Saturday, March 10, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग आठवा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग आठवा)
भगवान् श्रीकृष्णांनी अर्जुनाला आतांपर्यंत “सांख्य-स्थिति” म्हणजे आत्मज्ञानाचें स्वरूप थोडक्यांत समजावून सांगितले. सांख्यस्थिति म्हणजे सांख्यमार्ग किंवा ज्ञानमार्ग ; सांख्ययोग नव्हे.
म्हणून आतां बुध्दियोग अर्थात् सांख्ययोग किंवा ईश्वराचा ऐश्वर्ययोग सविस्तरपणें सांगतील. ज्याला हा बुध्दियोग अथवा निष्काम कर्मयोगाची बुध्दि साधली तो सर्व कर्मबंधनांतून मुक्त झाला, असे श्रीज्ञानदेव म्हणतात. उदाहरण देतात वज्रकवच म्हणजेच चिलखत धारण करून रणांगणावर उतरण्याचे, जेणेंकरून शस्त्रवर्षाव सहजपणे झेलत असतानाच तो योध्दा कोणतीही इजा न होतां यशस्वीपणे बाहेर पडतो. अशा निष्काम कर्मयोगाच्या युक्तीमुळे प्रापंचिक जीवनात तर अडचण येत नाहीच, पण पारमार्थिक मोक्षदेखील सहजसाध्य होतो.
आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य-कर्म तर करावेच, पण कर्मफलाची आसक्ती नसावी, जशी मांत्रिकाला पिशाच्चबाधा संभवत नाही. निष्काम कर्म करण्याची सद्बुध्दी झाली की विषयांचे जंजाळ जवळ असूनही त्याचा उपसर्ग होत नाही. अशा बुध्दींत सकाम पुण्य किंवा पापाला प्रवेश नाही, कारण ती अतिसूक्ष्म अशा ‘एकतत्वा’त स्थिरावलेली असते. म्हणून तिच्यावर सत्व-रज-तमादि त्रिगुणांचा लेप लागत नाही. अर्जुना, ती सद्बुध्दि आपल्या पूर्वपुण्याईने हृदयांत थोडीतरी उत्पन्न झाली तर जन्ममृत्यूरूपीं प्रपंचाची भीती नष्ट होते.

(खूपच भारी होतंय् नाही हे सर्व समजायला ? आपण निदान दिवाणखान्यात आरामात बसून हे वाचतो किंवा ऐकत आहोत. त्या बिचाऱ्या अर्जुनाचा विचार करून बघा ! तो तर डोक्याला हात लावून विमनस्क स्थितींत बसलाय् हे सर्व तत्वज्ञान ऐकत !! ) असो.
पुढे  पुन्हा एक चांगला श्लोक येतो, आपल्याला कदाचित् सहज समजेल असा. नि तो आहे,
 “व्ययसायात्मिका बुध्दिरेकेह कुरूनंदन । बहुशाखा:च अनंता: बुध्दयोsव्यवसायिनाम् ॥४१॥”
 (अर्जुना, या मोक्षमार्गावर निश्चयात्मक बुध्दी एकच आहे आणि ध्येयही एकच आहे ; परंतु अनिश्चयी वृत्तीच्या बुध्दीला अनेक भेदयुक्त फाटे फुटलेले असतात. )

समजतंय् काही ? असू देत. ज्ञानदेव यांवर काय म्हणतात ते पाहू.

‘जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रकटी । तैसी सदद्बुध्दि हें थेकुटी । म्हणों नये ॥”  पणती किंवा निरांजनाची ज्योत लहानशी असली तरी बक्कळ प्रकाश देते. अगदी तसेच फलाशा न बाळगणारी सद्बुध्दि अपवादाने अनुभवास आली तरी तिचा प्रभाव थोर असतो, तिला झिडकारू नये. ती खरोखर दुर्लभ असते, जसे सगळेच दगड काही परीस नसतात, किंवा अमृताचा एखादा थेंब मिळवायला भाग्य लागते. गंगा जशी समुद्रात विलीन होते, तशी ईश्वरचरणीं लीन होणारी बुध्दीच सद्बुध्दि होय.

दुसरी जी दुर्बुध्दी, ती अनेक प्रकारे विस्तारते आणि तिच्यात अविवेकी लोक अखंडपणे रममाण होतात. आणि म्हणून असे अविचारी लोक स्वर्ग, प्रपंच नि नरकाची अवस्था यांत गुरफटून जातात. त्यांना आत्मसुखाचा आनंद नि अनुभव उपभोगता येत नाही. वेदांचे प्रमाण देऊन आपले मत मांडणारे किंवा कर्मसिध्दांत सांगणारे फलप्राप्तीची आस बाळगून असतात.
इहलोकीं जन्म घ्यावा, यज्ञ-दान इत्यादि कर्में करावीत आणि मग मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा, कारण या पृथ्वीतलावर अशा स्वर्गसुखावाचून दुसरे सुख असूच शकत नाही असे बोलतात. ते निखालस दुर्बुध्दि होत अर्जुना !
असे लोक मन मानेल तसे केवळ फळाच्या आशेनें कर्में करतात. अनेक प्रकारची व्रत वैकल्ये, धर्मग्रंथांत सांगितल्याप्रमाणे विधिपूर्वक करतात. मात्र एकच घोडचूक करतात. स्वर्गाची कामना मनांत ठेवून केल्यामुळे ते सर्व  व्यर्थ ठरते. श्रमपूर्वक मिळवलेले पुण्य केवळ प्रापंचिक सुखाची इच्छा धरल्यामुळे का वायां घालवतात ? ही तर नि:संशय दुर्बुध्दीच !

सद्बुध्दि नि दुर्बुध्दीचा अशाप्रकारें उहापोह केल्यानंतर भगवन्त आता अर्जुनाला म्हणजेच आपल्याला कसे असावे, काय करावे नि काय करूं नये याचे निश्चित असे मार्गदर्शन करतील. गीता-ज्ञानेश्वरीतला तो भाग अतिशय महत्वाचा आहे. सबब आपण ताजेतवाने होऊन ते सर्व पुढील भागांत अभ्यासूं.
(क्रमश:…….


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?