला सांभाळून नेणारा डोळस माणूस सुध्दां सावकाश मंद गतीने चालतो. त्याचप्रमाणें ज्ञानी पुरूषाने अज्ञानी लोकांना बरोबर घेऊन स्वधर्म आचरत स्वधर्माचाच बोध करावा.)
असे केले नाही तर अज्ञानी लोकांना कसे समजणार ? त्यांना त्यांचे कर्तव्य कसे कळणार ?

“यद् यदाचरति श्रेष्ठसतत्तदेवेतरो जन: ।
स यत् प्रमाणं कुरूते लोकस्तदनुवर्तते ॥२१॥”
(श्रेष्ठ पुरूष जसे आचरण करतो तसेच अनुकरण इतर लोक करतात. आपल्या कृतीने तो जसा आदर्श घालून देईल तसेच सामान्य लोक वागतात.

एथ वडील जे जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंच येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥
शिवाय, श्रेष्ठ माणसाचे अनुकरण करणे अतिशय स्वाभाविक असल्याने ज्ञानी पुरूषांनी तर स्वधर्माचा त्याग कदापि करूं नये. जगत्कल्याणाची इच्छा धरणाऱ्या साधू, संत, सत्पुरूषांनी विशेष काळजी घेऊन धर्माचरण केले पाहिजे.
ते असो, इतरांची बात सोड. मी स्वत:च नाही का सतत कार्यमग्न असतो स्वधर्माच्याच मार्गावर ? मला कशाची तरी कमतरता आहे किंवा काही दुर्दम्य वासना शिल्लक आहेत म्हणून मी कर्म करतो असे जर तुला वाटत असेल तर नीट समजून घे की माझ्या एवढा परिपूर्ण असा जगात कोणीही नाही. तुला हे देखील माहीत आहे की माझ्याजवळ असीम सामर्थ्य एकवटलेले आहे. गुरू सांदीपनींचा मेलेला मुलगा मी यमलोकांत जाऊन प्रत्यक्ष यमाचा पराभव करून पुन्हा जीवंत करून आणला हे माझे सामर्थ्य तूं पाहिले आहेस. तरी पण मी मुकाट्याने माझे काम तत्परतेने करत असतोच.  अर्थात् हे सर्व मी निरपेक्ष बुध्दीने करतो, कारण हे सर्व जीव माझ्या आधीन असल्याने ते साहाजिकच माझे अनुकरण करतात. त्यांनी भलत्याच मार्गाने जावू नये आणि स्वधर्म पाळावा यासाठी मी स्वत: कार्यमग्न राहण्याची दक्षता घेतो.
मीच जर विरक्त होऊन अकर्तेपणाने आत्मस्थितीत स्वस्थ बसलो तर ही प्रजा कशी बरें उध्दरेल ? योग्य आचरणाचे सक्रिय उदाहरण त्यांचे समोर नसेल तर एकूणच सामाजिक सुव्यवस्थेची घडी बिघडून जाईल.
आणि म्हणूनच जो सामर्थ्यवान आणि ज्ञानसंपन्न आहे त्याने तर कर्मत्याग करूच नये !

फळाच्या लोभामुळे एखादा पुरूष साहाजिकच तत्परतेने कर्म करतो, पण तितक्याच तांतडीने अनासक्त ज्ञानी पुरूषाने ‘लोकसंग्रहार्थ’ सुयोग्य आचार पध्दतीचा शिरस्ता घालून दिला पाहिजे. समाजाची घडी विस्कटू नये म्हणून वारंवार तसा प्रयत्न करणे अत्त्यावश्यक होय.

“मार्गाधारें वर्तावें । विश्व हे मोहरें लावावें । अलौकिका नोहावें । लोकांप्रति ॥”
पुन्हा एक सुंदर नि महत्वाची ओंवी आहे ही !
संतांनी शास्त्रविहित धर्माचे म्हणजेच नीतीपूर्वक आचरण करून जगासाठी आदर्श निर्माण करावा. मात्र आपण स्वत: काही विशेष करतो आहोत असा अभिनिवेश कदापि नसावा.
असे पहा, जें बाळ आईचे दूधही सायासाने पिते त्याला पंचपक्वांनांचे जेवण कसे करता येईल ? अगदी तसेच शास्त्रसंमत कर्में करण्याची ज्या अज्ञानी माणसांची कुवत नाही, इतकेच नव्हे तर ज्यांना सामान्य कर्मेंही धड करता येत नाहीत, अशांना ज्ञान-प्राप्तीनंतर होणाऱ्या नैष्कर्म्य स्थितीबाबत अगदीं गमतीने हि सांगणे योग्य नाही. त्याला सत्कर्माकडे प्रवृत्त करावे, सत्कर्माचा गौरव करावा, मात्र त्याआधीं स्वत: सत्कर्म करून आदर्श घालून दिला पाहिजे.
लोक-कल्याणासाठीं केलेले कर्म कधीही बंधनकारक ठरत नसते. एखादा बहुरूपिया राजाराणीची सोंगें घेतो. मात्र त्याच्या मनांत स्त्रीपुरूष असा भेद सोंग घेतांना नसतो, तो केवळ ते सोंग लोकरंजनार्थ घेतो. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरूष निष्काम वृत्तीने लोककल्याणाची कर्में करत असतो : म्हणून  त्याला त्या कर्माचें बंधन राहात नाही.

असे पहा, आपण जर दुसऱ्याच्या डोक्यावरचे जड ओझे आपल्या डोईवर घेतले तर त्या भाराखालीं आपण दबून जाणार नाही काय ? प्रकृतीच्या त्रिगुणांमुळे बरी-वाईट कर्में निपजत असतात, मात्र त्या कर्मांचा आपणच कर्ता असल्याच्या अहंकारापोटीं अज्ञानी जीव त्या कर्मांच्या फळाखालीं भरडला जातो. असा अहंकारी, स्वार्थी, संकुचित वृत्तीचा माणूस मूढ असतो. अशा माणसांना गूढ परमार्थाचा बोध करू नये.

तें सर्व आता बाजूला ठेवून आतां मी तुझ्या हिताच्या चार गोष्टी सांगेन म्हणतो, त्या लक्ष देऊन ऐक !
(क्रमश:…...



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?